साऱ्या भारताला गौरावास्पद असलेलं स्वामी विवेकानंदांचं एक अद्वितीय स्मारक भारताच्या दक्षिणेला असलेल्या कन्याकुमारी येथील सागरात उभं राहिलं त्याला २ सप्टेंबर, २०२० ला ५० वर्षं पूर्ण झाली.
ज्या शिलेवर स्वामी विवेकानंदाना ध्यानावस्थेत आपलं जीवन कार्य गवसलं, त्या शिलेवरील स्मारकाचे खरेखुरे शिल्पकार म्हणजे कर्मयोगी मा. एकनाथजी रानडे! कारण फक्त स्मारक निर्माण करून ते थांबले नाहीत, तर स्वामीजींचे विचार पुढे नेणारे त्यांच्या कार्याचे कृतीतून स्मरण करणारे जिवंत स्मारक म्हणजे विवेकानंदकेंद्र हे त्यांच्यासाठी जास्तं महत्त्वाचे होते. स्वामीजींच्या विचारांवर आधारलेली सेवाभावी संघटना; जी ईशान्य भारतातील दुर्गम, पहाडी भागात जाऊन आरोग्यसेवा ते शिक्षणापासून वंचित राहणाऱ्यांना उत्तम शिक्षण देऊ शकेल, तीसुद्धा सेवा आणि त्याग ह्या भावानेने- अशी त्यांना अपेक्षित होती. शिलास्मारकापाठोपाठ ७ जानेवारी,१९७२ला ह्या अध्यात्मिक पायावरील सेवासंघटनेची स्थापना मा. एकनाथजींनीच केली.
योजनेनुसार स्मारक तयार झाले, एकनाथजींनी ह्यारिता अथक परिश्रम घेतले, इतरांनाही घ्यायला लावले. ते झपाटलेले जादुई दिवस होते. त्या काळात अनेक सामान्य माणसांनी असामान्य कामे करून दाखवली, तो त्यांच्या जीवनातील संस्मरणीय काळ ठरला, म्हणूनच विवेकानंद केंद्र सामन्य माणसांची असामान्य संघटना म्हणून ओळखली जाते.
ह्या स्मारकाच्या अनेक गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत, कशा ते बघूया.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकनाथजींनी काम कारण्याची शैली! अडचणी आणि संकटे यांना ते यशाच्या मार्गाकडे नेणाऱ्या संधी समजत आणि याच भावनेने त्यांनी संकटाचे,अडचणींचे संधीत रूपांतर करून शिलास्मारक त्यांना हवे होते तसेच उभारले, म्हणून ते वैशिष्ट्यपूर्ण आहे.
शिलास्मारक बंधणे ही एकनाथजींनी परीक्षाच होती. त्यांना हे सिद्ध करायचे होते की, जर राजकारणापासून दूर राहून, लोकांना मदतीचे आवाहन करण्यात आले तर लोक पक्षभेद, पंथभेद बाजूला ठेऊन मदतीसाठी पुढे येतील. त्यांनी दिल्लीत तळच ठोकला. सर्व पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना स्मारकाबद्दलची योजना समजावून सांगितली आणि २ दिवसात तब्बल ३२३ खासदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन साऱ्या देशाचा पाठिंबा स्मारकासाठी मिळवला, विरोधकांचा विरोध मोठ्या कौशल्याने दूर करून त्यांना आपलेसे केले, मित्र केले.
दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची निधी संकलनाची योजना देशातील सामान्यातील सामान्य माणसाला हे स्मारक आपले आहे असे वाटावे ह्याकरिता त्यांनी १ रुपयाची, २ रुपयाची देणगीची कुपने काढली. त्यासाठी तयार करण्यात आलेले माहितीपत्रक इतके सुंदर होते की, अजूनही काही जणांनी ते आपलया संग्रही जपून ठेवले आहे. निधी गोळा करण्यात आलेल्या १ कोटी, ३५ लाख रुपयांपैकी ८५ लाख रुपये देशातील १% प्रौढ जनतेकडून १, २ रुपयांच्या देणगीतून गोळा करण्यात आपले होते. माहितीपत्रके देशातील सर्व भाषांमध्ये छापली होती. निधीसंकलनाचे कामही कालबद्ध होते. सहा महिन्यात निधी संकलान करून हिशेब पुरा केला जाई.
यानंतर पुतळा कसा असावा याचा विचार सुरू झाला. रामकृष्ण मठातील काही स्वामीजींना पुतळा ध्यानस्थ असावा असे वाटत होते, पण एकनाथजी याबाबत ठाम होते. ते म्हणाले,’ ह्या शिलेवर स्वामीजींनी भारताच्या उत्थानासाठी ध्यान केले आहे, ध्यानातून उठून आत्मविश्वासपूर्वक कार्यासाठी पुढे निघाले आहेत, जगाला काही संदेश देण्यास निघाले आहेत, असा पुतळा असला पाहिजे हे त्यांनी पटवून दिले. मग प्रसिद्ध चित्रकार एस. एम. पंडित ह्यांच्य कडून प्रथम त्यांना हवे तसे चित्र काढून घेतले, त्याकरिता एस. एम. पंडितांनी देखील खूप मेहेनत घेतली. त्या नांतर देशातील ८ मूर्तिकारांशी संपर्क साधून मूर्ती तयार करून घेतल्या व नंतर मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार श्री. सोनावडेकर यांची निवड करून त्यांनी पुतळा बनविला. त्याकरिता स्वतः सोनावडेकरांनी देखील विवेकानंदांच्या साहित्याचा अभ्यास केला, साधना केली.
शिलास्मारकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे स्माराकाचे बांधकाम करणारे कारागीर. जवळजवळ ६५० कामगार रोज काम करीत असत. काही वेळा त्यांची मजुरी देण्यासाठी पैसे नसत. पण त्यांनीही साथ दिली. ते म्हणत “आम्हाला रोजचे फक्त जेवण द्या, बाकी आमच्या घरचे लोक घर कसे चालवायचे ते बघून घेतील. पण स्मारकाचे काम रेंगाळता कामा नये.” ह्या महान कामगारांच्या ह्या बाण्याने एकनाथजी हेलावून जात, त्यांना गहिवरून येई.
१९७० पूर्वी स्मारकाचे काम पूर्ण करायचे याबाबत देखील एकनाथजी ठाम होते, स्मारकाचा किती भाग केव्हा पूर्ण करायचा याचे अतिशय तपशीलवार वेळापत्रक तयार करण्यात आले होते. ते जेथे असतील तेथून प्रगतीचा अहवाल विचारीत व आपल्या वेळापत्रकाशी ताडून बघीत. जेव्हा जेव्हा ते दौऱ्याहून कन्याकुमारीला जात तेव्हा ते थेट शिलेवर जात. प्रवासाचा शीण, थकवा वगैरेचा प्रश्नच नसे.
एकदा असेच दौऱ्यावरून ते थेट कन्याकुमारीला शिलेवर गेले. अपेक्षित काम पूर्ण झालेले नव्हते, त्यांनी साऱ्या कामगारांना बोलवून घेऊन रातोरात काम पूर्ण करून घेतले. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र पंडित वर्णेकरही होते. त्यांनी एकनाथजींना विचारले,’एवढा हट्ट का? बांधकामात थोडं असं व्हायचंच!’ त्यावर एकनाथजी म्हणाले,’ राष्ट्रहिताच्यादृष्टीने एका दिवसाचा विलंबाहि चालायचा नाही. कारण विवेकानंदांचे जितेजागते स्मारक उभारण्याचे यापेक्षाही मोठे काम हाती घ्याचे आहे.’ अर्थात, त्या रात्री एकनाथजी व श्री. वर्णेकरही रात्रभर कारागीरांच्या बरोबर तेथेच होते.
स्मारक तयार झालं! कन्याकुमारी छोटं गावं! जेमतेम ७ हजार लोकवस्तीचं! ह्या राष्ट्रकार्यात सगळ्या देशाचा सहभाग असल्याने उद्घाटनाला खूप मोठ्या संख्येने लोकं येणार हे गृहित धरून एकनाथजींनी येथेही आपले कौशल्य सिद्ध केले. उदघाटनाला तत्कालीन राष्ट्रपती श्री. व्ही.व्ही.गिरी आले होते. बेलूर येथील रामकृष्ण मठ आणि मिशनचे अध्यक्ष स्वामी विरेश्वरानंदांच्या हस्ते स्मारक राष्ट्राला अर्पण करण्यात आले तो दिवस होता २ सप्टेंबर, १९७०. तिथीनुसार भाद्रपद शुद्ध द्वितीया, स्वामी विवेकांनंदांचा सर्वधर्म परिषदेतील पहिला दिवस! हा उद्घाटन सोहळा २ महिने चालला होता. देशातील विविध भागातील जनतेसाठी विशिष्ट तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. कोणत्याही दिवशी कन्याकुमारीत येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या ५००० वर जाणार नाही ह्याचीही खबरदारी घेण्यात आली होती. ह्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधी, उपराष्ट्रपती श्री. गोपाळस्वरूप पाठक, मा. श्री. गोळवलकर गुरुजी आदी मान्यवरांनी शिलास्मारकाला भेट दिली.
अजून एक वैशिष्ट्य असे आहे की, एवढं प्रचंड काम करणाऱ्या एकनाथजींचे नाव निमंत्रण पत्रिकेत काय किंवा शिलास्मारकावर कोठेही नाही. ‘मी’ हे केले असा भाव त्यांच्या कामात कधीही नसे. ह्या कार्यात परमेश्वराने आपल्याला एक साधन, उपकरणं बनविले आहे याचे त्यांना कधीही विस्मरण झाले नाही.
स्मारक बघण्यासाठी देशातून व विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात, रोज साधारणपणे ५ ते ६ हजार! पण तरी सुद्धा स्मारकाचा संपूर्ण परिसर अत्यंत स्वच्छ आणि प्रसन्न राहील याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत कन्याकुमारी गावातील जेट्टीपासून स्मारकावर जाण्यासाठी शासनाची बोटसेवा उपलब्ध आहे. स्मारकावर पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, चाकाची खुर्ची अशा सुविधा देखील उपलब्ध आहेत.
स्मारक पाहायला आलेले सारेच तेथील वातावरणाने भारावून जातात. श्रीपाद मंडपममध्ये देवी कन्याकुमारीच्या पदाचे दर्शन घेतात, विवेकानंद मंडपममध्ये स्वामीजींपुढे नतमस्तक होतात आणि ध्यानमंडपम मध्ये थोडावेळ तरी ध्यान करीत बसतात. चारही बाजूंनी उसळणाऱ्या लाटांच्या गर्जनेमध्ये स्वामीजींनी ३ दिवस ३ रात्र ध्यान कसे केले असेल, है विचाराने विस्मयचकित होऊन!
एक विवेकी स्मारक..!
0
Share.