पावसाळा सुरू झाला की त्याच्या अनुषंगाने पावसावरचे साहित्य, कविता, गाणी, पावसातले खाणे, रेडिओ, टिव्ही, वर्तमानपत्रांतल्या त्याच्याबद्दलच्या बातम्या… ह्या सगळ्यांनी पाऊस ’आपला पावसाळा’ भारून टाकतो. ’इतका सगळा’ किंवा ’इतकाच?’ संबंध आहे का पावसाचा आणि ’तुमचा-आमचा़?’
तो : पाऊस म्हणजे चिखल सारा, पाऊस म्हणजे मरगळ…
ती : पाऊस म्हणजे गार वारा, पाऊस म्हणजे हिरवळ
ही कवी सौमित्रची कविता गेल्या दशकात तुम्हा-आम्हा सर्वांच्या कानी पडलेली… तरूणाईच्या फेसबुक, व्हॉटस्अपवर फिर फिर फिरलेली. विशेषत: पावसाळा सुरू झाला की त्याच्या अनुषंगाने पावसावरचे साहित्य, कविता, गाणी, पावसातले खाणे, रेडिओ, टिव्ही, वर्तमानपत्रांतल्या त्याच्याबद्दलच्या बातम्या… ह्या सगळ्यांनी पाऊस ’आपला पावसाळा’ भारून टाकतो. ’इतका सगळा’ किंवा ’इतकाच?’ संबंध आहे का पावसाचा आणि ’तुमचा-आमचा़?’
पावसाळी सहलींच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासारख्या शहरांची मर्यादा ओलांडून जरा बाहेर गेलात की लक्षात येते ती पावसाच्या चित्राची दुसरी बाजू… तुम्हा-आम्हाला माहीत नसलेली… शेतीची!
पावसाने भिजून काळ्याशार मातीत बैल जोडीच्या बरोबरीने पोटरीभर चिखलात लगबगणारी माणसे, मुसळधार पावसाची फिकीर न करता… त्या चिखलातून कोपरापर्यंत हात बुडवून रोपांची लावणी करणार्या त्यांच्या बायका, पोरं टोरं… ह्या सगळ्यांच्या चेहर्यावर एक वेगळाच उत्साह, पावसाच्या सरींनाही मागे टाकून ओसंडत असतो. जणूकाही घरातल्या कुणा लाडक्याची लगीनघाईच!
ह्या सगळ्या उत्साह सोहळ्याचा प्रेरणास्रोत, पाऊस. कारण हा सोहळा आहे अन्ननिर्मितीचा! माणसाच्या तीन मूलभूत गरजा ’अन्न-वस्त्र-निवारा.’ ह्यापैकी प्राथमिक गरज, भूकेसाठी, जगण्यासाठी… अन्नाची, उद्यासाठी जगलो तर जगताना लाजेसाठी, सामाजिक शूचिर्भूततेसाठी ’वस्त्र’ आणि तेही मिळाले की सामूहिक जीवनासाठी ’निवारा’ म्हणजे ’घर’. ह्या सगळ्यानंतर जे येते ते म्हणजे जगण्याचा ’उत्सव’ म्हणजेच करमणूक… म्हणजेच साहित्य, नृत्य, नाटक, टीव्ही, मोबाईल फोन्स, आधुनिक गाड्या वगैरे वगैरे.
पण ह्या उत्सवातच मग्न असलेल्या तुम्हा-आम्हाला उदासीनता, अनभिज्ञता किंवा अनुत्साह असण्याचे कारण म्हणजे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अन्नाचा स्रोत म्हणजे आपल्या घरांच्या आजूबाजूची दुकाने, भाजीबाजार, सुपर मार्केट्स ही आपली गैरसमजूत वा आपले अज्ञान! कारण ह्या सर्व ठिकाणांचा अन्नरूपी मालाचा मूळ स्रोत म्हणजे शेती. तिचा संबंध शेतकर्यांशी त्या शेतीला आवश्यक त्या नैसर्गिक संसाधनांशी म्हणजे जमीन, सूर्यप्रकाश, पाणी/पाऊस ह्या सगळ्यांशी देणे-घेणे काय ते शेतकर्यांनाच. आम्हाला काय त्याचे? ही आपली संत(?) प्रकृती.
आपल्या हातातल्या मोबाईल फोनच्या डिटेल्ट स्पेसिफीकेशन्सपासून ते ’सिनेमातल्या नटी’च्या वेशभूषेपर्यंत सर्व माहिती आमच्याकडे इत्यंभूत. पण हे सर्व अनुभवण्याकरता जिवंत असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी हव्या असलेल्या अन्नाबद्दल मात्र इतकी उदासीनता की, आपल्या प्लेटमध्ये असलेला भात कोणत्या जातीच्या तांदळापासून बनला आहे, तो कुठल्या प्रांतात पिकवला आहे, कधी, कसा पिकवला जातो ह्याबद्दल 80-90 टक्के जनतेला शून्य ज्ञान!
अमेरिकेतल्या आजच्या काळातल्या एका थोर प्रतिभावंत लेखक आणि विचारवंताने ’वेंडेल बेरी’ ह्याने शेतीचा खूप अभ्यासपूर्वक अनुभव घेतल्यानंतर एक फार सुरेख सिद्धांत मांडला आहे. तो म्हणतो की, ’आपण सर्व ग्राहक ह्या नात्याने अन्ननिर्मितीच्या चक्रातला सर्वात शेवटचा पण अत्यंत महत्वाचा घटक आहोत.’ ह्या नात्याने वर उल्लेखलेल्या अन्न निर्मितीतील मूलभूत क्रियेच्या म्हणजे शेतीच्या सर्व अंगांचे, संसाधनांचे निदान मूलभूत ज्ञान तरी आपणा सर्वांना असणे आवश्यक आहे.
पावसाबद्दलच्या ह्या लेखात हे सर्व मांडण्याचे कारण म्हणजेच आपल्या देशातील, आपल्या राज्यातील शेतकर्यांचे अन्ननिर्मितीसाठी पावसावरचे अवलंबित्व. आपली शेती मुख्यत्वे ’खरीप’ म्हणजेच पावसावर अवलंबून. विशेषत: महाराष्ट्राचा पश्चिम घाट म्हणजेच कोकणातील शेती.
महाराष्ट्रातील एकूण पावसापैकी 45 टक्के पाऊस एकट्या कोकणात पडतो म्हणजे कोकण पाण्याने आणि हिरवाइने ‘सुजलाम् सुफलाम्’ असायला हवा. इथे, हिरवाई म्हणजे फक्त नैसर्गिक वनश्री मला अपेक्षित नसून ’खरिप’ व्यतिरिक्त म्हणजे डिसेंबर-जानेवारीनंतरही इथली शेती हिरव्यागार, भाज्यांनी, धान्यांनी भरलेली दिसणे अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात मात्र तसे होत नसून दिवाळीत भाताची पिके कापून झाली की शेतजमिनी बहुतांशी ओसाड पडतात. त्याची कारणे अनेक आहेत. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणार्या नद्या, नाले, खळाळत वाहणारे झरे, हवेतली रोमांचक आद्रता, जमिनीतला लोभस ओलावा… हे सगळे पावसाळ्या मागोमाग त्याची शेपटी धरून नाहिसे होते. मागे उरतात ती फक्त कापलेल्या भाताची बोचरी धाटं, दिवसागणिक पिवळे पडत जाणारे नकोसे रान आणि हडकत चाललेली मोकाट गुरे.
कोकणातल्या डोंगरदर्यांची भौगोलिक रचना, सरकारी व्यवस्थापनांचे दुर्लक्ष ही कारणे किती दिवस देत राहणार? एक शेतकरी म्हणून मी ह्या परिस्थितीचा अभ्यासपूर्वक विचार कधी करणार? माझ्या शेतातून वाहून वाया जाणार्या पाण्याला अडवायला, जिरवायला मी कधी शिकणार? एक समूह म्हणून, एक गाव म्हणून हेेच प्रयत्न आम्ही सामुदायिक पातळीवर राबवावेत. त्यातून आमच्या सुजलतेचा, सुफलतेचा मार्ग आम्ही कधी शोधणार? आमची प्रगतीची व्याख्या समृद्धीकडे नेणारी नसून फक्त सुबत्तेकडे नेणारी, संकुचित आहे. घरापर्यंत येणारा डांबरी रस्ता, दारात उभी मोटारसायकल, हाती खेळवायला अत्याधुनिक मोबाईल फोन, विजेच्या दिव्यांचा अनावश्यक लखलखाट ही फक्त सुबत्तेची लक्षणे आहेत. ह्या सगळ्यांचा हव्यास ग्रामीण जनतेला जडला आहे ते शहरी जनतेच्या सुखासीनतेच्या अंधानुकरणामुळे आणि त्याचबरोबर शहरी जनतेच्या आणि अ-शेतकरी व्यावसायिकांच्या (नोकरदार, इतर उद्योगधंदे) शेतीबद्दलच्या उदासीनतेमुळे. मूलत: ह्या सर्वांचीच मनुष्यप्राणी म्हणून अन्नाची गरज सारखीच आहे. आयटीमधील उच्च पदावरचा अधिकारी सुद्धा भूक लागल्यावर नोटा, चेकबुक्स किंवा बँक स्टेटमेंट्स खाऊ शकत नाही.
ह्याचा अर्थ तुम्हा-आम्हा, सर्वांना शेती करायला लागावी, असा नसून शेतीबद्दल म्हणजेच अन्न उत्पादनाच्या विषयाबद्दल थोडे तरी जागरूक व्हायला हवे. ग्राहक म्हणून विकत घेताना त्या अन्नाचे (भाजीचे, धान्याचे) कुळ मुळ विचारायला हवे. पर्यटनाला जाताना, राज्यात किंवा बाहेर, शेत दिसल्यावर आस्थेने ह्याबद्दल शेतकर्याची चौकशी करायला हवी. त्याच्याकडची छोटी मोठी उत्पादने विकत घेऊन त्याला प्रोत्साहन द्यायला हवे. आपल्या शहरात, सोसायटीत, मित्र परिवारात त्याला त्याचा उत्पादित माल थेट विकून देता यावा यासाठी सामूहि प्रयत्न करायला हवेत. शेतकर्यांसाठी जोडधंदा म्हणून आज ’कृषि पर्यटनाचा’ सुंदर उपाय पुढे आला आहे. दरवर्षी अधिकाधिक खर्चिक पर्यटनस्थळांना भेटी देण्याबरोबरच अशा एखाद्या कृषी पर्यटनस्थळाला भेट द्या. त्या शेतकर्याच्या कामाविषयी, त्याच्या जीवनमानाविषयी माहिती घ्या. त्याला प्रोत्साहन द्या. अशा अनेक छोट्याछोट्या गोष्टींमधून ह्या अन्न उत्पादन कार्याला पुन्हा एकदा उत्साह येईल, जोर येईल. तुमच्या प्रोत्साहनामुळे, देवाण घेवाणीमुळे, स्वत:पुरताच भात पिकवणारा कोकणातला हा छोटा शेतकरी काहीतरी अधिक पिकवायला प्रेरित होईल. अपुर्या पडणार्या पाण्याला आपल्या शेतात थांबवायला आपल्या कष्टांचे बांध घालेल. अशा शेकडो, नाही… हजारो शेतकर्यांचे जमीन दलालांकडे वळलेले पाय थबकतील, मागे फिरतील. आपापल्या शेतांना हिरवा शालू नेसवायला स्वत:च्या कपड्यांना चिखलात भिजवतील, मातीत रंगवतील आणि मगच तुम्ही-आम्ही, सगळेच होऊ ह्या हिरवाईचे सजल सबल भागीदार! आणि मग मात्र पावसाचे हे सुखदायक आगमन, आपल्या केवळ साहित्यिक, सांगितिक किंवा वैयक्तिक आवडींचा भाग न राहता आपल्या सर्वांच्याच आनंदी समृद्ध जीवनाचे आगमन ठरेल.
(पूर्व प्रसिद्ध जुलै, २०१४ ऋतुगंध मासिक)