गणपतीची चतुराई बघून शिव-पार्वती दोघेही प्रसन्न झाले आणि त्यांचा विवाह प्रजापतीच्या मुली सिद्धि, बुद्धि ह्यांच्यासोबत करून दिला. ही कथा शिव महापुराणातील कुमारखंडात आहे. गणेश आणि मुगल पुराणातदेखील सिद्धि आणि बुद्धि ह्याच गणपतीच्या पत्नी आहेत. मात्र त्या प्रजापतीच्या मुली नसून ब्रह्मदेवाच्या मुली आहेत. मत्स्य पुराणात रिद्धि आणि बुद्धि ह्या दोघी गणपतीसोबत दिसतात. पुराणातील पाठभेद आपण बाजूला ठेवू या आणि शब्दांकडे बघू या. सिद्धि म्हणजे यश आणि बुद्धि म्हणजे शहाणपणा. गणेशाला ‘सिद्धिबुद्धिप्रदाय नम:’ असे म्हटले जाते. म्हणजे नुसते यश नको तर यशासोबत ते पचवण्याचा शहाणपणा पण हवा आणि हे दोन्ही प्रदान करणारा म्हणजे गणपती.
॥ एकदंतं शूर्पकर्णम् गजवक्र चतुर्भुजम्॥
॥ पाशांकुशधरं देवं ध्यायेत्सिद्धिविनायकम्॥
आपल्या सर्वांना परिचित असलेला गणपती, जो गजानन ह्या रूपात पूजला जातो. नेहमी रिद्धि आणि सिद्धि ह्या दोन देवतांचेही त्याच्यासोबत नाव घेतले जाते. विशेषकरून महाराष्ट्र आणि उत्तर भारत इथे गणपतीला रिद्धि आणि सिद्धि ह्यांच्या सोबतच पूजतात. मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर आणि मोरगावचे मयुरेश्वर मंदिर येथील गाभार्यांत जी गणेशमूर्ती आहे ती रिद्धि आणि सिद्धि ह्यांच्या सोबतच आहे. काही जणांच्या मते, ह्या दोघी त्याच्या पत्नी तर काहींच्या मते दासी. पण मतमतांतरे आणि शास्त्राधार ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. द्वारकेला गणपतीच्या मंदिरात रिद्धि आणि सिद्धि ह्या दोघी त्याच्या पत्नी म्हणून विराजमान आहेत. इतकेच नव्हे, तर द्वारकेच्या ह्या गणपती मंदिरात दोन्ही पत्नींपासून झालेली शुभ आणि लाभ अशी गणपतीची दोन मुलेदेखील आहेत.
दक्षिणेत मात्र गणपती हा ब्रह्मचारी म्हणूनच पूजला जातो. महाराष्ट्रात आपण कार्तिकस्वामीची ब्रह्मचारी रूपात पूजा करतो. पण दक्षिणकडे कार्तिकस्वामींच्या दोन पत्नी आहेत, वल्ली आणि देवसेना. पुन्हा एकदा आवर्जून सांगतो, की मान्यता आणि शास्त्राधार हे एकमेकांना पूरक असतीलच असे नाही.
गोकर्ण आणि शृंगेेरी येथील पुरोहित वर्ग गणपतीची पूजा करताना रिद्धि आणि सिद्धि ह्यांच्यासह नामोच्चार करून उपचार वाहतात. वास्तविक पुराणांच्या अनुसार कार्तिकेय व गणपती दोघेही विवाहित आहेत. महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात आढळून येणारी रिद्धि-सिद्धि ही जोडी पुराणांत मात्र कुठेच नाही. पुराणांमधे सिद्धि आणि बुद्धि ह्या दोघी गणपतीच्या पत्नी आहेत. ह्याबद्दलची कथा तशी सर्वश्रृत आहे. पण वेगळ्या संदर्भात. अग्रपूजेचा मान कोणाला मिळावा ह्यासाठी स्कंद म्हणजेच कार्तिकस्वामी आणि गणेश ह्यांच्यात चुरस होती. जो कोणी सर्वप्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्यालाच हा मान मिळणार होता आणि गणपतीने शिवपार्वतीलाच प्रदक्षिणा करून प्रतियोगिता जिंकली ही कथा सर्वांनाच माहीत आहे. परंतु महर्षी वेदव्यास रचित शिवपुराण ह्यामध्ये ह्या कथेचा संदर्भ थोडा वेगळा आहे. शिवपुराणातील कथा हीच मूळ कथा आहे. पण पिढी दर पिढी सांगितली आणि ऐकली जाताना संदर्भ बदलतात.
कार्तिकस्वामी आणि गणपती हे दोघेही मोठे झाले होते. (इथे एक गंमत नमूद करावीशी वाटते, कार्तिक हा केवळ शंकरांचा मुलगा तर गणपती हा केवळ पार्वतीचा मुलगा आहे.) आपली दोन्ही मुले वयात आलेली पाहून शिवपार्वती दोघांनाही त्यांच्या विवाहाची चिंता लागली होती. कार्तिक आणि गणेश ह्यांच्यात आधी कोणाचा विवाह करायचा ह्यावरून कलह सुरू झाला. शिवपार्वतीलासुद्धा प्रश्न पडला की कोणाची बाजू घ्यावी. तेव्हा दोघांनी असा निर्णय घेतला की कार्तिक आणि गणेश ह्यांच्यात एक प्रतियोगिता घेतली जाईल आणि जो जिंकेल त्याचा सर्वप्रथम विवाह करण्यात येईल. सप्तद्वीपांसह अखंड पृथ्वीची प्रदक्षिणा असे त्या प्रतियोगितेचे स्वरूप होते. हे ऐतकताच कार्तिकस्वामी आपल्या वाहनावर म्हणजेच मोरावर आरूढ होऊन लगेच निघाले आणि त्यांनी द्वीप ओलांडायला सुरुवात केली. गणपतींना विचार पडला, ते मनात म्हणाले मी इथे एक खडकसुद्धा सहजासहजी ओलांडू शकत नाही तर सप्तद्वीप काय पार करणार, असा विचार करतानाच त्यांना एक युक्ती सुचली. लगेचच त्यांनी पूजेची तयारी केली आईवडिलांना म्हणजेच शिवपार्वतीला पाय खाली सोडून बसायला सांगितले आणि त्या दोघांची पाद्य अर्ध्य देऊन पूजा केली.
पूजा पूर्ण झाल्यावर गणपतीने दोघांना सात प्रदक्षिणा केल्या आणि तिथेच कैलासावर बसून राहिले. त्याला स्वस्थ बसलेला पाहून शिवपार्वती म्हणाले, अरे गणेशा त्वरा कर, तुझ्या भावाची अर्धी पृथ्वी प्रदक्षिणा झालीही असेल. त्यावर गणपती म्हणाले, ‘पण माझी तर पृथ्वी प्रदक्षिणा कधीच झाली. एकदा नाही सातवेळा झाली.’ पार्वती म्हणाली ‘कसे शक्य आहे, तू तर इथेच आहेस.’ गणपती म्हणाले, ‘पण मी तुम्हाला सात प्रदक्षिणा केल्या आहेत ना! शास्त्र उघडून बघा. धर्मनिर्णय काय सांगतो बघा. जो आपल्या आईवडिलांना वंदन करून त्यांना मनोभावे प्रदक्षिणा करतो त्याला पृथ्वीप्रदक्षिणेचे पुण्य प्राप्त होते. जर मी पृथ्वी प्रदक्षिणा केली नाही असे तुम्हाला म्हणायचे असेल तर ही शास्त्र पुराणेदेखील मिथ्या सांगतात हे मान्य करा!’ आपल्या मुलाची चतुराई आणि निष्ठा बघून शिवपार्वती दोघेही प्रसन्न झाले आणि त्यांचा विवाह प्रजापतीच्या मुली सिद्धि अणि बुद्धि ह्यांच्यासोबत करून दिला. ह्या दोघींपासून लाभ आणि क्षेम अशी दोन मुले झाली. (द्वारकेच्या मंदिरात शुभ आणि लाभ अशी दोन मुले आहेत). ह्यानंतर देवतांनी गणपतीची बुद्धि आणि चातुर्य पाहून त्याला अग्रपूजेचा मान दिला. ही कथा शिव महापुराणांतील कुमारखंडात आहे. गणेश आणि मुगल पुराणातदेखील सिद्धि आणि बुद्धि ह्याच गणपतीच्या पत्नी आहेत. मात्र त्या प्रजापतीच्या मुली नसून ब्रह्मदेवाच्या मुली आहेत. मत्स्य पुराणात रिद्धि आणि बुद्धि ह्या दोघी गणपतीसोबत दिसतात.
पुराणातील पाठभेद आपण बाजूला ठेवू या आणि शब्दांकडे बघू या. सिद्धि म्हणजे यश आणि बुद्धि म्हणजे शहाणपणा. गणेशाला ‘सिद्धिबुद्धिप्रदाय नम:’ असे म्हटले जाते. म्हणजे नुसते यश नको तर यशासोबत ते पचवण्याचा शहाणपणा पण हवा आणि हे दोन्ही प्रदान करणारा म्हणजे गणपती. गणेश सहस्त्रनामात ‘रिद्धि सिद्धि प्रवर्धनाय नम:’ असे म्हटले आहे. रिद्धि म्हणजे भौतिक यश आणि सिद्धि म्हणजे आध्यात्मिक उन्नती आणि हे दोन्ही प्रदान करणारा म्हणजे गणपती. शुभ म्हणजे मंगलमय, लाभ म्हणजे लाभकारक आणि क्षेम म्हणजे समृद्धी ह्या सर्वांचा पिता म्हणजे गणपती.
(लेखक भागवत कथा प्रवचनकार असून पूर्णवेळ पौरोहित्य करतात.)
(पूर्व प्रसिद्ध ऋतुगंध मासिक)