प्रश्न जर इंग्लिश-मराठीच्या स्थानाच्या तुलनेचा असेल; तर इंग्लिश ही काही जगाच्या आरंभापासून जागतिक महत्त्व लाभलेली भाषा नव्हती. सुरुवातीला तर ग्रीक-लॅटिनच्या वर्चस्वाच्या काळात युरोपमध्ये तिला गावठी भाषा असेच संबोधिले जात होते. तिचे स्वरूप आणि स्थान विस्तारले ते इंग्लिशभाषकांच्या कर्तृत्वामुळे आणि स्व-भाषेच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या अविश्रांत परिश्रमांमुळे. मराठीचे भविष्यातील स्वरूप आणि स्थान हे, मराठीभाषक वर्तमानात किती कर्तृत्व गाजवतात आणि मराठीच्या सक्षमीकरणासाठी किती परिश्रम करतात, ह्यांवर अवलंबून असेल.
सुमारे दोन-अडीच हजार वर्षांत महाराष्ट्री-महारट्ठी-मरहट्ठी-मर्हाटी-मराठी अशा अनेक नावांनी आणि विविध भाषिक अवस्थांतून मराठीचा एक भाषा म्हणून होत आलेला समृद्ध प्रवास; तिच्या ‘अभिजात भाषा’ असण्यावर लवकरच होणार असलेले सरकारी शिक्कामोर्तब; मराठी बोलणार्यांची अकरा कोटींहून अधिक इतकी मोठी संख्या; त्यामुळे भाषकसंख्येबाबत जगात पहिल्या पंधरा भाषांत असलेले स्थान; सुमारे 72 देशांत विविध क्षेत्रांत काम करीत असलेले मराठीभाषक; दरवर्षी मराठीत प्रकाशित होणारी हजारो पुस्तके आणि शेकडो दिवाळी अंक; साहित्यसंमेलनांची अनन्यसाधारण परंपरा आणि ज्ञानेश्वरांपासून ते ज्ञानपीठाने सन्मानित साहित्यिकांपर्यंत मराठी साहित्यविश्वातील वर्धिष्णू मांदियाळी इत्यादींचा विचार करता, ‘इये मराठीचिये नगरी’ सारे काही आबादीआबाद आहे, असे कुणालाही वाटू शकते.
परंतु येथे हे लक्षात घ्यावयास हवे की, ‘वाटणे’ आणि ‘असणे’ ह्यांत महदंतर असते. तपशील अनेकदा फसवे असू शकतात. मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ ही मान्यता अवश्य मिळावी; पण तिला ‘अभिजात भाषा’ ही उपाधी मिळणे हे सध्या अधिक महत्त्वाचे आहे, की तिचे एक भाषा म्हणून लोकव्यवहाराच्या सर्व क्षेत्रांत ‘जिवंत’ राहू शकणे? मराठीभाषकांच्या विशाल संख्येचा अभिमान बाळगायचा, की महाराष्ट्रात बंद पडत असलेल्या मराठी माध्यमाच्या शाळांच्या संख्येकडे पाहून लाज वाटून घ्यायची? मराठी लोक विविध देशांत विविध क्षेत्रांत काम करीत आहेत, हे खरे; पण ह्या परदेशस्थ मराठीभाषकांकडून त्या-त्या देशातील भाषा आणि ज्ञानक्षेत्रे, कार्यक्षेत्रे ह्यांबाबत मराठीत किती ज्ञानसाधने निर्माण केली जाताना दिसताहेत? आजच कितीतरी मराठी तरुण-तरुणींना अंक आणि वारांची नावेसुद्धा मराठीत सांगता-लिहिता येत नाहीत, मग येणार्या पिढ्यांना ज्ञानेश्वर वा नेमाडे कितपत रुचू-पचू शकणार आहेत? तात्पर्य, भाषाविकासाचा विचार करताना, भाषकसंख्या, अन्य तत्सम आकडेवारी किंवा इतिहास-परंपरा असे निकष फसवे ठरू शकतात. खरे म्हणजे, एखाद्या भाषिक समूहातील वर्तमानकाळातील भाषाव्यवहाराची गुणात्मक पातळी आणि त्या समूहाकडून भविष्यातील भाषासंवर्धनाच्या दृष्टीने केले जाणारे नियोजन ह्यांचा विशिष्ट भाषेच्या विकासाशी संबंध असतो.
ह्यादृष्टीने विचार करता, मराठीचा विकास होण्याकरिता महाराष्ट्रातील कुटुंबजीवन, दैनंदिन व्यवहार, शिक्षण-न्याय-प्रशासनादी क्षेत्रे, प्रसारमाध्यमे, कलाव्यवहार अशा सर्वच ठिकाणी मराठी आधिक्याने वापरली जायला हवी. दुसर्या शब्दांत सांगायचे तर, ती व्यवहारभाषा, संवादभाषा म्हणून जिवंत राहायला हवी. दुसरे म्हणजे, एक ज्ञानभाषा म्हणूनही ती सर्वतोपरी विकसित व्हायला हवी. विविध भाषा, ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान, विद्या-कला शिकण्यासाठी उपयुक्त अशी अद्ययावत ज्ञानसाधने तिच्यात निर्माण करायला हवीत. व्यवसायभाषा म्हणूनही तिचा परीघ विस्तारायला हवा. त्यासाठी मराठीच्या नावावर केवळ राजकारण खेळण्याचे प्रकार थांबवून, महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांत मराठीभाषकांनी प्रभावस्थानी पोहोचायला हवे आणि त्यांनी आपले हे प्रभावी स्थान ह्या सर्व क्षेत्रांतील मराठीच्या विकसनासाठी विधायक, रचनात्मक मार्गांनी उपयोगात आणायला हवे. उत्तम साहित्यनिर्मितीच्या जोडीने नवनवीन ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कलाविष्कार ह्यांच्या अभिव्यक्तीसाठी मराठी सक्षम होण्याकरिता उपलब्ध कोशादी ज्ञानसाधनांचे अद्ययावतीकरण केले जायला हवे; तसेच आवश्यक त्या नवशब्दांची किंवा संबोधांची निर्मिती व रुजवण ह्यासाठी प्रयोगशील प्रयत्न व्हायला हवेत. नव्या मनूची चाहूल ओळखून संगणक, आंतरजाल, समाजमाध्यमे, भ्रमणध्वनी, अनुप्रयोग (अॅप्लिकेशन्स) ह्यांत मराठीची मोहर उमटवण्याचे नियोजनपूर्वक प्रयत्न करायला हवेत. त्याकरिता आवश्यक ते संशोधनप्रकल्प हाती घ्यायला हवेत. आतापर्यंतच्या मांडणीतून हे सहज लक्षात यावे की, मराठीचे एक भाषा म्हणून सक्षमीकरण किंवा संवर्धन हा अनेक पैलू, अनेक कंगोरे असलेला असा एक बहुआयामी, व्यामिश्र विषय आहे. प्रस्तुत लेखात ह्यांपैकी एका प्रमुख पैलूबाबत विचार करावयाचा आहे, तो म्हणजे मराठीच्या विकासासाठी, तिच्या सक्षमीकरणासाठी तिच्यात उपलब्ध असलेल्या शब्दांचे जतन आणि नवशब्दांची निर्मिती ह्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे.
वस्तुतः मराठी भाषेत असंख्य अर्थच्छटांसाठी समर्पक असे विपुल शब्दभांडार आहे. तरीही दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी, मराठी-राजभाषादिनी मराठी-अभिमानगीत म्हणून ओळखली जाणारी सुरेश भट ह्यांची मायबोली ही कविता कानावर पडते; तेव्हा तिच्या ‘लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी’ ह्या पहिल्याच पंक्तीशी मन अडखळते, ठेचकाळते. कारण असे ‘भाग्य लाभलेले’ किती मराठीभाषक जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आवर्जून मराठीत बोलताना दिसतात? आणि जे मराठीत बोलतात; त्यांच्या बोलण्यात, शब्दयोजनेत, वाक्यरचनेत मराठीपण किती असते आणि ‘मी तिला मनवले’, ‘टीव्ही ऑन कर’ ह्या धाटणीचे हिंदी-इंग्लिशचे उसने वाण किती असते? ह्या प्रश्नांची कटुसत्यवत् उत्तरे सर्वांना ठाऊक आहेत. सध्या महाराष्ट्रात मराठी नव्हे, तर ‘मिंग्लिश’ (इंग्लिशमिश्रित मराठी) आणि ‘मिंदी’ (हिंदीमिश्रित मराठी) ह्या व्यवहारभाषा, संवादभाषा म्हणून प्रचलित होताना दिसतात. महानगरीकरण, मिश्रभाषिक वस्ती ह्यांमुळे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत (आजकाल तर पुण्यातही,) ह्या प्रवृत्तीने कळस गाठलेला दिसतो. त्यांतही काही अपवादात्मक व्यक्ती ह्या आवर्जून अस्खलित मराठीत जीवनव्यवहार करताना दिसतात. ह्या व्यक्ती, मराठी शब्दभांडाराच्या जतनाकरिता चाललेल्या त्यांच्या प्रयत्नांकरिता, काही वेळा कौतुकाच्या धनी ठरताना दिसतात; तर काहीवेळा टिंगलीचा विषयही ठरताना दिसतात. प्रश्न असा आहे की, प्राणिसंग्रहालयातील दुर्मिळ प्रजातीतील प्राण्यांकडे पाहताना घडते त्याप्रमाणे अस्खलित/संपूर्ण मराठीत बोलणार्या ह्या व्यक्तींविषयी अप्रूप वाटणे किंवा त्यांच्यावर खडे मारून त्या चेकाळतात का हे बघणे, ह्या मराठी समाजाकडून सध्या घडत असलेल्या वर्तनापेक्षा, मराठी भाषेत आधिक्याने मराठीतील उपलब्ध किंवा नवनिर्मित शब्द योजणे ही मराठी समाजातील एक सहजप्रवृत्ती, एक सर्वसामान्य गोष्ट का बनू नये?
ती तशी बनताना दिसत नाही, ह्या गोष्टीच्या मुळाशी हिंदीचे भारतातील, तसेच इंग्लिशचे विश्वातील महत्त्व ह्यांपेक्षाही मराठीभाषकांच्या काही भूमिका, काही समजुती कारणीभूत असलेल्या दिसतात. कित्येकदा मराठीत अधिक्याने मराठी शब्द योजणार्यांवर आक्षेप घेणार्यांची (ह्यांमध्ये अनेकदा मराठीच्या क्षेत्रातील प्राध्यापक, साहित्यिक, माध्यमकर्मी, कलाकार आदींचा समावेशही दिसतो) अशी भूमिका असते की, असे मराठी शब्दयोजनेसंबंधी आत्यंतिक आग्रह धरणे हे मागासलेपणाचे, बुरसटलेपणाचे, संकुचित दुराग्रही वृत्तीचे लक्षण आहे. भाषा ही प्रवाही, परिवर्तनशील असते. बदलत्या जीवनप्रवाहाशी जुळवून घेण्यासाठी भाषा ह्या अन्य भाषांतून शब्दांचे, संकल्पनांचे आदान (पक्षी : आयात, घेवाण, उसनवारी) करीतच असतात. इंग्लिशमध्ये जगभरातील विविध भाषांतून असे कितीतरी शब्द आदत्त झाले आहेत. मराठीने असे आदान करणे ह्यात वावगे ते काय? ते तिच्या जिवंतपणासाठी आवश्यकच आहे. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात मराठी लोकांना विकास साधायचा असेल, तर अन्य भाषांच्या प्रभावांपासून मुक्त राहणे शक्य नाही. त्यांचे असेही म्हणणे दिसते की, इंग्लिश शब्दांसाठी मराठीत जे पर्यायी शब्द वापरले जात आहेत, ते तरी सगळे कुठे निखळ मराठी आहेत? ‘डोअर’ असे न म्हणता, त्याला ‘दरवाजा’ असे संबोधिणार असू, तर तोही अरबी-फार्सीतून आयातच केला गेलेला शब्द आहे की ! मग डोअर म्हटले तर कुठे बिघडते? हिंदी-इंग्लिशचे अतिक्रमण टाळून मराठी शब्दांचे जतन व नवशब्दनिर्मिती करणार्यांविषयी आक्षेप घेणार्यांचा एक मुद्दा असाही असतो की, हिंदी-इंग्लिश शब्दांऐवजी मराठीत जे शब्द शोधून किंवा नव्याने घडवून योजिले जात आहेत, ते फारच क्लिष्ट, अवघड, बोजड आहेत. त्यांच्यापेक्षा हिंदी किंवा इंग्लिश शब्द अधिक सोपे, सुटसुटीत वाटतात. ह्या लोकांचा अजून एक मुद्दा हा असतो की, शेवटी अभिव्यक्ती महत्त्वाची होय आणि मराठीत सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीसाठी (उदाहरणार्थ, विज्ञान, माहिती-तंत्रज्ञानातील संकल्पना) चपखल प्रतिशब्द असू किंवा बनू शकत नाहीत. असा अट्टहास उगाच करू नये.
ह्यांतील एकेका आक्षेपाचा विचार करू या. एखाद्या भाषेत दुसर्या भाषेतून घडणारे आदान हे अभिव्यक्तीची गरज भागविण्यासाठी (उदाहरणार्थ, इटलीच्या खाद्यसंस्कृतीतून पिझ्झा हा पदार्थ घेतल्यामुळे, त्याच्यासाठीच्या संबोधाची आवश्यकता पूर्ण करण्याकरिता पिझ्झा हा शब्दही आयात करणे.) थोड्याफार प्रमाणात घडते; तेव्हा ते स्वाभाविक असते. ते आदान करीत असलेल्या भाषेची प्रकृती बिघडवत नाही. पण मराठीत विशेषतः इंग्लिशमधून घडत असलेले शब्दांचे आदान हे इतक्या थोडक्या प्रमाणातले आणि निव्वळ अभिव्यक्ती-पूर्ततेच्या स्वाभाविक गरजेतून घडणारे आदान नाही. दीडशे वर्षांच्या गुलामीची विशिष्ट ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यातून एकंदर भारतीय समूहमानसात भिनून राहिलेला जितपणाचा न्यूनगंड ह्यांमुळे अनेक भारतीय भाषांप्रमाणे मराठीत बर्याचदा जेत्यांची, विकसितांची प्रतिष्ठा लाभण्यासाठी ‘शब्दादान’ घडताना दिसते. उदाहरणार्थ, ताट, चमचा, भात, वाढदिवस असे मराठीत उपलब्ध असलेले शब्द न योजता डिश, स्पून, राइस, बर्थडे असे शब्द योजणे. ह्या प्रकारच्या आदानाची मराठीतील व्याप्ती इतकी वाढत चालली आहे की, मुळात मराठीत असलेले शब्द वापरले न गेल्यामुळे विस्मरणाच्या अडगळीत पडत आहेत. आदान हे एखाद्या भाषेतील पोकळी भरून काढण्यासाठी करावे. आदानामुळे एखाद्या भाषेतील मूळची समृद्धी अडगळीत जाऊन पडू नये. न वापरल्यामुळे माणसाचे शेपूट झडत गेले, तसे न वापरल्यामुळे मराठीतले अनेक चांगले-चांगले शब्द विस्मरणात जात चालले आहेत. उदाहरणार्थ, ‘नमनाला धडाभर तेल’ ह्या वाक्प्रयोगातील ‘धडा’ ह्या शब्दाचा एकेकाळचा ‘विशिष्ट माप’ हा अर्थच माहीत नसल्यामुळे, आपण ‘नमनाला घडाभर तेल’ म्हणू लागलो आहोत. दुसरे असे की, आदानात ‘शब्दादान’ हा एकच प्रकार नसतो. आळशीपणे शब्दादान करण्यापेक्षा, ‘भाषांतरादाना’च्या माध्यमातून स्वभाषेला अनुरूप असे नवनवीन शब्द घडवले जाऊ शकतात. भाषांतरदानातून घडवले गेलेले मधुचंद्र (हनिमून), उच्चभ्रू (हायब्रो) असे अनेक शब्द आज मराठीची शोभा वाढवताहेत.
येथेच दरवाजा चालतो, मग डोअर का नको? ह्या आक्षेपाचाही विचार करू या. मराठीच्या घडणीचा इतिहासक्रम लक्षात घेता, विविध कारणांनी तिच्यात संस्कृत (जन्य-जनक-संबंध), कानडी (निकट सांस्कृतिक संबंध), अरबी-फार्सी (जित-जेते-संबंध) अशा अनेक भाषांतील शब्द समाविष्ट होत गेले आहेत. काळाच्या ओघात मराठीत त्यांचे आत्मसातीकरण (लिंग, वचन आदी व्याकरणिक वैशिष्ट्यांची निश्चिती) पूर्ण होऊन ते स्थिरावले आहेत, मराठीच्या प्रकृतीशी जुळवून घेत ते तिच्यात मिसळून गेले आहेत. त्यांना आज धक्का लावण्यात काहीच अर्थ वाटत नाही. आज हिंदीतून आणि इंग्रजीतून मराठीत येणारे शब्दांचे आणि वाक्यरचनांचे लोंढे हे असे मराठीच्या प्रकृतीत सरमिसळून न जाता, तिचा पोत बिघडवत आहेत. मुळात सतत मागत राहणारी व्यक्ती काय किंवा भाषा काय, ती कधीच सक्षम, समर्थ होऊ शकत नाही, कारण आपल्या बळावर आपल्या गरजा भागविण्याची सवय ती गमावून बसते आणि अशी व्यक्ती किंवा भाषा स्व-प्रतिष्ठा गमावून बसते. मराठीभाषक आपल्या अभिव्यक्तीच्या गरजा भागवण्यासाठी सतत दुसर्या भाषांचे आधार घ्यायला लागले, तर एक भाषा म्हणून मराठीच्या ठायी असलेल्या नवशब्दनिर्मितीच्या क्षमता वापराअभावी गंजून जातील आणि हळूहळू मराठीचे भाषा म्हणून असलेले स्वतंत्र अस्तित्वही धोक्यात येईल. थोडक्यात, मराठीप्रेमींचा विरोध भाषेला समृद्ध करणार्या, अपरिहार्यपणे घडणार्या आदानाला नाही; तर अनाठायी घडणार्या किंवा न्यूनगंडातून घडणार्या आणि भाषेची प्रकृती, स्वयंसक्षमता बिघडवणार्या उसनवारीला आहे.
अगदी त्याचप्रमाणे, सर्वतोपरी मराठी असे म्हणणार्या आमचा विरोध हा कुणी जागतिक नागरिक बनण्यास नाही; स्वतःचा विकास साधण्यास नाही आणि अन्य भाषा शिकण्यास तर अजिबातच नाही. आमची भूमिका अशी आहे की, आपली भाषा नीट आत्मसात केल्याशिवाय, आपली ज्ञानात्मक, भावनात्मक, सामाजिक, सांस्कृतिक मुळे पक्की होत नाहीत आणि आभाळात तेच झाड अधिक उंच झेपावते, जे जमिनीत आपली मुळे घट्ट धरून राहते! स्वतःचा विकास अवश्य साधावा की; पण त्याबरोबर त्या विकासाची गंगा आपल्या भाषेत खेळती करण्याची जबाबदारीही का घेऊ नये? इंग्रजांनी जिथे-जिथे व्यापार नेला, साम्राज्यविस्तार केला, तिथे-तिथे त्यांच्यासोबत इंग्रज विद्वानही गेले. त्यांनी तिथल्या भाषा, ज्ञान, सांस्कृतिक संचित शिकण्यासाठीची साधने इंग्लिशमध्ये निर्माण केली आणि म्हणून इंग्लिश एक ज्ञानभाषा म्हणून समृद्ध झाली. आपला विकास साधण्याबरोबरच मराठी बुद्धिवंतांनी, कीर्तिमंतांनी आपापल्या विषयांसंबंधी आवर्जून मराठीत लेखन करायला हवे. त्यांनी आपल्या क्षेत्रांसाठीचे पारिभाषिक शब्द मराठीत कसे तयार होतील, ह्याकडे लक्ष द्यायला हवे. मध्ययुगात ज्ञानेश्वर-एकनाथांनी असा आग्रह धरला, म्हणूनच संस्कृतचा वरचष्मा असतानाही मराठीत अध्यात्म, तत्त्वज्ञानविषयक परिभाषा रुजू शकली. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘राज्यव्यवहारकोशा’च्या रूपाने मराठीच्या पाठीशी सत्तेचे बळ उभे केले, म्हणून तर अरबी-फार्सीच्या अतिक्रमणाचे मराठीवर उमटलेले परिणाम बर्याच अंशी दूर होऊ शकले. ब्रिटिश राजवटीत बाळशास्त्री जांभेकरांपासून न्यायमूर्ती रानडे, आगरकर, टिळक ह्यांच्यापर्यंत अनेक विद्वानांनी फर्डे इंग्लिश येत असतानाही आवर्जून मराठीत लेखन केले. म्हणूनच अर्वाचीन मराठीच्या प्रमाण गद्यधाटणीची घडण होऊ शकली. अगदी नजीकच्या काळातही माधव जुलियन, स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांचे मराठी नवशब्दनिर्मितीसाठीचे प्रयत्न, तसेच मराठीत विज्ञानसाहित्यनिर्मिती करणार्या जयंत नारळीकरांसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वैज्ञानिकाचे प्रयत्न हे आपल्यासमोर अनुकरणीय आदर्श ठेवणारे आहेत. ज्ञानवंतांची, प्रतिभावंतांची आणि लोकनेत्यांची मराठीविषयीची आस्थाच मराठीला समृद्ध करण्याच्या दृष्टीने आवश्यक अशा नवशब्दनिर्मितीला चालना देऊ शकेल.
आता प्रश्न राहतो तो इंग्लिश, हिंदी शब्दांसाठीचे मराठीतील जुने वा नवे प्रतिशब्द कठीण वाटण्याचा. मुळात आधुनिक भाषाविज्ञानाच्या मते, कुठलीही भाषा कठीण वा सोपी नसते. ‘फोटोग्राफ’ आणि ‘छायाचित्र’ (वा ‘प्रकाशचित्र’) ह्या शब्दांत सोपेपण, कठीणपण ह्या संदर्भात तसा काही फरक दाखवता येत नाही. भाषा ही एक सामाजिक सवय असते, हे लक्षात घेतले; तर कौटुंबिक जीवन, शिक्षणप्रक्रिया आणि प्रसारमाध्यमे ह्यांतून नवीन शब्द जनमानसात रुजवण्यासाठी सातत्याने, आस्थेने प्रयत्न केले, ह्या शब्दांची समाजाला सवय लावली, तर अवघडपणाचा प्रश्न उद्भवणार नाही. प्रतिशब्दांच्या संदर्भात ह्याच धर्तीचा अजून एक आक्षेप असतो तो म्हणजे, संस्कृतच्या शब्दसाधनिकेच्या आधारे नवीन शब्द तयार करण्याविषयी. असा कुणाचा आक्षेप असेल, तर त्यांनी बोलींच्या आधारे तयार केलेले नांगरगाडा (ट्रॅक्टर), फिरबोल (मोबाइल) असे शब्द योजावेत. किंबहुना ह्या प्रकारचे अधिकाधिक शब्द तयार करावेत. अभिजन-बहुजन किंवा त्या धर्तीचे नुसतेच वाद-प्रतिवाद ह्यांतून मराठीचे आजवर खूप नुकसान झाले आहे. आता ह्या वादांच्या पलीकडे जात, मराठीच्या सक्षमीकरणासाठी सर्व घटकांनी आपली ताकद एकवटण्याची; ‘धर्म, जात, पंथ एक जाणतो मराठी’ ही भूमिका घेण्याची गरज आहे.
काहींचे असे म्हणणे दिसते की, मुळात मराठी आणि इंग्लिश ह्यांची तुलनाच होऊ शकत नाही. मराठी ही केवळ एका राज्याची भाषा आहे, तर इंग्रजी ही विश्वभाषा आहे. मराठीत सर्व क्षेत्रांसाठी शब्द तयार होऊही शकत नाहीत आणि तशी काही आवश्यकताही नाही; कारण मुळात ह्या क्षेत्रांतील व्यवहार इंग्लिशमध्येच चालतो. आधी मराठीत सर्व क्षेत्रांसाठी शब्द तयार होऊ शकतात का? ह्या प्रश्नाचा विचार करू या. मुळात कुठल्याही मानवी भाषेत ध्वनिरूप (उदाहरणार्थ, झाड) आणि अर्थरूप (उदाहरणार्थ, झाड हा शब्द उच्चारताच जाणवणारी अर्थसंकल्पना) ह्यांत कार्यकारणभावावर आधारित नाही, तर योगायोगाने अस्तित्वात आलेला संबंध हा त्या-त्या भाषेतील शब्दचिन्हे घडवीत असतो. दुसरे असे की, कुठल्याही मानवी भाषेत अशा प्रकारचे अगणित नवरचनासंबंध तयार करण्याची क्षमता, म्हणजेच निर्मितीशीलता असते. त्यामुळे सर्व मानवी भाषांप्रमाणे मराठीतही आपल्याला हव्या त्या क्षेत्रांसाठी, हवे तितके नवीन शब्द घडवले, रुजवले जाऊ शकतात. प्रश्न जर इंग्लिश-मराठीच्या स्थानाच्या तुलनेचा असेल; तर इंग्लिश ही काही जगाच्या आरंभापासून जागतिक महत्त्व लाभलेली भाषा नव्हती. सुरुवातीला तर ग्रीक-लॅटिनच्या वर्चस्वाच्या काळात युरोपमध्ये तिला गावठी भाषा असेच संबोधिले जात होते. तिचे स्वरूप आणि स्थान विस्तारले ते इंग्लिशभाषकांच्या कर्तृत्वामुळे आणि स्व-भाषेच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या अविश्रांत परिश्रमांमुळे. मराठीचे भविष्यातील स्वरूप आणि स्थान हे, मराठीभाषक वर्तमानात किती कर्तृत्व गाजवतात आणि मराठीच्या सक्षमीकरणासाठी किती परिश्रम करतात, ह्यांवर अवलंबून असेल.
अनेक मराठी व्यक्ती, नियतकालिके, संकेतस्थळे, संशोधनसंस्था आपापल्या परीने आजही नवशब्दनिर्मिती आणि शब्दप्रसाराचे काम करीत आहेत. ह्याबाबत आंतरजालावर, भ्रमणध्वनीवर नवनवीन सुविधाही उपलब्ध होत आहेत. ह्या उपलब्ध सामग्रीत काही समन्वय, काही प्रमाणीकरण घडवता येईल का, ह्याचा विचार व्हायला हवा आहे. एकंदरीतच मराठीत उपलब्ध असलेले शब्द कटाक्षाने वापरात आणणे; प्रसंगी जुने शब्द नव्या संदर्भांच्या अभिव्यक्तीसाठी कल्पकपणे योजणे (उदाहरणार्थ, ऽ ह्या चिन्हासाठी मुक्काम हा शब्द वापरता येईल.) आणि गरजेनुसार नवनवीन शब्दांची मराठीत भर घालणे, ह्यांतून मराठीच्या विकासात, सक्षमीकरणात महत्त्वाचे योगदान घडू शकते. अर्थात, ह्यासाठी प्रयत्न करणे ही काही केवळ भाषाभ्यासक, मराठीचे प्राध्यापक आणि मराठीचे विद्यार्थी ह्यांची जबाबदारी नाही. मराठी साहित्यिक, प्रसारमाध्यम आणि मनोरंजन उद्योगातील मराठीभाषक, महाराष्ट्र सरकार, प्रशासन ह्यांच्याशी संबंधित व्यक्ती, विविध क्षेत्रांतील मराठीभाषक आणि सर्वसामान्य मराठी माणसे ह्यांनीही मराठी शब्दांचे जतन आणि नवशब्दनिर्माण ह्यांबाबत ‘शब्द शब्द जपुनी ठेव’ अशी ठोस भूमिका घ्यायला हवी आहे. त्याकरिता आपापल्या शक्तीनुसार जबाबदारी उचलायला हवी आहे. बेनयहूद एलिसारसारख्या काही व्यक्तींच्या ध्यासातून, अविरत विविधांगी प्रयासांतून केवळ धर्मभाषा म्हणून प्रचलित असलेल्या, लोकव्यवहारासाठीची घडण नसलेल्या हिब्रू भाषेचे व्यवहारभाषा म्हणून पुनरुज्जीवन घडून येऊ शकले; तर मुळात लाखो शब्द आणि अकरा कोटी भाषक गाठीशी असलेल्या मराठीसाठी सर्वतोपरी विकसित भाषा म्हणून आकाराला येणे हे फार अवघड ठरू नये. गरज आहे ती फक्त इच्छाशक्ती, प्रयोगशीलता, नियोजन, परस्परांतील समन्वय, एकी, आणि मुख्य म्हणजे आपल्या निजभाषेचा विकास साधण्याची दुर्दम्य प्रेरणा ह्यांची. बाबा आमटे ह्यांनी अन्य संदर्भात केलेल्या एका विधानाचा आधार घेऊन असे म्हणता येईल की, शब्दसामर्थ्याच्या आधारे मराठीचे सक्षमीकरण घडविण्याचे उद्दिष्ट गाठण्याकरिता, अशी सृजनशील साहसे हवी आहेत, जी भान ठेवून योजना आखतील आणि बेभान होऊन त्या अमलात आणतील.