रवा, डाळी, डालडा प्रत्येकी किलोभर. सोबत वेलची, सुका मेवा यांची घाऊक यादी करायला बसलं की, दिवाळी १० एक दिवसांवर आलेली असायची. जालगावातल्या गो. म.फाटक दुकानात तेव्हा गर्दी म्हणजे यादी दिली की, अर्ध्या पाऊण तासाने नंबर लागायचा. अतिशय प्रसिद्ध असं हे किराणा मालाचं दुकान सणासुदीला अधिक जास्ती गजबजलेलं. अशातच त्या गर्दीतून वाट काढत जातांना डालड्यासाठी आणलेला स्टीलचा डबा, तेलासाठीचा कॅन त्या गर्दीत मध्येमध्ये कडमडत असे. जाम राग यायचा आईचा अशावेळी. तेलाचा बंद कॅन आणि डालड्याची पॅक बरणी किंवा पॅकेट मिळत असतांना घरून कशाला आणायचे हे डबे वैगरे.
अर्ध्याएक तासात ‘चला जिन्नस घ्या’ म्हणून आप्पांची हाक यायची. ज्याचं झालंय घेऊन त्यांची जिन्नस पिशवीत भरायची घाई आणि आमची यादीच्या क्रमानुसार पिशव्या तयार करायची लगबग सगळं इतक्या ऐन टायमाला व्हायचं. त्यात डालड्याचा डबा तागडी समोरच्या फळीवर दोनचारदा आदळायचा. आप्पा पुन्हा खसकन ओरडत, ‘टाकळे, अहो वनस्पती डालडा ५ व्या नंबरवर लिहलेला असला तरी तो आम्ही शेवटी देणार आहोत. आधी तो डबा खाली ठेवा बघू नायतर डब्याला पोक बिक काढाल.’ आजूबाजूचे फ़िदीफिदी हसत आणि डोक्यात आणिक तिडीक जाई. आईकड डोळे वटारून बघायची सोय नव्हती. पुन्हा आप्पांनी पाहिलं तर आणिक काहीतरी फटकन बोलून जायचे. तसे ते फाटक्या तोंडाचे म्हणून परिचित होतेच. म्हणून फारसं कुणी त्यांच्या फंदात पडत नसे. ‘नुसता अंगाचा साबण म्हणजे कोणता? मैसूर वाला देऊ की, अजून भारी…’ ‘जास्त महागातला नको आप्पा, पण जरा चांगल्या वासाचा द्या’ ‘इतक्या गर्दीत तुझा साबण शोधायला वेळ नाही. देईन तो घ्यावा लागेल बदलून मिळणार नाही. ‘यादीनुसार एक एक घट्ट दोरा गुंडाळलेल्या जिन्नसाच्या पुड्या आई तिने नेमलेल्या पिशवीत भरल्या जात. ‘वहिनी, उटणं याद्या पूर्ण झाल्या की निघताना पावती टेबलावर न विसरता घ्या त्याचे पैसे लावले नाहियेत.’
इकडे याद्या संपत आल्या की माझं सगळं लक्ष फटाक्यांच्या टेबलाकड़ असायचं. कधी एकदाचा जिन्नस घेऊन होतोय आणि मी कधी फटाके घेतोय! नुसती चुळबुळ वाढत जाई. आई ‘आवर पटकन’ म्हणत पिशव्या धरतांना हातातले त्राण निघून जाई आणि परत आप्पा खेकसत, ‘काय रे इतकी घाई कशाला? फटाके काय संपणार नाहीयेत. आधी एक काम पूर्ण करावं मग दुसऱ्याकड़े वळावं बाळ. वहिनी फार लाड बरे नव्हेत मुलांचे. आजकालची पोरं म्हणजे…’ आता पुढची किमान १० मिनिटे आप्पा यावरच बोलणार म्हणून मग काढता पाय घेत आपल्याला झेपणाऱ्या पिशव्या भराभर दुकानाबाहेर आणाव्यात म्हटलं तर डालडा पोह्यांची पिशवी सोडली की सगळंच कसं जड़ काम. पण तरीही आपली तडमड पाहून आईला दया येई .रुमालातल्या नोटा तपासून ती म्हणे, ‘जा. तुळशीच्या लग्नापर्यंत पुरतील तेवढे फटाके घे. जास्त महागातले घेऊ नको. अजून कंदील-पणत्या- रांगोळी घ्यायची बाकी आहे. पैसे पुरणार नाहीत.’
मनात असूनही खूपसारे फटाके घेता येत नसत. फारफार तर एक चक्र बॉक्स, अर्धा पाऊस बॉक्स, अर्धा डजन फुलबाजा बॉक्स, चार लक्ष्मी बारचे पॅकेट, लवंगी बारची अक्खी लड़ी, दोन चार सुरसुऱ्या, एक नागगोळी बॉक्स, एक सिंह बॉम्ब बॉक्स (हे शक्यतो दिवाळीच्या सकाळी जो पहिला उठेल त्यांनी लावण्याच्या मानाचे विक्रमी बार म्हणजे यांच्या आवाजाची दहशत असे), अर्धा बॉक्स सुरसुरी बाण इतक्यात टोटल शंभरच्यावर जाई आणि आई म्हणे, ‘खूप झाले. बस कर आता. नाहीतर बाबा ओरड़तील… ‘बाबांचं नाव घेतलं म्हणजे चार सुतळी बॉम्ब एकत्र लावल्यागत वाटे. त्यांचा दरारा म्हणजे जरा वेगळंच प्रकरण. अजून आणिक काय घ्यावं वैगेरे धाडसच होत नसे. हेच फटाके तुळशीच्या लग्नापर्यंत पुरावे म्हणून अगदी लवंगी बारची माळ सोडवून त्यातला एक एक फटाका मोकळा करून वाजवायचा. फुसक्या निघालेल्या फटक्यांना उन्हात तापवून पुन्हा त्यांना वाजवी. करणं अशा एक ना अनेक युक्त्या काढत आम्ही फाटकेबाजी करत असू. जितकं मिळेल ते पुरवून वापरावं त्याउपर अपेक्षा करण्याचा सोस नसे त्याकाळी. आजकालची पोरं हजार दोन हजारचा चुराडा करूनही त्यांचं समाधान होत नाही.
दिवाळीतला आणखी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज. मला एकूण ५ बहिणी. त्याकाळात गृहपयोगी वस्तू घेण्याची पद्धत होती. नेमकं काय घ्यायचं हे आई ठरवी. …यांस कडून… यांस भाऊबीज सप्रेम भेट. अशी नावं घातलेली पाण्याची टाकी, मांडणी, परात, ग्लास, ताटं, डिश, वाट्या अशी भांडी, यातली कोणतीही वस्तू आजही कधी नजरेत आली तर तेव्हाचे ते क्षण सस्निल आठवतात. काळानुसार त्या त्यांच्या सासरी गेल्या आणि आम्हा भावंडांनी भरलेलं घर काहीसं सुनं झालं. प्रत्येक सणाला त्या सगळ्या भेटतीलच असं नाही. पण त्यांचा नुसता फोन आला तरी बरं वाटतं. आज टेक्नॉलोजीमुळे आपण प्रत्यक्ष तिथे पोहचू शकत नसलो तरी तिथल्या माणसांना थेट बघण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची सोय उपलब्ध झालीये. पण शेवटी काय तर वेळ-काळ आणि माणसाचं आयुष्य कायम बदलत असलं तरी आठवणी कायम तशात राहतात… कधीच न बदलणाऱ्या…
अर्ध्याएक तासात ‘चला जिन्नस घ्या’ म्हणून आप्पांची हाक यायची. ज्याचं झालंय घेऊन त्यांची जिन्नस पिशवीत भरायची घाई आणि आमची यादीच्या क्रमानुसार पिशव्या तयार करायची लगबग सगळं इतक्या ऐन टायमाला व्हायचं. त्यात डालड्याचा डबा तागडी समोरच्या फळीवर दोनचारदा आदळायचा. आप्पा पुन्हा खसकन ओरडत, ‘टाकळे, अहो वनस्पती डालडा ५ व्या नंबरवर लिहलेला असला तरी तो आम्ही शेवटी देणार आहोत. आधी तो डबा खाली ठेवा बघू नायतर डब्याला पोक बिक काढाल.’ आजूबाजूचे फ़िदीफिदी हसत आणि डोक्यात आणिक तिडीक जाई. आईकड डोळे वटारून बघायची सोय नव्हती. पुन्हा आप्पांनी पाहिलं तर आणिक काहीतरी फटकन बोलून जायचे. तसे ते फाटक्या तोंडाचे म्हणून परिचित होतेच. म्हणून फारसं कुणी त्यांच्या फंदात पडत नसे. ‘नुसता अंगाचा साबण म्हणजे कोणता? मैसूर वाला देऊ की, अजून भारी…’ ‘जास्त महागातला नको आप्पा, पण जरा चांगल्या वासाचा द्या’ ‘इतक्या गर्दीत तुझा साबण शोधायला वेळ नाही. देईन तो घ्यावा लागेल बदलून मिळणार नाही. ‘यादीनुसार एक एक घट्ट दोरा गुंडाळलेल्या जिन्नसाच्या पुड्या आई तिने नेमलेल्या पिशवीत भरल्या जात. ‘वहिनी, उटणं याद्या पूर्ण झाल्या की निघताना पावती टेबलावर न विसरता घ्या त्याचे पैसे लावले नाहियेत.’
इकडे याद्या संपत आल्या की माझं सगळं लक्ष फटाक्यांच्या टेबलाकड़ असायचं. कधी एकदाचा जिन्नस घेऊन होतोय आणि मी कधी फटाके घेतोय! नुसती चुळबुळ वाढत जाई. आई ‘आवर पटकन’ म्हणत पिशव्या धरतांना हातातले त्राण निघून जाई आणि परत आप्पा खेकसत, ‘काय रे इतकी घाई कशाला? फटाके काय संपणार नाहीयेत. आधी एक काम पूर्ण करावं मग दुसऱ्याकड़े वळावं बाळ. वहिनी फार लाड बरे नव्हेत मुलांचे. आजकालची पोरं म्हणजे…’ आता पुढची किमान १० मिनिटे आप्पा यावरच बोलणार म्हणून मग काढता पाय घेत आपल्याला झेपणाऱ्या पिशव्या भराभर दुकानाबाहेर आणाव्यात म्हटलं तर डालडा पोह्यांची पिशवी सोडली की सगळंच कसं जड़ काम. पण तरीही आपली तडमड पाहून आईला दया येई .रुमालातल्या नोटा तपासून ती म्हणे, ‘जा. तुळशीच्या लग्नापर्यंत पुरतील तेवढे फटाके घे. जास्त महागातले घेऊ नको. अजून कंदील-पणत्या- रांगोळी घ्यायची बाकी आहे. पैसे पुरणार नाहीत.’
मनात असूनही खूपसारे फटाके घेता येत नसत. फारफार तर एक चक्र बॉक्स, अर्धा पाऊस बॉक्स, अर्धा डजन फुलबाजा बॉक्स, चार लक्ष्मी बारचे पॅकेट, लवंगी बारची अक्खी लड़ी, दोन चार सुरसुऱ्या, एक नागगोळी बॉक्स, एक सिंह बॉम्ब बॉक्स (हे शक्यतो दिवाळीच्या सकाळी जो पहिला उठेल त्यांनी लावण्याच्या मानाचे विक्रमी बार म्हणजे यांच्या आवाजाची दहशत असे), अर्धा बॉक्स सुरसुरी बाण इतक्यात टोटल शंभरच्यावर जाई आणि आई म्हणे, ‘खूप झाले. बस कर आता. नाहीतर बाबा ओरड़तील… ‘बाबांचं नाव घेतलं म्हणजे चार सुतळी बॉम्ब एकत्र लावल्यागत वाटे. त्यांचा दरारा म्हणजे जरा वेगळंच प्रकरण. अजून आणिक काय घ्यावं वैगेरे धाडसच होत नसे. हेच फटाके तुळशीच्या लग्नापर्यंत पुरावे म्हणून अगदी लवंगी बारची माळ सोडवून त्यातला एक एक फटाका मोकळा करून वाजवायचा. फुसक्या निघालेल्या फटक्यांना उन्हात तापवून पुन्हा त्यांना वाजवी. करणं अशा एक ना अनेक युक्त्या काढत आम्ही फाटकेबाजी करत असू. जितकं मिळेल ते पुरवून वापरावं त्याउपर अपेक्षा करण्याचा सोस नसे त्याकाळी. आजकालची पोरं हजार दोन हजारचा चुराडा करूनही त्यांचं समाधान होत नाही.
दिवाळीतला आणखी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज. मला एकूण ५ बहिणी. त्याकाळात गृहपयोगी वस्तू घेण्याची पद्धत होती. नेमकं काय घ्यायचं हे आई ठरवी. …यांस कडून… यांस भाऊबीज सप्रेम भेट. अशी नावं घातलेली पाण्याची टाकी, मांडणी, परात, ग्लास, ताटं, डिश, वाट्या अशी भांडी, यातली कोणतीही वस्तू आजही कधी नजरेत आली तर तेव्हाचे ते क्षण सस्निल आठवतात. काळानुसार त्या त्यांच्या सासरी गेल्या आणि आम्हा भावंडांनी भरलेलं घर काहीसं सुनं झालं. प्रत्येक सणाला त्या सगळ्या भेटतीलच असं नाही. पण त्यांचा नुसता फोन आला तरी बरं वाटतं. आज टेक्नॉलोजीमुळे आपण प्रत्यक्ष तिथे पोहचू शकत नसलो तरी तिथल्या माणसांना थेट बघण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची सोय उपलब्ध झालीये. पण शेवटी काय तर वेळ-काळ आणि माणसाचं आयुष्य कायम बदलत असलं तरी आठवणी कायम तशात राहतात… कधीच न बदलणाऱ्या…