सामाजिक, धार्मिक महोत्सवांचे स्वरूप आज आपल्याला पूर्णपणे बदललेले दिसते. दुर्दैवाने हा बदल सार्वजनिक समाजहित आणि पर्यावरणास मारक ठरण्याच्या दिशेने चाललेला आहे.
आता जवळपास पुढील सहा महिने भारताच्या विविध राज्यांतून वेगवेगळ्या धार्मिक आणि सार्वजनिक महोत्सवांचा अविष्कार अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर पावसाळ्याच्या महिन्यांत जन्माष्टमी, गणेशोत्सव आणि नवरात्रीचा धमाका असतो. यापैकी प्रत्येक महोत्सवाचे आपपल्या परिने महत्त्व आहे. मात्र, त्यातून सर्वाधिक चालणारा आणि अबालवृद्धांना आनंद देणारा दहा दिवसांचा गणेशोत्सव खूपच महत्त्वाचा आणि आगळावेगळा ठरलेला आहे.
दुर्दैवाने अलीकडच्या काळात याच महोत्सवात आपल्याकडून आपला परिसर आणि पर्यावरणाची खूपच हानी होऊ लागल्याचे जाणवते. त्यातही प्रामुख्याने लागण होते ती ध्वनी आणि जलप्रदूषणाची! ध्वनिप्रदूषण होत राहते ते दिवसातील किमान बारा ते पंधरा तास सातत्याने वाजत राहणार्या ध्वनिवर्धकांमुळे. दुसर्या बाजूला जलसाठे आणि प्रवाहांचे प्रदूषण होत राहते ते त्यात विसर्जित केल्या जाणार्या देवादीकांच्या मूर्ती आणि शोभेच्या साधनसामग्रीमुळे, वेगवेगळ्या आकारांच्या ह्या मूर्ती तयार करतांना प्लास्टर ऑफ पॅरीस, झिंक, पारा तसेच विविध रासायनिक रंगांचा वापर केला जातो. मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर हे सर्व पदार्थ पाण्यात मिसळतात. त्यामुळे ते पाणी प्रदूषित होते. त्यात मासे आदी जैविकसृष्टीचे महत्त्वाचे घटक देखील नष्ट होतात. तलावांच्या बुडाशी गाळ जमून जिवंत झरे बुजू लागतात. पाण्याचे असे साठे मग मृतवत वाहू लागतात.
सुमारे दहा वर्षांपूर्वी ठाण्यातील ‘जिज्ञासा ट्रस्ट’ ह्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्याच सरस्वती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मासुंदा तलावाच्या केलेल्या एका सर्वेक्षणातून असे काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले. मूर्ती विसर्जनानंतर माती आणि प्लास्टर ऑफ पॅरीस तलावाच्या बुडाशी साठलेले आढळून आले, मृत झालेले मासे मिळाले. हेच मासे नंतर विकले जात होते, त्यांची चिरफाड केल्यानंतर त्यांच्या उदरात झिंक, पारा आदी मानवी जीवनास अपायकारक असे घटक आढळून आले.
असे महोत्सव साजरे करण्यासाठी ठिकठिकाणी रहदारीच्या रस्त्यांवर मंडप उभारले जातात. त्यांचे खांब रोवण्यासाठी चक्क रस्त्यांवर खड्डे केले जातात. पावसाळ्यात होणारे आणि स्थानिक शासन संस्थांकडून बुजविले न जाणारे खड्डे बहुतेक कमी पडत असावेत? यामुळे रस्त्यावरील रहदारीचा बोजवारा उडतो, अपघातांमध्ये वाढ होते, नागरिकांची गैरसोय होते. पर्यावरणाची हानी होण्यास असे अनेक घटक कारणीभूत ठरतात. अशा महोत्सवांचे उत्साही संयोजक ह्या गोष्टींचा कुठे गंभीरपणाने विचार करतात असे दुर्दैवाने दिसत नाही.
अशा तर्हेने महोत्सव साजरे करीत राहण्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी कशी थांबविता येईल अथवा कमी करता येईल? कायद्याने हे करता येईल? मूळात कायद्याचीच भीती दिवसेंदिवस कमी होत असलेल्या आपल्या देशात असा विचार करणेच भाबडेपणाचे वाटू लागते. शासन आणि लोकप्रतिनिधीच जिथे पदोपदी कायद्यातील विविध तरतुदींचा भंग करताना दिसतात तिथे सर्वसामान्य नागरिकांच्याकडून अशी अपेक्षा कशी करता येईल? आपण एक उदाहरण घेऊ या. भारतीय राज्यघटनेतील कलम 48 अ च्या तरतुदीनुसार ’शासन पर्यावरणाचे रक्षण आणि त्यांत सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध असेल.’दुसर्या बाजूला नागरिकांची मूलभूत कर्तव्य विषद करणार्या कलम 51 अ च्या जी या उपकलमात असे म्हटले आहे की, ‘वने, तलाव, नद्या आणि वन्यजीवन असलेल्या पर्यावरणाचे रक्षण आणि त्यात सुधारणा करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असेल.’ ह्या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करावयाची म्हटले तर ज्या गोष्टींमुळे जलसाठे प्रदूषित अथवा नष्ट होतील अथवा ज्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या जैविकसृष्टीस ईजा पोहोचेल अशा गोष्टी ना नागरिकांना करता येतील ना शासनाकडून त्या सहन केल्या जाऊ शकतील. त्यामुळे तलावात अथवा इतर कुठल्याही जलसाठ्यात मूर्तींचे अथवा शोभा साहित्याचे विसर्जन करण्यास आजही चक्क भारतीय घटनेनुसार बंदी आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. आजच्या आपल्या देशातील सामाजिक आणि राजकीय वातावरणात या तरतुदींची अंमलबजावणी करा, अशी मागणी करणेदेखील जोखमीचे ठरू शकते. अशावेळी आपल्यासमोर पर्याय उरतो तो फक्त लोकशिक्षण, जनजागृती आणि जनसहभागाचाच!
सामाजिक, धार्मिक महोत्सवांचे स्वरूप आज आपल्याला पूर्णपणे बदललेले दिसते. दुर्दैवाने हा बदल सार्वजनिक समाजहित आणि पर्यावरणास मारक ठरण्याच्या दिशेने चाललेला आहे असा कुणाचा समज होत असला तर तो चुकीचा आहे असे म्हणता येईल काय? आपण काही उदाहरणे घेऊ या. आधी लोकांशी व्यापक प्रमाणावर संपर्क साधीत पै-पैसा गोळा करीत अत्यंत काटकसरीने असे महोत्सव सादर केले जात. त्यात फार भपका नसे. खर्चिक दिखावट नसे. मूर्ती सुबक, प्रमाणशीर, शाडूच्या असत. त्यांचे विसर्जन नदी अथवा सागराच्या वाहत्या पाण्यात होत असे. छोट्या-छोट्या गावांतून क्वचितप्रसंगी विहिरींचा देखील उपयोग केला जायचा. सजावटीसाठी कागद, पुठ्ठा, पावसाळी वनस्पती, पाने फुले आदींचा वापर केला जायचा. ध्वनिवर्धकांचा फारसा वापर होत नसे. त्यामुळे कुठे पर्यावरणाची फारशी हानी होत नसे. गावातील मोजक्या ठिकाणीच अशा प्रकारे सार्वजनिकरीत्या उत्सव साजरे केले जायचे. रस्त्यावरील रहदारीला अडथळा येणार नाही अशा प्रकारे मंडप घातले जात; मोकळ्या जागी कार्यक्रमांचे आयोजन केले जायचे. त्यामुळे समाजहितास बाधा येईल असे कुठलेही काम सर्वसाधारणपणे होतांना दिसत नसे.
आज मात्र ह्या महोत्सवांचे स्वरूप अगदी आमूलाग्र बदलेले दिसून येते. सर्वसामान्य माणसाची वर्गणी आणि सहभागापेक्षा प्रायोजक, व्यापारी तत्त्वावरील जाहिराती, राजकीय दडपण, दंडेली अशा विविध, कमी मेहनतीच्या पण प्रभावी माध्यमांचा वापर करून निधी उभारला जातो. वाढत्या आकाराच्या मूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरीस, थर्माकोल आदी पर्यावरणास बाधा आणणार्या माध्यमांचा सजावटीसाठी वापर केला जातो. गल्ली-बोळातील छोटे मोठे राजकीय पुढारीदेखील आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी स्वतंत्र चुली उभारतात; मोठमोठाले ‘कट-आउट’ लावून परिसर विद्रूप करतात; रस्त्याच्या मधोमध खड्डे खोदून मंडप उभारतात; दणकेबाज ध्वनिवर्धक लावून लोकांची झोप उडवितात. रस्ते आणि पर्यावरणाचा बोजवारा केला जातो. त्यामुळे असे महोत्सव अंतर्बाह्य प्रदूषणाने बरबटलेले दिसतात. प्रदूषण पाण्याचे, हवेचे, आवाजाचे, रहदारीचे आणि प्रामुख्याने विचार आणि आचरणाचे!
पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात काम करणार्या विविध संघटना, व्यक्ती, प्रसिद्धीमाध्यमे, स्थानिक स्वराज्य संस्था आदींच्या प्रयत्नांमुळे काही प्रमाणात प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न होतांना दिसताहेत. उदाहरणार्थ, मूर्तींचे आकार कमी ठेवणे, मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे, प्लास्टर ऑफ पॅरीस ऐवजी धातू, कागद आदी माध्यमातून तयार केलेल्या मूर्तींची स्थापना करणे, रात्री ठरावीक वेळेनंतर ध्वनिवर्धक बंद ठेवणे, इत्यादी. ते अत्यंत स्वागतार्ह आणि कौतुकास्पद आहेत. दिवसेंदिवस अशा प्रयत्नांना अधिकाधिक प्रतिसाद मिळत असलेला देखील जाणवतो. त्यामुळे असे प्रयत्न करीत असलेले कार्यकर्ते आणि संस्थांचा उत्साह दुणावतो. मात्र, हे सर्व बाह्य स्वरूपाचे झाले असे नाही आपल्याला वाटत? असे महोत्सव साजरे करण्याच्या अंतस्थ हेतूंमध्ये बदल घडून येत नाही तोवर त्यात शिरकाव झालेले वैचारिक आणि अधिक विघातक प्रदूषण कसे नष्ट किंवा कमी होणार? ते दूर करण्यासाठी आज समाजाला गरज आहे ती एका प्रचंड क्षमतेच्या आणि प्रभावी ‘केमो थेरपी’ची! सामाजिक बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या तशाच एखाद्या प्रभावी आणि प्रतिभाशाली लोकमान्य टिळकांसारख्या लोकनेत्याची.
आता जवळपास पुढील सहा महिने भारताच्या विविध राज्यांतून वेगवेगळ्या धार्मिक आणि सार्वजनिक महोत्सवांचा अविष्कार अनुभवायला मिळणार आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर पावसाळ्याच्या महिन्यांत जन्माष्टमी, गणेशोत्सव आणि नवरात्रीचा धमाका असतो. यापैकी प्रत्येक महोत्सवाचे आपपल्या परिने महत्त्व आहे. मात्र, त्यातून सर्वाधिक चालणारा आणि अबालवृद्धांना आनंद देणारा दहा दिवसांचा गणेशोत्सव खूपच महत्त्वाचा आणि आगळावेगळा ठरलेला आहे.
दुर्दैवाने अलीकडच्या काळात याच महोत्सवात आपल्याकडून आपला परिसर आणि पर्यावरणाची खूपच हानी होऊ लागल्याचे जाणवते. त्यातही प्रामुख्याने लागण होते ती ध्वनी आणि जलप्रदूषणाची! ध्वनिप्रदूषण होत राहते ते दिवसातील किमान बारा ते पंधरा तास सातत्याने वाजत राहणार्या ध्वनिवर्धकांमुळे. दुसर्या बाजूला जलसाठे आणि प्रवाहांचे प्रदूषण होत राहते ते त्यात विसर्जित केल्या जाणार्या देवादीकांच्या मूर्ती आणि शोभेच्या साधनसामग्रीमुळे, वेगवेगळ्या आकारांच्या ह्या मूर्ती तयार करतांना प्लास्टर ऑफ पॅरीस, झिंक, पारा तसेच विविध रासायनिक रंगांचा वापर केला जातो. मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर हे सर्व पदार्थ पाण्यात मिसळतात. त्यामुळे ते पाणी प्रदूषित होते. त्यात मासे आदी जैविकसृष्टीचे महत्त्वाचे घटक देखील नष्ट होतात. तलावांच्या बुडाशी गाळ जमून जिवंत झरे बुजू लागतात. पाण्याचे असे साठे मग मृतवत वाहू लागतात.
सुमारे दहा वर्षांपूर्वी ठाण्यातील ‘जिज्ञासा ट्रस्ट’ ह्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याच्याच सरस्वती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मासुंदा तलावाच्या केलेल्या एका सर्वेक्षणातून असे काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले. मूर्ती विसर्जनानंतर माती आणि प्लास्टर ऑफ पॅरीस तलावाच्या बुडाशी साठलेले आढळून आले, मृत झालेले मासे मिळाले. हेच मासे नंतर विकले जात होते, त्यांची चिरफाड केल्यानंतर त्यांच्या उदरात झिंक, पारा आदी मानवी जीवनास अपायकारक असे घटक आढळून आले.
असे महोत्सव साजरे करण्यासाठी ठिकठिकाणी रहदारीच्या रस्त्यांवर मंडप उभारले जातात. त्यांचे खांब रोवण्यासाठी चक्क रस्त्यांवर खड्डे केले जातात. पावसाळ्यात होणारे आणि स्थानिक शासन संस्थांकडून बुजविले न जाणारे खड्डे बहुतेक कमी पडत असावेत? यामुळे रस्त्यावरील रहदारीचा बोजवारा उडतो, अपघातांमध्ये वाढ होते, नागरिकांची गैरसोय होते. पर्यावरणाची हानी होण्यास असे अनेक घटक कारणीभूत ठरतात. अशा महोत्सवांचे उत्साही संयोजक ह्या गोष्टींचा कुठे गंभीरपणाने विचार करतात असे दुर्दैवाने दिसत नाही.
अशा तर्हेने महोत्सव साजरे करीत राहण्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी कशी थांबविता येईल अथवा कमी करता येईल? कायद्याने हे करता येईल? मूळात कायद्याचीच भीती दिवसेंदिवस कमी होत असलेल्या आपल्या देशात असा विचार करणेच भाबडेपणाचे वाटू लागते. शासन आणि लोकप्रतिनिधीच जिथे पदोपदी कायद्यातील विविध तरतुदींचा भंग करताना दिसतात तिथे सर्वसामान्य नागरिकांच्याकडून अशी अपेक्षा कशी करता येईल? आपण एक उदाहरण घेऊ या. भारतीय राज्यघटनेतील कलम 48 अ च्या तरतुदीनुसार ’शासन पर्यावरणाचे रक्षण आणि त्यांत सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध असेल.’दुसर्या बाजूला नागरिकांची मूलभूत कर्तव्य विषद करणार्या कलम 51 अ च्या जी या उपकलमात असे म्हटले आहे की, ‘वने, तलाव, नद्या आणि वन्यजीवन असलेल्या पर्यावरणाचे रक्षण आणि त्यात सुधारणा करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असेल.’ ह्या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करावयाची म्हटले तर ज्या गोष्टींमुळे जलसाठे प्रदूषित अथवा नष्ट होतील अथवा ज्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या जैविकसृष्टीस ईजा पोहोचेल अशा गोष्टी ना नागरिकांना करता येतील ना शासनाकडून त्या सहन केल्या जाऊ शकतील. त्यामुळे तलावात अथवा इतर कुठल्याही जलसाठ्यात मूर्तींचे अथवा शोभा साहित्याचे विसर्जन करण्यास आजही चक्क भारतीय घटनेनुसार बंदी आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. आजच्या आपल्या देशातील सामाजिक आणि राजकीय वातावरणात या तरतुदींची अंमलबजावणी करा, अशी मागणी करणेदेखील जोखमीचे ठरू शकते. अशावेळी आपल्यासमोर पर्याय उरतो तो फक्त लोकशिक्षण, जनजागृती आणि जनसहभागाचाच!
सामाजिक, धार्मिक महोत्सवांचे स्वरूप आज आपल्याला पूर्णपणे बदललेले दिसते. दुर्दैवाने हा बदल सार्वजनिक समाजहित आणि पर्यावरणास मारक ठरण्याच्या दिशेने चाललेला आहे असा कुणाचा समज होत असला तर तो चुकीचा आहे असे म्हणता येईल काय? आपण काही उदाहरणे घेऊ या. आधी लोकांशी व्यापक प्रमाणावर संपर्क साधीत पै-पैसा गोळा करीत अत्यंत काटकसरीने असे महोत्सव सादर केले जात. त्यात फार भपका नसे. खर्चिक दिखावट नसे. मूर्ती सुबक, प्रमाणशीर, शाडूच्या असत. त्यांचे विसर्जन नदी अथवा सागराच्या वाहत्या पाण्यात होत असे. छोट्या-छोट्या गावांतून क्वचितप्रसंगी विहिरींचा देखील उपयोग केला जायचा. सजावटीसाठी कागद, पुठ्ठा, पावसाळी वनस्पती, पाने फुले आदींचा वापर केला जायचा. ध्वनिवर्धकांचा फारसा वापर होत नसे. त्यामुळे कुठे पर्यावरणाची फारशी हानी होत नसे. गावातील मोजक्या ठिकाणीच अशा प्रकारे सार्वजनिकरीत्या उत्सव साजरे केले जायचे. रस्त्यावरील रहदारीला अडथळा येणार नाही अशा प्रकारे मंडप घातले जात; मोकळ्या जागी कार्यक्रमांचे आयोजन केले जायचे. त्यामुळे समाजहितास बाधा येईल असे कुठलेही काम सर्वसाधारणपणे होतांना दिसत नसे.
आज मात्र ह्या महोत्सवांचे स्वरूप अगदी आमूलाग्र बदलेले दिसून येते. सर्वसामान्य माणसाची वर्गणी आणि सहभागापेक्षा प्रायोजक, व्यापारी तत्त्वावरील जाहिराती, राजकीय दडपण, दंडेली अशा विविध, कमी मेहनतीच्या पण प्रभावी माध्यमांचा वापर करून निधी उभारला जातो. वाढत्या आकाराच्या मूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरीस, थर्माकोल आदी पर्यावरणास बाधा आणणार्या माध्यमांचा सजावटीसाठी वापर केला जातो. गल्ली-बोळातील छोटे मोठे राजकीय पुढारीदेखील आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी स्वतंत्र चुली उभारतात; मोठमोठाले ‘कट-आउट’ लावून परिसर विद्रूप करतात; रस्त्याच्या मधोमध खड्डे खोदून मंडप उभारतात; दणकेबाज ध्वनिवर्धक लावून लोकांची झोप उडवितात. रस्ते आणि पर्यावरणाचा बोजवारा केला जातो. त्यामुळे असे महोत्सव अंतर्बाह्य प्रदूषणाने बरबटलेले दिसतात. प्रदूषण पाण्याचे, हवेचे, आवाजाचे, रहदारीचे आणि प्रामुख्याने विचार आणि आचरणाचे!
पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात काम करणार्या विविध संघटना, व्यक्ती, प्रसिद्धीमाध्यमे, स्थानिक स्वराज्य संस्था आदींच्या प्रयत्नांमुळे काही प्रमाणात प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न होतांना दिसताहेत. उदाहरणार्थ, मूर्तींचे आकार कमी ठेवणे, मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे, प्लास्टर ऑफ पॅरीस ऐवजी धातू, कागद आदी माध्यमातून तयार केलेल्या मूर्तींची स्थापना करणे, रात्री ठरावीक वेळेनंतर ध्वनिवर्धक बंद ठेवणे, इत्यादी. ते अत्यंत स्वागतार्ह आणि कौतुकास्पद आहेत. दिवसेंदिवस अशा प्रयत्नांना अधिकाधिक प्रतिसाद मिळत असलेला देखील जाणवतो. त्यामुळे असे प्रयत्न करीत असलेले कार्यकर्ते आणि संस्थांचा उत्साह दुणावतो. मात्र, हे सर्व बाह्य स्वरूपाचे झाले असे नाही आपल्याला वाटत? असे महोत्सव साजरे करण्याच्या अंतस्थ हेतूंमध्ये बदल घडून येत नाही तोवर त्यात शिरकाव झालेले वैचारिक आणि अधिक विघातक प्रदूषण कसे नष्ट किंवा कमी होणार? ते दूर करण्यासाठी आज समाजाला गरज आहे ती एका प्रचंड क्षमतेच्या आणि प्रभावी ‘केमो थेरपी’ची! सामाजिक बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या तशाच एखाद्या प्रभावी आणि प्रतिभाशाली लोकमान्य टिळकांसारख्या लोकनेत्याची.
(पूर्व प्रसिद्ध ऋतुगंध मासिक)