अलिकडे दिवाळी आली की आठवणी येत ती आमच्या लहानपणाची. म्हणजे ५०/६० वर्षांपूर्वीच्या दिवाळीची. घरोघरीचं नवरात्र मोठ्या श्रद्धेनं साजरं झालेलं असायचं. नंतर दसरा झाला की वेध लागायचे दिवाळीचे. वर्षातून एकदा दिवाळीपूर्वी सगळं घर झाडूनपुसून लख्ख केलं जायचं. घराचे कानेकोपरे, माळा, ओसरी, अंगण सगळं झाडून, सारवून स्वच्छ करण्यात गडीमाणसांचा फार मोठा हातभार असे. घर झाडण्या-सारवण्यात घरच्या वयनीबायला मदत करण्यात गडीमाणसं मनापासून भाग घेत आणि त्याबद्दल मालकिणीकडून त्यांना ‘दिवाळा’ दिली जायची. जो-तो आपल्या ऐपतीप्रमाणे नोकरचाकरांना दिवाळी देत असे; त्यात कुठलाही करार, बोली नसायची. देणारा आणि घेणारा दोघांच्याही खुशीचा मामला असायचा. घरच्या मुलांना नवीन कपडे शिवले जायचे. मुलांना दोन जोड शर्ट-पॅन्ट आणि मुलींना जरीच्या काठाची परकर-पोलकी शिवली जायची. ऐन दिवाळीच्या गर्दीत शिंप्याला वेळ मिळायचा नाही म्हणून महिनाभर आधीच कापड खरेदी केले जायचे आणि शिंपीदादाकडे पोचतेही केले जायचे.
दसरा झाला की घराघरांत खमंग पदार्थांचे वास दरवळायला लागायचे. दामल्यांकडे बेसन भाजतायत आणि गोखल्यांकडे लाडवांचा घाणा भाजतायत, हे अवघ्या वाडीला कळायचं. चकल्या, कडबोळी, अनारसे, लाडू, चिवडा प्रत्येक घरी अगत्यानं केलं जायचं. म्हणजे गृहिणी स्वत:च्या हातांनी अगदी हौसेनं हे सगळे पदार्थ तयार करीत. गंमत म्हणजे वर्षातून फक्त एकदा- दिवाळीतच हे पदार्थ केले जायचे. त्यामुळे चकल्या, करंज्यांची कोण अपूर्वाई वाटायची! दिवाळीच्या दिवशी शेजारीपाजारी या पदार्थांची ताटं फिरायची. म्हणजे गोडबोले काकू स्वत: केलेले पदार्थ एका ताटात घालून ते ताट जोशी, कुळकर्णी, केळकरांकडे पाठवायच्या, त्या-त्या घरांतूनही ती ताटं तशीच पदार्थांनी भरून गोडबोले काकूंकडे परत यायची. प्रत्येक घरात मग एकमेकांकडच्या फराळाचा खमंग चवीचवीने फडशा पाडायचा. रेडीमेड चिवडा-चकल्यांची संकल्पनाच त्यावेळी नव्हती.
आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे चार दिवस म्हणजे दिवाळी. खरं तर तिथीप्रमाणे पाहिलं तर हे पाच दिवस असतात. पण कधी पंचांगाप्रमाणे एखाद्या तिथीचा लोप तरी होतो किंवा एकाच दिवशी दोन तिथी तरी येतात. म्हणजे दिवाळीचा सण चार दिवसांचा. आश्विन-कार्तिक महिन्याच्या मध्यावर शरद ऋतूत ही दिवाळी येते. पावसाळा सरलेला, गुलाबी थंडीचं आगमन झालेलं, सर्वत्र आनंद, उत्साह भरून राहिलेला असतो.
दिवाळी म्हणजे दीपोत्सव. पुराणकथा सांगते की, प्रभू रामचंद्र वनवास संपवून सीतामाई आणि लक्ष्मणासह अयोध्येत परतले. लोकांनी घरोघरी दिवे लावून रामप्रभूंचं मोठ्या आनंदानी स्वागत केलं तो दिवस म्हणजे दिवाळी. आजही आपण पणत्या, दिवे लावून, घरावर आकाशकंदील टांगून ही परंपरा पाळतो. आपल्या आजूबाजूचा सर्व अंध:कार दिवे लावून उजळून टाकायचा. हे दिवे म्हणजे जणू ज्ञानाचे, सुखसमृद्धीचे, आशेचे प्रतीक. नवीन कपडे घालून, नव्या उमेदीनं नवे संकल्प करीत हा दीपोत्सव साजरा करायचा. दारापुढे सडासारवण करून रांगोळ्या रेखायच्या. समांतर ठिपके-ठिपके जोडून रांगोळी काढायची आणि त्यात हिरवे, पिवळे, जांभळे रंग भरायचे… किती कौशल्य असायचं त्यात काही ठिकाणी तर मोठमाठे किल्ले उभारले जायचे. म्हणजे घरापुढच्या अंगणात शिवाजीराजांच्या एखाद्या किल्ल्याचं मॉडेल दगडविटांनी उभं केलेलं असायचं. बारीक-सारीक तपशीलांसह, कधी हलत्या चित्रांनी हे किल्ले तयार व्हायचे, कधी कधी तिकिटं लावूनही हे किल्ले पहायला गर्दी व्हायची.
आम्ही मुलंही घरोघरी किल्ले करायचो. म्हणजे दारापुढे किंवा व्हरांड्यात २/४ फूट उंचीचा मातीचा किल्ला उभारायचा. पुठ्ठ्याचे बुरूज, बुरूजाच्या माथ्यावर सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराज, त्यांच्यासमोर मुसलमानांशी लढाई करणारे मावळे, आरसा लावून केलेलं तळ, त्यात पाणी पिणारा पिवळा वाघ, शेजारी त्याची गुहा, किल्ल्याच्या पायर्या, विटांची पावडर घालून तयार केलेली तांबडी पायवाट, त्या पायवाटेवरून जाणारी गवळण आणि गंमत म्हणजे कधी कधी एखादा पोस्टमनही असायचा. ही मातीची चित्रं मोठ्या जिवाभावानं जपली जायची. किल्ला बांधून झाला की त्यावर हळीव किंवा मोहोरी पेरायची, म्हणजे ४/५ दिवसांत छान हिरवीगार वनराई उगवायची. आल्या-गेल्यांच्या कौतुकाचा विषय व्हायचे हे किल्ले!
दिवाळीच्या दिवसांत आठवणीनं नव्या-जुन्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना भेटायला जायचा रिवाज होता. एकमेकांकडे फराळाला बोलावलं जायचं. नातेसंबंधांचा ओलावा या भेटीतून पाझरत जायचा. आज सणवार साजरे करताना त्यातलं हौसेमौजेचं प्रमाण वाढलंय, पण परंपरेचं भान कमी कमी होत चाललेलं दिसून येतंय. आजकाल कुठलाही सण म्हटला की त्याचं महत्त्व काय हे लक्षात न घेता त्याची सुट्टी मिळणार ह्याचाच आनंद मानला जातो. गणपती, दिवाळीसारखे सण आपण मोठ्या उत्साहात साजरे करतो, पण ते साजरे करण्यामागचं प्रयोजन काय ह्याचा विचार न करता केवळ कॅलेंडरमधला बँक हॉलिडे पाहून आनंद माननं खेदजनक आहे. आपले सण हे केवळ आनंद देण्याच्या उद्देशानं योजलेले नाहीत तर एका उदात्त प्रेरणेनं सर्व माणसांनी एकत्र यावं, श्रद्धेनं जगण्याची प्रेरणा देत-घेत येणार्या संकटांना, दु:खांना दूर सारून आनंदाने जगण्याच्या उर्मीतून निर्माण झालेले आहेत.
पूर्वी दिवाळीची सुरुवात आश्विन-कृष्ण द्वादशीपासून व्हायची. ही द्वादशी म्हणजे वसुबारस. या दिवशी सवत्स धेनूची पूजा केली जायची. गायवासराला ओवाळून प्रेमाने घास भरवला जायचा. आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत गोधनाची पूजा केली तर घरात समृद्धी, संपन्नता नांदते ह्या श्रद्धेनं ही पूजा केली जायची. खरं तर देवपूजा, धरणीची पूजा, पशुपक्ष्यांची पूजा, इतकंच काय सापासारख्या विषारी जीवाचीही पूजा करण्यामागे कृतज्ञता, उपयुक्तता, आरोग्य, वैद्यकशास्त्र आणि समाधान या सर्वांचं देवत्वाशी जोडलेलं नातं असा उदात्त विचार आहे. गेल्या २/४ वर्षांत काही शहरांत बाजारूपणाचाच दर्प जाणवतो. कारण ना कुणाच्या घरी गोठा, ना गायवासरू. मग भाड्यानं गायी आणून चार पैसे गाठीला बांधायची युक्ती एवढाच ‘अर्थ’ त्यातून व्यक्त होतो.
पुढचा दिवस धनत्रयोदशी, धनतेरस. या दिवसापासून खरी दिवाळी सुरू होते. या दिवशी घराबाहेर दिवा लावला तर अपमृत्यू टळतो हा समज होता. यासंबंधी एक कहाणी सांगितली जाते. हेम नावाचा एक प्रजाहितदक्ष राजा होता. त्याच्या पुत्राचं लग्न होऊन चारच दिवस उलटले होते तोच त्या राजपुत्राचा मृत्यू झाला. राजा आणि प्रजाही शोकाकुल झाली. त्याचे प्राण न्यायला आलेल्या यमदूतांनाही शोक आवरेना. ते पाहून प्रत्यक्ष यमाचेही काळीज द्रवले. त्याने राजपुत्राचे प्राण परत दिले आणि लोकांना सांगितले की, ‘जे लोक हे पाच दिवस रोज आपल्या घरासमोर दिवे लावतील त्यांना अपमृत्यूचे भय राहणार नाही!’ तेव्हापासून चार-पाच दिवस दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो.
खरं म्हणजे देवांचा वैद्य धन्वंतरी याच्या सन्मानार्थ ही तिथी साजरी केली जाते. आरोग्यसंपन्न रहा असा संदेश देणारी ही तिथी. आजही वैद्यलोक या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात आणि व्यापारीवर्ग आपल्या दुकानांची, वह्या-चोपड्यांची पूजा करतात.
दिवाळीच्या दुसर्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीला भल्या पहाटे उठून मंगलस्नान करायचं. भर थंडीत पहाटे उठून कुडकुडणार्या दातांनी आंघोळीला बसायचं. आई आम्हा मुलांना पाटावर बसवून अंगाला तेल लावायची, पाटाभोवती रांगोळीची रेघ न विसरता ओढली जायची. न्हाणीघरात बंब पेटवलेला असे. तांब्याचा बंबही चिंच-मीठ लावून घासून तांबूस रंगात झळझळत असायचा. विशेष म्हणजे, त्यालाही पेटत घालण्यापूर्वी फुलांचा हार घातला जायचा. मग सुगंधी उटणे लावून, गरमागरम पाण्याने अभ्यंगस्नान. गंमत म्हणजे खास दिवाळी म्हणून घरात खास साबण आणलेला असायचा. इतर दिवशी साधा हिरवा हमाम साबण असायचा. आंघोळीपूर्वी उंबरठ्यावर ठेवलेले कारिंटे पायाने चिरडताना केवढी गंमत वाटायची. जणू आपणच नरकासुराला पायाखाली चिरडतो आहोत असं वाटायचं!
कृतज्ञता व्यक्त करणं हा आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक. या दिवशी पहाटे श्रीकृष्णानं नरकासुराचा वध करून सोळा हजार राजकन्यांना बंदिवासातून मुक्त केलं आणि प्रजाजनांना अभय दिलं. इंद्रादी देवांची नरकासुरानं लुटलेली संपत्तीही देवांना परत दिली. या घटनेचं कृतज्ञतापूर्वक स्मरण म्हणून साजरी व्हायची नरक चतुर्दशी! सर्वांच्या आंघोळी झाल्या की घरातल्या सर्वांनी एकत्र बसून फराळ करायचा.
तिसर्या दिवशी असते अमावस्या. अमावस्येचा अंधार दूर सारणार्या लक्ष लक्ष ज्योतींच्या सोनेरी प्रकाशात, सोन्याच्या पावलांनी घरी येणार्या लक्ष्मीची मनोभावे पूजा केली तो हा दिवस. घरात सुखसमृद्धी, शांतता नांदो, अज्ञानाचा, अशुभाचा अंध:कार नाहीसा करून मांगल्याचा प्रकाश पसरो म्हणून केलेली ही लक्ष्मीची प्रार्थना.
आज मात्र कानठळ्या बसविणार्या फटाक्यांच्या आवाजांनी, धुरांनी आपल्या भोवतीचा परिसर अमंगल करून, केरकचर्याचं प्रदूषण वाढवून आपण आपलं आयुष्य धोक्यात आणतो आहोत. लक्ष्मीपूजन म्हणजे घरात येणार्या लक्ष्मीचा सन्मान करणं. पण आज संपत्तीचं वारेमाप प्रदर्शन करण्यात आपण धन्यता मानतो आहोत. संपूर्ण वर्षात फक्त हे चार दिवस, हौसेमौजेसाठी पैसे खर्च करणार्या आमच्या पूर्वजांचा सुज्ञपणा इथे आवर्जून आठवावा.
बलिप्रतिपदा किंवा पाडवा म्हणजे विक्रम संवत्सराची सुरुवात. म्हणून नववर्षाची सुरुवात मानण्याची प्रथा आहे. अत्यंत पवित्र मानलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक. या दिवशी कोणत्याही नव्या संकल्पाला सुरुवात केली जाते. याच दिवशी विष्णूने वामनाचे रूप घेऊन बळीराजाकडे तीन पावलं जमीन मागितली आणि बळीराजाला पाताळात गाडलं, नि:ष्प्रभ केलं. बळीराजानं विष्णूचा डाव ओळखला होता; परंतु त्याने दानशूरपणानं सर्वस्वाचं दान दिलं. त्यामुळे श्रीविष्णूंनी प्रसन्न होऊन त्याला पाताळाचं राज्य दिलं. स्वत: त्याचे द्वारपाल झाले आणि सांगितलं की, ‘आजपासून लोक ह्या दिवशी तुझ्या नावाचं स्मरण करतील’. म्हणून या दिवसाला बलिप्रतिपदा म्हणतात.
पाडव्याची आणखी एक हृदय परंपरा आहे. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती तिला काहीतरी भेटवस्तू ओवाळणी म्हणून देतो. आजच्या काळात याचं महत्त्व लक्षात येणार नाही. पण जुन्या काळी पतीने पत्नीला भेटवस्तू आणणं आणि सर्वांसमोर ती तिला देणं हा उभयतांमधील प्रेम वृद्धिंगत करण्याचा एक गोड उपचार होता. नवविवाहितांचा दिवाळीसण थाटामाटात साजरा करण्याचीही प्रथा आहे.
भाऊबीज किंवा यमद्वितीया म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस. पौराणिक कथेनुसार यम आणि यमी या बहीण-भावांच्या प्रेमाची स्मृती म्हणजे हा दिवस. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जेवायला जातो. बहीण स्वत:च्या हातांनी गोडधोडाचा स्वयंपाक करून भावाला जेवायला घालते, त्याला पंचारतीने ओवाळते आणि भाऊ भाऊबीज म्हणून तिला ओवाळणी घालतो. माहेराशी असलेले संबंध दृढ करणारा हा सोहळा. जिला भाऊ नसेल ती स्त्री चंद्राला भाऊ मानून ओवाळते. भावा-बहिणीमधल्या विशुद्ध प्रेमाचं हे प्रतीक दुसरं काय?
सणांचं महत्त्व जाणून घेताना अशा आख्यायिका, दंतकथांची आठवण स्वाभाविकपणेच होते. आजच्या विज्ञान युगात या कथांना चमत्कार कथा म्हणून त्याकडे दुर्लक्ष होऊ नये. सुट्टीचा आनंद लुटताना निदान या कथांचा परिचय करून घेतला पाहिजे. तुम्हालाच माहीत नसेल तर पुढच्या पिढीला ते कोण सांगणार? कारण श्रद्धा हाच या सर्व आख्यायिकांचा पाया आहे. श्रद्धा हीच धर्माची बैठक असते आणि या श्रद्धेच्या बळावर आपलं जगणं सुफळ संपूर्ण करत असतो.
प्राचीन काळापासून सुरू असलेल्या भारतीय जीवनशैलीची परंपरा निश्चितपणे काळावेळाचं भान राखून निर्माण केलेली आहे. ऋतुचक्र आणि मानवी जीवन यांच्या परस्पर अवलंबित्वाची ही घट्ट वीण आहे. माणसाच्या दैनंदिन गरजा, त्याचे आचारविचार आणि विकारसुद्धा लक्षात घेऊन, पंचमहाभूतांचा त्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या जीवनमानात या सणावारांची योजना केलेली आहे. आपले उत्सव किंवा व्रतवैकल्ये म्हणजे केवळ भाकडकथा नाहीत. विश्वतत्त्वाशी एकरूप होत होत आपलं जीवन समृद्ध करण्याचे ते मार्ग आहेत. हा प्रवास अवघड वाटू नये म्हणून उत्सवांच्या रूपाने ही आनंदाची शिदोरी आपल्याबरोबर दिलेली आहे!
ही दिवाळी व नूतन वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचे, आनंदाचे जावो ही शुभेच्छा!
दसरा झाला की घराघरांत खमंग पदार्थांचे वास दरवळायला लागायचे. दामल्यांकडे बेसन भाजतायत आणि गोखल्यांकडे लाडवांचा घाणा भाजतायत, हे अवघ्या वाडीला कळायचं. चकल्या, कडबोळी, अनारसे, लाडू, चिवडा प्रत्येक घरी अगत्यानं केलं जायचं. म्हणजे गृहिणी स्वत:च्या हातांनी अगदी हौसेनं हे सगळे पदार्थ तयार करीत. गंमत म्हणजे वर्षातून फक्त एकदा- दिवाळीतच हे पदार्थ केले जायचे. त्यामुळे चकल्या, करंज्यांची कोण अपूर्वाई वाटायची! दिवाळीच्या दिवशी शेजारीपाजारी या पदार्थांची ताटं फिरायची. म्हणजे गोडबोले काकू स्वत: केलेले पदार्थ एका ताटात घालून ते ताट जोशी, कुळकर्णी, केळकरांकडे पाठवायच्या, त्या-त्या घरांतूनही ती ताटं तशीच पदार्थांनी भरून गोडबोले काकूंकडे परत यायची. प्रत्येक घरात मग एकमेकांकडच्या फराळाचा खमंग चवीचवीने फडशा पाडायचा. रेडीमेड चिवडा-चकल्यांची संकल्पनाच त्यावेळी नव्हती.
आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे चार दिवस म्हणजे दिवाळी. खरं तर तिथीप्रमाणे पाहिलं तर हे पाच दिवस असतात. पण कधी पंचांगाप्रमाणे एखाद्या तिथीचा लोप तरी होतो किंवा एकाच दिवशी दोन तिथी तरी येतात. म्हणजे दिवाळीचा सण चार दिवसांचा. आश्विन-कार्तिक महिन्याच्या मध्यावर शरद ऋतूत ही दिवाळी येते. पावसाळा सरलेला, गुलाबी थंडीचं आगमन झालेलं, सर्वत्र आनंद, उत्साह भरून राहिलेला असतो.
दिवाळी म्हणजे दीपोत्सव. पुराणकथा सांगते की, प्रभू रामचंद्र वनवास संपवून सीतामाई आणि लक्ष्मणासह अयोध्येत परतले. लोकांनी घरोघरी दिवे लावून रामप्रभूंचं मोठ्या आनंदानी स्वागत केलं तो दिवस म्हणजे दिवाळी. आजही आपण पणत्या, दिवे लावून, घरावर आकाशकंदील टांगून ही परंपरा पाळतो. आपल्या आजूबाजूचा सर्व अंध:कार दिवे लावून उजळून टाकायचा. हे दिवे म्हणजे जणू ज्ञानाचे, सुखसमृद्धीचे, आशेचे प्रतीक. नवीन कपडे घालून, नव्या उमेदीनं नवे संकल्प करीत हा दीपोत्सव साजरा करायचा. दारापुढे सडासारवण करून रांगोळ्या रेखायच्या. समांतर ठिपके-ठिपके जोडून रांगोळी काढायची आणि त्यात हिरवे, पिवळे, जांभळे रंग भरायचे… किती कौशल्य असायचं त्यात काही ठिकाणी तर मोठमाठे किल्ले उभारले जायचे. म्हणजे घरापुढच्या अंगणात शिवाजीराजांच्या एखाद्या किल्ल्याचं मॉडेल दगडविटांनी उभं केलेलं असायचं. बारीक-सारीक तपशीलांसह, कधी हलत्या चित्रांनी हे किल्ले तयार व्हायचे, कधी कधी तिकिटं लावूनही हे किल्ले पहायला गर्दी व्हायची.
आम्ही मुलंही घरोघरी किल्ले करायचो. म्हणजे दारापुढे किंवा व्हरांड्यात २/४ फूट उंचीचा मातीचा किल्ला उभारायचा. पुठ्ठ्याचे बुरूज, बुरूजाच्या माथ्यावर सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराज, त्यांच्यासमोर मुसलमानांशी लढाई करणारे मावळे, आरसा लावून केलेलं तळ, त्यात पाणी पिणारा पिवळा वाघ, शेजारी त्याची गुहा, किल्ल्याच्या पायर्या, विटांची पावडर घालून तयार केलेली तांबडी पायवाट, त्या पायवाटेवरून जाणारी गवळण आणि गंमत म्हणजे कधी कधी एखादा पोस्टमनही असायचा. ही मातीची चित्रं मोठ्या जिवाभावानं जपली जायची. किल्ला बांधून झाला की त्यावर हळीव किंवा मोहोरी पेरायची, म्हणजे ४/५ दिवसांत छान हिरवीगार वनराई उगवायची. आल्या-गेल्यांच्या कौतुकाचा विषय व्हायचे हे किल्ले!
दिवाळीच्या दिवसांत आठवणीनं नव्या-जुन्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना भेटायला जायचा रिवाज होता. एकमेकांकडे फराळाला बोलावलं जायचं. नातेसंबंधांचा ओलावा या भेटीतून पाझरत जायचा. आज सणवार साजरे करताना त्यातलं हौसेमौजेचं प्रमाण वाढलंय, पण परंपरेचं भान कमी कमी होत चाललेलं दिसून येतंय. आजकाल कुठलाही सण म्हटला की त्याचं महत्त्व काय हे लक्षात न घेता त्याची सुट्टी मिळणार ह्याचाच आनंद मानला जातो. गणपती, दिवाळीसारखे सण आपण मोठ्या उत्साहात साजरे करतो, पण ते साजरे करण्यामागचं प्रयोजन काय ह्याचा विचार न करता केवळ कॅलेंडरमधला बँक हॉलिडे पाहून आनंद माननं खेदजनक आहे. आपले सण हे केवळ आनंद देण्याच्या उद्देशानं योजलेले नाहीत तर एका उदात्त प्रेरणेनं सर्व माणसांनी एकत्र यावं, श्रद्धेनं जगण्याची प्रेरणा देत-घेत येणार्या संकटांना, दु:खांना दूर सारून आनंदाने जगण्याच्या उर्मीतून निर्माण झालेले आहेत.
पूर्वी दिवाळीची सुरुवात आश्विन-कृष्ण द्वादशीपासून व्हायची. ही द्वादशी म्हणजे वसुबारस. या दिवशी सवत्स धेनूची पूजा केली जायची. गायवासराला ओवाळून प्रेमाने घास भरवला जायचा. आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत गोधनाची पूजा केली तर घरात समृद्धी, संपन्नता नांदते ह्या श्रद्धेनं ही पूजा केली जायची. खरं तर देवपूजा, धरणीची पूजा, पशुपक्ष्यांची पूजा, इतकंच काय सापासारख्या विषारी जीवाचीही पूजा करण्यामागे कृतज्ञता, उपयुक्तता, आरोग्य, वैद्यकशास्त्र आणि समाधान या सर्वांचं देवत्वाशी जोडलेलं नातं असा उदात्त विचार आहे. गेल्या २/४ वर्षांत काही शहरांत बाजारूपणाचाच दर्प जाणवतो. कारण ना कुणाच्या घरी गोठा, ना गायवासरू. मग भाड्यानं गायी आणून चार पैसे गाठीला बांधायची युक्ती एवढाच ‘अर्थ’ त्यातून व्यक्त होतो.
पुढचा दिवस धनत्रयोदशी, धनतेरस. या दिवसापासून खरी दिवाळी सुरू होते. या दिवशी घराबाहेर दिवा लावला तर अपमृत्यू टळतो हा समज होता. यासंबंधी एक कहाणी सांगितली जाते. हेम नावाचा एक प्रजाहितदक्ष राजा होता. त्याच्या पुत्राचं लग्न होऊन चारच दिवस उलटले होते तोच त्या राजपुत्राचा मृत्यू झाला. राजा आणि प्रजाही शोकाकुल झाली. त्याचे प्राण न्यायला आलेल्या यमदूतांनाही शोक आवरेना. ते पाहून प्रत्यक्ष यमाचेही काळीज द्रवले. त्याने राजपुत्राचे प्राण परत दिले आणि लोकांना सांगितले की, ‘जे लोक हे पाच दिवस रोज आपल्या घरासमोर दिवे लावतील त्यांना अपमृत्यूचे भय राहणार नाही!’ तेव्हापासून चार-पाच दिवस दिवे लावून दीपोत्सव साजरा केला जातो.
खरं म्हणजे देवांचा वैद्य धन्वंतरी याच्या सन्मानार्थ ही तिथी साजरी केली जाते. आरोग्यसंपन्न रहा असा संदेश देणारी ही तिथी. आजही वैद्यलोक या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात आणि व्यापारीवर्ग आपल्या दुकानांची, वह्या-चोपड्यांची पूजा करतात.
दिवाळीच्या दुसर्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीला भल्या पहाटे उठून मंगलस्नान करायचं. भर थंडीत पहाटे उठून कुडकुडणार्या दातांनी आंघोळीला बसायचं. आई आम्हा मुलांना पाटावर बसवून अंगाला तेल लावायची, पाटाभोवती रांगोळीची रेघ न विसरता ओढली जायची. न्हाणीघरात बंब पेटवलेला असे. तांब्याचा बंबही चिंच-मीठ लावून घासून तांबूस रंगात झळझळत असायचा. विशेष म्हणजे, त्यालाही पेटत घालण्यापूर्वी फुलांचा हार घातला जायचा. मग सुगंधी उटणे लावून, गरमागरम पाण्याने अभ्यंगस्नान. गंमत म्हणजे खास दिवाळी म्हणून घरात खास साबण आणलेला असायचा. इतर दिवशी साधा हिरवा हमाम साबण असायचा. आंघोळीपूर्वी उंबरठ्यावर ठेवलेले कारिंटे पायाने चिरडताना केवढी गंमत वाटायची. जणू आपणच नरकासुराला पायाखाली चिरडतो आहोत असं वाटायचं!
कृतज्ञता व्यक्त करणं हा आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक. या दिवशी पहाटे श्रीकृष्णानं नरकासुराचा वध करून सोळा हजार राजकन्यांना बंदिवासातून मुक्त केलं आणि प्रजाजनांना अभय दिलं. इंद्रादी देवांची नरकासुरानं लुटलेली संपत्तीही देवांना परत दिली. या घटनेचं कृतज्ञतापूर्वक स्मरण म्हणून साजरी व्हायची नरक चतुर्दशी! सर्वांच्या आंघोळी झाल्या की घरातल्या सर्वांनी एकत्र बसून फराळ करायचा.
तिसर्या दिवशी असते अमावस्या. अमावस्येचा अंधार दूर सारणार्या लक्ष लक्ष ज्योतींच्या सोनेरी प्रकाशात, सोन्याच्या पावलांनी घरी येणार्या लक्ष्मीची मनोभावे पूजा केली तो हा दिवस. घरात सुखसमृद्धी, शांतता नांदो, अज्ञानाचा, अशुभाचा अंध:कार नाहीसा करून मांगल्याचा प्रकाश पसरो म्हणून केलेली ही लक्ष्मीची प्रार्थना.
आज मात्र कानठळ्या बसविणार्या फटाक्यांच्या आवाजांनी, धुरांनी आपल्या भोवतीचा परिसर अमंगल करून, केरकचर्याचं प्रदूषण वाढवून आपण आपलं आयुष्य धोक्यात आणतो आहोत. लक्ष्मीपूजन म्हणजे घरात येणार्या लक्ष्मीचा सन्मान करणं. पण आज संपत्तीचं वारेमाप प्रदर्शन करण्यात आपण धन्यता मानतो आहोत. संपूर्ण वर्षात फक्त हे चार दिवस, हौसेमौजेसाठी पैसे खर्च करणार्या आमच्या पूर्वजांचा सुज्ञपणा इथे आवर्जून आठवावा.
बलिप्रतिपदा किंवा पाडवा म्हणजे विक्रम संवत्सराची सुरुवात. म्हणून नववर्षाची सुरुवात मानण्याची प्रथा आहे. अत्यंत पवित्र मानलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक. या दिवशी कोणत्याही नव्या संकल्पाला सुरुवात केली जाते. याच दिवशी विष्णूने वामनाचे रूप घेऊन बळीराजाकडे तीन पावलं जमीन मागितली आणि बळीराजाला पाताळात गाडलं, नि:ष्प्रभ केलं. बळीराजानं विष्णूचा डाव ओळखला होता; परंतु त्याने दानशूरपणानं सर्वस्वाचं दान दिलं. त्यामुळे श्रीविष्णूंनी प्रसन्न होऊन त्याला पाताळाचं राज्य दिलं. स्वत: त्याचे द्वारपाल झाले आणि सांगितलं की, ‘आजपासून लोक ह्या दिवशी तुझ्या नावाचं स्मरण करतील’. म्हणून या दिवसाला बलिप्रतिपदा म्हणतात.
पाडव्याची आणखी एक हृदय परंपरा आहे. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती तिला काहीतरी भेटवस्तू ओवाळणी म्हणून देतो. आजच्या काळात याचं महत्त्व लक्षात येणार नाही. पण जुन्या काळी पतीने पत्नीला भेटवस्तू आणणं आणि सर्वांसमोर ती तिला देणं हा उभयतांमधील प्रेम वृद्धिंगत करण्याचा एक गोड उपचार होता. नवविवाहितांचा दिवाळीसण थाटामाटात साजरा करण्याचीही प्रथा आहे.
भाऊबीज किंवा यमद्वितीया म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस. पौराणिक कथेनुसार यम आणि यमी या बहीण-भावांच्या प्रेमाची स्मृती म्हणजे हा दिवस. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जेवायला जातो. बहीण स्वत:च्या हातांनी गोडधोडाचा स्वयंपाक करून भावाला जेवायला घालते, त्याला पंचारतीने ओवाळते आणि भाऊ भाऊबीज म्हणून तिला ओवाळणी घालतो. माहेराशी असलेले संबंध दृढ करणारा हा सोहळा. जिला भाऊ नसेल ती स्त्री चंद्राला भाऊ मानून ओवाळते. भावा-बहिणीमधल्या विशुद्ध प्रेमाचं हे प्रतीक दुसरं काय?
सणांचं महत्त्व जाणून घेताना अशा आख्यायिका, दंतकथांची आठवण स्वाभाविकपणेच होते. आजच्या विज्ञान युगात या कथांना चमत्कार कथा म्हणून त्याकडे दुर्लक्ष होऊ नये. सुट्टीचा आनंद लुटताना निदान या कथांचा परिचय करून घेतला पाहिजे. तुम्हालाच माहीत नसेल तर पुढच्या पिढीला ते कोण सांगणार? कारण श्रद्धा हाच या सर्व आख्यायिकांचा पाया आहे. श्रद्धा हीच धर्माची बैठक असते आणि या श्रद्धेच्या बळावर आपलं जगणं सुफळ संपूर्ण करत असतो.
प्राचीन काळापासून सुरू असलेल्या भारतीय जीवनशैलीची परंपरा निश्चितपणे काळावेळाचं भान राखून निर्माण केलेली आहे. ऋतुचक्र आणि मानवी जीवन यांच्या परस्पर अवलंबित्वाची ही घट्ट वीण आहे. माणसाच्या दैनंदिन गरजा, त्याचे आचारविचार आणि विकारसुद्धा लक्षात घेऊन, पंचमहाभूतांचा त्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या जीवनमानात या सणावारांची योजना केलेली आहे. आपले उत्सव किंवा व्रतवैकल्ये म्हणजे केवळ भाकडकथा नाहीत. विश्वतत्त्वाशी एकरूप होत होत आपलं जीवन समृद्ध करण्याचे ते मार्ग आहेत. हा प्रवास अवघड वाटू नये म्हणून उत्सवांच्या रूपाने ही आनंदाची शिदोरी आपल्याबरोबर दिलेली आहे!
ही दिवाळी व नूतन वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचे, आनंदाचे जावो ही शुभेच्छा!