“Hey….. hi r you Marathi? मी पण मराठीच,so काय करतेस तू? कुठे असतेस ?” परदेशात आल्यापासून जवळजवळ पन्नास वेळातरी मी ह्या संभाषणाला सामोरे गेलेय. खरंच; भारत सोडून जवळजवळ पाच-सहा वर्षे झाली. ह्या परदेशात,ह्या अनोळखी देशाची स्वत:च्या संस्कृतीशी नाळ जोडण्याच्या प्रयत्नात किती वर्षे अशीच निघून गेली. तरीसुद्धा आजही मराठी -भाषा माझी मातृभाषा- कानावर पडली की आपोआपच एक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाल्यासारखंच वाटतं.
‘पिकतं तिथं विकत नाही़’ असं म्हणतात ते काही चुकीचं नाही. तसंच भारतात राहून मराठी भाषेचे महत्त्व तितके जाणवत नाही. आपली आई आपल्याजवळ असताना तिचं महत्त्व आपल्याला जाणवतं का? आपली माणसं, आपली संस्कृती, ही तिच्या जवळ असताना आपण त्यांना महत्त्व देत नाही. कायम गृहीत धरून आपण त्यांना दुर्लक्षित करतो, परंतु जेव्हा परदेशात आपण काही कामासाठी जातो, सततजेव्हा तिथली परप्रांतीय भाषा आपल्या कानावर पडू लागते, तेव्हा आपण आपली मातृभाषा ऐकण्यासाठी कासावीस होतो. चुकूनदेखील आपली भाषा बोलणारी अनोळखी मंडळी दिसली तरीही; अनोळखी असूनही ती खूप आपली वाटतात. हे माझ्या मराठी भाषेचे अदृश्य धागे!
परदेशात अनेक प्रकारची, वेगवेगळ्या जातीची,वेगवेगळ्या धर्माची, वेगवेगळ्या संस्कृतीची लोकं सतत आपल्या अवतीभोवती वावरत असतात.अनेकांनी येथे अनेक वर्षांपासून आपापले व्यवसाय आणि आपापली नोकरी संभाळण्याच्या प्रयत्नात इथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. याला एकच कारण म्हणजे द्रव्य प्राप्ती! इथे अनेक रेस्टॉरंट, दुकाने,मंदिरे, प्रार्थनास्थळे आहेत आणि त्याद्वारे लोक आपापली संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न देखील करताना दिसून येतात. इथे घड्याळ्याच्या काट्यावर दिवस सुरू होतो आणि थंडीच्या पाशामुळे थोडा लवकर संपतो. लोक सकाळी उठून कामावर जातात. इंग्रजाळलेल्या जगात वावरतात. त्यांचे क्रोसंट, बर्गर, फास्टफुडही आणि इतकेच काय सॅलडही आपलेसे करतात.पण ह्या सगळ्या गर्दीत कधीकधी नव्हे; तर नेहमीच जेव्हा ‘मराठीची’, आपल्या संस्कृतीची तहान लागते तेव्हा मात्र हसू आवरल्या शिवाय राहवत नाही. अर्थात ह्या हसू मध्ये अदृश्य अश्रूंचीही मनामध्ये जोड असते.
इथे आपण कधीकधी माणसांच्या गर्दीत वावरण्यापेक्षा विचारांच्या गर्दीत हरवणं जास्त पसंत करतो. हे विचार आपले असतात. आपल्या मातीतले असतात. ते तर कधी बदलू नाही शकत.परदेशात राहून एक गोष्ट लक्षात येते की इथे राहून आपले आपल्या मराठी भाषेवरचे प्रेम अधिक दृढ होत जाते. आपली संस्कृती, आपली भाषा येथे जपण्याच्या प्रयत्नात आपण त्याच्याअधिक जवळ जातो. लोक आज परदेशात स्वातंत्र्यदिनी ढोलपथक वाजवतात. सर्व सण साजरे करतात. त्या दिनाच्या निमित्ताने सर्वमराठी अधिकच नव्हे तर इतर भाषिकांनाही आपलंसं करतात. सध्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि आधुनिकीकरणामुळे भारतात असताना देखील इंग्रजाळलेली मराठी अनुभवायला मिळाली होती.खरंतर मुंबई- पुणे यांसारख्या शहरातच आता मराठी भाषेचा वापर कोणी करताना दिसून येत नाही. शाळा, कॉलेज यामधील इंग्रजी मीडियमचा वाढता प्रभाव, ग्लोबलायझेशन यामुळे महाराष्ट्रातही मराठीचे अस्तित्व धोक्यात असल्याचे जाणवते. परंतु आजही अनेक कार्यक्रम, समारोह यांद्वारे मराठी संस्कृतीजपण्याचा प्रयत्न आपल्याला दिसून येतो.
॥ मराठीचा बोलु कवतुके। परी अमृतातेही पैजा जिंके॥ ह्या अमृतमयी शब्दांची बरसात मनाला सुखावून जाते. अशा मराठीचे कौतुक काय सांगावे! मराठीत उच्चार, व्यंजन, स्वर यांची सरमिसळ नसते आणि असली तरी देखील ती अत्यल्प असते. मराठी भाषा ही अत्यंत तरल, सुक्ष्म, संवेदनशील आहे. मराठीचा जगातील ८००० भाषांमध्ये १५वा क्रमांक लागतो. मराठी भाषिकांमुळे आज परदेशात महाराष्ट्र मंडळ, मराठा मंडळ यांसारख्या संस्थांची स्थापना करण्यात आली आहे आणि त्याचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर होत आहे.इतकेच नव्हे; तर उत्तर अमेरिका, शिकागो, यांसारख्या भागात तर मराठी मिडीयमच्या शाळा काढण्यात आल्या आहेत.
आपल्या मराठी भाषेचा आपल्याला अभिमान असतो. परंतु;अलीकडे आमच्यासारख्या तरूण मंडळींना इंग्रजी भाषेचे जास्त आकर्षण असते.त्यात त्यांचा दोष नाही. कारण त्यांचे महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण इंग्रजीतूनच होत असते. पदव्या मिळवून, परदेशात आल्यावर इंग्रजी भाषाच लिहावी आणि बोलावी लागते. परंतु यामध्ये अशी ही ’मराठी़’ भाषा काळाच्या ओघात टिकून राहील का? याचे उत्तर होय असेच असेल. सातासमुद्रापार असणारी पाश्चात्य भाषा आपण शिकतो, कारण त्याचे विस्तारीत क्षेत्र व सहजसाध्य असा अर्थार्जनाचा हेतू असू शकतो.परंतु जशी पाश्चात्य भाषा आपल्याला शिकावी लागते, त्याच प्रमाणे आपली मराठी भाषा आपल्या रक्तात असते. त्यामुळे आपल्या संस्कारांचे पालनपोषण होते आणि आपल्या अस्तित्वाची ती खरी ओळख असते. म्हणूनच अशी ही मराठी भाषा प्रत्यक्ष व्यवहारात वापरणे, मराठीविषयी सुलभ बीज्ञान देणे, मराठी भाषेला वैश्विक स्वरूप देणे, मराठी साहित्य प्रकार इतकेच नव्हे; तर मराठी खाद्यसंस्कृती लोकांपर्यंत पोहचवणे अशा अनेक गोष्टींमुळेच मराठी भाषाटिकून राहील.
२७ फेब्रुवारीला मराठी दिन अर्थात; जागतिक मराठी दिवस साजरा केला जातो. ह्या दिनाच्या निमित्ताने आता परदेशात राहून कुसुमाग्रजांच्या कवितेत थोडा बदल करून म्हणावेसे वाटते.
॥ मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा,
हिच्या संगे जागतील,
‘परदेशातीलही’ शिळा॥
(न्यू जर्सी, अमेरिका)
2 Comments
अतिशय सुंदर लेख आहे। लेखिके चे व मराठी भाषेचे कौतूक वाटते ।
परदेशात राहून देखील आपल्या भाषेचा अभिमान वाटणाऱ्या प्रत्येकाला माझा सलाम।
प्रियांका, खूप खूप छान लेख लिहिला आहेस. मनापासून अभिनंदन. माय मराठीचा झेंडा सार्या जगात असाच डौलाने फडकत राह्यला हवा. मराठी भाषा दिना निमित्त तू हे काम मोठ्या. ताकतीने केले आहे. मराठीला राजभाषेचा दर्जा मिळविण्यासाठी अनेक मराठी प्रेमी इकडे महाराष्ट्रात प्रयत्न करत आहेत. त्यात तुझा हा लेख खारीचा वाटा नक्कीच ठरणार आहे. शिवाय अमेरिकेत राहून तू हे काम करते आहेस. म्हणून पुन्हा एकदा अभिनंदन व आभार.