“माणूस हसला की आपला झाला.” असं पुलंनी एका भाषणात सांगितलं होतं. हे हसू निखळ हवं, कुत्सित किंवा जहरी नसावं. मग असं निखळ हसू समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर आणायचं असेल तर ‘विनोद’ हा सगळ्यात उत्तम (पक्षी : एकमेव) पर्याय आहे. तथापि, आपल्याकडे ‘टवाळा आवडे विनोद’ ह्या म्हणींचा शब्दशः अर्थ घेऊन विनोद आणि विनोदी लेखक किंवा साहित्यिकांना, विनोदनिर्मिती करणाऱ्यांना हसण्यावारी नेण्याची सवय बऱ्याच लोकांना आहे.
आपण हसण्यासाठी ‘लाफ्टर क्लब’ जॉईन करू, पण दर्जेदार विनोदी साहित्य वाचण्याचे कष्ट घेण्याची आपली तयारी नाहीय. मराठी साहित्यात इतकी दर्जेदार विनोदीनिर्मिती झालेली आहे की, आपल्याला खळखळून हसवायला ती पुरेशी आहे, पण त्यासाठी आपली अभिरुचीची पातळी किती आहे; हेही महत्त्वाचं आहे.
मराठी साहित्यात विनोदी साहित्य म्हणलं की, राम गणेश गडकरी, दत्तू बांदेकर, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पुलं, रमेश मंत्री, शंकर पाटील, द.मा. मिरासदार, वि. आ. बुवा आदी दिग्गज लेखकांची नावं पटकन डोळ्यांसमोर येतात. ह्या सगळ्यात पुलंचं स्वतःचं असं एक खास स्थान निर्माण झालं. त्याला कारण पुलंनी निर्माण केलेला साधा-सरळ निखळ विनोद. पुलंनी मराठी विनोदाला इतक्या उच्च पातळीवर नेऊन ठेवलं की, तिथपर्यत जाणं कोणाला सहजशक्य झालं नाही आणि आताच्या काळात होतही नाहीय. आपण मराठी माणूस असल्याने आता अशा लेखकाचा गौरव कमी आणि उपमर्द जास्त करणार यांत आश्चर्य ते कोणतं?
‘पुलंचा विनोद किंवा पुलं कालबाह्य झाले आहेत का? यावर सोशल मीडियामध्ये अधेमधे वादळी चर्चा होत राहते. पुलं हयात असतानाही ही चर्चा मराठी साहित्यविश्वात खाजगीत व्हायची. प्रश्न पुलं कालबाह्य होण्याचा नाहीय तर आपली विनोदबुद्धी आणि अभिरुची बदलत; किंबहुना बिघडत चालली आहे त्याचा आहे. हल्ली त्याकाळातील मध्यमवर्गासारखी परिस्थिती आज राहिलेली नसल्याने पुलंचे विनोद कालबाह्य वाटतात अशी एक धारणा सध्या काही लोकांमध्ये, नवसाहित्यिकांमध्ये किंवा स्वयंघोषित समीक्षकांमध्ये आहे. मुळात कोणताही दर्जेदार विनोद कालबाह्य होत नाही, किंवा मानवी स्वभाव-वृत्ती-दांभिकता केंद्रस्थानी ठेऊन निर्माण केलेलं कोणतंही साहित्य कालबाह्य होत नाही. महाभारत-रामायण हे आद्य ग्रंथ घ्या किंवा संत एकनाथांचा ‘भारूड’ हा साहित्याचा विनोदी काव्यप्रकार हे सगळं आजच्या काळातही तितकंच सुसंगत वाटतं, आपण ती सुसंगती शोधत नसू तर ते आपल्याला कालबाह्य वाटणार यात त्या साहित्याचा किंवा लेखकांचा काही दोष नसतो तर आपल्या अभिरुचीमध्ये किंवा आकलनक्षमतेमध्ये झालेला बदल हे त्याचं मुख्य कारण असतं. हजारो वर्षांपूर्वी चाणक्याने लिहिलेली वचनं किंवा तत्त्वं आजही लागू होतात, नव्हे २०१४ च्या निवडणुकांत त्याचा हल्लीच्या काळाशी किती सुसंगतीने व्यावसायिक वापर करता येतो हेही आपण बघितलं आहे. त्यामुळे एखादी उत्तम साहित्यकृती कधीही कालबाह्य होत नाही हे शाश्वत सत्य आहे.
पुलंच्या ‘बटाट्याची चाळी’वरूनच पुलंना ‘मध्यमवर्गीय’ ठरवण्यात आले असण्याची शक्यता आहे, पण त्याच बटाटयाच्या चाळीतली कित्येक पात्रं आज आपल्या पॉश कॉलनी किंवा अपार्टमेंटमध्ये सर्रास आढळतात. आजही एखाद्या कॉलनीत एच्च. मंगेशराव आणि त्यांच्या गायिका पत्नी वरदाबाई यांचा रियाज ऐकू येतोच. पंतांनी वजन कमी करण्यासाठी केला ‘उपासाचा प्रयोग’ आणि त्यातून निर्माण होणारे विनोद आज आपल्यासमोर ‘डाएट’च्या माध्यमातून येतातच. ग्रुप टूरला जायचं ठरलं की त्याच्या तयारीपासून ते प्रत्यक्ष टूरमधल्या गमतीजमती आजही घडत असतात. पुलंच्या ‘असा मी असामी’ मधले कित्येक प्रसंग आज आपल्या आजूबाजूला नव्या स्वरूपात घडतच असतात. एखादा पत्ता शोधतानाची गंमत आज आपण स्वतः अनुभवतोच. बायकोमुलांना सिनेमाला घेऊन जातानाची अवस्था (आणि अनावस्था) ही ‘असामी’ मधल्या धोंडोपंतांची फ्यामिली नाटकाला जाते तेव्हाच्या अनावस्थेसारखीच असते. ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधली तर सगळी पात्रं नवीन रूपात आपल्यासमोर सतत येत असतात.
‘म्हैस’ कथेतील एसटीचा प्रवास, त्यातील गंमत आजही कित्येक लोक अनभुवत असतात. हल्लीच्या लग्नसोहळ्यांमधून एकापेक्षा चार ‘नारायण’ आपल्याला आढळून येतात. पुलंनी रंगवलेली ‘मधली आळी’ अजूनही तशीच आहे. तिथली घरं बदलली, काळ बदललेला असेल पण वृत्ती तीच असल्याने पुलंचे ते विनोद आजही संदर्भहीन वाटतच नाहीत. पुलंच्या नाटकातील विनोद तर आजही खळखळून हसवतात. ‘वाऱ्यावरची वरात’, ‘वटवट’ ही नाटकं आणि त्यातील विनोद आजच्या काळातही ताजेतवाने वाटतात. पुलंनी मराठी ग्रामीण बोलीभाषेत विनोद खूप कमी केला किंवा त्यांचं साहित्य हे ग्रामीण मराठी बोलीभाषेत नसल्याने पुलं समाजातील सर्व स्तरातील वाचकांपर्यंत पोहोचले नाहीत, हे सत्य असलं तरी ते कालबाह्य झालेत हे विधान कुठल्याही परिस्थितीत विनोदाची जाण असणाऱ्या कोणालाही पटणारं नाहीय.
हल्लीच्या लेखकांकडून दर्जेदार विनोद लिहिले जात नाहीत हे काहीअंशी खरं आहे. याबाबत पुलंनीच एकेठिकाणी गमतीने विनोदी लेखकांबद्दल सांगितलं आहे की, ”विनोदाचे दोन प्रकार आहेत. एका प्रकारामुळे आपल्याला हसू येतं व दुसऱ्या प्रकारामुळे हसू येत नाही. आता ज्या प्रकारामुळे हसू येत नाही तो अर्थातच वाईट प्रकार असुनसुद्धा लेखक असले विनोद का करतो हा मूलभूत प्रश्न आहे. पण यामागे होतंय काय, की ज्या विनोदावर हसू येत नाही त्यावेळी त्या प्रसंगाला लेखकाची खिल्ली होते. आणि त्याच वेळी वाचकाच्या मनामध्ये लेखकाच्या त्या प्रसंगावेळच्या तोंडावरच्या करुण भावना डोळ्यासमोर येतात आणि आपसूकच वाचकाच्या थोबाडावर मिश्किल हास्य येते.”
पुलंनी वरील वाक्यात अप्रत्यक्षपणे दर्जाहीन विनोद करणाऱ्यांना फटकारलं आहे. सोशल मीडियावरचे टुकार विनोद वाचल्यावर पुलंनी सांगितलेल्या दुसऱ्या प्रकारच्या विनोदाची प्रचिती येते. तात्पर्य काय तर, विनोद करताना त्याचा दर्जा सांभाळला गेला तर तो कधीच कालबाह्य होत नाही, आणि दर्जासहित तारतम्य देखील राखलं नाही तर मात्र विनोदाचं हसू होण्याची शक्यता असते. विनोदनिर्मिती करायची की, स्वतःचं हसू करून घ्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे, त्यासाठी इतरांना कालबाह्य किंवा कमी समजण्याची अज्जिबात गरज नाहीय. असो!
आपण हसण्यासाठी ‘लाफ्टर क्लब’ जॉईन करू, पण दर्जेदार विनोदी साहित्य वाचण्याचे कष्ट घेण्याची आपली तयारी नाहीय. मराठी साहित्यात इतकी दर्जेदार विनोदीनिर्मिती झालेली आहे की, आपल्याला खळखळून हसवायला ती पुरेशी आहे, पण त्यासाठी आपली अभिरुचीची पातळी किती आहे; हेही महत्त्वाचं आहे.
मराठी साहित्यात विनोदी साहित्य म्हणलं की, राम गणेश गडकरी, दत्तू बांदेकर, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पुलं, रमेश मंत्री, शंकर पाटील, द.मा. मिरासदार, वि. आ. बुवा आदी दिग्गज लेखकांची नावं पटकन डोळ्यांसमोर येतात. ह्या सगळ्यात पुलंचं स्वतःचं असं एक खास स्थान निर्माण झालं. त्याला कारण पुलंनी निर्माण केलेला साधा-सरळ निखळ विनोद. पुलंनी मराठी विनोदाला इतक्या उच्च पातळीवर नेऊन ठेवलं की, तिथपर्यत जाणं कोणाला सहजशक्य झालं नाही आणि आताच्या काळात होतही नाहीय. आपण मराठी माणूस असल्याने आता अशा लेखकाचा गौरव कमी आणि उपमर्द जास्त करणार यांत आश्चर्य ते कोणतं?
‘पुलंचा विनोद किंवा पुलं कालबाह्य झाले आहेत का? यावर सोशल मीडियामध्ये अधेमधे वादळी चर्चा होत राहते. पुलं हयात असतानाही ही चर्चा मराठी साहित्यविश्वात खाजगीत व्हायची. प्रश्न पुलं कालबाह्य होण्याचा नाहीय तर आपली विनोदबुद्धी आणि अभिरुची बदलत; किंबहुना बिघडत चालली आहे त्याचा आहे. हल्ली त्याकाळातील मध्यमवर्गासारखी परिस्थिती आज राहिलेली नसल्याने पुलंचे विनोद कालबाह्य वाटतात अशी एक धारणा सध्या काही लोकांमध्ये, नवसाहित्यिकांमध्ये किंवा स्वयंघोषित समीक्षकांमध्ये आहे. मुळात कोणताही दर्जेदार विनोद कालबाह्य होत नाही, किंवा मानवी स्वभाव-वृत्ती-दांभिकता केंद्रस्थानी ठेऊन निर्माण केलेलं कोणतंही साहित्य कालबाह्य होत नाही. महाभारत-रामायण हे आद्य ग्रंथ घ्या किंवा संत एकनाथांचा ‘भारूड’ हा साहित्याचा विनोदी काव्यप्रकार हे सगळं आजच्या काळातही तितकंच सुसंगत वाटतं, आपण ती सुसंगती शोधत नसू तर ते आपल्याला कालबाह्य वाटणार यात त्या साहित्याचा किंवा लेखकांचा काही दोष नसतो तर आपल्या अभिरुचीमध्ये किंवा आकलनक्षमतेमध्ये झालेला बदल हे त्याचं मुख्य कारण असतं. हजारो वर्षांपूर्वी चाणक्याने लिहिलेली वचनं किंवा तत्त्वं आजही लागू होतात, नव्हे २०१४ च्या निवडणुकांत त्याचा हल्लीच्या काळाशी किती सुसंगतीने व्यावसायिक वापर करता येतो हेही आपण बघितलं आहे. त्यामुळे एखादी उत्तम साहित्यकृती कधीही कालबाह्य होत नाही हे शाश्वत सत्य आहे.
पुलंच्या ‘बटाट्याची चाळी’वरूनच पुलंना ‘मध्यमवर्गीय’ ठरवण्यात आले असण्याची शक्यता आहे, पण त्याच बटाटयाच्या चाळीतली कित्येक पात्रं आज आपल्या पॉश कॉलनी किंवा अपार्टमेंटमध्ये सर्रास आढळतात. आजही एखाद्या कॉलनीत एच्च. मंगेशराव आणि त्यांच्या गायिका पत्नी वरदाबाई यांचा रियाज ऐकू येतोच. पंतांनी वजन कमी करण्यासाठी केला ‘उपासाचा प्रयोग’ आणि त्यातून निर्माण होणारे विनोद आज आपल्यासमोर ‘डाएट’च्या माध्यमातून येतातच. ग्रुप टूरला जायचं ठरलं की त्याच्या तयारीपासून ते प्रत्यक्ष टूरमधल्या गमतीजमती आजही घडत असतात. पुलंच्या ‘असा मी असामी’ मधले कित्येक प्रसंग आज आपल्या आजूबाजूला नव्या स्वरूपात घडतच असतात. एखादा पत्ता शोधतानाची गंमत आज आपण स्वतः अनुभवतोच. बायकोमुलांना सिनेमाला घेऊन जातानाची अवस्था (आणि अनावस्था) ही ‘असामी’ मधल्या धोंडोपंतांची फ्यामिली नाटकाला जाते तेव्हाच्या अनावस्थेसारखीच असते. ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधली तर सगळी पात्रं नवीन रूपात आपल्यासमोर सतत येत असतात.
‘म्हैस’ कथेतील एसटीचा प्रवास, त्यातील गंमत आजही कित्येक लोक अनभुवत असतात. हल्लीच्या लग्नसोहळ्यांमधून एकापेक्षा चार ‘नारायण’ आपल्याला आढळून येतात. पुलंनी रंगवलेली ‘मधली आळी’ अजूनही तशीच आहे. तिथली घरं बदलली, काळ बदललेला असेल पण वृत्ती तीच असल्याने पुलंचे ते विनोद आजही संदर्भहीन वाटतच नाहीत. पुलंच्या नाटकातील विनोद तर आजही खळखळून हसवतात. ‘वाऱ्यावरची वरात’, ‘वटवट’ ही नाटकं आणि त्यातील विनोद आजच्या काळातही ताजेतवाने वाटतात. पुलंनी मराठी ग्रामीण बोलीभाषेत विनोद खूप कमी केला किंवा त्यांचं साहित्य हे ग्रामीण मराठी बोलीभाषेत नसल्याने पुलं समाजातील सर्व स्तरातील वाचकांपर्यंत पोहोचले नाहीत, हे सत्य असलं तरी ते कालबाह्य झालेत हे विधान कुठल्याही परिस्थितीत विनोदाची जाण असणाऱ्या कोणालाही पटणारं नाहीय.
हल्लीच्या लेखकांकडून दर्जेदार विनोद लिहिले जात नाहीत हे काहीअंशी खरं आहे. याबाबत पुलंनीच एकेठिकाणी गमतीने विनोदी लेखकांबद्दल सांगितलं आहे की, ”विनोदाचे दोन प्रकार आहेत. एका प्रकारामुळे आपल्याला हसू येतं व दुसऱ्या प्रकारामुळे हसू येत नाही. आता ज्या प्रकारामुळे हसू येत नाही तो अर्थातच वाईट प्रकार असुनसुद्धा लेखक असले विनोद का करतो हा मूलभूत प्रश्न आहे. पण यामागे होतंय काय, की ज्या विनोदावर हसू येत नाही त्यावेळी त्या प्रसंगाला लेखकाची खिल्ली होते. आणि त्याच वेळी वाचकाच्या मनामध्ये लेखकाच्या त्या प्रसंगावेळच्या तोंडावरच्या करुण भावना डोळ्यासमोर येतात आणि आपसूकच वाचकाच्या थोबाडावर मिश्किल हास्य येते.”
पुलंनी वरील वाक्यात अप्रत्यक्षपणे दर्जाहीन विनोद करणाऱ्यांना फटकारलं आहे. सोशल मीडियावरचे टुकार विनोद वाचल्यावर पुलंनी सांगितलेल्या दुसऱ्या प्रकारच्या विनोदाची प्रचिती येते. तात्पर्य काय तर, विनोद करताना त्याचा दर्जा सांभाळला गेला तर तो कधीच कालबाह्य होत नाही, आणि दर्जासहित तारतम्य देखील राखलं नाही तर मात्र विनोदाचं हसू होण्याची शक्यता असते. विनोदनिर्मिती करायची की, स्वतःचं हसू करून घ्यायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे, त्यासाठी इतरांना कालबाह्य किंवा कमी समजण्याची अज्जिबात गरज नाहीय. असो!