ढम्या आता ह्या जगात नाही. पण आजही तो काही केल्या माझ्या मनातून जात नाही. वास्तव जगातून तो आता अस्पष्ट झालेला असला तरीही माझ्या मनात तो पूर्वीसारखाच स्पष्ट आहे. म्हणजे तो माझा कोणीतरी होता असं अजिबात नाही. पण काहीवेळा एखादं माणूस आपलं कुणीही नसतं तरी उगाच मनात कुठेतरी कायमचं राहून जातं तशातलाच हा प्रकार. ढम्या कोणी सर्वसामान्य माणूस नव्हता म्हणजे तो असामान्यही नव्हता. गावाच्या आणि जगाच्या दृष्टीनेही तो अतिसामान्य होता. तो सर्वसामान्य नव्हता, म्हणजे तो गतिमंद होता. मतिमंद नव्हे, तर गतिमंद! त्याच्या अब्बू-अम्मीला झालेलं ते बारावं आणि बारा अपत्यांमध्ये वाचलेलं एकमेव अपत्य! नियतीने देखील त्यांच्याशी काय डाव साधलेला देव जाणे! पण आधीची अकरा अपत्यं नेऊन वाचवलं ते मात्र ह्याला! कसा का असेना, पण शकिलाबानोचा- त्याच्या अम्मीचा त्याच्यावर विलक्षण जीव होता हेही तितकंच खरं! ती त्याला जिवापाड जपायची. ढम्याचे वडीलसुद्धा काही दीर्घायुषी ठरलेलेे नव्हते. तेसुद्धा लवकरच अल्लाहला प्यारे झालेले. त्यामुळे मोडकळीला आलेल्या घरात केवळ तिघं जणंच राहत. ढम्या, अम्मी आणि कायम सोबत करणारं दारिद्र्य! पण तशाही परिस्थितीत काबाडकष्ट करून तिने त्याला वाढवलं होतं, जिवापाड सांभाळलेलं होतं. माझी पिढी जेव्हा आठवणीत आली तेव्हा ढम्या हा बर्यापैकी लग्नाळू मुलगा झालेला होता. शाळेशी तर त्याचा काही संबंध आलेला नसावाच. साधी अक्षर ओळखसुद्धा झालेली नसावी. शाळेशी संबंध आलेला नसला तरीही त्याला सगळं काही माहिती असायचं. निदान तो तसा अविर्भाव तरी आणायचा.
पाच फुटापेक्षा जास्ती उंची, मजबूत बांधा, चौकोनी उभट चेहरा, बटबटीत भीती वाटावी असे डोळे, दाढीचे खुंट वाढलेले, केस अस्ताव्यस्त पसरलेले, सपाट तळवे असलेले तिरके पाय, ढगळपगळ कपडे, ते सुद्धा क्वचितच त्याच्या मापाचे. पँटचा कधी कधी एक पाय दुमडलेला. तर कधी कधी दोन्ही पाय पोटरीपर्यंत दुमडलेले. शर्टाची बटणंसुद्धा एकसारखी लावलेली सापडणार नाहीत. तीसुद्धा वर खाली. कपडे नीट धुतलेले असले पाहिजेत, अशी त्याचीसुद्धा अपेक्षा नसावी. घर आणि रस्ता, ह्यामधील मोकळ्या जागेत ठेवलेल्या पायरीवर बसून तो आंघोळ करताना दिसायचा. म्हणजे तो आंघोळ करायचा. पण तो आंघोळ करीत असावा ह्यावर विश्वास ठेवावा की न ठेवावा असा संभ्रम निर्माण व्हावा, इतका तो मळकट असायचा. पण त्यामुळे त्याचं काहीही अडत नव्हतं. त्याचा आला दिवस नीट जात होता, हे सुद्धा तितकंच खरं होतं. त्याच्या भीतीप्रद डोळ्यांमुळे आणि टीपेच्या घोगरट आवाजामुळे लहान मुलं- अगदी मीसुद्धा लहान होतो तेव्हा- ढम्याला टरकून असायची. तो दिसला की बरोबरच्या माणसाचा आडोसा घ्यायची, रस्ता बदलायची किंवा धूम ठोकून पळूनसुद्धा जायची! माझ्या बहिणीसुद्धा तो बघ, तो बघ ढम्या आला बघ किंवा ढम्याला बोलवू? ढम्याला देऊन टाकू? वगैरेसारखी भीती घालून मला घाबरवायच्या. मीसुद्धा घाबरायचो. दहशतवादाचा मागमूसही नसलेल्या त्या काळात, बच्चे कंपनीसाठी ढम्या म्हणजे एक दहशतवादीच होता! पण खरोखर निरुपद्रवी दहशतवादी!!
‘काय ले काय? गप्प बस की पकलून नेऊ? किंवा ‘शालेत नाय जात? चल, शालेत जा’. ढम्याने भरलेला एवढा दमसुद्धा पोरांना पुरेसा व्हायचा. दोन-तीन अक्षरांशी ढम्याचं वैर होतं. त्यामुळे त्याच्या बोलण्यात थोडासा बोबडेपणा होता. पण त्यामुळे फार काही बिघडत होतं अशातला भाग नव्हता. त्याचा तार सप्तकातला आवाज त्याच्या बोबडेपणावर मात करायचा. नियतीने त्याच्याशी झगडा केलेला होता हे खरं पण तो सुद्धा नियतीशी झगडलेला होता. नाक्यावरुन मुंबईला जाणार्या एसटीच्या टपावर तो कुणाचे तरी सामान चढवायला चढला होता. तो टपावर असतानाच मास्तरने बेल मारली आणि गाडीने वेग पकडत ती पन्नास शंभर मीटर पुढे धावली. ढम्या वरून पडला किंवा त्याने उडी मारली. तो वाचला पण त्याच्या कमरेला थोडासा मार लागला असावा. तेव्हापासून तो पुढे झुकून, थोडासा डुलल्यासारखा चालू लागला. त्याचं वाचणं ही त्याच्यातील कणखरपणाची साक्ष होती.
ढम्या काही कुठे कायमस्वरूपी नोकरीधंद्याला नव्हता. कोणाकडे कायमस्वरुपी राहून कामधंदा करावा हा त्याचा पिंडधर्म सुद्धा नव्हता. गिरधर शेठ, खेडेकर मामा, तावडे ताईंच्या किराणा दुकानातील वाण सामान कोणाच्या ना कोणाच्या घरपोच कर, एसटीवर आलेला पेपरचा गठ्ठा श्रीकृष्ण हॉटेलात आणि तिथून विकत घेऊन पेपर वाचणार्यांच्या घरी पेपर टाक, गिरणवाल्या ताईकडून दळण घरपोच कर, सायकलवाल्या बाबूतात्यांकडे स्टोव्ह नाहीतर पेट्रोमॅक्स रिपेअरला ने आणि रिपेअर झाल्यावर ज्याची त्याला दे, त्याच्याशी गट्टी जमलेल्या पोराला शाळेत ने-आण, मासळी बाजारातून कुणाचे मासे घरी नेऊन दे, कुणाचे निरोप पोहोचव, मुंबईहून कुणाचे पाहुणे आले की त्यांच्या बॅगा न सांगता डोक्यावर घेऊन त्यांना इच्छितस्थळी पोहोचव, अंगण सारवायला कुणाला शेण आणून दे, कुठे मेेलेली घूस, कुत्रं, मांजर उकिरड्यावर फेकून दे, कुणाच्या आवारातलं गवत काढून टाक… एक ना हजार कामं तो करायचा. तीसुद्धा विश्वासानं. कुठल्या कामात तो हात मारील याची अजिबात शक्यता नव्हती. उभ्या गावाचा त्याच्यावर विश्वास होता. त्या विश्वासाला त्यानेसुद्धा तडा जाऊ दिला नाही.
केल्या कामाचे कुणी आठ आणे-रुपया, दोन-पाच रुपये जे काही हातावर टेकवील ते तो घ्यायचा आणि दुसर्या कामाला धूम पळायचा. निरोप्या म्हणून त्याच्यावर असलेली जबाबदारी तो इमाने इतबारे निभावायचा. ‘अमक्याला बोलावून आण’ असं तमक्याने सांगितलं, की अमक्याला हुडकून काढून तमक्यासमोर उभं करीपर्यंत ढम्याला चैन पडायची नाही, त्यांना एकमेकासमोर उभं केलं की, ‘ बघ, हानला का नाय शोदून? मंऽऽग…‘ अशी पुस्ती जोडून तो पुढच्या कामगिरीवर रवाना होई. कधी कधी त्याला उगाचच लहर यायची. म्हणायचा-
‘हूंऽऽऽ दादा’,
‘काय रे?’ आपण विचारावं.
‘चाल्लोऽऽऽ’ तो उत्तरे.
‘कुठे?’ आपला प्रश्न.
‘कामालाऽऽऽ’ अपॉईंटमेंट लेटर जणू काही हातात आहे अशा अविर्भावात त्याचं उत्तर येई.
‘हो! पण कोणाकडे?’ त्याला बरं वाटावं म्हणून आपण विचारायचं.
‘मुंबैलाऽऽऽ.’ जणू काही आता मुंबईला निघालोच आहे, अशा घाईने झपाझप पावलं टाकत तो निघून जाई.
हे असं अधनं मधनं घडत राही. फक्त कामाचं ठिकाण बदलत राही. कधी उत्तर ‘बँकेतऽऽऽ’ तर कधी ‘आरसीएफलाऽऽऽ’ असंसुद्धा असायचं. हे तो सुद्धा गांभीर्याने घ्यायचा नाही आणि इतरांनीही ते गांभीर्यानं घ्यावं अशी त्याची अपेक्षा नसायची.
गणेशोत्सवाच्या काळात तो कुठल्या ना कुठल्या गणपती कारखान्यात जायचा रात्रीच्यावेळी. त्या काळात गावच्या कारखान्यांमध्ये कॉम्प्रेसर पोहोलेले नव्हते. सायकलीच्या चाकात हवा भरायच्या पंपाने रंगकाम केले जायचे. अशावेळी पम्प मारायला हौशी पोरं स्वखुशीने जात. ढम्यासुद्धा असायचा. मग ढम्याची टर उडवणार्यांना जोर यायचा. असाच एकदा तो एका कारखान्यात गेला. ढम्याला पाहताच कटकारस्थान रचलं गेलं. एक वांड मुलगा झोपेचं सोंग घेऊन आडवा पडला. इतरांनी ढम्याच्या हातात रंगाचा ब्रश लावला. ब्रश लागताच झोपेचं सोंग घेतल्याने काडकन् ढम्याच्या कानशिलात लगावली; एकच हास्यकल्लोेळ झाला. ढम्याच्या वेड्या डोळ्यांत शहाणपणाचं पाणी तरळलं. त्यानंतर ढम्या कधीच गणपतीच्या कारखान्यात मदतीला गेला नाही. जगाच्या दृष्टिकोनातून ढम्या वेडा होता. पण खरोखरंच तो वेडा नव्हता. तो पराकोटीचा भोळसट मात्र होता. उभ्या आयुष्यात त्याने कधी कुठल्या मुलीची, बाईची छेड काढलेली नाही की हातळपणा करून कुणाचे पैसे, वस्तू लांबवली नाही. शहाण्या माणसापेक्षाही त्याच्यामध्ये फार मोठं शहाणपण होतं. त्याला पैसे हवे असले, चहा किंवा खायला हवं असलं तरी तो तोंड उघडून मागायचा नाही. हाताची घडी करून उभा रहायचा. आपलं लक्ष नाही, असं त्याला जाणवलं तर एखादं गाणं गुणगुणून लक्ष्य वेधून घ्यायचा. चलनी नोटा, सुट्टे पैसे त्याला बरोबर कळायचे. कोणी मुद्दामहून त्याच्या हातातून पैसे हिसकावण्याचा किंवा त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला तर मात्र तो पिसाळायचा. त्याला चिडवणार्याच्या कुळाचा मग मात्र उद्धार केल्याशिवाय तो गप्प बसायचा नाही. प्रसंगी एखादा दगड उचलून भिरकावयालासुद्धा मागे पुढे पहायचा नाही. पण ते तेवढ्यापुरतं असायचं. त्याच्या मनात विष साचून राहत नसे म्हणूनच त्याच्या आणि गावाच्या संबंधात कधीही त्याचा धर्म आडवा आला नाही. त्यामुळेच सणावाराला कुठल्या ना कुठल्या घरी त्याला जेवायला बोलावलं जायचंच. माझी आई तर गाईचं पान ज्या आठवणीने काढावं तितक्याच आठवणीने ढम्याला निरोप पाठवायची. पोटभर जेऊ घातल्यावर संध्याकाळसाठी जेवण सोबत द्यायची.
बंधू चेंबूरकर नावाचे गृहस्थ सुट्टीत गावी आले की, ढम्याची चंगळ व्हायची. बंधू मुळातच प्रेमळ होते. ते अगदी ढम्याच्या खांद्यावर हात टाकून फिरायचे. त्याला हवं-नको ते पुरवायचे. त्यांची सुट्टी संपली की, नाक्यावर त्यांना सोडायला गेलेला ढम्या एसटी निघून गेल्यावरही बराच वेळ उदासवाणा बसून राहिलेला असायचा. त्याला ज्यांनी जीव लावला; त्यांना त्यानेही जीव लावला आणि ज्यांनी त्याच्या जीवाला त्रास दिला; त्यांना जीव खाऊन शिव्याही घातल्या.
कुठे घरकाम करून आणि संध्याकाळी मोगर्याचे गजरे विकून दोघांचं घर चालवणारी शकिला भाभी थकलेली तर होतीच, पण आपल्यानंतर आपल्या ह्या भोळ्या पोराचं कसं होणार ह्या काळजीने ती जास्त खंगलेली होती. एक दिवस ढम्याला अल्लाहच्या भरोश्यावर सोडून ती अल्लाहकडे निघून गेली आणि ढम्या खरोखरंच बापुडवाणा, पोरका झाला. आधीच मोडकळीला आलेलं घर जमिनीला टेकलं. शेजारच्या घराने चाल करत ढम्याच्या घराची जागा पादाक्रांत केली आणि तो रस्त्यावर आल्यासारखाच झाला. संजय गांधी निराधार योजनेखाली त्याला पेन्शन मिळायचं म्हणे, पण ते त्याच्यापर्यंत किती पोहोचत होतं कोण जाणे! ढम्याला अपरंपार महत्व यायचं ते मात्र इलेक्शनच्या दिवशी. सकाळीच कार्यकर्ते अब्दुल कादीर करीम किरकिरे ह्या इसमाला शोधायला येत आणि त्याचं मतदान होईस्तोवर त्याला फुलासारखं जपत. त्या वेळेपुरते तरी ते त्याचे वारस असत… त्यानंतर पुन्हा ढम्या बेवारस होई!!
आई गेल्यापाठोपाठ ढम्याचं घरसुद्धा गेल्यातच जमा झालं. मग तो ह्याच्या त्याच्याकडे राहू लागला. जेवणाखाणाची आबाळ वाढली. शरीरसुद्धा थकायला लागलं. मग त्याच्या मामेबहिणीने त्याला आपल्या घरी नेलं. मग तो तिथंच राहू लागला. त्याच्या बहिणीच्या स्वभावातील माणुसकीच्या झर्याचा आधार त्याला मिळाला. तो पूर्णपणे निष्कांचन होता. त्यामुळे काहीतरी डबोलं मिळणार ह्या भावनेनं त्याची ही बहीण काही करीत होती असे अजिबात नाही. उलट तिची मुलंसुद्धा आपलेपणानं त्याचं सर्वकाही करत होती.
जन्मगावात त्याचं येणं कमी कमी होत गेलं. चोंढीच्या नाक्यावर तो मला एक दोनदा दिसला. मला पाहिल्यावर शक्य तितक्या वेगाने तो माझ्या गाडीजवळ येऊन उभा राहिला. मी त्याच्या हातावर पैसे टेकवले. जवळच्या बेकरीतून काही खायला घेऊन दिलं. ‘दादा, परत येशील तवा मला दोन बॉड्या घेऊन ये’- आयुष्यात ढम्याने माझ्याकडे काही मागितलं असेल तर हे एवढंच! मात्र- माझ्याकडून त्याचं मागणं पूर्ण होण्यापूर्वीच- अगदी काही दिवसांतच- ढम्या गेल्याची बातमी कानावर आली.
ढम्या आता ह्या जगात नाही- पण त्याचं देणं द्यायचं राहून गेलं, ही खंत मात्र आयुष्यभर मला पोखरत राहणार आहे.