जगात अन्य कोणत्याही देशात झाली नाही, अशी मानसिकता आपण पेहरावांच्या बाबतीत स्वीकारली आहे. विचारांनी आधुनिक झालेला माणूस पाश्चात्य कपड्यांत वावरतो तर अडाणी पारंपरिक वेषात. पण टीव्ही, सिनेमा आणि इथल्या इंडस्ट्रीने हा विचार बदलायला भाग पाडलंय. त्यामुळे आज पुन्हा एकदा देसी पेहराव लेटेस्ट ट्रेंड झालाय..
‘पक्का इंडियन है…’ अशी जाहिरात करण्याची गरज एका परदेशी कंपनीला आपला माल खपवण्यासाठी का करावी लागते… याचा विचार केलाय का? आज भारतीय म्हणून आपली काही वैशिष्ट्ये आपण ठामपणे ठसवतो. त्यात आम्ही इंग्रजी बोलत असलो, काट्या-चमच्यांनी जेवत असलो तरी मनाने भारतीय आहोत, असं सांगण्याची एकही संधी आपण सोडत नाही. रोजचा पेहराव मात्र पाश्चात्यांचा स्वीकारलाय, यावर ही चर्चा उतरते, तेव्हाही आपल्याकडे एक बहाणा असतोच. आठवड्यातले चार दिवस फॉर्मल्स, विकेंडला जीन्स-टी शर्ट वापरतो. पण सण, घरगुती कार्यक्रम असले की भारतीय माणूस आपल्या पारंपरिक कपड्यांकडे वळतो. आधुनिक राहणीमान झाले म्हणून पाश्चात्यांचा वेष धारण केला तरी पुन्हा एकदा पारंपरिक पेहरावाला झुकते माप देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ह्या निमित्ताने पारंपरिक पेहराव, पाश्चात्यांचं अनुकरण पुन्हा एकदा पारंपरिकतेच्या नव्या रूपाकडे आपण वळतो आहोत.
भारतातील अन्य क्षेत्रांप्रमाणे फॅशन इंडस्ट्रीची सुरुवात झाली ती 1990 पासून. तोवर जगभरातील फॅशन इंडस्ट्री परिपक्वतेला पोहोचली होती. त्यामुळेच सुरुवातीला तिथल्या कपड्यांची थेट उचल करण्याची मानसिकता भारतीय डिझायर्न्समध्ये होती. खरं तर भारतीयांचे पारंपरिक कपडे आहेत साडी, घागरा-चोळी आणि पुरुषांसाठी धोती. पाश्चात्यांच्या कपड्यांचं अनुकरण करताना आपण पँट, शर्ट, स्कर्ट ह्या कपड्यांना मॉडर्न लाइफस्टाइलच्या नावाखाली स्वीकारलं. म्हणजे कपड्यांचा संबंध थेट आपल्या सुशिक्षित असण्याशी जोडला गेला. त्यामुळे आपले पारंपरिक कपडे वापरणं म्हणजे खेडवळ आणि अडाणी असणं आणि पाश्चात्य पेहराव म्हणजे विचारांनी आधुनिक, सुशिक्षित आणि श्रीमंतीचं लक्षण मानलं जाऊ लागलं.
भारतात फॅशन ही गोष्ट ठरविणारी इंडस्ट्री नव्वदच्या दशकापर्यंत अस्तित्वातच नव्हती त्यामुळे फॅशन ही गोष्ट केवळ श्रीमंत, आधुनिक विचारांच्या लोकांसाठी आहे असा समज तोवर दृढ होत गेला. आजही बहुतांश भारतीयांचं विचारणं असतं की फॅशन शोमधले कपडे लोक खरंच घालतात का? भारतात फॅशनकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा असा आहे त्यामुळे फॅशन इंडस्ट्रीची मूळ रूजण्यास जरा वेळ लागला.
जगभरात जेव्हा फॅशन इंडस्ट्रीत बदलाची आवर्तने सुरू झाली तेव्हा पॅरिस हे फॅशनचं केंद्र न राहता इटलीतील मिलान झालं तेव्हा इटालियन डिझायनर्सनी आपल्याकडे आलेली संधी आव्हान म्हणून स्वीकारली. त्यातूनच त्यांनी पारंपरिक कपड्यांना नव्याने सादर केलं. हा प्रयोग इतका लोकप्रिय झाला की जगभरात जिथे जिथे फॅशन इंडस्ट्रीने पाय रोवले तिथे तिथे हा ट्रेंड रूजला.
भारतात रितू कुमारसारख्या डिझायनरने कोलकात्याला हँडब्लॉक डिझाइन्सने कपडे सजवले. मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्ससारख्या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमध्ये आपल्या स्पर्धकांना पारंपरिक डिझाइन्स आणि घागरा-चोलीसारख्या कपड्यांमध्ये सादर केले. त्यामुळेच आपल्या पारंपरिक कपड्यांना पुन्हा एकदा आपल्या वॉर्डरोबमध्ये स्थान मिळालं. अर्थात, हा बदल स्वीकारण्यासाठी भारतीयांना तब्बल दहा-वीस वर्षांचा कालावधी जावा लागला. त्याला अडथळा झाला तो फॅशन इंडस्ट्री ही काही मूठभर लोकांपुरती मर्यादित असण्याचा. सुदैवाने भारतीय सिनेमा लोकांना आपला पेहराव कसा असावा, याचं मार्गदर्शन करत राहिला. आता ती जागा टीव्ही इंडस्ट्रीने घेतली आहे.
भारतीयांनी सिनेमाला आपलं मनोरंजनाचं माध्यम मानून स्वीकारल्यानंतर आपण फॅशन कशी असावी यासाठी त्यातल्या कलाकारांना फॅशन गुरू मानलंय. त्यामुळेच राजेश खन्नाचा गुरूशर्ट, देव आनंद यांचे मोठ्या कॉलरचे शर्ट, सायराबानोच्या फ्लोरल प्रिंट साड्या, आशा पारेखचे चुडीदार, साधनाचे ब्लाऊज, नंदा, मुमताजच्या साड्या नेसण्याच्या ग्लॅमरस पद्धती आपण स्वीकारल्या त्या फॅशन म्हणूनच. ‘जयपूर की चोली मंगवा दे रे सय्या, आगरे का घागरा…’ अशा गाण्यांच्या ओळींतून. कपडे तयार होण्याची खास ठिकाणं गाजत राहिली, तर आजही ‘घागरा तेरा…’ म्हणताना आगरा हेच शहर त्यासाठी लोकप्रिय असल्याचं ठसवलं जातं. दीपिका पडुकोण, करिना कपूर किंवा सलमान खान
हेच आपले फॅशन गुरू ठरतात.
ब्लॅक अॅण्ड व्हाइट सिनेमांपासून ते रंगीत सिनेमापर्यंतचा काळ हा फॅशन ठरविण्याचा होता. पुढच्या काळात तर सिनेमातून फॅशन थेट रस्त्यावर येऊ लागली. यशराजच्या सिनेमातून शिफॉनच्या अंगदिखाऊ साड्या वापरणं हे चारचौघींमध्ये ग्लॅमरस ठरू लागलं. अगदी संपूर्ण पांढरा चुडीदार घालून एखादी मुलगी निघाली की तिला आजही एकदम चांदणी बनून आलीयस, असा शेरा हमखास ऐकायला मिळतोच. तोवर सिनेमातली फॅशन पाहून कपडे शिवण्यासाठी टेलरकडे तगादा लागलेला असायचा. टेलरला कपडे शिवण्याआधी सिनेमा पाहून रेखाच्या नव्या सिनेमातल्या ब्लाऊजची फॅशन कशी ते लक्षात ठेवावं लागायचं. मग सिनेमावाल्यांनी आपल्याच सिनेमाचे कपडे बाजारात उतरवायला सुरुवात केली. ‘मैने प्यार किया…’ सिनेमात भाग्यश्रीने वापरलेले एकूण एक ड्रेस मुंबईच्या फॅशन स्ट्रीटपासून ते नगरच्या गल्लीपर्यंत मिळायला लागले. तेव्हापासून टेलरचा भाव घसरला तो पुढे ड्रेस डिझायनर हा शब्द अस्तित्वात येईपर्यंत.
हिंदी सिनेमात ऑस्करविजेत्या भानु अथय्यांनी पारंपरिक कपड्यांना एक नवं रूप दिलं. ‘साहब बीवी और गुलाम’, ‘आम्रपाली’ यासारख्या सिनेमांतून पारंपरिक पेहरावाचं ग्लॅमरस रूप दिसलं. पुढे हेच रूप वेगवेगळ्या ट्रेंडमध्ये झिरपत राहिलं. मधुबालाच्या ‘मुगल ए आझम’मधल्या चुडीदार-अनारकली, ‘हम आपके कौन’मधल्या माधुरी दीक्षितच्या जांभळ्या साडीतून किंवा विद्या बालनच्या ‘परिणीता’ सिनेमातल्या ब्लाऊजमधून. हे कपडे लोकप्रिय करण्यात जेवढा डिझायनरचा वाटा आहे तितकाच आपल्या पारंपरिक पेहरावांचाही.
अबु जानी-संदीप खोसला यांनी अनारकली स्टाइलचे चुडीदार लोकप्रिय केले. पण हे चुडीदार ‘पाकिझा’ सिनेमातल्या मीना कुमारीच्या कपड्यांचं आणि बॉलरूम गाऊनचं अफलातून कॉम्बिनेशन आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. सुनीत वर्माने फ्रेंच महिला वापरत असलेले कोर्सेट आणि भारतीय चोळी यांची सांगड घालत तयार केलेले स्ट्रेचेबल कपड्यांचे ब्लाऊज आपल्याला नवी फॅशन वाटते. साधुमंडळी वापरत असलेले ओम नमो शिवाय लिहिलेले कपडे मनीष अरोरा कुर्ता स्टाइलमध्ये प्रेझेंट करतो तेव्हा आपण त्याला ट्रेंडी म्हणतो. मनीष मल्होत्राने शिफॉनच्या पेस्टल कलर साड्या, नेट किंवा सॅटीनच्या साड्यांना कॉकटेल साडी म्हणून प्रेझेंट केल्यानंतर एरव्ही साडी नेसून वावरणं जमत नाही म्हणत नाक मुरडणार्या तरुण मुलीही हरखून जातात.
मागील दशकात असलेल्या पाश्चात्य कपड्यांच्या प्रभावातून पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक कपड्यांकडे सिनेमा वळला त्याचं प्रमुख कारण ठरलं ते परदेशस्थ भारतीय. या एनआरआयना आवडतील असे सिनेमे बनवताना त्यांना आपल्या देशाशी जोडण्यासाठी पेहराव हे कारण ठरलं. परदेशात राहिल्याप्रमाणेच जर कथानकातल्या भारतीयांचे कपडे दिसले तर त्यांना कनेक्ट करणं कठीण होणार हे जाणून खास भारतीय पोशाखांना स्थान दिलं. म्हणूनच परदेशात राहणारा ‘कभी खुशी कभी गम’ मधला शाहरूख खान करवा चौथसाठी शेरवानी घालून नाचला. करिनाला मनानेही भारतीय झालीय हे दाखविण्यासाठी साडी नेसणं गरजेचं झालं. ‘दोस्ताना’त अख्ख्या सिनेमाभर वेस्टर्न पेहरावात वावरलेली प्रियंका देसी गर्ल आहे, हे ठसविण्यासाठी तिची एकमेव चंदेरी साडी प्रभावी ठरली.
सत्तरीच्या दशकात पाश्चात्यांच्या प्रभावामुळे भडक रंगाचे, विशिष्ट प्रकारचे कपडे वापरण्याचा ट्रेंड भारतातही आला. भारतीय सिनेमात नेमका हाच काळ भरभराटीचा होता त्यामुळे हा लूक ज्याला रेट्रो लूक म्हटलं जातो त्याची हजारो रूपं पडद्यावर वेगवेगळ्या कलावंतांच्या माध्यमातून लोकांना पहायला मिळाली. आता हीच रूपं पडद्यावर पुन्हा येण्याचं कारण ठरलं की आता देसी कन्सेप्ट लोकप्रिय होण्यात.
चोलीस्टाइल ब्लाऊज, अनारकली, शरारा, पुरूषांमध्येही कुर्ता, धोतीस्टाइल अशा फॅशन त्याच भाषेत सांगायचं तर इन ठरल्या आहेत. ‘ओम शांती ओम’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘लुटेरा’, ‘अक्शन रिप्ले’, यासारख्या सिनेमांमुळे रेट्रो लूक पुन्हा एकदा पडद्यावर आला आहे. हे देखील पारंपरिक कपड्यांची मागणी वाढण्यास कारणीभूत आहेतच. बॉबी सिनेमातल्या डिम्पलप्रमाणे कपडे घालणारी प्राची शहा किंवा पोल्का डॉट साडी नेसलेली ऐश्वर्या राय आजच्या पिढीला लगेच आकर्षित करते. रेखा वर्षोनुवर्षे फिल्मफेअर किंवा अन्य अॅवॉर्ड सोहळ्यांना कांजीवरम साडी नेसून येते. आज विद्या बालनही तेच करते त्यामुळेच अशा साड्यांना आपल्या वॉर्डरोबमध्ये स्थान मिळू लागलं आहे.
पुरुषांच्याबाबतीतही पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम असलेली फॅशन स्वीकारली जातेय तरीही त्याचं इन्स्पिरेशन हे बॉलिवूडच आहे. मोठ्या कॉलरचे शर्ट, कुर्ते, शेरवानी असे कपडे फॉर्मल इतकेच महत्त्वाचे झाले आहेत. अगदी अलीकडेच कलरफुल जीन्सचा पुन्हा एकदा जमाना आला आहे. लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाच्या जीन्स वापरण्याचा सत्तरीतला ट्रेंड पुन्हा एकदा अनुभवता येत आहे. शिवाय सलमान खानमुळे गमचाचं आधुनिक रूप स्कार्फ तुम्ही फॅशनेबल आहात हे लेबल लावणारं ठरलं आहे. बेलबॉटम्स हे लेटेस्ट इन फॅशन ठरले आहेत.
भारतीय टीव्ही इंडस्ट्रीही ह्या सगळ्याला हातभार लावते आहेच. जाहिरातीत आपण आधुनिक झालो आहोत. जाहिरातीतल्या आईचा पेहराव आता चुडीदारवरून जीन्स-टी शर्ट, स्कर्ट्स आला आहे. मात्र, सिरीयलमध्ये ती परंपरावादीच आहे. मग ती बा, अम्मा असो नाही तर आई. मराठीतली आई, आजी नववारीत, राजस्थानी आई कपाळावर टीका हा दागिना ल्यायलेली असते. सूना कितीही आधुनिक असल्या तरी त्या पारंपरिक वेशातच. त्यांच्या साड्या ह्या आजच्या तरुणींना आकर्षित करणार्या आहेत. त्या मालिकांमधले पुरूषही पारंपरिक वेषात जास्त करून दिसतात. त्यामुळेच हा प्रभाव थेट आपल्या पेहरावावर दिसून येऊ लागला. टीव्ही, सिनेमा हे निमित्त झालं असलं तरी आपला पेहराव पुन्हा एकदा पारंपरिकतेच्या वळणावर येऊन ठेपला आहे. कामाच्या ठिकाणी गरज म्हणून ट्राऊझर-शर्ट घालणार्या अनेक तरुणींना विचारा की साडी नेसणं त्यांना किती आवडतं, त्या प्रत्येकीला तो दिवस किती आनंदाचा असतो. ट्रेडशिनल डेच्या नावाखाली असे वर्षाला किमान बारा दिवस नटणारे स्त्री-पुरूष पाहिलं की पेहरावातलं एक वर्तुळ पूर्ण झाल्याचं समाधान मिळतं.
आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका…
भारतातल्या प्रत्येक राज्यात कपड्यांचा एक तरी प्रकार लोकप्रिय असतो. महाराष्ट्रात पैठणी, राजस्थानात बांधणी, दक्षिणेत कांजीवरम, मध्य प्रदेशात इंदुरी, उत्तर प्रदेशात लखनवी याशिवाय बनारसी, पटोला, इक्कत अशा असंख्य कपड्यांना ड्रेस डिझायनर्सने संजीवनी दिली आहे. शिवाय कपड्यांवरील भरतकामांना नाव आणि सन्मान मिळवून दिला आहे. त्यामुळे जरदोसी, लखनवी, कळीदार, शीशावर्क, अशा पारंपरिक कामांना पुन्हा एकदा वैभव मिळालं आहे. काही दिग्दर्शक आणि डिझायनर अशा पारंपरिक पेहराव, भरतकामांना सत्तर एमएमच्या पडद्यावर पेश करत पुन्हा एकदा भारतीयांना भुरळ पाडायला भाग पाडत आहेत. मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी जेव्हा पहिल्यांदा भारतीय स्पर्धक भारतीय पेहरावात दिसली त्याचं श्रेय रितू कुमार यांना जातं. आज हा पेहराव परदेशात प्रचंड लोकप्रिय झालाय. मनीष मल्होत्राने केवळ काळ्या-पांढर्या रंगांत अकडलेल्या परदेशी फॅशन डिझायनर्सनांही चटकदार रंग वापरण्यास भाग पाडलं आहे, तर अबु-जानी यांचे लखनवी डिझाइन्स ऑस्करच्या रेड कार्पेटवर लक्ष्यवेधी ठरले.
अपर्णा पाटील
1 Comment
We’re a group of volunteers and opening a brand new scheme in our community.
Your site offered us with useful information to work on. You have performed an impressive
process and our whole group will likely be thankful to you. http://idmfreedownload.org/