गाण्यांमधून झालेले बाप्पाचे वर्णनसुद्धा अनेक अर्थछटा प्रतीत करताना दिसते. ह्या गीतांमधले प्रासादिक शब्द, संगीत, स्वर सर्वच अलौकिक आनंदाचा वर्षाव करणारे, मुळात बाप्पा म्हणजे कलेची-बुद्धीची देवता. कदाचित त्यामुळेच त्याच्यावरच्या सर्वच गीतांना, लेखनाला त्याचा दैवी स्पर्श होत असावा.
‘आधी गणाला रणी आणला; नाहीतर रंग पुन्हा सुना-सुना हो़’ ही पठ्ठे बापूरावांची रचना शाहीर साबळेंच्या आवाजात ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. शाहिरांचा आवाज टीपेचा पहाडी. ह्या पहाडी आवाजात त्यांनी गायलेले हे गणेशस्तवनपर कवन आजही प्रसिद्ध आहे. ह्या शब्दरचनेमधले श्रीवर्णन नितांतसुंदर आहेच, पण पहाडी आवाजात तरल प्रासादिक भावांनी ओतप्रोत होत शाहिरांनी ते तितक्याच सुंदरतेने आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे. त्यामुळेच असेल कदाचित, पण प्रत्येक वेळी हे ऐकत असताना आपल्याला त्यातून नव्याने काहीतरी गवसल्याचा आनंद मिळतो. नवे अर्थ सापडत जातात.
मराठी असो किंवा हिंदी, कोणत्याही भाषेतील गणेश गीते ऐकताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली आहे. ती म्हणजे, वर्षभरात ऐकलेल्या गणेशगीतातून मिळणारा आनंदानुभव आणि गणेशोत्सवामध्ये ऐकलेल्या त्याच गीतांमुळे निर्माण होणारी समधात् अवस्था ही वेगवेगळी असते. म्हणजे नैवेद्याचा वरणभात, तुपाची धार आणि इतर वेळचे तेच जेवण, ह्यामध्ये जिभेला फरक जाणवतो. एरवी खातो त्या खोबर्याची चव आणि प्रसादातल्या खोबर्याची चव, ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक जाणवतो तसेच काहीसे ह्या गाण्यांच्या नादानुभूतीमध्ये जाणवत राहते. अगदी सत्यनारायणाच्या सार्वजनिक पूजेला प्रल्हाद शिंदेंच्या दमदार आवाजात ‘बाप्पा मोरया रे… चरणी ठेवीतो माथा़’ हे गाणे ऐकावे आणि तसेच्या तसे ते गणपतीच्या दिवसात ऐकावे. त्यातल्या सुखाची प्रत आपल्याला वेगवेगळी असल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही.
‘अन्नपूर्णा’ चित्रपटातले सुमनताईंच्या आवाजातले ‘तुझ्या कांतीसम रक्तपताका पूर्वदिशी झळकती’ आशालता वाबगावकरांच्या आवाजातले, ‘तू सुखकर्ता-तू दु:खहर्ता विघ्नविनायक मोरया’, वाणी जयरामांचं, ‘जय जय मंगल गणराया, शुभंकरा… सुंदर ओंकारा’, सुरेश वाडकरांचे ‘नमिला गणपती, माऊली सारजा’, उत्तरा केळकरांचे ‘अशी चिकमोत्यांची माळ…’ बाप्पाच्या लीला अनंत, तशी त्यावरची गाणीसुद्धा अनंत आहेत. ह्या गाण्यांमधून झालेले बाप्पांचे वर्णनसुद्धा अनेक अर्थछटा प्रतीत करताना दिसते. ह्या गीतांमधले प्रासादिक शब्द, संगीत, स्वर सर्वच अलौकिक आनंदाचा वर्षाव करणारे, मुळात बाप्पा म्हणजे कलेची-बुद्धीची देवता. कदाचित त्यामुळेच त्याच्यावरच्या सर्वच गीतांना, लेखनाला त्याचा दैवी स्पर्श होत असावा.
गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ संगीतप्रेमी आणि शब्दप्रेमींना सुखावत असलेली आणखी एक लोकप्रिय पर्वणी म्हणजे लतादीदी, उषाताई, शांता शेळके, हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी आपल्याला दिलेली गणेश गीते. रांजण गावाला-गावाला, रचिल्या ऋषिमुनींनी, बाल भक्तालागी तुचि आसरा… हा संपूर्ण नजराणा काही वेगळाच. प्रासादिक सांगीतिक बाजारपेठेत दरवर्षी नवनव्या गणेशगीतांची भर पडताना दिसते. मात्र, हा खजिना अजरामर आहे. ‘चल साधका चल यात्रिका’पासून लताबाईंच्या आवाजातील आरती… सर्वकाही मौल्यवान, अतिसुंदर, गाण्यांमधला प्रत्येक शब्द, हरकती, आलाप, आपल्या चित्रवृत्ती बहरवून टाकते. मुळात म्हणजे संगीत संयोजनामध्ये नेटकेपणा आल्याने प्रत्येक गीतातील शद्ध, अर्थ संदर्भासह काळजाला भिडत राहतो. आपली समाधी लागल्याशिवाय राहत नाही, हे खरे.
अशीच लोकप्रिय झालेली गणेशगीते म्हणजे सचिन पिळगावकरांच्या ‘अष्टविनायक’ चित्रपटातील सदाबहार गाणी! मधुसूदन कालेलकर, जगदीश खेबुडकरांसारख्या सिद्धहस्त कवींनी लिहिलेली, अनिल-अरुण ह्यांनी संगीतसाज चढवलेली आणि पं. वसंतराव देशपांडे, अनुराधा पौडवाल, राणी वर्मा ह्यांच्या आवाजातली ही गणेशस्तवने मन प्रसन्न करून टाकतात. ‘प्रथम तुला वंदितो’, ‘तू सुखकर्ता-तू दु:खहर्ता’, ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ ही गीते आजही लाकप्रिय आहेत. त्यामागचे कारण म्हणजे त्यांचे स्वरसौंदर्य! डोळे मिटून ऐकले तरी आपण अष्टविनायकाची यात्रा करून येतो. नवलपूर्ण गोष्ट म्हणजे अष्टविनायकाची यात्रा न केलेल्या खेबुडकरांनी केलेले अष्टविनायकाचे जिवंत दर्शन! बाप्पाच्या प्रसादाशिवाय असे अप्रतिम काव्य जन्माला येणे अशक्य होते. ह्या शारदापुत्रांची साहित्यसाधनाही दिव्य असल्याने एकापेक्षा एक सरस गणेशकवनं त्यांच्या लेखणीतून साकारली आणि आपल्यासाठी ती आनंदनिधान ठरली.
शास्त्रीय आणि नाट्यसंगीत गायक अजित कडकडे ह्यांची ‘हृदयाच्या तालावर नाचे गणेशु, निनादती पैंजणे’ सारखी भजनी बाजाची काही गणेशगीतेसुद्धा खूप लोकप्रिय आहेत. कडकडे ह्यांची गायकी अभिषेकी पद्धतीची आहे हे खरे, पण त्यांची अशी गाणी आनंदाचा अभिषेक करतात हे कुणीही मान्य करील. ‘तेजाब’, ‘राम-लखन’, ‘साजन’ ह्यांसारखे हिंदी चित्रपट तिकीटखिडकीवर धुमाकूळ घालत होते. त्या लाटेमध्ये, ह्या चित्रपटांतील गाजलेल्या गीतांच्या चालीवर गणेशगीते लिहून ती सांगीतिक बाजारपेठेत आणण्याचा प्रवाह कार्यरत झाला होता. काही काळ श्रोत्यांनी त्या पद्धतीला पाठबळ दिले, पण आपलेसे मात्र केले नाही. काही काळ ही गीते ऐकायला आली पण केवळ व्यापारी हेतूने प्रेरित होऊन बनवल्या गेलेल्या ह्या गणेशगीतांमध्ये उच्च कोटीची निर्मितीमूल्ये अजिबात नसल्यामुळे अल्पावधीतच त्यांचे निर्माल्य झाले. मात्र ‘बंधु येईल माहेरी न्यायला, ‘गौरीगणपतीच्या सणाला’, ‘टिंब टिंब टिंबाली ढमाक ढम ढोल बाजे’ ‘गणपतीच्या म्होरं सारी नाचू गाऊया’सारखी लोकसंगीताचा स्पर्श झालेली गणेशगीते आजही आपल्याला ठेका धरायला लावतात, ती त्यांच्यामधील अननुभूूत नादमाधुर्यामुळे. केव्हाही ऐकली तरी ती ताजीतवानी वाटतात. शब्दरचना साधी व सोपी असेलही पण त्यात आगळे लावण्य आहे. मराठीप्रमाणेच, ‘देवा हो देवा गणपती देवा’, ‘हर बरस आएंगे हम सागर के तीर’, ‘माय फ्रेंड गणेशा’ ह्या हिंदी बालचित्रपटातील गीते, अशी हिंदी भाषेतील गणेशगीतेसुद्धा हिंदी-मराठी शब्दोच्चारांसह आपल्या जिभेवर रुळलेली आहेतच. आपल्या बाप्पाची अशी हिंदी गाणी ऐकताना एक शब्दातीत भावना मनात दाटून येते. सच्चा गणेशप्रेमी ती केवळ संवेदनेच्या पातळीवरच अनुभवू शकतो. नेमके काय वाटते, ते मग शब्दांमध्ये मांडता येत नाही. गेली 15 वर्षांपासून तर अजय-अतुल ह्यांनी संगीतबद्ध केलेले आणि शंकर महादेवन ह्यांनी केशरकस्तुरी केलेले ‘एकदंताय गौरीतनयाय’ जगभर प्रसिद्ध झालेय. संस्कृतप्रचूर असले तरी ते सुगम आणि श्रवणीय आहे. अलीकडे अवधुत गुप्तेंनी बाप्पाची कव्वाली सादर करून एक वेगळ्या संगीतप्रकारामधून बाप्पाला दंडवत घातलाय. हे गीत आणि प्रयत्न दोन्हीही स्तुत्यच म्हणायला हवे.
शोधायला आणि लिहायला गेले तर गणेशगीतांचा एक मोठा ग्रंथच होईल. प्रत्येक गीतावर भरभरून लिहिता येईल. गणेशकवनांचे हे धन संपन्न आहे. हे संपन्न धन आपल्यापाशी असल्यामुळेच, आपणही आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न जीवन जगत आहोत.
(लेखक साहित्य-कला, जाहिरात, निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत.)