देश-विदेशात भटकन्ती करीत असताना कधीकधी अकल्पितपणे आपली भेट अशा काही गावांशी होत असते, ज्या गावांच्या आठवणी आपण आयुष्यभर मनाच्या अत्तरकुपीत जतन करून ठेवतो. त्या गावांचे वेगळेपण हेच त्याचे एक प्रमुख कारण असते. जसे कालव्यांचे गाव म्हणून आपल्याला व्हेनिस आठवते किंवा पवनचक्क्यांचे गाव म्हणून आपण अॅमस्टरडॅम गावाचा उल्लेख करतो . तलावांचे गाव म्हणून आपल्याला उदयपुर भावते तर मंदिरांचे गाव म्हणून मदुराई मनात घर करते! कांद्याचे गाव म्हणून लासलगाव तसे फटाक्यांचे गाव म्हणून शिवकाशी आणि मिरच्यांचे गाव म्हणून संकेश्वर तर सर्पांचे गाव म्हणून बत्तीस शिराळे आपल्याला परिचित असते! मला आठवतंय, अनेक वर्षांपूर्वी, इंग्लंडमधल्या माझ्या स्वैर भटकंतीत एके दिवशी मी अशा एका चिमुकल्या गावी जाऊन ठेपलो, ज्याचे नाव होते, ‘हे ऑन वे’. (Hay on Wye) जगातले पहिले ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून ते विख्यात होते. ‘वे’ नदीच्या काठावर वसलेले ते गाव तसे म्हटले तर इंग्लंडच्या सरहद्दीपलीकडे वेल्स मध्ये होते. वेल्समधल्याच पॉविज कौंटीच्या प्रशासकीय क्षेत्रात ते वसले असले तरी इंग्लंडमधल्या हेअरफोर्ड (Hereford) ह्या एका प्रमुख शहरापासून फक्त वीस मैल अंतरावर होते . लंडनपासून ते सुमारे १७० मैल दूर होते. माझ्या सुदैवाने त्यादिवशी ते संपूर्ण गाव असंख्य पर्यटकांनी फुललेले होते. वास्तविक, त्या गावात ना कोणतीही ऐतिहासिक वास्तू होती, ना कोणतेही प्रेक्षणीय वस्तुसंग्रहालय होते, ना त्या गावात कुणा विख्यात व्यक्तीचे स्मारक होते. तरीही तिथे पर्यटक येत होते ते केवळ त्यांच्या पुस्तक प्रेमामुळे! खासकरून इंग्रजी भाषेतली जुनी परंतु अगदी नवी वाटावी इतक्या चांगल्या स्थितीतली हजारो दुर्मीळ पुस्तके त्या एकाच गावात अगदी नाममात्र मूल्य देऊन विकत घेता येत होती . त्याखेरीज, काही मोजक्या युरोपियन भाषांमधली पुस्तकेही तिथे विक्रीसाठी उपलब्ध होती. त्यामुळेच पर्यटक त्या गावी इतक्या संख्येने आलेले होते. गावात फेरफटका मारताना जिकडेतिकडे मला पुस्तकांचे ढीगच्या ढीग दिसत होते. पुस्तके केवळ दुकानातच नव्हे तर बागेतल्या विश्रांतीच्या जागेसमोर देखील रचलेली होती. कोणतीही पुस्तके, कितीही वेळ चाळत बसण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याने चोखंदळ वाचक तास अन् तास तिथे बसून वाचनाचा आनंद लुटत असल्याचे चित्र मला दिसत होते. प्रत्येक पुस्तकावर विक्री-मूल्य लिहिलेले होते जे छापील मूल्यापेक्षा फारच कमी होते. तथापि ज्या पुस्तकांवर प्रत्यक्ष लेखकाने स्वाक्षरी केलेली होती , अशा पुस्तकांचे विक्री-मूल्य मात्र छापील मूल्यापेक्षाही अधिक होते. अशाच काही पुस्तकांमध्ये ‘स्लमडॉग मिलिओनर’ हे पुस्तक होते ज्यावर त्या पुस्तकाचे लेखक विकास स्वरूप यांची पहिल्या पानावर स्वाक्षरी होती. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या “Compassion & Individual” या पुस्तकावर दलाई लामा यांची स्वाक्षरी होती तर माफिया विश्वावर आधारित उत्कंठावर्धक कथा-कादंबऱ्या लिहिणारे, विशेषतः ऑस्कर विजेत्या ‘गॉडफादर’चे लेखक म्हणून गाजलेले मारिओ पूझो यांची स्वाक्षरी असलेली ‘Fools Die’ ही कादंबरी तिथे होती. हेरॉल्ड रॉबिन्स याची स्वाक्षरी असलेली ‘The Lonely Lady’ ही कादंबरी तिथे होती . विल्यम पीटर ब्लाटी यांचे ‘Exorcist’ आणि जॉर्डन बेलफोर्ट याचे ‘Woolf of Wall Street’ अथवा जे. के. रोलिंग या ब्रिटीश लेखिकेचे ‘Harry Potter” तसेच सलमान रश्दी यांचे ‘Satanic Verses’ अशी अनेक गाजलेली पुस्तके लेखकांच्या स्वाक्षरीसह तिथे उपलब्ध होती. एकंदरीत लेखकांची स्वाक्षरी असलेल्या दुर्मीळ पुस्तकांचा तो खजिना पुस्तकप्रेमींना अक्षरशः पर्वणी वाटावा असाच होता! वास्तविक, ‘हे-ऑन-वे’ म्हणजे अवघ्या चारशे उंबरठ्यांचे इवलेसे गाव होते आणि तिथले हजार-दीड हजार रहिवासी प्रामुख्याने जुन्या पुस्तकांचा खरेदी-विक्री व्यवसाय करण्यात आणि पर्यटकांच्या सोयी-सुविधा बघण्यातच पूर्णवेळ गुंतलेले होते. तिथे खाण्यापिण्याचे निवडक ब्रिटीश पदार्थ मिळू शकणारी छोटी-छोटी रेस्तरॉं देखील होती. मात्र त्या गावात मुक्काम करायचा असेल तर सहा-सहा महिने आधीच एखाद्या हॉटेलमध्ये आपली खोली संगणकाच्या महाजालावरून आरक्षित करणे गरजेचे असते. प्रतिवर्षी, मे महिन्याच्या अखेरीस अथवा जून महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसात ‘हे-ऑन-वे’ गावात फार मोठा ग्रंथमहोत्सव साजरा होत असतो. असे हे “जगातले पहिले पुस्तकांचे गाव” निर्माण करण्याचे संपूर्ण श्रेय जाते ते केवळ रिचर्ड बूथ नावाच्या कल्पक इसमाला! तो स्वतः जेव्हा ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत होता तेव्हापासूनच त्याला पुस्तके वाचण्याचे वेड तर लागले होतेच शिवाय त्याला छान-छान पुस्तके जमा करण्याचे जणू वेडच लागले होते, त्यामुळे त्याचे सहाध्यायी त्याला गंमतीने “बिब्लिओफिलिया”ने पछाडलेला मनोरुग्ण म्हणत असत. तो पदवीधर झाला तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की संगणकांच्या आगमनामुळे इंग्लंडपेक्षाही अमेरिकेत पुस्तके वाचणाऱ्या व्यक्तींची संख्या अधिक वेगाने रोडावत चालली असून तिथली मोठमोठी ग्रंथालये वाचकांअभावी ओस पडत चालली आहेत आणि अनेक ग्रंथालये आपली अमूल्य ग्रंथसंपदा रद्दीच्या भावाने विकून टाकू लागली आहेत! ते समजताच रिचर्ड बूथ तडक अमेरिकेत जाऊन थडकला. विविध ग्रंथालयांतून त्याने अक्षरशः हजारो ग्रंथ कवडीमोलाने खरेदी केले आणि ते घेऊन तो जहाजाने इंग्लंडला आला. वेल्समधल्या आपल्या हे-ऑन-वे ह्या गावी त्याने एका पडक्या किल्ल्यात त्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडले आणि नाममात्र किंमतीला ती बहुमोल पुस्तके विकण्यास प्रारंभ केला. इंग्लंडची जनता मुळातच पुस्तकवेडी असल्याने त्याला छान प्रतिसाद मिळू लागला. पुढे त्याने तो पडकाझडका किल्ला स्वतःच्या मालकीचा करून घेतला आणि तिथेच तो राहू लागला. गावातल्या अन्य काही रहिवाश्यांनी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून, त्याच्याच पद्धतीने आपलीही पुस्तक-विक्रीची दुकाने थाटली आणि बघताबघता ते चिमुकले गाव , ज्याचे नाव देखील तोंवर कुणी ऐकलेले नव्हते, ते अख्ख्या युरोपमधल्या पुस्तकप्रेमी जनतेच्या आकर्षणाचे स्थान बनले! गावात पुस्तक-खरेदीच्या निमित्ताने प्रतिवर्षी हजारोच्या संख्येने पर्यटक येऊ लागल्याने गावात विविध उद्योग सुरु करायला चालना मिळाली. रिचर्ड बूथ हा तर त्या पुस्तक जगताचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखला जाऊ लागला! माझे नशीब असे बलवत्तर होते की जगातल्या त्या पहिल्या पुस्तकांच्या गावातच मला त्या कल्पनेचा जनक असलेल्या दस्तूरखुद्द रिचर्ड बूथ यानेच लिहिलेले, “My Kingdom of Books” हे १९९९ साली प्रकाशित झालेले आणि तरीही अगदी नवे कोरे वाटावे असे मूळ पंधरा पौंड किंमत असलेले आत्मकथनपर पुस्तक अवघ्या दोन पौंडाला विकत मिळाले! त्यावेळी मला झालेला आनंद हा जणू देहूला जाऊन तुकारामांची गाथा विकत घ्यावी अथवा आळंदीला जाऊन ज्ञानेश्वरी विकत घ्यावी असाच होता. असो. वेल्सप्रमाणेच आता इंग्लंडमध्ये कुम्ब्रिया परगण्यात ‘सेडबर्ग’ आणि स्कॉटलंडमध्ये ‘विगटाऊन’ ही दोन पुस्तकांची गावे पुस्तकप्रेमींना आकर्षित करू लागली आहेत . बेल्जियममध्ये ‘रेडू’, स्वीडनमध्ये ‘बॉरबी’, फ्रान्समध्ये बेचेरल, पोर्तुगालमध्ये ‘ओबिडॉस’ अशी लहान-लहान खेडी आज पुस्तकांची गावे म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. आजमितीस जगभरातल्या पुस्तकांच्या गावांची संख्या चाळीस झाली आहे! आशिया खंडात जपान, मलेशिया आणि दक्षिण कोरिया या देशात देखील असे एक-एक गाव आहे. अर्थात ही सगळी पुस्तकांची गावे म्हणजे एकापरीने सुस्थितीत असलेली हजारो जुनी पुस्तके सामान्य वाचकांना सहज परवडणाऱ्या किंमतीत विक्रीसाठी एकाच गावातल्या डझनावारी दुकानांतून उपलब्ध करून देणाऱ्या पुस्तकांच्या या जणू पेठा आहेत असेच माझे मत झाले आहे.
याउलट, हिंदुस्थानातील पुस्तकांचे पहिले गाव म्हणून महाराष्ट्रात ‘भिलार’ची निवड करणाऱ्या आपल्या राज्य शासनाने “पुस्तकांचे गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवीत असताना अन्य देशातल्या पुस्तकांच्या गावांची नक्कल न करता कितीतरी वेगळा, व्यापक आणि समाजाभिमुख दृष्टिकोन ठेवलेला दिसतो! त्यामुळेच, वेल्स मधल्या ‘हे- ऑन-वे’पेक्षा किंवा तत्सम अन्य पुस्तकांच्या गावांपेक्षा ‘भिलार’चे वेगळेपण मला विशेष भावले. समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंचावर, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, अवघ्या सात-आठशे उंबरठ्यांच्या आणि तीन हजार वस्तीच्या ह्या निसर्गरम्य गावाला “पुस्तकांचे गाव” अशी आगळीवेगळी ओळख देण्याचा ठाम निर्धार जेव्हा २०१४ साली महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याने केला अगदी त्या क्षणापासून त्याच खात्याच्या अखत्यारीत येत असलेल्या मराठी भाषा विभागाने तो प्रकल्प उत्तम प्रकारे पूर्णत्वाला नेण्यासाठी सातत्याने आणि चिकाटीने दोन वर्षे नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. त्यामुळेच वर्ष २०१६च्या डिसेंबरमध्ये गेट वे ऑफ इंडिया येथे राज्य शासनातर्फे साजरा झालेल्या मराठी भाषा दिनाच्या भव्यदिव्य कार्यक्रमात सांस्कृतिक खात्याच्या मंत्रिमहोदयांनी याबाबतची अधिकृत घोषणा करून, ५ मे २०१७ हा दिवस उद्घाटन समारंभासाठी निश्चित केल्याचे सांगून टाकले! त्याच क्षणी मी उद्घाटनाच्या दोन दिवस आधीच भिलार गावी मुक्कामास जाण्याचे मनाशी पक्के ठरवून टाकले आणि तदनुसार पाठीवरती ‘बिऱ्हाड’ घेऊन ३ मे रोजी सकाळी मी पुण्याहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या बसमध्ये आसनस्थ झालो. माझ्यासमवेत माझे एक स्नेही प्रवीण मथुरे होते. पुण्यापासून भिलार ८० किलोमीटर्स अंतरावर आहे. त्या भागात रेल्वे नाही. त्यामुळे तिथे केवळ रस्त्यानेच जाता येते. सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण भिलार पासून ४० किलोमीटर्स अंतरावर आहे. मुंबईपासून पुणे मार्गे भिलार सुमारे २७० किलोमीटर्स अंतरावर आहे. मुंबईहून महाड-पोलादपूर-महाबळेश्वर मार्गे देखील भिलारला जाता येते. भिलार आणि महाबळेश्वर याच्यात १४ किलोमीटर्स अंतर आहे. कुठूनही जायचे झाले तरी पांचगणी-महाबळेश्वर यांच्या दरम्यान असलेल्या ‘भोसे खिंड’ येथून भिलारकडे वळणारा रस्ता चोखाळावा लागतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे! मे महिन्यातल्या त्या भर दुपारी दोनच्या सुमारास आम्ही ‘भोसे खिंड’ येथे अचूक उतरलो आणि आश्चर्य म्हणजे त्याही वेळी तिथले वातावरण अगदी सुसह्य होते. भिलारच्या दिशेने आम्ही रमतगमत निघालो. वाटेतच आम्हाला दुचाकीवरून चाललेले दोन तरुण भेटले. दोघेही वाईच्या विश्वकोश कार्यालयातले अधिकारी होते आणि भिलार गावातली उद्घाटन सोहळ्याची पूर्वतयारी करण्यासाठी तिथे आलेले होते. आमची अत्यंत अदबीने वास्तपूस केल्यानंतर ते दुचाकीवरून गावाच्या दिशेने निघून गेले परंतु जाताना गावाच्या अगदी सुरुवातीस असलेल्या “अनमोल इन्”च्या मालकांना आमच्या आगमनाची पूर्वसूचना देऊन आमच्यासाठी जेवण देखील तयार ठेवण्यास सांगायला ते विसरले नाहीत! त्यामुळेच, आम्ही येत असलेले दुरून दिसताच त्या हॉटेलचे मालक राजेन्द्र भिलारे यांनी बाहेर येऊन सस्मित मुद्रेने आमचे स्वागत केले आणि त्यांचे चिरंजीव राहुल भिलारे यांनी तत्परतेने आमच्या क्षुधाशांतीची व्यवस्था केली. असे आदरातिथ्य ह्या अनोळख्या गावी तर आम्हाला अपेक्षितच नव्हते. त्यातून ‘अनमोल इन्’ हे तर अगदी अद्ययावत हॉटेल होते. राहुल हा हॉटेल व्यवस्थापन विषयाचा पदवीधर होता. त्याचे वडील राजेंद्र हे भिलार गावाचे बावीस वर्षे सरपंच होते. भोजनाचा आस्वाद घेता घेता आम्हाला त्यांच्याकडून भिलार आणि त्याच्या आसपासच्या परिसराबद्दल मोलाची माहिती मिळाली. भिलारला येण्यासाठी आम्ही बसमधून ज्या भोसे खिंडीत उतरलो होतो त्याच भोसे खिंडीत एकेकाळी मर्द मराठ्यांनी अफझलखानाच्या सैन्याला आपल्या तलवारीचे पाणी चाखवले होते, अशी शिवकालीन इतिहासात नोंद असल्याचे त्यांनी सांगितले . सह्याद्रीच्या त्याच भागात महाबळेश्वरजवळ जसे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री ह्या पाच नद्यांचे उगमस्थान आहे तसे भिलार गावाजवळ ‘कुडाळी’ ह्या कृष्णेच्या उपनदीचे उगमस्थान आहे असे ते म्हणाले. भिलारची ग्रामदेवता ‘कुंबळजाई जन्नी माता’ आहे. प्रतिवर्षी माघ शुद्ध अष्टमीला ह्या ग्रामदेवतेचा उत्सव समस्त गावकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतात असेही त्यांच्यामुळेच आम्हाला समजले. भिलारच्या आजूबाजूच्या गावात प्राचीन शिवमंदिरे असून त्यापैकी अवकाळी गावाचे कोटेश्वर – मंदिर, भूतेघरचे भूतेश्वर मंदिर, गोडवलीचे तपनेश्वर मंदिर आणि दाण्डेघरचे केदारेश्वर मंदिर आणि अर्थातच महाबळेश्वरचे महाबळीश्वर मंदिर विशेष प्रसिद्ध आहेत हेही सांगायला ते विसरले नाहीत. भिलार गाव हे पांचगणीपासून पाच किलोमीटर्स आणि महाबळेश्वरपासून चौदा किलोमीटर्स इतक्या थोड्या अंतरावर असल्याने ती ठिकाणे पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांपैकी काही पर्यटक नक्कीच तिथल्या महागड्या हॉटेल्समध्ये राहण्यापेक्षा, तुलनेने त्यापेक्षा कमी भाडे आकारणाऱ्या मात्र तशाच सोयी-सुविधा पुरविणाऱ्या भिलार मधल्या हॉटेल्समध्ये राहणे पसंत करतात. अनमोल इन् प्रमाणेच ह्या गावात, शिवसागर, मंगलतारा, मयूर रिसॉर्ट, गिरीजा रिसॉर्ट अशा अनेक वास्तूत आवास-निवास यांची सोय आहे, त्याखेरीज इथली अनेक गावकरी मंडळी देखील त्यासाठी पर्यटकांना यथाशक्ती मदत करायला तत्पर असतात. इथे मधुचंद्रासाठी येणारी नव विवाहित तरुण जोडपी असोत की मुलाबाळांना घेऊन येणारे परिवारजन असोत अथवा सहलीला आलेला मित्र-मैत्रिणींचा गट असो, सगळेच इथल्या निसर्गसुंदर, ध्वनिप्रदूषणरहित आणि प्रसन्न ग्रामीण वातावरणाचा अनोखा आणि अवीट आनंद घेऊनच परत जातात असे हे भिलार गाव आहे! भिलारचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे, स्ट्रॉबेरी उत्पादक बागायतदारांचे गाव आहे!इथे अनेकवर्षे केवळ बटाट्याचे एकमात्र पीक घेतले जायचे मात्र इथलेच एक प्रगत, उद्यमशील बागायतदार आणि समाजधुरीण बाळासाहेब भिलारे यांनी “स्ट्रॉबेरी” ( Strawberry ) ह्या विदेशी फळाच्या लागवडीचे तंत्र आणि मंत्र अवगत करून इथल्या अनेकांना स्ट्रॉबेरीची लागवड करायला प्रवृत्त केले आणि बघता बघता भिलार हे “स्ट्रॉबेरीचे गाव” म्हणून नावारूपाला आले. प्रतिवर्षी, सर्वसाधारणतः मार्च-एप्रिल महिन्यात येथे ‘स्ट्रॉबेरी-महोत्सव’ साजरा होतो. ह्या गावातून लालचुटुक स्ट्रॉबेरीची टनावारी रसदार फळे निर्यात होतात आणि देशाला कोट्यवधी मूल्याचे विदेशी चलन प्राप्त होते! भिलार गावाबद्दलची इतकी अनमोल माहिती आम्हाला ‘अनमोल इन् ‘ च्या भिलारे पितापुत्रांकडून मिळाल्याने तृप्तीचा ढेकर देत आम्ही दोघे प्रत्यक्ष गावात जाण्यासाठी तिथून बाहेर पडलो. पुढे एक किलोमीटर लांब रस्त्याच्या दुतर्फा घरे दिसत होती. बहुतेक घरे ही अलीकडेच दुरुस्त केलेली अथवा ऐसपैस वाढवून छान रंगरंगोटी केलेली होती. वर्षभरापूर्वी इथे राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे काही अधिकारी गावाची पाहणी करण्यासाठी आले होते. पुस्तकांचे गाव म्हणून भिलार गाव यापुढे ओळखले जाणार असल्याने ते नेमके कसे असायला हवे, कसे दिसायला हवे, याची स्पष्ट कल्पना त्यांनी नक्कीच गावकरी मंडळींना दिलेली होती . त्याचवेळी गावातली एकूण पंचवीस अशी ठिकाणे राज्य शासनाने निश्चित केली होती जिथे पर्यटक दिवसाच्या कोणत्याही वेळी , कितीही वेळ बसून, विनाशुल्क आणि विनाव्यत्यय वाचनाचा आनंद घेऊ शकेल! त्यासाठी केवळ पुस्तकेच नव्हे तर पुस्तके ठेवण्यासाठी भक्कम आणि देखणी कपाटे, बसण्यासाठी खुर्च्या, लिहिण्यासाठी टेबले ह्या सर्व गोष्टी शासनाने आधीच पुरविलेल्या होत्या. पुस्तकांची निवड करताना काही तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेऊन शासनाने एकूण पंधरा हजार नवी कोरी मराठी पुस्तके विकत घेतली होती. कविता, कथा, कादंबरी, चरित्रे-आत्मचरित्रे, विज्ञान, स्त्री-साहित्य, संत-साहित्य, लोकसाहित्य, परिवर्तनवादी साहित्य , शिवकालीन इतिहास, पर्यावरण आणि पर्यटन, बाल-कुमार साहित्य अशी वर्गवारी करून त्यानुसार ती पुस्तके विविध पंचवीस ठिकाणी वाटण्यात देखील आली होती. प्रत्येकाच्या वाट्याला सरासरीने सहाशे पुस्तके आली होती. तिथले हिलरेंज हायस्कूल आणि जिल्हा परिषदेची शाळा यामध्ये बालकुमार साहित्य ठेवले होते तर एका कृषिसेवा केंद्राच्या ‘कृषिकांचन’ इमारतीत चरित्रे आणि आत्मचरित्रे होती. हनुमान मंदिराच्या वळचणीला नियतकालिके दिसत होती तर श्रीराम मंदिराच्या छताखाली साहित्यिकांचे प्रदर्शन मांडलेले होते . जन्नी माता (जननी माता) मंदिराच्या विशाल मंडपात संत साहित्याचे विचारभांडार सर्वांसाठी खुले झाले होते. गिरीजा रिसॉर्टमध्ये उत्तमोत्तम कवितांचे ताटवे फुललेले होते तर मयूर रिसॉर्टमध्ये पर्यटन आणि पर्यावरण विषयक साहित्याचा मंद-मधुर सुवास दरवळला होता. भिलार गावाच्या विद्यमान महिला सरपंच सौ. वंदना प्रवीण भिलारे यांच्या टुमदार घरातले कथासंग्रह वाचकांना खुणावत होते तर दत्ता भिलारेंच्या घरी परिवर्तन चळवळीचा इतिहास आणि तत्सम साहित्य यांचा लाभ घेणे शक्य झाले होते. अनिल भिलारे यांनी केवळ महिला लेखिकांचे साहित्य आपल्या घरी मांडले होते तर ‘शिवसागर हॉटेल’च्या सुभाष भिलारे यांनी आपल्या आवारात स्ट्रॉबेरीच्या वेलींबरोबर विज्ञान-साहित्याची बाग फुलविली होती. प्रशान्त भिलारे ह्या तरुण सिव्हील इंजिनीयरच्या ज्या वास्तूत आम्ही मुक्काम केला, त्या ‘मंगलतारा’च्या दिवाणखान्यात शिवकालीन इतिहासाची आणि गडकिल्ल्यांच्या माहितीची नानाविध पुस्तके ठेवलेली होती. सारांश, अन्य देशातल्या पुस्तकांच्या गावांप्रमाणे ह्या गावात पुस्तके विकत घेण्याची दुकाने थाटलेली नव्हती तर गावातल्या निवडक ठिकाणी तिथेच बसून निःशुल्क वाचण्यासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती! ही कल्पना अभिनव आणि स्तुत्य आहे हे निःसंदेह मान्य केले तरी इथली अनेक जाडजूड पुस्तके अथवा इतिहाससंशोधक गोविंद सखाराम सरदेसाई यांनी लिहिलेला, मालोजीराव भोसले यांच्या काळापासून ते पेशवाईच्या अस्तापर्यंतचा हिंदवी स्वराज्याचा समग्र इतिहास विशद करणारे रियासतीसारखे संदर्भग्रंथ, ह्या गावात आलेला पर्यटक, त्याच्या उपलब्ध वेळात चाळून तरी पाहू शकेल की नाही याची शंका वाटते आणि असे दुर्मीळ आणि सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे मौल्यवान ग्रंथ खरोखरीच वाचण्याची इच्छा उराशी बाळगून आणि त्यासाठी पुरेसे दिवस ह्या गावात खर्च करण्याची मनाची तयारी करून कुणी जिज्ञासू वाचक इथे आलेच तर ह्या गावात त्यांची राहण्याची सोय ही अत्यंत माफक दरात उपलब्ध असणे हेही तितकेच आवश्यक आहे असे मला मनापासून वाटते. दुसरे असे की ह्या गावात नवी-जुनी परंतु दुर्मीळ पुस्तके विकत मिळण्याची सोय अजिबात नाही. ती होणे देखील तितकेच गरजेचे आहे. याचे कारण पुस्तकांच्या गावी येऊन एकही पुस्तक विकत न घेता परतणे म्हणजे प्रयागला जाऊन गंगेत डुबकी न मारताच केवळ तीरावरून गंगादर्शन करून परतण्यासारखे आहे, असे माझ्याप्रमाणेच अनेकांना वाटू शकते. असे असले तरी एक मात्र खरे की, इथली विविध विषयांवरची ग्रंथसंपदा पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात पुस्तक वाचनाची ओढ नक्कीच निर्माण होईल आणि तेवढे जरी झाले तरी ते वाचनसंस्कृती वर्धिष्णू करायला साहाय्यक ठरेल! असो, ह्या भिलार गावात आम्ही तीन दिवस मनसोक्त भटकलो. ह्या गावापासून दूर जंगलात एक प्रशस्त अशी गुहा आहे. पारतंत्र्याच्या काळात, ब्रिटीशांविरोधी छेडलेल्या १९४२च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात सक्रीय असलेले साताऱ्याचे क्रांतिसिंह नाना पाटील आणि किसन वीर यांच्यावर ब्रिटीश सरकारने जेव्हा अटक वॉरन्ट जारी केले तेव्हा ब्रिटीश पोलिसांना आपला थांगपत्ता लागू नये यासाठी त्या दोघांनी भिलारच्या याच गुहेत काही दिवस मुक्काम ठोकला होता. अशा ह्या निःशब्द वातावरण असलेल्या गुहेत अनेक महिने ध्यानधारणा करून पुढे एक तत्त्वचिंतक, सिद्धपुरुष, प्रवचनकार आणि अनेकांचे अध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले गेलेले ठाण्याचे दत्ताराम माधव गावंड, अर्थात तपस्वी दादा गावंड यांच्याबद्दल भिलारवासियांच्या मनात नितान्त आदर आहे. दादा गावंड यांनी लिहिलेली, ‘इंटेलिजन्स बियॉन्ड थॉट’, ‘टोवर्डस्द अन् नोन’, ‘बियॉन्ड द माइन्ड’, ‘इन्ट्युइटिव्ह इन्टेलिजन्स : ए प्ले विदिन अॅन्ड विदाउट” अशी अनेक चिन्तनपर पुस्तके देश-विदेशात त्यांच्या प्रवचनांप्रमाणेच लोकप्रिय झाली आहेत. त्या पुस्तकांचे अनुवाद हिंदी आणि मराठीत प्रसिध्द आहेत. ‘टोवर्डस्द अन् नोन’चा मराठी अनुवाद ‘चाहूल अज्ञाताची’ ह्या शीर्षकाने प्रसिद्ध असून त्याचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते झाले होते. २१ जानेवारी, २०१२ ह्या दिवशी वयाच्या ९५ व्या वर्षी दादा गावंड यांनी जगाचा निरोप घेतला. अशा ह्या सत्पुरुषाने आपल्या अठरा वर्षांच्या साधना काळात भिलारप्रमाणेच सज्जनगडावर देखील एका पर्णकुटीत वास्तव्य केले असल्याने ‘दादा गावंड’ हे नाव भिलारसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात परिचित आहे. भिलारच्या गावकऱ्यांची आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांच्या ह्या चिमुकल्या गावात संगीतकार नौशाद आणि विख्यात गायिका आशा भोसले यांचे बंगले आहेत. तसे पाहिले तर, भिलार हे गाव अनेक थोर व्यक्तींच्या पदस्पर्शामुळे कमालीचे भाग्यशाली ठरले आहे. प्रत्यक्ष महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, पूज्य साने गुरुजी, नेहरू , पटेल, कर्मवीर भाऊराव पाटील, मोरारजी देसाई, भूतपूर्व राज्यपाल पी.सी. अलेक्झान्डर, इतकेच कशाला, अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासूनचे महाराष्ट्र राज्याचे आजवर झालेले सर्व मुख्यमंत्री ह्या ना त्या निमित्ताने भिलार गावाला भेट देऊन गेलेले आहेत हे समजल्यावर तर मी तोंडातच बोट घातले. असे इथे विशेष होते तरी काय ज्यामुळे इतकी थोर मंडळी, तुम्हा-आम्हाला आजवर ठाऊकही नसलेल्या, ह्या आडवाटेवरच्या गावाकडे आकर्षित होऊन इथे येऊन देखील गेली होती असा प्रश्न मला पडला होता त्याचे एकमेव उत्तर होते इथले सेवाव्रती भिलारे गुरुजी! भिकू दाजी भिलारे अर्थात भिलारे गुरुजी हे ह्या गावात एक असे असामान्य व्यक्तिमत्त्व होऊन गेले, ज्यांच्यामुळे भिलार गाव प्रकाशझोतात आले. ह्या इसमाने पूज्य सानेगुरुजींचा आदर्श समोर ठेवून साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आचरणात आणताना निःस्वार्थ समाजसेवेचे असिधाराव्रत आजीवन पाळले. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभागी होऊन त्यांनी भिलार परिसरातल्या जमीनदारांना सुमारे शंभर एकर जमीन दान करायला प्रवृत्त केले होते . गांधीजींच्या विचारांचे ते समर्थक होते. १९४२च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना कारावास भोगावा लागला होता.१९४४ च्या जुलै महिन्यात गांधीजी पांचगणी येथे विश्रांतीसाठी मुक्कामास आलेले असताना एके दिवशी प्रार्थना सभेत सर्वासमक्ष एक तरुण हातातला धारदार सुरा परजत गांधीजींच्या अंगावर धावून गेला होता. त्यावेळी याच भिलारे गुरुजींनी आणि तिथल्या स्थानिक ‘सूरज लॉज’चे मणिशंकर पुरोहित यांनी प्रसंगावधान राखून त्या तरुणावर झडप घालून त्याला जेरबंद केले आणि गांधीजींचे प्राण वाचविले! तो तरुण दुसरा तिसरा कुणी नसून नथुराम गोडसे होता! त्या दिवसापासून भिलारे गुरुजी हे नाव सर्वतोमुखी झाले. हेच भिलारे गुरुजी स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या निःस्वार्थ समाजसेवेमुळे इतके लोकप्रिय झाले की इथल्या जनतेने त्यांना एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून पाठविले. त्यानंतर त्यांनी विधानपरिषदेचे सदस्य म्हणूनही काम केले. “भिलारचे भूषण” असलेल्या भिलारे गुरुजींच्याच वास्तूत आम्हाला राहायला मिळाले होते हे आमचे अहोभाग्यच म्हणायला हवे! त्यावेळी भिलारे गुरुजी ९८ वर्षांचे होते. मुंबईतल्या आपल्या निवासस्थानी राहून ते त्याही वयात रोज मंत्रालयात जात असत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतन संबंधी समस्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या एका उच्चाधिकार समितीचे सचिव म्हणून निरपेक्ष वृत्तीने काम पाहत असत. १९ जुलै, २०१७ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली! अशा ह्या भिलारे गुरुजींच्या व्यतिरिक्त ह्या अवघ्या तीन हजार वस्तीच्या गावाने गणपतराव भिलारे आणि मारुती भिलारे असे दोन आमदार राज्य विधिमंडळाला दिले होते. मारुती भिलारे यांचे सुपुत्र प्रल्हाद मारुती उर्फ बाळासाहेब भिलारे यांनी राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाचे अध्यक्षपद भूषविले होते. आनंदराव भिलारे हे आजही पोलीसदलात उच्च पदावर कार्यरत असून राष्ट्रपती पदकाचे ते मानकरी आहेत. गोविन्द भिलारे हे अव्वल दर्जाचे पखवाज वादक म्हणून देशभर नावाजले जात आहेत. सायली भिलारे ही युवती बॅडमिंटन ह्या खेळामध्ये आज ना उद्या आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकेल असा इथल्या अनेकांना विश्वास आहे.
“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्ने करू, शब्दांचि आमुच्या जिवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका” हे तुकाराम वचन सार्थ करण्यासाठी सिद्ध झालेले भिलार गाव उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी एखाद्या नवयौवनेप्रमाणे नटले सजले होते. जागोजागी रांगोळ्या काढलेल्या होत्या. गडकिल्ले बनविले होते. ठाण्याच्या ‘स्वत्त्व’ संस्थेच्या पन्नास कलाकारांनी घरांच्या भिंतींवर ख्यातनाम साहित्यिकांची अथवा साहित्यकृतींची चित्रे चितारून या पुस्तक महोत्सवासाठी अनुकूल असा माहौल निर्माण केला होता . वाईच्या विश्वकोश मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी हा सोहळा सुनियोजित पद्धतीने पार पाडण्यासाठी अपार कष्ट घेत होते. ठरल्यावेळी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांचे आगमन झाले. त्यांनी गावातल्या निवडक स्थळांना भेट देऊन पुस्तकांची मांडणी आणि एकूण व्यवस्था ठीकठाक झाली असल्याची खातरजमा करून घेतली आणि त्यानंतर भव्य मंडपात हजारो स्त्रीपुरुषांच्या साक्षीने आणि टाळ्यांच्या कडकडाटात भिलार गाव हे हिंदुस्थानातले पहिले “पुस्तकांचे गाव” म्हणून अधिकृतपणे घोषित झाले! त्या संस्मरणीय क्षणाचा मी प्रत्यक्षदर्शी ठरलो होतो.
याउलट, हिंदुस्थानातील पुस्तकांचे पहिले गाव म्हणून महाराष्ट्रात ‘भिलार’ची निवड करणाऱ्या आपल्या राज्य शासनाने “पुस्तकांचे गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवीत असताना अन्य देशातल्या पुस्तकांच्या गावांची नक्कल न करता कितीतरी वेगळा, व्यापक आणि समाजाभिमुख दृष्टिकोन ठेवलेला दिसतो! त्यामुळेच, वेल्स मधल्या ‘हे- ऑन-वे’पेक्षा किंवा तत्सम अन्य पुस्तकांच्या गावांपेक्षा ‘भिलार’चे वेगळेपण मला विशेष भावले. समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंचावर, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, अवघ्या सात-आठशे उंबरठ्यांच्या आणि तीन हजार वस्तीच्या ह्या निसर्गरम्य गावाला “पुस्तकांचे गाव” अशी आगळीवेगळी ओळख देण्याचा ठाम निर्धार जेव्हा २०१४ साली महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याने केला अगदी त्या क्षणापासून त्याच खात्याच्या अखत्यारीत येत असलेल्या मराठी भाषा विभागाने तो प्रकल्प उत्तम प्रकारे पूर्णत्वाला नेण्यासाठी सातत्याने आणि चिकाटीने दोन वर्षे नियोजनबद्ध पद्धतीने काम केले. त्यामुळेच वर्ष २०१६च्या डिसेंबरमध्ये गेट वे ऑफ इंडिया येथे राज्य शासनातर्फे साजरा झालेल्या मराठी भाषा दिनाच्या भव्यदिव्य कार्यक्रमात सांस्कृतिक खात्याच्या मंत्रिमहोदयांनी याबाबतची अधिकृत घोषणा करून, ५ मे २०१७ हा दिवस उद्घाटन समारंभासाठी निश्चित केल्याचे सांगून टाकले! त्याच क्षणी मी उद्घाटनाच्या दोन दिवस आधीच भिलार गावी मुक्कामास जाण्याचे मनाशी पक्के ठरवून टाकले आणि तदनुसार पाठीवरती ‘बिऱ्हाड’ घेऊन ३ मे रोजी सकाळी मी पुण्याहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या बसमध्ये आसनस्थ झालो. माझ्यासमवेत माझे एक स्नेही प्रवीण मथुरे होते. पुण्यापासून भिलार ८० किलोमीटर्स अंतरावर आहे. त्या भागात रेल्वे नाही. त्यामुळे तिथे केवळ रस्त्यानेच जाता येते. सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण भिलार पासून ४० किलोमीटर्स अंतरावर आहे. मुंबईपासून पुणे मार्गे भिलार सुमारे २७० किलोमीटर्स अंतरावर आहे. मुंबईहून महाड-पोलादपूर-महाबळेश्वर मार्गे देखील भिलारला जाता येते. भिलार आणि महाबळेश्वर याच्यात १४ किलोमीटर्स अंतर आहे. कुठूनही जायचे झाले तरी पांचगणी-महाबळेश्वर यांच्या दरम्यान असलेल्या ‘भोसे खिंड’ येथून भिलारकडे वळणारा रस्ता चोखाळावा लागतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे! मे महिन्यातल्या त्या भर दुपारी दोनच्या सुमारास आम्ही ‘भोसे खिंड’ येथे अचूक उतरलो आणि आश्चर्य म्हणजे त्याही वेळी तिथले वातावरण अगदी सुसह्य होते. भिलारच्या दिशेने आम्ही रमतगमत निघालो. वाटेतच आम्हाला दुचाकीवरून चाललेले दोन तरुण भेटले. दोघेही वाईच्या विश्वकोश कार्यालयातले अधिकारी होते आणि भिलार गावातली उद्घाटन सोहळ्याची पूर्वतयारी करण्यासाठी तिथे आलेले होते. आमची अत्यंत अदबीने वास्तपूस केल्यानंतर ते दुचाकीवरून गावाच्या दिशेने निघून गेले परंतु जाताना गावाच्या अगदी सुरुवातीस असलेल्या “अनमोल इन्”च्या मालकांना आमच्या आगमनाची पूर्वसूचना देऊन आमच्यासाठी जेवण देखील तयार ठेवण्यास सांगायला ते विसरले नाहीत! त्यामुळेच, आम्ही येत असलेले दुरून दिसताच त्या हॉटेलचे मालक राजेन्द्र भिलारे यांनी बाहेर येऊन सस्मित मुद्रेने आमचे स्वागत केले आणि त्यांचे चिरंजीव राहुल भिलारे यांनी तत्परतेने आमच्या क्षुधाशांतीची व्यवस्था केली. असे आदरातिथ्य ह्या अनोळख्या गावी तर आम्हाला अपेक्षितच नव्हते. त्यातून ‘अनमोल इन्’ हे तर अगदी अद्ययावत हॉटेल होते. राहुल हा हॉटेल व्यवस्थापन विषयाचा पदवीधर होता. त्याचे वडील राजेंद्र हे भिलार गावाचे बावीस वर्षे सरपंच होते. भोजनाचा आस्वाद घेता घेता आम्हाला त्यांच्याकडून भिलार आणि त्याच्या आसपासच्या परिसराबद्दल मोलाची माहिती मिळाली. भिलारला येण्यासाठी आम्ही बसमधून ज्या भोसे खिंडीत उतरलो होतो त्याच भोसे खिंडीत एकेकाळी मर्द मराठ्यांनी अफझलखानाच्या सैन्याला आपल्या तलवारीचे पाणी चाखवले होते, अशी शिवकालीन इतिहासात नोंद असल्याचे त्यांनी सांगितले . सह्याद्रीच्या त्याच भागात महाबळेश्वरजवळ जसे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री ह्या पाच नद्यांचे उगमस्थान आहे तसे भिलार गावाजवळ ‘कुडाळी’ ह्या कृष्णेच्या उपनदीचे उगमस्थान आहे असे ते म्हणाले. भिलारची ग्रामदेवता ‘कुंबळजाई जन्नी माता’ आहे. प्रतिवर्षी माघ शुद्ध अष्टमीला ह्या ग्रामदेवतेचा उत्सव समस्त गावकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतात असेही त्यांच्यामुळेच आम्हाला समजले. भिलारच्या आजूबाजूच्या गावात प्राचीन शिवमंदिरे असून त्यापैकी अवकाळी गावाचे कोटेश्वर – मंदिर, भूतेघरचे भूतेश्वर मंदिर, गोडवलीचे तपनेश्वर मंदिर आणि दाण्डेघरचे केदारेश्वर मंदिर आणि अर्थातच महाबळेश्वरचे महाबळीश्वर मंदिर विशेष प्रसिद्ध आहेत हेही सांगायला ते विसरले नाहीत. भिलार गाव हे पांचगणीपासून पाच किलोमीटर्स आणि महाबळेश्वरपासून चौदा किलोमीटर्स इतक्या थोड्या अंतरावर असल्याने ती ठिकाणे पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांपैकी काही पर्यटक नक्कीच तिथल्या महागड्या हॉटेल्समध्ये राहण्यापेक्षा, तुलनेने त्यापेक्षा कमी भाडे आकारणाऱ्या मात्र तशाच सोयी-सुविधा पुरविणाऱ्या भिलार मधल्या हॉटेल्समध्ये राहणे पसंत करतात. अनमोल इन् प्रमाणेच ह्या गावात, शिवसागर, मंगलतारा, मयूर रिसॉर्ट, गिरीजा रिसॉर्ट अशा अनेक वास्तूत आवास-निवास यांची सोय आहे, त्याखेरीज इथली अनेक गावकरी मंडळी देखील त्यासाठी पर्यटकांना यथाशक्ती मदत करायला तत्पर असतात. इथे मधुचंद्रासाठी येणारी नव विवाहित तरुण जोडपी असोत की मुलाबाळांना घेऊन येणारे परिवारजन असोत अथवा सहलीला आलेला मित्र-मैत्रिणींचा गट असो, सगळेच इथल्या निसर्गसुंदर, ध्वनिप्रदूषणरहित आणि प्रसन्न ग्रामीण वातावरणाचा अनोखा आणि अवीट आनंद घेऊनच परत जातात असे हे भिलार गाव आहे! भिलारचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे, स्ट्रॉबेरी उत्पादक बागायतदारांचे गाव आहे!इथे अनेकवर्षे केवळ बटाट्याचे एकमात्र पीक घेतले जायचे मात्र इथलेच एक प्रगत, उद्यमशील बागायतदार आणि समाजधुरीण बाळासाहेब भिलारे यांनी “स्ट्रॉबेरी” ( Strawberry ) ह्या विदेशी फळाच्या लागवडीचे तंत्र आणि मंत्र अवगत करून इथल्या अनेकांना स्ट्रॉबेरीची लागवड करायला प्रवृत्त केले आणि बघता बघता भिलार हे “स्ट्रॉबेरीचे गाव” म्हणून नावारूपाला आले. प्रतिवर्षी, सर्वसाधारणतः मार्च-एप्रिल महिन्यात येथे ‘स्ट्रॉबेरी-महोत्सव’ साजरा होतो. ह्या गावातून लालचुटुक स्ट्रॉबेरीची टनावारी रसदार फळे निर्यात होतात आणि देशाला कोट्यवधी मूल्याचे विदेशी चलन प्राप्त होते! भिलार गावाबद्दलची इतकी अनमोल माहिती आम्हाला ‘अनमोल इन् ‘ च्या भिलारे पितापुत्रांकडून मिळाल्याने तृप्तीचा ढेकर देत आम्ही दोघे प्रत्यक्ष गावात जाण्यासाठी तिथून बाहेर पडलो. पुढे एक किलोमीटर लांब रस्त्याच्या दुतर्फा घरे दिसत होती. बहुतेक घरे ही अलीकडेच दुरुस्त केलेली अथवा ऐसपैस वाढवून छान रंगरंगोटी केलेली होती. वर्षभरापूर्वी इथे राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे काही अधिकारी गावाची पाहणी करण्यासाठी आले होते. पुस्तकांचे गाव म्हणून भिलार गाव यापुढे ओळखले जाणार असल्याने ते नेमके कसे असायला हवे, कसे दिसायला हवे, याची स्पष्ट कल्पना त्यांनी नक्कीच गावकरी मंडळींना दिलेली होती . त्याचवेळी गावातली एकूण पंचवीस अशी ठिकाणे राज्य शासनाने निश्चित केली होती जिथे पर्यटक दिवसाच्या कोणत्याही वेळी , कितीही वेळ बसून, विनाशुल्क आणि विनाव्यत्यय वाचनाचा आनंद घेऊ शकेल! त्यासाठी केवळ पुस्तकेच नव्हे तर पुस्तके ठेवण्यासाठी भक्कम आणि देखणी कपाटे, बसण्यासाठी खुर्च्या, लिहिण्यासाठी टेबले ह्या सर्व गोष्टी शासनाने आधीच पुरविलेल्या होत्या. पुस्तकांची निवड करताना काही तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेऊन शासनाने एकूण पंधरा हजार नवी कोरी मराठी पुस्तके विकत घेतली होती. कविता, कथा, कादंबरी, चरित्रे-आत्मचरित्रे, विज्ञान, स्त्री-साहित्य, संत-साहित्य, लोकसाहित्य, परिवर्तनवादी साहित्य , शिवकालीन इतिहास, पर्यावरण आणि पर्यटन, बाल-कुमार साहित्य अशी वर्गवारी करून त्यानुसार ती पुस्तके विविध पंचवीस ठिकाणी वाटण्यात देखील आली होती. प्रत्येकाच्या वाट्याला सरासरीने सहाशे पुस्तके आली होती. तिथले हिलरेंज हायस्कूल आणि जिल्हा परिषदेची शाळा यामध्ये बालकुमार साहित्य ठेवले होते तर एका कृषिसेवा केंद्राच्या ‘कृषिकांचन’ इमारतीत चरित्रे आणि आत्मचरित्रे होती. हनुमान मंदिराच्या वळचणीला नियतकालिके दिसत होती तर श्रीराम मंदिराच्या छताखाली साहित्यिकांचे प्रदर्शन मांडलेले होते . जन्नी माता (जननी माता) मंदिराच्या विशाल मंडपात संत साहित्याचे विचारभांडार सर्वांसाठी खुले झाले होते. गिरीजा रिसॉर्टमध्ये उत्तमोत्तम कवितांचे ताटवे फुललेले होते तर मयूर रिसॉर्टमध्ये पर्यटन आणि पर्यावरण विषयक साहित्याचा मंद-मधुर सुवास दरवळला होता. भिलार गावाच्या विद्यमान महिला सरपंच सौ. वंदना प्रवीण भिलारे यांच्या टुमदार घरातले कथासंग्रह वाचकांना खुणावत होते तर दत्ता भिलारेंच्या घरी परिवर्तन चळवळीचा इतिहास आणि तत्सम साहित्य यांचा लाभ घेणे शक्य झाले होते. अनिल भिलारे यांनी केवळ महिला लेखिकांचे साहित्य आपल्या घरी मांडले होते तर ‘शिवसागर हॉटेल’च्या सुभाष भिलारे यांनी आपल्या आवारात स्ट्रॉबेरीच्या वेलींबरोबर विज्ञान-साहित्याची बाग फुलविली होती. प्रशान्त भिलारे ह्या तरुण सिव्हील इंजिनीयरच्या ज्या वास्तूत आम्ही मुक्काम केला, त्या ‘मंगलतारा’च्या दिवाणखान्यात शिवकालीन इतिहासाची आणि गडकिल्ल्यांच्या माहितीची नानाविध पुस्तके ठेवलेली होती. सारांश, अन्य देशातल्या पुस्तकांच्या गावांप्रमाणे ह्या गावात पुस्तके विकत घेण्याची दुकाने थाटलेली नव्हती तर गावातल्या निवडक ठिकाणी तिथेच बसून निःशुल्क वाचण्यासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती! ही कल्पना अभिनव आणि स्तुत्य आहे हे निःसंदेह मान्य केले तरी इथली अनेक जाडजूड पुस्तके अथवा इतिहाससंशोधक गोविंद सखाराम सरदेसाई यांनी लिहिलेला, मालोजीराव भोसले यांच्या काळापासून ते पेशवाईच्या अस्तापर्यंतचा हिंदवी स्वराज्याचा समग्र इतिहास विशद करणारे रियासतीसारखे संदर्भग्रंथ, ह्या गावात आलेला पर्यटक, त्याच्या उपलब्ध वेळात चाळून तरी पाहू शकेल की नाही याची शंका वाटते आणि असे दुर्मीळ आणि सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे मौल्यवान ग्रंथ खरोखरीच वाचण्याची इच्छा उराशी बाळगून आणि त्यासाठी पुरेसे दिवस ह्या गावात खर्च करण्याची मनाची तयारी करून कुणी जिज्ञासू वाचक इथे आलेच तर ह्या गावात त्यांची राहण्याची सोय ही अत्यंत माफक दरात उपलब्ध असणे हेही तितकेच आवश्यक आहे असे मला मनापासून वाटते. दुसरे असे की ह्या गावात नवी-जुनी परंतु दुर्मीळ पुस्तके विकत मिळण्याची सोय अजिबात नाही. ती होणे देखील तितकेच गरजेचे आहे. याचे कारण पुस्तकांच्या गावी येऊन एकही पुस्तक विकत न घेता परतणे म्हणजे प्रयागला जाऊन गंगेत डुबकी न मारताच केवळ तीरावरून गंगादर्शन करून परतण्यासारखे आहे, असे माझ्याप्रमाणेच अनेकांना वाटू शकते. असे असले तरी एक मात्र खरे की, इथली विविध विषयांवरची ग्रंथसंपदा पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात पुस्तक वाचनाची ओढ नक्कीच निर्माण होईल आणि तेवढे जरी झाले तरी ते वाचनसंस्कृती वर्धिष्णू करायला साहाय्यक ठरेल! असो, ह्या भिलार गावात आम्ही तीन दिवस मनसोक्त भटकलो. ह्या गावापासून दूर जंगलात एक प्रशस्त अशी गुहा आहे. पारतंत्र्याच्या काळात, ब्रिटीशांविरोधी छेडलेल्या १९४२च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात सक्रीय असलेले साताऱ्याचे क्रांतिसिंह नाना पाटील आणि किसन वीर यांच्यावर ब्रिटीश सरकारने जेव्हा अटक वॉरन्ट जारी केले तेव्हा ब्रिटीश पोलिसांना आपला थांगपत्ता लागू नये यासाठी त्या दोघांनी भिलारच्या याच गुहेत काही दिवस मुक्काम ठोकला होता. अशा ह्या निःशब्द वातावरण असलेल्या गुहेत अनेक महिने ध्यानधारणा करून पुढे एक तत्त्वचिंतक, सिद्धपुरुष, प्रवचनकार आणि अनेकांचे अध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले गेलेले ठाण्याचे दत्ताराम माधव गावंड, अर्थात तपस्वी दादा गावंड यांच्याबद्दल भिलारवासियांच्या मनात नितान्त आदर आहे. दादा गावंड यांनी लिहिलेली, ‘इंटेलिजन्स बियॉन्ड थॉट’, ‘टोवर्डस्द अन् नोन’, ‘बियॉन्ड द माइन्ड’, ‘इन्ट्युइटिव्ह इन्टेलिजन्स : ए प्ले विदिन अॅन्ड विदाउट” अशी अनेक चिन्तनपर पुस्तके देश-विदेशात त्यांच्या प्रवचनांप्रमाणेच लोकप्रिय झाली आहेत. त्या पुस्तकांचे अनुवाद हिंदी आणि मराठीत प्रसिध्द आहेत. ‘टोवर्डस्द अन् नोन’चा मराठी अनुवाद ‘चाहूल अज्ञाताची’ ह्या शीर्षकाने प्रसिद्ध असून त्याचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते झाले होते. २१ जानेवारी, २०१२ ह्या दिवशी वयाच्या ९५ व्या वर्षी दादा गावंड यांनी जगाचा निरोप घेतला. अशा ह्या सत्पुरुषाने आपल्या अठरा वर्षांच्या साधना काळात भिलारप्रमाणेच सज्जनगडावर देखील एका पर्णकुटीत वास्तव्य केले असल्याने ‘दादा गावंड’ हे नाव भिलारसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात परिचित आहे. भिलारच्या गावकऱ्यांची आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांच्या ह्या चिमुकल्या गावात संगीतकार नौशाद आणि विख्यात गायिका आशा भोसले यांचे बंगले आहेत. तसे पाहिले तर, भिलार हे गाव अनेक थोर व्यक्तींच्या पदस्पर्शामुळे कमालीचे भाग्यशाली ठरले आहे. प्रत्यक्ष महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, पूज्य साने गुरुजी, नेहरू , पटेल, कर्मवीर भाऊराव पाटील, मोरारजी देसाई, भूतपूर्व राज्यपाल पी.सी. अलेक्झान्डर, इतकेच कशाला, अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासूनचे महाराष्ट्र राज्याचे आजवर झालेले सर्व मुख्यमंत्री ह्या ना त्या निमित्ताने भिलार गावाला भेट देऊन गेलेले आहेत हे समजल्यावर तर मी तोंडातच बोट घातले. असे इथे विशेष होते तरी काय ज्यामुळे इतकी थोर मंडळी, तुम्हा-आम्हाला आजवर ठाऊकही नसलेल्या, ह्या आडवाटेवरच्या गावाकडे आकर्षित होऊन इथे येऊन देखील गेली होती असा प्रश्न मला पडला होता त्याचे एकमेव उत्तर होते इथले सेवाव्रती भिलारे गुरुजी! भिकू दाजी भिलारे अर्थात भिलारे गुरुजी हे ह्या गावात एक असे असामान्य व्यक्तिमत्त्व होऊन गेले, ज्यांच्यामुळे भिलार गाव प्रकाशझोतात आले. ह्या इसमाने पूज्य सानेगुरुजींचा आदर्श समोर ठेवून साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आचरणात आणताना निःस्वार्थ समाजसेवेचे असिधाराव्रत आजीवन पाळले. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभागी होऊन त्यांनी भिलार परिसरातल्या जमीनदारांना सुमारे शंभर एकर जमीन दान करायला प्रवृत्त केले होते . गांधीजींच्या विचारांचे ते समर्थक होते. १९४२च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना कारावास भोगावा लागला होता.१९४४ च्या जुलै महिन्यात गांधीजी पांचगणी येथे विश्रांतीसाठी मुक्कामास आलेले असताना एके दिवशी प्रार्थना सभेत सर्वासमक्ष एक तरुण हातातला धारदार सुरा परजत गांधीजींच्या अंगावर धावून गेला होता. त्यावेळी याच भिलारे गुरुजींनी आणि तिथल्या स्थानिक ‘सूरज लॉज’चे मणिशंकर पुरोहित यांनी प्रसंगावधान राखून त्या तरुणावर झडप घालून त्याला जेरबंद केले आणि गांधीजींचे प्राण वाचविले! तो तरुण दुसरा तिसरा कुणी नसून नथुराम गोडसे होता! त्या दिवसापासून भिलारे गुरुजी हे नाव सर्वतोमुखी झाले. हेच भिलारे गुरुजी स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या निःस्वार्थ समाजसेवेमुळे इतके लोकप्रिय झाले की इथल्या जनतेने त्यांना एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून पाठविले. त्यानंतर त्यांनी विधानपरिषदेचे सदस्य म्हणूनही काम केले. “भिलारचे भूषण” असलेल्या भिलारे गुरुजींच्याच वास्तूत आम्हाला राहायला मिळाले होते हे आमचे अहोभाग्यच म्हणायला हवे! त्यावेळी भिलारे गुरुजी ९८ वर्षांचे होते. मुंबईतल्या आपल्या निवासस्थानी राहून ते त्याही वयात रोज मंत्रालयात जात असत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतन संबंधी समस्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या एका उच्चाधिकार समितीचे सचिव म्हणून निरपेक्ष वृत्तीने काम पाहत असत. १९ जुलै, २०१७ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली! अशा ह्या भिलारे गुरुजींच्या व्यतिरिक्त ह्या अवघ्या तीन हजार वस्तीच्या गावाने गणपतराव भिलारे आणि मारुती भिलारे असे दोन आमदार राज्य विधिमंडळाला दिले होते. मारुती भिलारे यांचे सुपुत्र प्रल्हाद मारुती उर्फ बाळासाहेब भिलारे यांनी राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाचे अध्यक्षपद भूषविले होते. आनंदराव भिलारे हे आजही पोलीसदलात उच्च पदावर कार्यरत असून राष्ट्रपती पदकाचे ते मानकरी आहेत. गोविन्द भिलारे हे अव्वल दर्जाचे पखवाज वादक म्हणून देशभर नावाजले जात आहेत. सायली भिलारे ही युवती बॅडमिंटन ह्या खेळामध्ये आज ना उद्या आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकेल असा इथल्या अनेकांना विश्वास आहे.
“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्ने करू, शब्दांचि आमुच्या जिवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका” हे तुकाराम वचन सार्थ करण्यासाठी सिद्ध झालेले भिलार गाव उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी एखाद्या नवयौवनेप्रमाणे नटले सजले होते. जागोजागी रांगोळ्या काढलेल्या होत्या. गडकिल्ले बनविले होते. ठाण्याच्या ‘स्वत्त्व’ संस्थेच्या पन्नास कलाकारांनी घरांच्या भिंतींवर ख्यातनाम साहित्यिकांची अथवा साहित्यकृतींची चित्रे चितारून या पुस्तक महोत्सवासाठी अनुकूल असा माहौल निर्माण केला होता . वाईच्या विश्वकोश मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी हा सोहळा सुनियोजित पद्धतीने पार पाडण्यासाठी अपार कष्ट घेत होते. ठरल्यावेळी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांचे आगमन झाले. त्यांनी गावातल्या निवडक स्थळांना भेट देऊन पुस्तकांची मांडणी आणि एकूण व्यवस्था ठीकठाक झाली असल्याची खातरजमा करून घेतली आणि त्यानंतर भव्य मंडपात हजारो स्त्रीपुरुषांच्या साक्षीने आणि टाळ्यांच्या कडकडाटात भिलार गाव हे हिंदुस्थानातले पहिले “पुस्तकांचे गाव” म्हणून अधिकृतपणे घोषित झाले! त्या संस्मरणीय क्षणाचा मी प्रत्यक्षदर्शी ठरलो होतो.