श्रीगणेश चतुर्थीचा उत्सव हा घराघरात आनंद निर्माण करणारा असतो. पण गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या दिवशी मात्र घरात वातावरण वेगळेच झालेले असते. एकीकडे वार्षिक परंपरेची जबाबदारी पाळली गेल्याचे समाधान असते, तर दुसरीकडे बाप्पाला निरोप देण्याचा तो दिवस असल्याने प्रत्येकाचे अंत:करण हेलावलेले असते.
श्रीगणेश चतुर्थीचा उत्सव हा घराघरात आनंद निर्माण करणारा असतो. दैनंदिन चिंता, दु:ख विसरायला लावणारा असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात गणेशमूर्ती आणली जाते. प्राणप्रतिष्ठापना करुन मूर्तीची षोडशोपचारे पूजा केली जाते. आरती म्हटल्या जातात, प्रसाद दाखविला जातो. सर्वजण आबालवृद्ध मोठ्या उत्साहात असतात. वातावरण सर्वत्र प्रसन्न, भक्तिमय झालेले असते. पण गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या दिवशी मात्र घरात वातावरण वेगळेच झालेले असते. एकीकडे वार्षिक परंपरेची जबाबदारी पाळली गेल्याचे समाधान असते, तर दुसरीकडे बाप्पाला निरोप देण्याचा तो दिवस असल्याने प्रत्येकाचे अंत:करण हेलावलेले असते.
गणेश पूजनाची ही पद्धत नेमकी कधी सुरू झाली याविषयी विद्वानांत मतभिन्नता आहे. डॉ. रामकृष्णपंत भांडारकरांच्या मते गणेशपूजा पाचव्या ते आठव्या शतकात सुरू झाली असावी; परंतु काही पंडितांच्या मते गणपती अथर्वशीर्ष इतके जुने आहे, त्याअर्थी गणेशपूजेची ही पद्धत साडेतीन हजार वर्षांपूर्वी वैदिक काळीही प्रचारात असावी.
दिवस विसर्जनाचा
घरोघरी गणेशमूर्तीची स्थापना श्रीगणेश चतुर्थीच्या म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी माध्यान्ह काळी असेल त्या दिवशी केली जाते. मात्र, गणेशमूर्तीचे विसर्जन हे सर्वसाधारणपणे घराण्यातील रूढी परंपरेप्रमाणे केले जाते. काही भाविक दीड दिवसानंतर गणेशमूर्तीचे विसर्जन करतात, तर काही पाचव्या दिवशी बाप्पाला निरोप देतात. काही भक्तांच्या घरी गौरी विसर्जनाच्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते, तर काही सातव्या दिवशीही गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करतात आणि काही भाविक अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. विशेषत: सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या मिरवणुकीने वाजत गाजत अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते.
गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या दिवसाविषयी अनेक उपासक प्रश्न विचारतात. मूळ शास्त्रामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी माध्यान्हाला पार्थिव गणेश पूजन करण्यास सांगितलेले आहे. स्वत: नदीकाठी जाऊन तेथील माती आणून त्याची मूर्ती तयार करावी. माध्यान्हाला तिची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करावी. षोडशोपचारे पूजा-आरती करून त्याच दिवशी सायंकाळी गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे सांगण्यात आलेले आहे. दक्षिण भारतात अजूनही गणेश चतुर्थीच्याच दिवशी सायंकाळी मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. आपण एवढी सुंदर गणेशमूर्ती घरात आणतो. प्राणप्रतिष्ठा करून षोडशोपचार पूजा करतो. घरात आनंदमय प्रसन्न वातावरण तयार होते. वर्षातून एकदा आप्तेष्ट, मित्र गणेश दर्शनासाठी आपल्या घरी येत असतात. मग त्याच दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करणे ख्ाूप जड जाते म्हणून दीड दिवस, पाच दिवस, गौरींबरोबर, सात दिवस किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची प्रथा पडली असावी.
अनंत चतुर्दशी हा शेवटचा दिवस का? त्यालाही कारण आहे. भाद्रपद कृष्ण पक्ष हा पितृपक्ष-श्राद्धपक्ष म्हणून मानला जातो. अपराण्हकाल हा श्राद्धाला प्रमुख काळ सांगण्यात आलेला आहे. कधी कधी भाद्रपद पौर्णिमा सकाळीच समाप्त होऊन पौर्णिमेच्या दिवशी अपराण्हकाली भाद्रपद कृष्ण प्रतिपदा असते. त्यामुळे भाद्रपद पौर्णिमेच्याच दिवशी महालदारंभ व प्रतिपदा श्राद्ध येते. म्हणून भाद्रपद शुक्ल चतुर्दशी- अनंत चतुर्दशी हाच गणेशमूर्ती विसर्जनाचा अखेरचा दिवस मानला जातो.
समजा एखाद्या घरी पाच दिवस गणेशमूर्तीची पूजा केली जात आहे. त्यांना दीड दिवस किंवा दहा दिवस गणेशमूर्तीची पूजा करावयाची इच्छा आहे तर तसे करावयासही हरकत नसते. समजा एखाद्या वर्षी काही अडचणीमुळे गणेशमूर्तीची स्थापना-पूजा करता आली नाही तरीही चालते. गावी गणेशमूर्तीची पूजा करण्यात येत असेल आणि जागा बदलल्याने दुसरीकडे गणेशमूर्ती आणून पूजा करावयाची असेल तरीही शास्त्रकारांनी परवानगी दिलेली आहे. मात्र, गणेशमूर्तीला काही कारणाने तडा गेला तर मात्र लगेचच उत्तरपूजा करून गणेशमूर्तीचे विसर्जन करावयाचे असते. तसेच सुवेर-सुतक आले तर दुसर्या करवी उत्तरपूजा करून लगेच गणेशमूर्तीचे विसर्जन करावयाचे असते.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेशपूजन हे घाबरून भीतीने करावयाचे नसते. ते श्रद्धेने, शुद्ध अंत:करणाने करावयाचे असते. गणेशपूजा केल्याने देवात बदल होत नसतो. तो पूजन करणार्यामध्ये होत असतो. तसा तो होत नसेल तर पूजा व्यर्थ ठरत असते. ईश्वराची उपासना ही आपल्यामध्ये चांगला बदल व्हावा यासाठी करावयाची असते. श्रद्धेनेच ती करावयाची असते.
गणेशपूजेचा उद्देश
गणपती हा विघ्नहर्ता आहे तो विघ्ने दूर करतो अशी उपासकांची श्रद्धा असते. ह्या श्रद्धेमुळे मन निर्भय बनते, संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य-मनोबल आपल्यामध्ये येते. गणेश हा सुखकर्ता आहे त्यावर श्रद्धा असल्याने प्रत्येक गोष्ट आपल्यास सुखमय वाटू लागते. सुख-दु:ख ह्या मनाच्या भावना आहेत. मग आपल्या मनात नेहमी चांगले विचार येतात. त्यामुळे हातून चांगली कृती घडते. घरात प्रसन्न वातावरण राहते. मग माणसे निर्व्यसनी बनतात. आपण वाईट काम केले तर ईश्वर आपणास शासन करील असे वाटू लागते. गरीबांविषयी मनात कणव निर्माण होते. आपल्या हाताला इतरांना मदत करण्याची सवय लागते. वादविवाद-भांडणे यापासून आपण दूर राहण्याचा प्रयत्न करतो. ईश्वराच्या कृपेसाठी आपण चांगले वागण्याचा प्रयत्न करू लागतो. नीतिमान राहण्याचा प्रयत्न करू लागतो. भ्रष्टाचार, अनीती, गुंडगिरी यापासून दूर राहतो. इतरांना त्रास देणे म्हणजे पाप! आणि मदत करणे म्हणजे पुण्य! गणेश उपासनेमुळे आपले मन पापभीरू होते. हातून पुण्यकर्मासाठी कृती होते. इतरांना मदत करण्याची सवय लागते. श्रीगणेश चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांची देवता आहे. आपण विद्या-कलांचे उपासक बनतो आणि हाच गणेशपूजेचा मूळ उद्देश असतो.
गणेशपूजनामुळे आपण निसर्गावर प्रेम करू लागतो. ऋतूप्रमाणे आहारात बदल होतो त्यामुळे शरीराचे आरोग्य चांगले राहते. गणेशोत्सवाच्या दिवसात दु:ख, चिंता, काळजी, द्वेष, मत्सर, क्रोध विसरून जातो. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहते. गणेश उपासनेचा हाच मूळ उद्देश असतो.
भक्तिमय वातावरण
ज्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन व्हावयाचे असते त्या दिवशी घरातील वातावरण जास्तच भक्तिमय बनत असते. विसर्जनाच्यावेळी पाऊस पडू नये, विसर्जन उत्तम प्रकारे व्हावे, अशी प्रार्थना घरातील पुरुष करीत असतो. घराण्यातील एक वार्षिक गणेशपूजनाचे कार्य निर्विघ्नपणे पार पडावे याची जबाबदारी त्याच्यावर असते. त्यादिवशी तो नोकरीवर सुट्टी घेतो किंवा गणेशमूर्तीच्या विसर्जनाची जबाबदारी नीट पार पडावी यासाठी लवकर घरी येऊन पूजेच्या तयारीला लागतो. घरातील महिला गणेशमूर्ती विसर्जनापूर्वीच्या पूजेची आणि नैवेद्याची तयारी करीत असते. नवीन वस्त्रालंकार घालून सर्वजण बाप्पाला निरोप देण्याच्या तयारीत असतात. पूजा-आरती झाल्यावर नैवेद्य दाखविला जातो. उत्तरपूजेचा मंत्र म्हणून अक्षता अर्पण करण्यापूर्वी सर्वजण आपापली प्रार्थना करू लागतात. घरात कोणी आजारी असेल तर त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. घरातील मुले कोणी दहावी, बारावी किंवा पदवी परीक्षेला बसणार असतील तर उत्तम यशासाठी बाप्पाला प्रार्थना केली जाते. कोणी विवाहेच्छुक असतील तर पुढच्या वर्षीच्या गणेशाच्या आगमनापूर्वी विवाह व्हावा असे मागणे मागितले जाते. अपत्यप्राप्तीची इच्छा असेल तर सुखरूप अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना केली जाते. उत्तम आरोग्य, चांगली धनप्राप्ती आणि सौख्यप्राप्ती यासाठी प्रत्येकजण मनापासून प्रार्थना करीत असतात. प्रार्थनेमुळे प्रत्येकाचे मनोबल वाढते. मन निश्चिंत होत असते. उद्दिष्टप्राप्तीसाठी मनाची एकाग्रता साधली जाते. ही एक श्रद्धा असते.
पुढच्या वर्षी लवकर या!
उत्तरपूजेचा मंत्र म्हणून अक्षता गणेशमूर्तीवर अर्पण केल्यानंतर मूर्तीमधील देवत्त्व निघून जाते अशी श्रद्धा असते. उत्तरपूजेनंतर विसर्जन केले जाते ते गणेशाचे नव्हे! तर देवत्त्व निघून गेलेल्या गणेशमूर्तीचे असते. सर्वांच्या प्रार्थना झाल्यानंतर हातात अक्षता घेऊन उत्तरपूजेतील पुढील मंत्र म्हटले जातात-
त्यानंतर त्या अक्षता मूर्तीवर अर्पण करून मूर्ती आसनावर किंचित पुढे आपल्याकडे सरकवून ठेवली जाते.
त्यानंतर गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी घरातील सर्व मंडळी जलाशयाकडे जाण्यासाठी निघतात.
‘गणपती बाप्पा मोरया। पुढच्या वर्षी लवकर या।’
हेच शब्द प्रत्येकाच्या मुखी असतात. मन भक्तीत तल्लीन झालेले असते. गणेशमूर्ती विसर्जनासाठी घराबाहेर नेण्यापूर्वी सर्व घर दाखविण्याची प्रथा असते. मग घराकडे तोंड करून मूर्ती घराच्या दरवाजातून बाहेर नेली जाते. तसेच घरातील सर्व मंडळी गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत सामील होतात.
‘पायी हळु हळु चाला। मुखाने गजानन बोला।’
‘कपाळी केशरी गंध। गणेशा तुझा मला छंद।’
इत्यादी गजर करीत घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुका तलावाकाठी किंवा सागरकिनारी जात असतात. मुंबईत गिरगाव चौपाटीकडे तसेच दादर चौपाटीकडे गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुका जातात. त्यावेळी लाखो गणेश उपासकांचा जनसागर पाहणे आनंददायी असते. ती दृश्ये सर्व वाहिन्यांवरून दाखविली जात असल्याने लोकांना घरात बसूनही पाहता येतात. काही परदेशी पर्यटक गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुका पाहण्यासाठी आणि ती दृश्ये आपल्या कॅमेर्यात टिपण्यासाठी मुंबईत येत असतात. गिरगाव-दादरची चौपाटी गणेश उपासकांनी फुललेली असते. जनसागर जलसागराच्या दिशेने जात असतो. ‘लालबागचा राजा’ हे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीतील महत्त्वाचे आकर्षण असते. बाप्पाला निरोप देताना हात जोडले जातात. डोळ्यांत भक्तीचे दर्शन होत असते. गर्दीतही लोक स्वयंशिस्तीने वागत असतात.
पुण्यामध्ये गणेशमूर्ती मिरवणूक खूप देखणी असते. ढोल वाद्य अधिक सुंदर दिसते. महिलाही एकाच गणवेशात समूहाने ढोलवादन करतानाचे दृश्य तर प्रेक्षणीय असते. पुण्यात मानाचे गणपती प्रथम निघतात नंतर इतर गणेशमूर्ती! विसर्जन मिरवणूक अगदी पहाटेपर्यंत चालू असते. एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. परंतु कुठेही गडबड गोंधळ होत नाही. कारण ‘गणपती बाप्पाला निरोप’ हा एकच उद्देश तेथे असतो. लोक शिस्तीने वागतात. स्वयंसेवक चोख काम करताना दिसतात. वातावरण भक्तिमय झालेले असते. ती दृश्ये पाहिल्याने डोळ्यांचे पारणे फिटते.
महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पूर्वी फक्त घरगुती गणेशमूर्तींचेच विसर्जन व्हावयाचे. त्यावेळी मिरवणुकीमध्ये कमी गणेशमूर्ती असावयाच्या. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी घराघरातील गणेशोत्सवाबरोबरच 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जनसामान्यांच्या मनात जागृती निर्माण करण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला. सध्या गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये गणेशमूर्तींची संख्याही वाढलेली दिसते तसेच घरगुती गणेशमूर्तींची संख्याही वाढलेली दिसते. साहजिकच सध्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये लाखो भाविक सामील होताना दिसतात.
सागरकिनारी किंवा तलावाच्या काठी गणेशमूर्ती विसर्जनापूर्वी आरती केली जाते. ते भक्तीचे वातावरणही प्रत्येकाच्या मनाला भावणारे असते. काही भाविक विसर्जन करून घरी आल्यावर परत बाप्पाची आरती करतात. घरातील एखादा माणूस गेल्यावर किंवा लळा लावणारा एखादा आवडता पाहुणा निघून गेल्यावर जसे घर ओके-रिकामे वाटते ना? अगदी तशीच भावना गणेशमूर्तीचे विसर्जन करून घरी आल्यावर होत असते.
विसर्जन मिरवणुकीतील पथ्ये
सध्या गणेशमूर्तींची संख्या वाढत आहे त्यामुळे गणेशमूर्ती मिरवणुकीमध्ये काही पथ्ये पाळणे जरूरीचे आहे.
- गणेशमूर्ती लहान असावी. भक्ती-श्रद्धा मोठी असावी.
- विसर्जनच्या मिरवणुकीत फटाके लावू नयेत.
- मिरवणुकीत बीभत्स नृत्ये करू नयेत.
- मिरवणुकीत कर्कश आवाज करणारी वाद्ये किंवा ‘डीजे’ असू नयेत.
- निर्माल्य पाण्यात टाकू नये. जलप्रदूषण न करता निर्माल्याचा वापर खतनिर्मितीसाठी केला जावा.
- गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर केला जावा.
- आरती कर्कश आवाजात म्हणू नये. मंजुळ, सुमधुर आवाजात म्हणाव्यात. ध्वनिप्रदूषण टाळावयास हवे.
- गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक पहायला परदेशी लोक येत असतात. त्यामुळे स्वयंशिस्तीने वागणे खूप जरूरीचे आहे.
- सांस्कृतिक कलाकौशल्याचे, तसेच राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन मिरवणुकीत शिस्तीने व्हावयास हवे.
- मिरवणुकीत गुलाल उधळताना जास्त काळजी घ्यावयास हवी.
काही घरी गणपती बाप्पाला निरोप देऊन घरी आल्यावर नातवंडे आजीला विचारतात- ‘आजी, बाप्पा कुठे गेला? तो आत्ता काय करीत असेल?’
आजी सांगते-‘सर्व गणपतीबाप्पा एकत्र बसून गप्पा मारीत आहेत. प्रत्येकाच्या घरी स्वागत कसे केले गेले? नैवेद्य काय खायला मिळाला? त्या घरातील मुले कशी अभ्यास करीत होती? कसे वागत होती? घरात किती स्वच्छता व प्रसन्नता होती? ते एकमेकांना सांगत आहेत.’ गणपतीबाप्पा समोर आपण कसे वागत होतो याचे स्मरण मुलांना होऊ लागते.
गणेशमूर्ती ही मातीची असावी. पार्थिव गणेशपूजन म्हणजे हे पृथ्वीचे पूजन असते. भारत हा शेतीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात शेतीची कामे झालेली असतात. अशा वेळी पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थिव गणेशपूजन करावे असे सांगण्यात आलेले आहे. गणेशपूजनासाठी वापरली जाणारी पत्री ही औषधी वनस्पती आहे. तिची लागवड गावात व्हावी यासाठी त्या वनस्पतीचा वापर पूजेमध्ये सांगितलेला असतो. सण उत्सव हे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी साजरे करावयाचे असतात. त्यामुळे पर्यावरणास नुकसान होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यावयास हवी. उत्सवामुळे जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावयास हवी. आता हे उत्सव केवळ धार्मिक राहिलेले नाहीत तर ते सांस्कृतिक झाले आहेत. सामाजिक ऐक्याचे साधन झाले आहेत. समाजसुधारणेसाठी त्यांचा उपयोग करून घ्यावयास हवा आहे. माणसाच्या मनाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी अशा उत्सवांची जरूरी असते.
सध्या सर्वत्र असुरक्षितता वाढली आहे. सर्वच क्षेत्रात जीवघेण्या स्पर्धा आहेत. कमी श्रमात मोठे यश मिळावे यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे. ह्या कारणांमुळेच समाज आज दैववादी बनला आहे. राष्ट्राच्या प्रगतीसाठी हे चांगले नाही. म्हणून अशा धार्मिक उत्सवांचा उपयोग समाजामध्ये आरोग्य, निर्व्यसनी वृत्ती, दीनदुबळ्यांना मदत, सार्वजनिक स्वच्छता, राष्ट्राभिमान, धार्मिक बंधूभाव यासाठी करून घ्यावयास हवा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी प्रयत्न व्हावयास हवे आहेत. आता काळ बदलला आहे. कालबाह्य समाजविघातक गोष्टी बंद होण्यासाठी प्रयत्न व्हावयास हवे आहेत.
दरवर्षी बाप्पाला निरोप देताना प्रत्येक उपासकाने आपल्यात चांगला बदल होण्यासाठी संकल्प करावयास हवा आहे. नीतिमान- प्रामाणिक राहून अधिक मेहनत करावयाची शपथ घ्यावयास हवी आहे. राष्ट्राभिमान, बंधुभाव वृद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय करावयास हवा आहे. आपण जर ह्या गोष्टींसाठी प्रयत्नच केले नाहीत, निष्क्रिय राहिलो तर बाप्पा आपणास काहीही देणार नाही ही गोष्ट समजून घ्यावयास हवी आहे. कोणत्याही क्षेत्रातील यश हे अपघाताने किंवा चमत्काराने मिळत नसते तर ते अथक प्रामाणिक परिश्रमाने मिळत असते ही गोष्ट लक्षात घ्यावयास हवी आहे. कधीच न मिळालेलं यश मिळविण्यासाठी कधी न केलेली मेहनत करणे जरूरीचे असते. प्रत्येकाला आवडीचे काम मिळेल असे कधीच घडत नसते; परंतु मिळालेल्या कामात आवड निर्माण करणे हे प्रत्येकाच्या नक्कीच हाती असते. कोणतेही काम ‘लक्ष’ देऊन केले की ‘लक्ष्य’ गाठणे सुलभ जाते. स्पष्ट व निश्चित ध्येय असलेला माणूस अतिशय खडतर रस्त्यावर सुद्धा प्रगती करू शकतो. बाप्पाला निरोप देताना हीच गोष्ट उपासकाने मनाशी ठरवावयास हवी आहे. प्रत्येक माणसाची क्षमता आणि कल्पनाशक्ती अमर्याद असते. त्यांचा उपयोग करावयास आपण शिकले पाहिजे. प्रत्येकाकडे काम करण्याची अमर्याद शक्ती असते. तिचा योग्य वापर करावयाचा निश्चय मनाशी करावयाचा आहे. गणपतीबाप्पा आपणास मनोधैर्य मिळवून देत असतो. दरवर्षी बाप्पाचे आगमन होते, दरवर्षी बाप्पाला निरोप द्यावयाची वेळही येत असते. आपण दरवर्षी आपली तुलना आपल्याच गतकाळाशी करावयास हवी आहे. संधी ही प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. अयशस्वी होणारी माणसे प्रत्येक संधीत अडचणी सांगत बसलेली असताना दिसतात आणि यशस्वी होणारी माणसे प्रत्येक अडचणीतही संधी शोधणारी असतात. आपणास जर यशस्वी व्हावयाचे असेल तर दरवर्षी बाप्पाला निरोप देताना आपल्यात चांगला बदल करण्याचा संकल्प मनाशी करावयास हवा. मग त्याप्रमाणे कृती करून वर्षभरात महान यश प्राप्त करून पुढील वर्षी गणपती बाप्पाचे स्वागत मोठ्या उत्साहात, आत्मविश्वासाने, अभिमानाने आपणास करता येईल. आपली प्रगती पाहण्यासाठी गणपती बाप्पाला निरोप देताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी प्रार्थना आपण करूया.
(पूर्व प्रसिद्ध ऋतुगंध मासिक)