केवळ चार भिंतींची रचना करून त्यास ‘वास्तू’ असे संबोधणे हा अपरिपक्व विचार झाला. ही निर्मिती करताना बाह्यावकाशातील ऊर्जास्त्रोतांचा, दिशा, उपदिशा, आकाशस्थ ग्रह, पंचमहाभूतं, भूगर्भातील चुंबक व सौर ऊर्जा आणि त्यांचे परस्परांवर होणारे परिणाम व त्यातून निर्माण होणारी स्पंदने यांचा एकत्रित विचार करून जेव्हा एखादी बांधणी केली निर्मिती केली जाते, त्याला ‘वास्तू’ संबोधणे इष्ट ठरू शकते. आजकालच्या धावपळीच्या जीवनपद्धतीमध्ये भारतवर्ष ज्या संस्कृतीकरिता प्रसिद्ध आहे. त्याचा विसर पडू लागला आहे. दर्शन शास्त्रे म्हणून प्रचलित, प्रमाणित असलेली शास्त्रे उदा. योगशास्त्र, आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादींबद्दल अनास्था आढळते. ह्या सर्व शास्त्रांची निर्मिती-रचना अथवा मांडणी ही मनुष्याच्या हितासाठी झालेली आहे. जीवनाकडे केवळ व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता त्यांचा आंतरिक आणि बाह्यरूपाने विकास कसा होईल, याचा विचार करणारी मंडळी ह्या शास्त्राकडे आदराने पाहतात. अशापैकी मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजेशी निगडीत असलेले शास्त्र म्हणजे ‘वास्तुशास्त्र’
केवळ चार भिंतींची रचना करुन त्यास ‘वास्तू’ असे संबोधणे हा अपरिपक्व विचार झाला. ही निर्मिती करताना बाह्यावकाशातील ऊर्जास्त्रोतांचा, दिशा, उपदिशा, आकाशस्थ ग्रह, पंचमहाभूतं, भूगर्भातील चुंबक व सौर ऊर्जा आणि त्यांचे परस्परांवर होणारे परिणाम व त्यातून निर्माण होणारी स्पंदने यांचा एकत्रित विचार करून जेव्हा एखादी बांधणी केली जाते, निर्मिती केली जाते त्याला ‘वास्तू’ संबोधणे इष्ट ठरू शकते. ह्या निर्मितीच्या सभोवतालाचा आवार हा देखील त्याचा भाग समजायला हवा. थोडक्यात मूक्त उजास्त्रोतांच्या निसर्गनियमित प्रवाहात जेव्हा वास्तू बांधली जाते तेव्हा बाह्य व आंतरिक भिंतीच्या आतले असे दोन भाग आपण तयार करतो. सहाजिक निसर्गनियमित बाह्य अवकाशातील स्पंदने व आंतरभागातील स्पंदनांची सुसूत्रता बिघडते. त्यात समन्वय राहावा यासाठी वास्तुशास्त्राची काही नियमावली आहे. त्याचे अनुकरण केल्यास ह्या निर्मिलेल्या आंतरिक भागात; ज्याला आपण निवारा म्हणू, त्यात जीवनमान ‘पंचपरमेष्ठी’नी युक्त होऊ शकते.
घराची निवड करताना बहुतांशी व्यावहारिक क्षमता, दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेली साधनसुविधा, मार्केट, शाळा, बससुविधा, रेल्वे स्टेशनपासून जवळ, नातेवाईक मंडळींपासून फार दूर नाही असा विचार करून घर निवडले जाते. वास्तुनियम पाळणारी घरे शोधण्यासाठी वेळ आणि पैसे खर्च होण्याची शक्यताच जास्त म्हणून त्या विषयास हात न घालता ‘सोय’ डोळ्यासमोर ठेवून घर घेतले जाते. 500-550 स्क्वेअर फूट ते 2000 स्क्वेअर फूट; परंतु हे घर जर वास्तू नियमामध्ये बसणारे नसेल तर त्याचा परिणाम त्या घरातील माणसांना भोगावा लागतो. घरातील वस्तुंची रचना दिशा- पंचमहाभूतांच्या समन्वयाने केल्याने ‘वास्तुदोष’ होत नाही. अग्नेयेस किचन-ओटा असल्यास अग्नीची स्थापना दररोज पूर्वअग्नेय दिशेस होते जे शास्त्रसमंत आहे. तेच जर किचन इशान्येस असेल अथवा टॉयलेट इशान्येस असेल तर त्याचे नकारात्मक परिणाम राहणार्या माणसाला अनुभवायला मिळण्याची शक्यता दाट असते. जसे दिशांचे भान-ग्रहांचे भान-चुंबकीय वृत्ताच्या लहरींचे भान ठेवणे आवश्यक आहे तसेच दैनंदिन दिनचर्येचा भाग म्हणून नियमित पूजा-अर्चा- स्तोत्रपठण, आध्यात्मिक वाचन इत्यादी बाबी ‘वास्तू’ला अधिक फलदायी बनवतात. जसा मानवाच्या जीवनावर ग्रहांच्या भ्रमणाचा परिणाम होतो, तसाच ‘वास्तू’च्या मधील संतुलित-ऊर्जेचा-चांगला व असंतुलित ऊर्जेचा नकारात्मक परिणाम होताना दिसतो.
3000 वर्षांपूर्वीपासून चालत आलेले हे शास्त्र प्राचीन ऋषींनी मानवाला दिलेली देणगी आहे. मानवाच्या प्रापंचिक गरजा लक्षात घेऊनच ह्या ऋषींनी विचारपूर्वक पद्धतीने ‘वास्तुनिर्माण कसे करावे’ ह्याची आदर्श स्थिती वास्तुशास्त्राधारे मांडली आहे.
ज्या घरांमध्ये नेमक्या शास्त्रोक्त परिभाषेप्रमाणे खोल्यांचा उपयोग होत नसेल तर त्यासाठी नेमके काय उपाय योजावेत, याचा उहापोह ह्या तत्कालीन ऋषींनी केला आहे. त्यात त्यांचा भर रत्न, धातू, मंत्र, उपासना, पिरॅमिडस् (धातुंचे) ह्याचा अंतर्भाव करणे हिताचे ठरते; परंतु हे करताना योग्य वास्तुशास्त्र सल्लागाराचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
घर निवडण्यापासून वास्तुतज्ज्ञाची मदत घेतल्यास फायद्याचे ठरू शकते. घर घेऊन नंतर त्याच्या आंतरिक रचना वास्तु अनुसार करण्यासाठी वेळ आणि पैसे खर्च होतात. त्यामुळे घर निवडण्यासाठी वास्तुतज्ज्ञांचा सल्ला घेऊन जे घर जास्त वास्तू नियमात नसते व अल्प प्रमाणात काही बदल करणे गरजेचे ठरेल असे घर निवडावे.
घरामध्ये कोणती पेन्टींग्ज लावावीत, रंगसंगती काय असावी, देवघर कसे असावे, असे अनेक प्रश्न अनेकांना भेडसावत असतात. त्याची एक लिस्ट बनवून तयार ठेवावी व वास्तूतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घराचे इंटेरिअर करावे.
घराची प्रसन्नता ही कशी टिकवून ठेवता येईल याबद्दलसुद्धा ‘वास्तुशास्त्रात’ काही सूचना आहेत. काही चिन्ह, मूर्ती, चित्र, मंत्र, आचारसंहिता याबद्दल खोलवर विश्लेषण आहे. बाजारातून आणलेल्या चिनी बनावटीच्या वस्तूमार्फत घराचे ‘वास्तू’त रूपांतर करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरू शकतो.
तुमच्या घराची प्राथमिक सुरुवात-आसरा अशी सुरू होते. त्यात तुमच्या भावनाविष्काराची-गरजेनुरूप साधनसामुग्रीची भर पडते व त्या आसर्याचे रूपांतर ‘स्वीट होम’ मध्ये होते. पण हे स्थित्यंतर होताना जर नैसर्गिक ऊर्जाप्रवाह, ग्रह-तारे, पंचमहाभूते, चुंबकीय लहरी, सौर उर्जा इत्यादींचा विचार करुन आंतरिक उपयुक्तता व रचना केली तर ‘स्वीट होम’चे रुपांतर ‘वास्तू’मध्ये होते व ‘वास्तू’ ही एक यंत्रणा बनते जी बाह्यावकाशाशी तादात्म्य साधते. ‘यत पिंडी तत् ब्रह्मांडी’ ह्या उक्तीप्रमाणे त्रिवासबाह्य ऊर्जा प्रवाहातील स्पंदनांशी सुसंबद्ध संवाद साधू लागते व ह्या निवासातील राहणारे पंचपरमेष्ठीचा अनुभव घेतात. थोडक्यात सांगायचे तर वास्तुशास्त्राचा जीवनातील अंतर्भाव म्हणजे प्रगती, समृद्धी, अर्थवृद्धी, व्यापारवृद्धी, आरोग्य, आनंद इत्यादींचा प्राप्तीचा महामार्ग.