संजू सॅमसनचे कौतुक करताना गंभीरने सुनावले खडे बोल; वैयक्तिक विक्रमांच्या मानसिकतेवर ओढले ताशेरे

0

वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाच्या विजयाला प्राधान्य देणारी मानसिकता भारतीय खेळाडूंनी दाखवली, असे भारताचा मुख्य क्रिकेट प्रशिक्षक गौतम गंभीर याने म्हटले आहे. गंभीर यांनी विशेषतः संजू सॅमसनचं कौतुक केलं. स्पर्धेदरम्यान सॅमसन तीन वेळा ८०-९० धावांच्या आसपास बाद झाला, मात्र त्याने शतकाचा विचार न करता संघासाठी आक्रमक फलंदाजी कायम ठेवली. ‘खेळाडू ९७ किंवा ९८ धावांवर असताना शतकासाठी सुरक्षित खेळण्यापेक्षा संघाच्या गरजेनुसार षटकार मारण्याचा प्रयत्न करावा,’ अशी भूमिका गंभीरने मांडली.

गंभीरच्या या वक्तव्यावर इंग्लंडचा माजी गोलंदाज स्टिव्ह हार्मिसनने ही विराट आणि रोहीतवर अप्रत्यक्ष टीका असल्याचं म्हटलं आहे. गंभीरचा इशारा विराट, रोहीतवरच आहे, असं हार्मिसनने एका टीव्ही वाहिनीवर हे बोलून दाखवलं. टॉकस्पोर्ट क्रिकेटवर बोलताना हार्मिसन म्हणाला की, ‘गंभीर यांनी संघाच्या विजयाला वैयक्तिक टप्प्यांपेक्षा महत्त्व दिल्याबद्दल बोलणे मला आवडले. पण, त्याचवेळी हे बोलणं रोहित आणि कोहलीवर हलकी टोमणे असल्यासारखे वाटले.’

गंभीर याने स्पष्टपणे सांगितले की, वैयक्तिक विक्रम साजरे करण्यापेक्षा संघाने जिंकलेली ट्रॉफी अधिक महत्त्वाची असते. ‘जर एखादा फलंदाज ९७ धावांवर असताना तीन सिंगल घेऊन शतक पूर्ण करतो, तर तो स्वतःसाठी खेळत आहे. त्या क्षणी संघाला गरज असेल तर ९७ वर बाद झाला तरी षटकार मारण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरेल,’ असे गंभीरने सांगितले. त्यामुळे त्याच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट विश्वात मोठी चर्चा रंगली आहे. आणि विराट, रोहीतचं एकदिवसीय संघातील स्थान पक्कं नसल्याचं बोललं जात आहे. सध्या कोहली आणि रोहित हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय नसले तरी ते एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी खेळत आहेत. त्यामुळे आगामी एकदिवसीय मालिकांमध्ये ते पुन्हा संघात परतल्यावर ड्रेसिंग रूममधील वातावरण कसे असेल, याबाबत उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech