वेगवेगळी तिखट गोड सारणे पोटात मिरवणारा असा हा मोदक भारी, नैवेद्य म्हणून अर्पण केलेला हा मोदक प्रसाद म्हणून श्रद्धेने आणि आवडीने पोटात भरणारे लहान-थोर भक्तही भारी आणि मोदकांच्या बरोबरीनेच भक्तांचे अपराधही पोटात सामावून घेणारा श्रीगणेश-सगळेच लय भारी!
एक छान खाऊ ह्या स्वरूपात मोदकाशी ओळख झाली. दुसरी, तिसरीत असताना आणि थोडे मोठे झाल्यावर म्हणजे पाचवी सहावीत असताना श्री गणेश आणि मोदक ह्यांचे अतूट नाते लक्षात आले. आम्ही तेव्हा गिरणगावात राहायला होतो. तिथल्या पंधरा-सोळा इमारतींच्या आमच्या वसाहतीत अकरा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव अगदी दणक्यात साजरा होत असे. जुनी आणि नवी वसाहत असे दोन अलिखित तट तिथे होते पण उत्सव मात्र एकच व्हायचा आणि सार्वजनिक असला तरी धामधूम मात्र घरच्या गणपतीसारखीच प्रेमाची, अगत्याची, एकोप्याची असायची. मराठी भक्तगणांबरोबरच इतर भाषिकही तेवढ्याच उत्साहाने सगळ्या कामांमध्ये भाग घ्यायचे.
सुशोभन, प्रसाद आणि नैवेद्याचे काम अर्थाच महिलावर्गाकडे असायचे. मुले सगळ्याच कामांमध्ये आपापल्या पालकांसोबत असायची. प्रसादात विविधता असायची. म्हणजे कधी खिरापत, कधी गुळ-शेंगदाणे, कधी साखरफुटाणे, कधी देवासमोर ठेवण्यात येणार्या फळांचे तुकडे असे आलटून पालटून असे. पेढे मात्र कधी नसायचे कारण पंधरा इमारतीतल्या, किमान पंधराशे चिमुकल्या हातांवर (शिवाय हे हात एकदा प्रसाद घेऊन थांबत नसत) पेढा टेकवणे ही बाब चाळीस वर्षांपूर्वी गिरणगावात परवडणारी नव्हती.
नैवेद्यातले मानाचं स्थान अर्थात मोदकाचे असायचे. एक ते अकरा असे सगळे दिवस मोदक एके मोदकच! त्याची चव, आकार, क्वचित रंगरूप ह्यात फरक पडायचा. संख्याही कधीकधी बदलायची म्हणजे एखाद्या चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या घरून ताट आले तर पाचच मोदक असायचे. तेच अधिकार्यांच्या घरचे असले तर अकरा, एकवीस अशी वाढती संख्या असायची. मात्र हे सगळे मोदक उकडीचे असायचे.
ह्यात वेगळेपण असायचे ते पहिल्याच दिवशी देवासमोर ठेवण्यात येणार्या एक हजार एकशे एकवीस मोदकांचे! हा खर्या अर्थाने ‘सार्वजनिक’ प्रसाद असे. अगदी त्या अकरा दिवसांतून दोन-तीन वेळा होणारा जंगी सोहळाच जणू! संख्या मोठी असली तरी मोदक आकाराने छोटा असायचा. नेमका आकार सांगायचा तर सध्याच्या एक रूपयाच्या नव्या नाण्याइतका. गणेश चतुर्थीच्या किमान दहा दिवस आधीपासूनच बैठका, चर्चा होऊन योजना तयार व्हायची. महिला मंडळातील पाच-सहा जणी प्रमुख (त्यांचे हे ‘प्रमुखपण’ दरवर्षी ठरलेले आणि सर्वमान्य असे) कार्यकर्त्या असत. यांच्याच मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे (इतक्याजणी असूनही कोणताही वाद न होता हे विशेष) हा जंगी कार्यक्रम पार पडे.
गणेशाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी, तळमजल्यावर राहणार्या भगिनीकडे सगळ्याजणी आळीपाळीने आपापल्या आयुधांसह (पोळपाट-लाटणे) जमा होत. आपापल्या घरची कामे उरकून झालेली असल्यामुळे, यजमान भगिनी प्रथम त्यांना चहा नामे ऊर्जा-पेय (मराठीत एनर्जी ड्रिंक) देत असे. गप्पांच्या सोबतीने चहापान होई आणि नव्या जोमाने कामाला सुरुवात होई.
दोघीजणी मोठी चपाती लाटून, अगदी छोट्या वाटीने छोट्या पार्या तयार करत. सगळे मोदक एकाच आकाराचे होण्यासाठी वाटीचा आकार ठरलेला असे. पोळपाटावरून ह्या पार्या पाटावर किंवा तबक (ट्रे) अथवा ताटाच्या मागच्या बाजूवर ओळीने ठेवल्या जात. मग त्यांचा ताबा पुढच्या दोघी घेत. त्या दोघी मग छोट्याशा चमच्याने त्यावर सारण ठेवीत. (ह्या चमच्याचा आकारही ठरलेला असे) ह्या सगळ्यांमध्ये एक-दोन आज्याही असत. त्यांच्याकडून सूचना येत असे. ‘गच्च भरा ग सारण, नाहीतर खुळखुळे हणून पोरांना खेळायला द्यायला लागतील.’
नंतरचे काम हलक्या हाताने, नाजुकपणे करण्यासारखे असे. म्हणजे पारी चिमटीत पकडून सात-आठ पाकळ्या करायच्या आणि त्या पाकळ्यांचा मिळून एक देठ करायचा, की झाला ‘सुबक ठेंगणा’ मोदक तयार! अगदी शेवटचे काम मोदक तळण्याचे असे. ते पुढच्या दोघी पार पाडीत. मंद आचेवर मोदक तळण्याचे हे कामही तितकेच महत्त्वाचे असे. कारण मोदक कच्चाही रहायला नको आणि करपायलाही नको. तळण्यासाठी कढईत सोडलेले हे मोदक आठवले की ‘एका तळयात होती बदके पिले सुरेख’ ही ओळ हमखास आठवते.
हा ‘मोदक-डे’ अकरा दिवसांतून पुन्हा एक-दोनदा पार पडे. तोही त्याच उत्साहात, त्याच शिस्तीत. मात्र त्यावेळी, पहिल्या वेळेसारखी विशिष्ट संख्या नसे, पण ती कमीही नसे. घराघरातून आळीपाळीने येणारे उकडीचे मोदक हे बाप्पाच्या नैवेद्याच्या ताटात असत, तर हे तळलेले मोदक प्रसाद म्हणून त्याच्या भेटीसाठी येणार्या भक्तांच्या हातात देण्यासाठी असत.
उकडीचा पहिल्या दिवशी बनणारा मोदक ही तीन-चार दिवस टिकणारी गोष्ट नव्हे. त्याच्यामध्ये अंतर्बाह्य बदल होतो. म्हणजे बाहेरून कडकपणा येतो तर ओलसरपणामुळे आतले सारण खराब होऊ शकते. म्हणूनच मोदकही तळलेला आणि आतले सारणही, रंग न बदलता भाजलेला सुक्या खोबर्याचा कीस आणि पिठीसाखर ह्याचे, असा पर्याय निवडण्यात आला असावा.
ह्या दोन्ही प्रकारच्या मोदकांमध्ये, आत-बाहेरून असलेला एक मजेशीर विरोधाभास सहजच लक्षात आला. गौरवर्णी उकडीच्या मोदकात गूळ-खोबर्यांचे सावळ्या वर्णाचे सारण, तर तळणीच्या सावळ्या वर्णाच्या मोदकात सुके खोबरे आणि पिठीसाखर ह्याचे गौरवर्णी सारण. उकडीच्या मोदकाचा बाह्य मऊ ओलसरपणा त्याच्या सारणातही कायम, तर तळलेला मोदक बाहेरूनही काहीसा कोरडा आणि आतले सारणही कोरडेच. ही सुद्धा ह्या दोघांतली गंमतच म्हणायला हवी!
अशा ह्या चिमुकल्या मोदकाच्या प्रसादासाठी पुढे होणार्या चिमुकल्याच हातांची गर्दी आजही आठवते. ह्या गर्दीत आमचे काही ठरावीक हात नसायचे. कारण आमच्या आया-मावश्यांच्या ‘मोदक-डे’ मध्ये लुडबुड करण्याची पदोन्नती आम्हाला मिळाली तेव्हाच बक्षीस म्हणून एक-एक मोदक मिळण्याचा मानही मिळाला होता.
मला-मला असा कल्ला करणारे हे हात प्रसाद वाटणार्याला अगदी भंडावून सोडत असत. मग मंडपातले काही स्वयंसेवक, त्या वाटणार्याच्या मदतीला येऊन त्या हातांना रांग करायला लावत. रांगेत शेवटी शेवटी असणार्या हातांना मोदक मिळेल की नाही ही चिंता असे. पण ‘एक हात एक मोदक’ हे तत्त्व, वाटणारा सांभाळत असे. मग प्रत्येक हातावर मोदक आणि चेहेर्यावर तो मिळवल्याचा आनंद हे समीकरण जुळत असे.
अशा ह्या मोदकांची उत्पत्ती कशी झाली असेल? सारण पोटात भरलेला मोदक ही कल्पनेची आयडिया कोणाच्या डोक्यातून बाहेर आली असेल? गणेशाची ही आवड सर्वज्ञात कशी झाली असेल? मोदकाला असलेल्या अनेक पाकळ्यांप्रमाणेच ह्या प्रश्न पाकळ्यांनी डोक्यात गर्दी केली. बुद्धीला हीच चालना दिल्यावर, बुद्धी-दात्याच्या ह्या आवडीबद्दल एक भावुक विचार मनात आला. आपल्या पूर्वजांचा एक प्रघात होता. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत हसतमुखाने करायचे आणि त्याने आसन ग्रहण केल्यावर त्याला प्रथम गूळ-पाणी द्यायचे. ‘अतिथी देवो भव’ ह्या न्यायाने पाहुणा देवस्थानी असे. श्रीगणेशालाही आपण पाहुणा म्हणूनच संबोधतो. पण सामान्य पाहुणा आणि हा पाहुणा ह्यात फरक आहे. वर्षातून एकदाच येणारा हा राजेशाही पाहुणा ‘देवानां देव’ असताना फक्त गुळाच्या खड्यावर त्याची बोळवण कशी करणार? मग श्रीफळ यानेके नारळ (ह्याच्या नावातच त्याची नाळ श्रीशी जोडलीय) ह्याला गुळाच्या सोबत घेतले गेले. शुभ्र खोबरे आणि सावळ्या गुळाचा सुंदर मिलाफ करण्यात आला. मंद आचेवर, गुळाच्या गोडव्यात खोबर्यानेही आपली स्निग्धता मिसळली. स्वाद वाढवण्यासाठी वेलदोडा-जायफळ ह्यांची मदत घेण्यात आली तर पौष्टिकता वाढावी म्हणून काजू-बेदाणे-चारोळी ह्या सुक्या फळांची साथ घेतली गेली. असा हा ‘सप्तगणी’माल-मसाला उकडीच्या गोर्यापान किंवा तळणीच्या सावळ्या पारीत गच्च भरून दर्शनाने डोळे आणि सुगंधाने नाक, एकाचवेळी धन्य करीत, बाप्पाला ऑफर करून नंतर भक्तांच्या पोटात जाण्यासाठी मोदक सिद्ध झाला.
गूळ-खोबरे-तांदळाचे पीठ (तळलेला असेल तर गव्हाचे पीठ) असा त्रिवेणी संगम ही महाराष्ट्रीय खासियत! मात्र केरळीय कुटुंबाशी विवाह संबंध जुळल्यानंतर हाच त्रिवेणी संगम त्यांच्याही घरात मिष्टान्न म्हणून असतो असे लक्षात आले. त्याचे नाव आहे ‘अडा’. केळीच्या पानात, तांदळाच्या उकडलेल्या पिठाची पारी हातानेच थापून, त्यात शिजवलेले गूळ-खोबरे घालून त्या पानाची घडी घालतात आणि चाळणीवर ठेऊन उकडून घेतात की ‘अडा’ तयार! आपल्या हळदीच्या पानात केल्या जाणार्या पातोळ्या/ पानगी ‘ह्यासम हाच’ असा पदार्थ हाच. सगळा ऐवज वापरून ते कधीकधी गोल मुटकेही करतात. ‘अडा’ हा पदार्थ ते खासकरून श्रावण अमावस्या (आपली पिठोरी अमावस्या उर्फ मातृदिन) आणि दिवाळीत करतात. तमिळ लोकही त्यांच्या ‘पोंगल’ ह्या सणाला हीच सामग्री वापरून मिष्टान्न बनवतात.
पौराणिक ग्रंथ संपदा किंवां दंतकथांमध्ये नैवेद्यस्वरूपी मोदकाचा उल्लेख विशेषत्त्वाने आढळत नाही. काही अभ्यासकांच्या मते, साधारणत: आठव्या शतकात श्रीगणेशाचे स्थान ‘देव’ ह्या संकल्पनेत आढळल्यानंतर, त्याच शतकातील शिल्पांपैकी वेरूळ लेण्यातील शिल्पांच्या हातात मोदकसदृश मिष्टान्नासाठीचे वाडग्यासारखे पात्र बघायला मिळते, तर काही ठिकाणी लाडूही आढळतो. तसेच ‘नाना परिमळ दुर्वा…’ ह्या श्रीगणेशाच्या आरतीत ‘लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे’ ही ओळ येते तेव्हा मोदक भरलेले ताट नजरेसमोर येतेच आणि मोदकांचे गणेशाशी असलेले नातेही अधिक स्पष्ट होते.
आपल्या धर्मशास्त्राचा आधार घ्यायचा झाला तर फार प्राचीन काळी ‘पृथ्वी, आप तसे तेज, वायु, आकाश पाचवे’ ह्या एका श्लोकाच्या पूर्वार्धानुसार पृथ्वी हे जमिनीचे प्रतीक म्हणजेच भूमाता, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू म्हणजे वारा, आणि आकाश ही पंचमहाभूते देवतास्वरूप मानली जात. ह्या पंचमहाभूतांनीच ह्या विश्वाचा पसारा बनलेला आहे. ह्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणूनच आपल्या पूर्वजांनी त्यांना पूजनीय मानले असावे. ह्या सर्व देवतांना अर्ध्य किंवा आहुति स्वरूपात ‘नैवेद्यम् समर्पयामि’ करण्यात येत असे. अर्थात, आजही सूर्याला अर्ध्य आणि अग्नीला आहुति देण्यात येतेच. मूर्ती पूजेची सुरूवात ह्यानंतरची असावी. म्हणूनच त्यानुसारच मूळ नैवेद्याच्या बनावटीत फेरफार होत गेले असावेत. म्हणजे निव्वळ पोहे-गूळ-खोबरे ह्याऐवजी पोहे म्हणजे पर्यायाने तांदूळ-त्याचे पीठ आणि त्यात गूळ-खोबर्याचा ऐवज भरून मोदक निर्मिती झाली. आजही आमच्या घरच्या गणपतीला, त्याच्या परतीच्या प्रवासात, आगमनानंतर ठेवण्यात येणार्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसादांपैकी गोल गरगरीत सुक्या खोबर्याची वाटी त्यात चपखल बसणारा गुळाचा खडा घालून देतातच. शिवाय दूध-साखरेत भिजवलेल्या पोह्यांची पुरचुंडी शिदोरी म्हणून बांधून देण्याची पद्धत आहे. (ह्यापैकी गूळ-खोबर्याची वाटी विसर्जन करणार्या मुलाला दिली जाते.)
अशा ह्या गौर किंवा सावळ्या वर्णाच्या मोदकांच्या अंतर्गत घटकांमध्ये बरीच ‘भरभराट’ झाली. म्हणजे त्यात भरण्यात येणार्या सारणाच्या प्रकारांमध्ये प्रचंड वैविध्य आले आणि चवही निव्वळ गोड न राहता तिखट चवही त्याच्या पोटातून आपल्या पोटात जायला लागली. त्यातही शामलवर्णी तळणीच्या मोदकात सारणाच्या विविधतेला अधिक वाव मिळाला. तर गौरवर्णी उकडीच्या मोदकाच्या बाह्यरूपात रंगांच्या विविध छटा आल्या आणि पारीसाठीही कणिक वगळता मैदा, बेसन, सोयाबीनचे पीठ, रवा, मावा ह्यांचीही वर्णी लागली.
चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी मोदकांचे दोनच प्रकार होत. एक उकडीचा आणि दुसरा तळणीचा. हल्ली त्यात बेक्ड म्हणजे भाजलेल्या मोदकांची भर पडलीय. ह्याच्याही पुढची पायरी हणजे सामिष सारण भरलेला मोदक, जो ‘मोमो’ ह्या नावाने ओळखला जातो. एक म्हणजे हा परदेशातून आयात झालेला खाद्य प्रकार आहे. शिवाय त्याचे अंतरंगही निषिद्ध घटकांनी भरलेले असल्यामुळे, खवैय्यांच्या किंवा जनसामान्यांच्याही मनात मोदकाबद्दल असलेले प्रेम आणि विशिष्ट मान, जो एकवेळ तिखट चवीचा मोदकही मिळवू शकेल, तो ह्या मोदकाला मिळणे अशक्यच म्हणावे लागेल.
मोदक बनविणे हे कलाकुसरीचे आणि शांत डोक्याने करण्याचे संयमाचे काम असल्यामुळे महिलावर्गाच्या अखत्यारीतले मानले जाते. पण आमच्याच वसाहतीत राहणारे, माझ्या वडिलांचे, बेस्ट व्यवस्थापनातील उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थ सहकारी कम मित्र, ज्यांनी आज वयाची नव्वदी पार केलीय, ते आजही दर संकष्टी चतुर्थीला उकडीचे मोदक इतके सुबक करतात की ते एका पुरुषाने केलेत ह्यावर पटकन् विश्वास बसणार नाही. अगदी खोबरे किसणे, गूळ घालून ते शिजवणे ह्या प्राथमिक कामांबरोबरच उकड काढणे, कळीदार मोदक तयार करून ते उकडणे ही सगळी कामे ते स्वत: सराईतपणे करतात.
गणेशायनम् प्रिय: असे हे मोदक आणि गणेशाची आतुरतेने वाट बघणारे त्याचे भक्त ह्यांच्यातही, ह्या वेगवेगळ्या मोदकांप्रमाणेच वर्गवारी करता येईल. उकडीचा मोदक म्हणजे त्याचे काहीसे सुखवस्तू उच्च्वर्गीय भक्त! त्याच्यासारखेच मऊ मुलायम, तजेलदार कांतीचे. तर तळलेले मोदक म्हणजे निम्नवर्गीय, श्रमजीवी भक्तांचे प्रतीक! त्यांच्यासारखेच रापलेल्या वर्णाचे आणि थोड्या निबर अंगकांतीचे. अलिकडचे बेक्ड मोदक म्हणजे नवमतवादी भक्तांचे प्रतीक म्हणावेत असे! अंगकांती मुलायमही नाही किंवा रापलेलीही नाही. वर्णही सरमिसळ, म्हणजे उकडीच्या मोदकासारखा तजेलदारही नाही किंवा तळलेल्या मोदकांप्रमाणे निबरही म्हणता येणार नाही. पण एक कोरडेपणा हमखास अनुभवायला मिळणार! अशी भिन्नता असली तरी ह्या सगळ्याच भक्तांमध्ये बाप्पाबद्दलचे प्रेम, त्याच्या पाहुणचारासाठी कितीही कष्ट घेण्याची तयारी, त्यातला उत्साह, त्याच्या भेटीची आतुरता आणि तो परतताना येणारी व्याकुळता, हा समान धागा आहे.
वेगवेगळी तिखट गोड सारणे पोटात मिरवणारा असा हा मोदक भारी, नैवेद्य म्हणून अर्पण केलेला हा मोदक प्रसाद म्हणून श्रद्धेने आणि आवडीने पोटात भरणारे लहान-थोर भक्तही भारी आणि मोदकांच्या बरोबरीनेच भक्तांचे अपराधही पोटात सामावून घेणारा श्रीगणेश-सगळेच लय भारी!
(लेखिका ‘गार्गी’ वार्षिकाच्या सहसंपादिका असून साहित्य-कला क्षेत्रात कार्यरत आहेत.)
(पूर्व प्रसिद्ध ऋतुगंध मासिक)