आजही शेकडो शहरी लोकांची नाळ गावखेड्यांशी जुळलेली आहे. कधीकाळी आपले गाव सोडून कामधंद्यासाठी शहरात आलेले लोक इथेच स्थिरावले. तसं त्यांचं सणावाराला, लग्नकार्याला गावाकडे जाणं होतं पण कामाच्या व्यापात निवांत राहायाला मिळत नाही. मोठ्यांची अशी अवस्था तर त्यांच्या मुलाबाळांची तशी नाळच तुटलीय गावापासून. अजूनही कित्येक मुलांनी आपलं आजोळ नीटसं पाहिलं नसेल, ते अनुभवलं नसेल. शेती-भाती तर पाहिलीच नसेल कदाचित, मन मोकळं गावातल्या कच्च्या रस्त्यानं हुंदडताही आलं नसेल त्यांना. हे झालं ज्यांना गाव आहे त्यांचं, पण ज्यांना गावच नाही त्यांचं काय? पण मग अशा सर्वांसाठी “कृषी पर्यटन” हा एक उत्तम पर्याय सध्या समोर आलाय.
खरंतर कृषी व्यवसाय भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. कृषी व्यवसायावर जवळजवळ ८० टक्के लोक आजही अवलंबून आहेत. शेती व्यवसायाला जोडव्यवसायाची साथ देऊन उत्पादनात भर घालता येणारा सध्याच्या ट्रेण्डचा नवीन प्रकल्प म्हणजे ‘कृषिपर्यटन’. खरंतर सध्या जगभर पर्यटनाला अनन्यसाधारण महत्त्व येते आहे. कित्येक देशांत पर्यटनाच्या संकल्पना दिवसेंदिवस बदलत आहेत. आजतागायत आर्थिक कुवत असणारेच पर्यटनाबाबत विचार करू शकत होते. पण ही संकल्पना आता हळूहळू बदलत असून त्याला नवे स्वरूप प्राप्त झाले आहे. आपलं महाराष्ट्र राज्य देखील यासाठी प्रयत्नशील आहे. अगदी थोडक्यात कृषिपर्यटन म्हणजे काय? तर शेतावरील फेरफटका, आपल्या ग्रामीण संस्कृतीची ओळख करून घेणं, मोकळ्या वातावरणात गावकुसातल्या स्वच्छ हवेत मोकळा श्वास घेणं. तिथल्या लोकल पदार्थांवर यथेच्छ ताव मारणं. अर्थात शहरी जीवनशैलीचा वीट आलेल्या लोकांनी चार दिवस शेतकर्याच्या शेतावर जाऊन राहणे, शक्य असल्यास त्याच्या शेतात काम करणे, माळरानात दरीखोऱ्यात उनाड दिवस घालवणे आणि ह्या सगळ्यासोबत शेतकर्याने शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषिपर्यटन.
सध्या महाराष्ट्रभर कृषिपर्यटनाची संकल्पना जोर धरते आहे. गावातल्या तरुण मुलांचा गट एकत्रित येऊन “‘स्टार्टअप इंडिया”च्या माध्यमातून हा व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढे येतो आहे. तर काही ठिकाणी शहरातला उच्चशिक्षित तरुण आपल्या गावाकडं परत जाऊन तिथं कृषिपर्यटनाची सुरुवात करतो आहे. हे विशेष म्हणायला हवंय. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार कृषिपर्यटनाचा उगम ऑस्ट्रेलिया मध्ये ६५ वर्षांपूर्वी झाला. महाराष्ट्रात प्रथम बारामती येथे कृषीतज्ज्ञ स्व. आप्पासाहेब पवार यांनी केलेले शेतीमधील नावीन्यपूर्ण प्रयोग, कृषी संशोधन पाहण्यासाठी येणार्या शेतकर्याची नि:शुल्क राहण्याची, भोजनाची सोय शेतावर करीत. कालांतराने शुल्क आकारून कृषी अभ्यासदौरे आयोजित केले जात, अशा रितीने कृषीपर्यटन संकल्पनेचे बीज रोवले गेले. कालांतराने नेरळ येथील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी “सगुणाबाग” कृषिपर्यटन केंद्राच्या माध्यमातून कृषिपर्यटन शेतकर्याला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व प्रतिष्ठा मिळवून देणारे आहे हे सिध्द केले. वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस नागरिकांचा निसर्गाकडे ओढा वाढत आहे. निसर्गाची हानी न होऊ देता पर्यावरणाचा समतोल राखून पर्यटनाचा आनंद देणारी कृषिपर्यटन केंद्रे हा सक्षम पर्याय शेतकर्यांना मिळाला आहे. आजमितीस महाराष्ट्रात तीनशेहून अधिक कृषिपर्यटन केंद्रे आहेत.
आज शेतीमालाच्या दराबाबत अनिश्चितता आहे. शेतकरी शेती उत्पादन पिकवतो. त्याला दर निश्चितीचा हक्क नाही. यामुळे बहुतेकदा शेतकर्यांना त्यांचा उत्पादनखर्चसुद्धा मिळत नाही. अशा अवस्थेमध्ये कृषिपर्यटन व्यवसायात पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांच्या अनुषंगाने तसे पॅकेजेस ठरविणे शेतकर्यांच्या हातात आहे. म्हणून हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य व सामर्थ्य देणारा आहे. त्याचबरोबर कृषिपर्यटन व्यवसायात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे, हे राज्यातील अनेक कृषिपर्यटन केंद्र चालवणाऱ्या शेतकर्यांनी सिद्ध केले आहे. त्यापैकी संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस ह्या गावात “FARM OF HAPPINESS” हे कृषिपर्यटन केंद्र चालवणारे राहुल कुलकर्णी म्हणतात, ‘येत्या काळात कृषिपर्यटन नक्कीच एक नवीन पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी निवडायला हरकत नाही पण यात सर्वात पहिल्यांदा शेतीला प्राधान्य दिल पाहिजे. त्यात नुसता कमर्शियल आस्पेक्ट महत्त्वाचा नाही; तर आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांना आपल्या मातीत उतरवता आलं पाहिजे. ह्या व्यवसायात आपली अशी ठाम भूमिका असायला हवी. म्हणजे एकतर आपण निव्वळ कृषिपर्यटन करणार असू तर त्यावर नेमका फोकस असायला हवाय.’ याबाबत अधिक विस्तृत सांगताना ते म्हणाले, ‘आम्ही पर्यटकांना त्यांच्या गावातल्या घरी आल्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही स्वतः शेती करतो. त्यातलं जे उत्पन्न येतं तेच पर्यटकांना सर्व्ह करतो. म्हणजे नाष्ट्याला आमच्याच बागेतली फळ, दुपारच्या जेवणात आमच्यात शेतात उगवलेल्या भाज्या आणि रात्री जेवणातही जे पिकलंय तेच वाढतो. जे पर्यटकांना जास्ती आवडतं आणि भावतंही. शिवाय, कृषिपर्यटन मधल्या आम्ही “कृषी ” ह्या शब्दाला जास्त महत्त्व देतो. म्हणून आधी शेती, मग पर्यटन. कारण आपण ज्या बेस वर लोकांना इतक्या लांबचा प्रवास करून बोलावतो आहोत, त्यांना त्या शेतात वेगळेपण दाखवता आले पाहिजे. आपल्या शेतात केलेल्या नवनवीन प्रयोगांच्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करता आल्या पाहिजेत. त्यामुळे नुसते कॉटेजेस बांधून पर्यटकांची गर्दी वाढवणं आमचा उद्देश नाही, तर आलेल्या टुरिस्टना शेतीबद्दल अधिक जिव्हाळा निर्माण करणं, त्यांना बांधावर नेऊन ते त्यांना त्याची अनुभूती देणं हा देखील आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्या उपक्रमामुळे निसर्गाला कोणतीही हानी पोहचणार नाही, याची काळजी घेणं देखील आलंच. अगदी सरळ म्हणजे कृषिपर्यटन हे रिसॉर्ट, फार्म हाऊस, शेतघरासमोरच्या पार्ट्या, वैगरेंच्या कॉन्सेप्टपलीकडला प्रकार आहे. हे कृषिपर्यटन करणाऱ्यांनी आणि नव्याने ह्या क्षेत्रात येणाऱ्या इच्छुकांनी आधी लक्षात घ्यायला हवंय आणि मुळात जे करायचंय हे स्वतःच्या वे ऑफ इंटरेस्ट ने काहीतरी वेगळं करण्याच्या जिद्दीने यात उतरायला हवंय. दरम्यान सरकारी योजनांचा लाभ घेता आला तर ठीक नाहीतर आपल्या हिमतीने यात पाऊल टाकण्याची तयारी असेल तर इकडे वळा. कारण अनेकदा सरकारी योजना कागदी फायलीत अडकतात, फायनान्स करणारे नाही म्हणतात. शिवाय, कायम सोबत देतील अशी खात्री देणारी माणसं आयत्यावेळी मागे होतात. उपक्रम पुढे चालू झालाच तरी कायम मदतीला माणसं मिळतातच असं काही सांगता येणार नाही. तेव्हा मग आपल्यालाच ह्या सगळ्या कामात हात घालावा लागतो. त्यामुळे तीही तयारी असायला हवी. कारण तुम्ही इथे मालक नसता तर आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचाराचे यजमान असता.’
काही वैशिष्ट्यपूर्ण कृषिपर्यटन केंद्रे
पराशर कृषिपर्यटन केंद्र : राजुरी, ता. जुन्नर, जि. पुणे येथे मनोज हाडवळे ह्या फलोत्पादन शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणाने ऋषी पराशर ह्या कृषिविषयक पहिला ग्रंथ लिहिणाऱ्या ऋषींच्या नावे हे पर्यटन केंद्र सुरु केले आहे. याठिकाणी एका वेळेस ४० हून अधिक पर्यटकांची निवास सुविधा असून द्राक्ष, डाळिंब, वनपर्यटन, आठवडी बाजार, दुग्धव्यवसाय, डेअरी, लोककला व मासवडी-भाकरीसारखे पाटावर बसून घ्यावयाचे जेवण अशा विविध बाबी येथे उपलब्ध आहेत. मुंबईपासून साधारणत: १५० व पुणे-नाशिकपासून ११०-१२० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. (संपर्क : www.hachikotourism.in)
सगुणा बाग : नेरळ (ता. कर्जत,जि. रायगड) येथे चंद्रशेखर भडसावळे ह्या कोंकण कृषी विद्यापीठातून कृषिविषयक शिक्षण घेतलेल्या व अमेरिकेत जाऊन काही काळ काम केलेल्या कृषिपदवीधराने जवळपास १९९५-९६ मध्ये हे कृषिपर्यटन केंद्र सुरू केले आहे. ह्या ठिकाणी शेततळ्यांमधील मत्स्यपालन, भातशेती, नारळ, आंबा, चिकूसारखी फळपिके आणि शेतीविषयक विविध भाजीपाला व इतर पिकांची लागवड आहे. ह्या ठिकाणी ग्रामीण खेळांचा अनुभवदेखील आपण घेऊ शकतो. ह्या पर्यटन केंद्रावर तळ्यामध्ये असलेले घर ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण येथून जेमतेम १५ ते २० किमीपर्यंत आहे. आपण नेरळपर्यंत मुंबईहून लोकल रेल्वेने जाऊ शकतो. तेथून जेमतेम ६ किमी अंतरावर असलेल्या सगुणा बागेत प्रवाश्यांची नेण्या-आणण्याची व्यवस्था आहे. (संपर्क – www.sagunabaug.com)
Farm Of Happiness : फुणगुस ( ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी ) इथे राहुल कुलकर्णी आणि संपदा कुलकर्णी ह्या जोडप्याने २४ एकरवर हा प्रोजेक्ट सुरु केला आहे. गेली चार वर्षं ही दोघेजण Farm Of Happiness ह्या उपक्रमात नावीन्य आणत अनेक नव्या गोष्टी कृषिपर्यटनात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. निव्वळ कृषिपर्यटन आणि शेतीशी जिव्हाळा हे यांच्या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे . त्यामुळे ह्या उपक्रमाची सुरुवात करण्याआधी स्वतः राहुल कुलकर्णी आणि संपदा कुलकर्णी ह्या जोडप्याने स्वतः शेती करून पहिली . त्यात त्यांच सातत्य आणि त्यांना आलेल्या अनेक चांगल्या-वाईट अनुभवांनंतरच मग त्यांनी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इथं येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला द बेस्ट देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो, जो आजही चालू आहे. कोंकण रेल्वेच्या संगमेश्वर स्टेशन पासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्या उपक्रमाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास (http://www.farmofhappiness.
तापोळा कृषिपर्यटन शेतकरी व्यावसयिक कंपनी : गणेश उत्तेकर व काही युवा प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तापोळा ह्या कोयना बॅक वॉटर असलेल्या महाबळेश्वरनजीकच्या ठिकाणी कृषिपर्यटन व्यावसायिक शेतकऱ्यांची कंपनी स्थापन केली आहे. ह्या ठिकाणी कंपनीतील सभासद शेतकरी हे पर्यटकांचे राहणे, भोजन व स्थानिक कृषिपर्यटनाची सोय करतात (संपर्क : www.tapolatourism.com)
आनंद कृषिपर्यटन केंद्र : बोरगाव, (ता. जि. सातारा) येथे आनंद शिंदे ह्या प्रयोगशील शेतकऱ्याने हे केंद्र उभारले असून ह्या ठिकाणी मुलांसाठी रेनडान्स, लॉनवरील खेळ, साहसी क्रीडाप्रकार इत्यादी अनेक सुविधा आहेत. ह्या ठिकाणी पांचगणी येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहली ग्रामीण कार्यानुभवासाठी मोठ्या प्रमाणावर भेटी देतात. (संपर्क : www.anandagriturism.com)
पळशी कृषी पर्यटन केंद्र : पांडुरंग तावरे यांनी राज्यातील विविध कृषिपर्यटन व्यावसायिकांना कॄषिपर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कृषिपर्यटनात केलेल्या कामाबद्दल त्यांना राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारासह अनेक देशांचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी उभारलेले पळशीवाडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील पर्यटन केंद्र शहरी पर्यटकांची नाळ ग्रामीण भागाशी जोडण्याचे काम करत आहे.(संपर्क : www.agritourism.in)
कृषिपर्यटन करू इच्छिणार्यांसाठी काही महत्त्वाच्या टीप्स
व्यवसाय सुरू करताना सर्वबाजूंचा अभ्यास आवश्यक आहे. आपल्या शेतीची बलस्थाने आपणच विकसित करावीत. नावीन्य आणि वेगळेपण जपणे गरजेचे असते. आपल्या शेतात पर्यटकांना खिळवून ठेवण्यासाठी शक्यतो नैसर्गिक स्रोतांचा जास्तीत जास्त उपयोग करून पर्यटकांना सेवा द्यावी. शेतीसोबतच निसर्गाशी संबंधीत इतर गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्याही पर्यटकांना दाखवता येतात. उदा. विविध पक्षी, प्राणी, झाडे, फुलपाखरे इ. पर्यटकांना घरचे चुलीवर शिजवलेले जेवण मिळाले तर पर्यटक जास्त आनंदी व समाधानी होतात. त्यामुळे ह्या गोष्टींचीही खूप काळजी घ्यायला हवी. राहण्याची व खाण्यापिण्याची योग्य व व्यवस्थित सोय झाली की पर्यटक पुन्हा तुमच्याकडे नक्की भेट देणार याची खात्री.
कर्ज घेण्यासाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आवश्यक असतात : राहण्याचा दाखला व फोटो दाखला, ग्रामपंचायतीचा व्यवसाय म्हणून दाखला, ग्रामपंचायत बांधकाम परवाना, एस्टिमेट (अंदाजपत्रक), आर्किटेक्चर दाखला, ज्या जागी बांधकाम करायचे त्या क्षेत्राचा एनए दाखला (कलेक्टर) किंवा झोन दाखला. जागेविषयक संपूर्ण कागदपत्रे, वकील तारणयोग्यतेचा दाखला, टायटल व सर्च रिपोर्ट, ज्यांच्या नावावर जमीन आहे, त्यांचे संमतीपत्रक, जागेचा नकाशा, अन्य गटधारकांची संमती, कुटुंबातील अन्य सदस्यांची संमती. जोडतारण असल्यास जोडतारणाची कागदपत्रे, आर्थिक कागदपत्रे, आवश्यक प्रमाणपत्रे, जामीनदारांची कागदपत्रे. जामीनदार हा कर्जदाराइतकाच परतफेडीला समप्रमाणात जबाबदार असतो. धकाधकीच्या जीवनात परस्परातील संवाद कमी होतोय त्यामुळे ताणतणाव वाढतोय. तो कमी करण्यासाठी कृषिपर्यटन हे चांगले माध्यम आहे. पर्यटकांना निवांतपणा मिळाला की ते आनंदीत होतात. त्यासाठी आपण मात्र त्यांना कमीत कमी आवश्यक अशा पायाभूत सुविधा तरी पुरविल्याच पाहिजेत. कृषिपर्यटन केंद्रासाठी शक्यतो निसर्गाच्या सानिध्यात जागा निवडावी. रिसॉर्ट व कृषिपर्यटन ह्या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत हे केंद्र चालवणार्याने नेहमी लक्षात ठेवावयास हवे. शेतीतून अधिकचे उत्पन्न वाढविण्याची संकल्पना म्हणून कृषिपर्यटन. त्यामुळे शेतीला प्रथम प्राधान्य मिळालेच पाहिजे.
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अनेक एकरांवर बहरलेली ही केंद्रे शेतीसोबत नवनवीन संकल्पना, प्रयोग करून कृषिपर्यटन यशस्वीरित्या राबवत आहेत. त्यांचा अभ्यासदौरा करून त्यांचे प्रकल्प समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शासनाच्या विविध योजना आणि भविष्यातील ह्या क्षेत्रातील वाढती मागणी याची वेळीच दखल घेऊन आपल्याकडील प्रत्येक शेतकर्याने कृषिपर्यटनासाठी सुरुवात करायला योग्य नियोजन आणि दूरदृष्टीने ह्या गोष्टीकडे पाहिले तर भारत हा कृषिपर्यटनात पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून उदयास येण्यास जास्त वेळ लागणार नाही.
कृषिपर्यटन : व्यवसाय आणि शहरी-ग्रामीण संस्कृतीतील दुवा
0(माहितीचा स्रोत : महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्र)
Share.