आजकाल अगदी दहावी झालेल्या मुलामुलींनासुद्धा प्रतिष्ठित नोकरी हवी असते. शिकलीसवरलेली मुलं छोटामोठा स्वयंरोजगार करायला तयार नसतात. एकीकडे आपण सर्वजणच कमीअधिक प्रमाणात परप्रांतीयांच्या नावाने ठणाणा करत असतो. पण आपणच ह्या सर्वाला करणीभूत आहोत, आपणच लहानमोठे व्यवसाय करायला तयार नसतो, हे वास्तव आहे. ह्या सर्वाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुजाता कृष्णा कामटे ह्या तरुणीने धाडसी पाऊल उचलले आहे आणि समाजासमोर एक आदर्श ठेवलेला आहे.
सर्वसामान्य मराठमोळ्या परिवारात जन्मलेल्या सुजाताला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुजाताने शेअर बाजारातील एका कंपनीत नोकरी पत्करली. शेअर बाजारातील नोकरी भलेही खासगी कंपनीतील का असेना; पण प्रतिष्ठितच म्हणायला हवी. सिद्धिविनायक मंदिराजवळच्या प्रभादेवी इंडस्ट्रीजच्या रस्त्यालगत वडील कृष्णा कामटे ह्यांचे उसाच्या रसाचे छोटेखानी दुकान. ह्या सर्वाचा घरगाडा चालण्यासाठी हातभार लागत होता. सर्वंकाही सुरळीत सुरू असतांना मात्र ह्या कुटुंबावर नियतीने आघात केला. सुजाताचे वडील कृष्णा कामटे ह्यांचे आजारपण सुरू झाले. त्यांना कर्करोग असल्याचे निदान झाले आणि ह्या कुटुंबाच्या परीक्षेचा काळ सुरू झाला. घरखर्च, वडिलांचे उपचार, त्यांची सुश्रुषा ह्या सर्वाची वाढीव जबाबदारी ह्या तरूण मुलीवर आली. मात्र ती जरासुद्धा डगमगली नाही!प्राप्त परिस्थितीला हिंमतीने सामोरी जात राहिली. पण कर्करोगासारख्या गंभीर आजाराने तिच्या वडिलांना पराभूत केले, त्यांचे निधन झाले. घरातला कर्ता पुरुष गेला. आधाराचा भक्कम खांब कोसळला. ह्या हादऱ्यातून मन कठोर करून सुजाताने निर्णय घेतला तो नोकरी सोडण्याचा! आपल्या लाडक्या वडिलांचे उसाच्या रसाचे दुकान बंद ठेवणे तिच्या मनाला पटत नव्हते. मराठी माणसाने छोटामोठा का होईना; पण स्वतःचा व्यवसाय करायला हवा, ही त्यांची शिकवण होती. सुजाताने ह्या शिकवणुकीच्या मार्गाने जायचे ठरवले आणि वडिलांचे बाराव्या दिवसाचे विधी पूर्ण करून तिने उसाच्या रसाच्या यंत्राचा खटका दाबला. वडिलांचे हे दुकान पुन्हा सुरू झाले. खरे पाहता, हे काम काही सोप्पे नाही. त्याला मेहनत लागते. सुजाता सांगते की, ‘वडिलांना हे काम करतांना जवळून पाहिले होते. त्यामुळे आपण हे करू शकू; हा विश्वास होता. प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाही; हे वडिलांनी मनावर बिंबवले होते. सुरुवातीला थोडे कठीण गेले, पण आता अंगवळणी पडले आहे.’
ह्या धाडसी निर्णयाला तिच्या घरच्यांनी, मित्रमैत्रिणींनी, शेजाऱ्यांनी पाठबळ दिल्याचे ती आवर्जून नमूद करते. ‘लोक काय म्हणतील, हा विचार सर्वत्र करून उपयोगाचा नाही. ‘सुजाता नम्रपणे सांगते, ‘न्यूनगंड आणि अहंगंड मनातून काढून टाकून आजच्या तरुणवर्गाने व्यवसायाचे वेगवेगळे मार्ग चोखाळून पाहायला हवेत. ह्यातून आपली बलस्थाने आपल्याला सापड़तात आणि स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग गवसतो.’
खरोखरच सुजाताचे हे विचार आचरणात आणून पाहायला हवेत. परिस्थितीच्या फटक्यांनी खचून न जाता एक मुलगी वेगळ्या क्षितिजाकडे झेप घेतेय, हे नक्कीच स्पृहणीय आणि अनुकरणीय आहे.
(लेखक मुक्त पत्रकार म्हणून आणि सारस्वत बँकेत रोखपाल म्हणून कार्यरत आहेत.)