आपल्यावर होणारी टीका ही आपल्याला संपवणारी नाही, तर आपल्यात नसलेल्या गुणाला ओळखून, ती भरून काढून, सर्वोच्च अढळ स्थानी झेप घेण्यासाठी सुसंधी आहे, हे ज्याला कळते तो यशाच्या शिखरावर निश्चियाने पोहोचू शकतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे लता मंगेशकर. संपूर्ण जगाच्या लाडक्या लतादीदी. कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात दिलीपकुमारने नकळतपणे का होईना पण “मराठी लोगों के उच्चारण में दाल-चावल की बू आती है…” असे म्हटले नसते तर… आणि त्या टिप्पणीला लतादीदींनी मनावर जिद्दीने कोरून ठेवले नसते तर… तर आज लता मंगेशकर ज्या उंचीवर आहेत तिथे नसत्या.
जिद्दी तर ती होतीच, हट्टी, ठाम होती. आजही आहे. आपल्याला काय साध्य करायचे आहे त्या विचारावर तिचे लक्ष केंद्रीत होते. प्रसंगी नाते, मैत्री, संबंधही तिने आड येऊ दिले नाहीत. मग समोर प्रत्यक्ष ती सख्खी बहीण असो, संगीतकार सचिनदा असो वा मोहम्मद रफी असो… किंवा निर्माता दिग्दर्शक राजकपूर! आपल्या भूमिकेत व विचारावर ती ठाम राहिली… काही काळ अबोला सहन करूनही.
कौटुंबिक जबाबदारीमुळे तिला आपल्या अंगी असलेल्या कलेला व्यावसायिक पातळीवर आणावे लागले पण तसे आणतानाही सुरांशी स्वरांशी, संगीतकलेशी तडजोड, प्रतारणा कधीच केली नाही. उलट,आपण अपेक्षा करतो आहोत त्यापेक्षा कितीतरी अधिकच मिळाल्याचे समाधान तिने संगीतकारांना दिलेच आणि पर्यायाने आनंदही रसिकांना दिला. म्हणूनच ‘लता’च हवी ह्या मागणीवर संगीतकार हटून बसायचे. अपवाद फक्त ओ. पी. नय्यर यांचा. ( ते सांगीतिक कारण नसून अन्य काही होते.) लताची गाणी म्हणटले म्हणजे अगदी गुलाम हैदरपासून ते खेमचंद प्रकाश, शामसुंदर, वसंत देसाई, सरदार मलिक, चित्रगुप्त, अनिल विश्वास, सी.रामचंद्र, रोशन, नौशाद, सचिन देव बर्मन, हेमंतकुमार, सलील चौधरी, जयदेव, खैय्याम, मदनमोहन, शंकर-जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राहूल देव बर्मन, बप्पी लाहिरी, राजेश रोशन, उषा खन्ना, आनंद-मिलिंद, जतीन-ललित, ए. आर. रेहमान ही नावे तर आपल्याला तोंडपाठ असतात किंवा थोड्याश्या विचाराने आठवतातही. परंतु, सर्वात पहिली महिला संगीतकार खुर्शीद मिनोचर होमजी ऊर्फ सरस्वतीदेवी, शास्त्रीय संगीतातील मान्यवर पं. रवीशंकर, उस्ताद अली अकबर खान, अझीझ, इक्बाल कुरेशी, एरिक राॅबर्टस उर्फ विनोद, कमल मित्रा, गुलाम मोहम्मद, नाशाद, मलय चक्रवर्ती, शैलेश मुखर्जी, भुपेन हजारिका, अमरनाथ, सज्जाद हुसैन, हुस्नलाल भगत, एस मोहिंदर, शिवदयाल बातिश, मोहम्मद शफी, जमाल सेन, शंभू सेन, दिलीप ढोलकिया, शिवरामकृष्ण, जगमोहन ‘सुरसागर’, ह्यांसारखे विस्मरणात गेलेले संगीतकार, तसेच आपले मराठमोळे स्नेहल भाटकर, सुधीर फडके, वसंत प्रभू, दत्ता कोरगावकर, एन. दत्ता, दत्ता डावजेकर, मा. कृष्णराव आणि हृदयनाथ मंगेशकर ह्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या हिंदी चित्रपट गीतांच्या संगीतरचनांना लता मंगेशकरांच्या स्वरांच्या परिसस्पर्शाने अजरामर केले आहे.
असंख्य उदाहरणांतून केवळ एकच उदाहरण देतो. १९५७ साली आलेला सुवर्ण सुंदरी चित्रपट, संगीतकार पी. आदिनारायण राव, गाणे, “कुहू कुहू बोले कोयलिया…” आजही हे गाणे सर्व गानरसिकांना प्रिय आहे आणि प्रत्येक ऋतुंचे वर्णन करणारे असल्यामुळे तसेच शास्त्रीय संगीत रसिकांच्या आवडीच्या ‘सोहनी’ रागावर आधारीत असल्याने सार्वकालिक सर्वप्रिय आणि पुन्हा पुन्हा ऐकले जाणारे आहे. शास्त्रीय संगीत श्रेष्ठ आणि चित्रपट संगीत कनिष्ठ असा विचार करणाऱ्या तसेच “लताचे शास्त्रीय संगीतातील योगदान काय?” असा प्रश्न विचारणार्या लोकांनी लतादीदींची शास्त्रीय संगीतावर आधारित असंख्य गीते ऐकावीत.
काही उदाहरणे पुढीलप्रमाणे
तीनक तीन तानी दो दिन की जिंदगानी – सरगम, १९५०, सी. रामचंद्र
गर्जत बरसत भीगत आयीलो – मल्हार – १९५१ मल्हार, रोशन
झनझनझन पायल बाजे – बुझदिल–१९५१ सचिन देव बर्मन नटबिहाग
ए री आली पीयाबीन – रागरंग १९५२ यमन रोशन
जाग दर्दे इश्क जाग... – अनारकली १९५३ – हेमंत कुमार बागेश्री
पतझड जैसा जीवन मेरा पी बीन सुना रे – हमदर्द १९५३जोगिया अनिल विश्वास
मन मोहना बडे झुठे – सीमा १९५५ शंकर-जयकिशन, जयजयवंती
जा तो से नही बोलू कन्हैया… – परिवार १९५६ हंसध्वनी सलील चौधरी
जागो मोहन प्यारे… – जागते रहो १९५६ सलील चौधरी भैरव
झनन झन झनन झन बाजे पायलीया – रानी रूपमती १९५७ श्रीनाथ त्रिपाठी
सजन संग काहे नेहा लगा… – मैं नशेमे हूं १९५९ तिलंग शंकर-जयकिशन
आधा है चंद्रमा… – नवरंग १९५९ सी. रामचंद्र मालकंस
सावरे सावरे काहे मोसे करो जोराजरी – अनुराधा पं रवीशंकर १९६० मुलतानी
जा रे बदरा बैरी जा पिया का संदेसवा ला रे – बहाना, १९६०, मदनमोहन यमनकल्याण
बलमा मानेना बैरी – ऑपेरा हाऊस १९६१ चित्रगुप्त मालकंस
छम छम नाचत आई बहार – छाया १९६१ सलील चौधरी बहार
अल्ला तेरो नाम… – हम दोनो १९६१ जयदेव गौड सारंग
ओ पपीहे तुमने नही देखे मोरे सैया… – जिया – अनपढ १९६२ यमनकल्याण मदनमोहन
पवन दिवानी न माने उडावे मोरा घुंघटा – डाॅ. विद्या १९६२ सचिन देव बर्मन बागेश्री
बलमा अनाडी मन भाए का करू समझ ना आए – बहुरानी १९६३सी रामचंद्र हेमंत
बेदर्दी दगाबाजी जा बना ना बतीया – ब्लफमास्टर १९६३कल्याणजी-आनंदजी बागेश्री
नैनो में बदरा छाए बिजली सी छमके हाये – मेरा साया १९६६ मदन मोहन भीमपलास
रैना बीत जाए … – अमर प्रेम १९७२ राहूल देव बर्मन मियाँ की तोडी आणि खमाज
रस्मे उलफत को निभाये तो… – दिल की राहे १९७३ मदन मोहन – मधुवंती
ही आणि यासम इतर असंख्य गीते, शास्त्रीय संगीत सामान्य माणसाच्या मनात रुजवण्यात लतास्वरांचे मोठेच योगदान आहे. ह्या व ह्यासारख्या शास्त्रीय राग आधारित रचना केवळ शास्त्रीय रचना आहेत किंवा बुजुर्ग संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या आहेत, म्हणून गाजल्या नाहीत तर शास्त्रीय संगीताला केवळ तीन-चार मिनिटांच्या अतिशय कमी अवधीत तेवढ्याच ताकदीने त्या वेळच्या रेकॉर्डींग पद्धतीनुसार ( Sync sound नाही किंवा voice dubbing नाही किंवा अत्याधुनिक रेकॉर्डींग पद्धतीने नाही ) पुन्हा पुन्हा रेकॉर्ड करून अतिशय उत्कट अशी साभिनय भावना त्यात प्रकट करून पार्श्वगायनात अढळपदी टिकून राहणे, हे वाटते तेवढे सोपे काम नाही. ह्याबरोबरच गझल व इतर सर्व प्रकारच्या गाण्यांनाही न्याय देणे ही ईश्वरी देणगीच.
अनेक दंतकथा तिच्याभोवती गुंफल्या गेल्या. काही तिच्या स्वभावामुळे तर काही चित्रपटसृष्टीच्या वातावरणामुळे… पण तिने आपले गाणे हेच प्राधान्य ठेऊन इतर सर्व गोष्टींना त्यापुढे महत्त्व दिले नाही. तिने इतरांवर अन्याय केला का? राजकारण केले का? तिच्यावर अन्नातून विषबाधा करण्याचा प्रयत्न झाला का? तिचे वैयक्तिक आयुष्य ह्या गोष्टींवर अनेक चर्चा होत राहतील. गतकाळ, इतिहास, त्या वेळची माणसेच याची उत्तरे देऊ शकतील. परंतू एक गोष्ट मात्र खात्रीशीर निश्चित की, चित्रपट क्षेत्र, मुख्यत्वे अमराठी लोकांचे स्थान अधिक बळकट असताना, तसेच चित्रपट सृष्टीतील संगीत, गायन ह्या संबंधीत कोणत्याही लेखात जी मोजकी मराठी नावे समाविष्ट केल्यावाचून तो लेख इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही, त्या नावांमध्ये लता मंगेशकर यांचे नाव सर्वात पुढे आघाडीवर असेल यात तीळमात्रही शंका नाही. दिलीपकुमार ने ते जे विधान अजाणतेपणी केले, त्याचे पुरेपूर तोडीसतोड किंबहुना, अधिकच सडेतोड उत्तर लता मंगेशकर ह्या नावाने, मराठी व्यक्तीने, कलाकाराने, एका कर्तृत्ववान स्त्रीने दिले, ह्याची नोंद जगाला घ्यावीच लागेल, एवढे महान यश आहे हे.
3 Comments
Very nice article
प्रसादजी लतादीदींवरील आपला लेख खूप सुंदर आणि अप्रतिम झाला आहे. लतादीदींबद्दल बोलावे तितके थोडे आणि लिहावे तितके कमीच आहे. आपल्या या लेखात त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत केलेल्या कार्याचाच उल्लेख केल्याचे दिसून येते. परंतु त्यांनी मराठी चित्रपट सृष्टी व इतर अनेक भाषांमध्ये कार्य केले आहे त्याचा उल्लेख या लेखात करायला हवा होता असे वाटते. तसेच मराठी चित्रपट सृष्टीत “आनंदघन” या टोपण नावाने संगीतबद्ध केलेली त्यांची गाणी तर अजरामर आहेत. त्यात ‘ऐरणीच्या देवा तुला…’ हे गाणं तर अजूनही रसिकांच्या हृदयावर राज्य करतं आहे.
नेटका आणि वाचत राहावंसं वाटणारा लेख. चांगला दस्तावेज आहे हा.