इंडोनेशियातील भूकंपानंतर तिथे आलेल्या महाकाय त्सुनामीचा पालू बेटाला प्रचंड तडाखा बसला असून भयानक विध्वंसानांतर आता तिथली परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येत आहे. मात्र हिंदुस्थानाच्या मुंबई बेटावर आलेल्या ‘मी टू’ त्सुनामीने गल्ली ते दिल्ली खळबळ माजली असून यात मोठे मासे अडकत आहेत. स्त्रियांवरील अत्याचारात मग ते बॉलिवूड असो की हॉलीवूड तसुभरही फरक नसून जसजसे हे प्रकरण पुढे जात आहे तसतसे खळबळजनक खुलासे होत आहेत. चित्रपट, राजकारण, मिडीया, शिक्षण, साहित्य आणि इतरही क्षेत्रातून स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना आता उघडकीला येऊ लागल्या आहेत आणि याची व्याप्ती पाहता आतापर्यंत केवळ हिमनगाचे टोकच बाहेर पडले असून खरी परिस्थिती समोर आली तर नक्कीच हाहाकार माजेल अशी स्थिती दिसत आहे.
नुकतेच तनुश्री दत्ता या अभिनेत्रीने २००८ साली ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटात गाण्याच्या चित्रीकरणात जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. सोबतच नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आणि इतरही यात सामील असल्याचे सांगितले आहे. याच अभिनेत्रीने २००५ ला ‘चॉकलेट डिप डार्क सिक्रेट’, चित्रपटाच्यावेळी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर असभ्य वर्तनाचा आरोप केलेला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी तात्काळ तनुश्री दत्ताचे आरोप फेटाळून लावत हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे तर नाना पाटेकरांनी फारकाही स्पष्टीकरण न देता ‘जे सत्य आहे ते समोर येईल’ एवढी भुमिका घेतली आहे. तनुश्री प्रकरणाची शाई वळते न वळते तोच इतरही क्षेत्रातील महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचून समाजात उजळमाथ्याने फिरणाऱ्या कित्येक नामचिन चेहऱ्यावरील बुरखा टराटरा फाडला आहे. मात्र रजत कपुर असो की प्रख्यात लेखक चेतन भगत असो यांनी सरळसोट माफी मागत, दिलगिरी व्यक्त करत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तर तनुश्री दत्ताने एक पाऊल पुढे जात सरळ पोलीस स्टेशनला नाना पाटेकर आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण एवढ्या लवकर शांत होईल असे वाटत नाही.
खरेतर जाहिराती असो की मिडीया, स्त्री ही केवळ उपभोग्य, दिखाऊ वस्तू आहे याचे वारंवार प्रदर्शन केले जाते. शिवाय ‘लैंगिक स्वातंत्र्याच्या नावाखाली ‘उघडेनागडे’ ‘कायदे’ करून समाजाकडून नैतिकतेची अपेक्षा करणे निव्वळ हास्यास्पद आहे.’ लिव्ह इन रिलेशनशिप, समलैंगिकता आणि आता जोडीला ४९७ आल्याने भविष्यात किती गदारोळ माजेल याची भितीच वाटते. सध्याच्या मी टू बद्दल बोलायचे झाले तर मानव कितीही प्रगत प्राणी असला तरी त्याची मुळ पाशवी वृत्ती अधुनमधून डोके वर काढतच असते. समाज कितीही पुढारलेला असला तरी नर, मादी या मानसिकतेतून अजुनही बाहेर पडलेला दिसत नाही. सोबतच काहीही करून कसेही करून यश मिळवायचे आहे ही मानसिकता असल्याने टपून बसलेल्या गिधाडांचे आयतेच फावते. त्यातच चित्रपटसृष्टी म्हणजे अशा प्रकारासाठी अगदी भुसभुशीत जमीन. नवोदितांना कास्टिंग काऊचच्या अग्निदिव्यातून जाण्याचा अलिखित नियमच आहे. याबाबत फारकोणी बोलतांना दिसत नाही. याऊलट प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी मागे तर याबाबत जे अकलेचे तारे तोडले होते ते पाहता या विषयाची गंभीरताच नष्ट होते. ‘बॉलिवूड हे कास्टिंग काऊचच्या बदल्यात रोजीरोटी देते’ असे त्यांचे म्हणणे होते परंतु प्रकरण अंगाशी शेकताच त्या माफी मागून मोकळ्या झाल्या होत्या.
‘बळी तो कान पिळी’ असा सर्वत्र प्रकार चालतो. सोबतच पुरुषी अहंकारी मानसिकता साथीला असल्यास शोषण ठरलेच आहे. बरेचदा बदनामीपोटी किंवा हातचे काम चालले जाईल म्हणून शोषणाचे प्रकार दाबले जातात. कित्येकदा करिअरच्या नावाखाली किंवा प्रमोशनसाठी असे निर्लज्ज प्रकार सर्रास केले जातात. बरेचदा यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याविरूद्ध आवाज उठवला जातो मात्र तोपर्यंत बराच काळ निघून गेलेला असतो. शिवाय आपल्यावर अन्याय होऊनही समाज आपल्याला साथ देईल काय? दोषींवर कारवाई होईल काय? आरोपी “बडे नामवाले” असल्याने असे प्रकरण दाबण्याचीच शक्यता जास्त असल्याने पिडीत नाईलाजाने गप्प बसतात. मात्र आता मी टू ही चळवळ जोर धरू लागल्याने हळूहळू का होईना पिडीतांनी आपल्या अन्यायाला वाचा फोडून समोर यायची हिंमत दाखवली आहे.
मात्र इतक्या वर्षानंतर असे प्रकरण बाहेर येत असल्याने बरेचदा याला पब्लिसिटी स्टंट म्हटले जाते. परंतु अन्याय, अत्याचार याबाबत जसजसा काळवेळ निघून जातो तशी त्याची तीव्रता कमी होत जात असली तरी त्याचे गांभीर्य अजिबात कमी होत नाही किंवा जखमा भरुन निघतात असेही नाही कारण ‘ज्याचे जळते त्यालाच कळते’ अशी स्थिती असते. एवढे सर्व असुनही मिडीया, समाजाने फटाफट मानसिकतेत न जाता अशा घटनांचा काळजीपूर्वक अभ्यास करायला हवा. एखाद्यावर आरोप होताच त्याला लगेचच फाशी देऊन किंवा तत्कालीन तथ्य, पुराव्याअभावी क्लिनचिट देऊन मोकळे करणे धोकादायक आहे. शिवाय मिडीया ट्रायलच्या नावाखाली एखाद्याला गुन्हेगाराचा शिक्का मारणे सोपे असते परंतु तिच व्यक्ती निर्दोष सुटताच त्याला बातम्यात कुठेच स्थान नसते. यामुळेच ‘मी टू’चे स्वागत करतांना ओल्याबरोबर सुके जळणार नाही याची काळजी घेणे गरजेचं आहे. अन्यथा ३७६, ४९८ पाठोपाठ मी टू हे एकमार्गी शस्त्र न ठरता त्याचा व्यवस्थित उपयोग व्हायला हवा. निश्चितच गुन्हेगार कोणीही असो त्याला शिक्षा व्हायलाच हवी यात दुमत नाही पण केवळ प्रसिद्धीसाठी किंवा द्वेषापोटी यात निरपराध भरडल्या जाणार नाही याची दक्षता घ्यायलाच हवी. एवढे मात्र नक्की यापुढे ‘मी टू’मुळे स्त्री पुरुष आपसातील संबंध नक्की किती मर्यादित राहतील किंवा विश्वासार्हता किती उरेल हे येणारा काळच सांगू शकतो. एक चांगल्या उद्देशाने सुरू झालेली ही चळवळ स्त्रीमुक्ती, स्त्री स्वातंत्र्यास पुरक ठरायला पाहिजे यात तिळमात्र शंका नाही तरीपण ही चळवळ आपल्या उद्देशांपासुन भरकटू नये आणि समाजातील लिंगपिसाट वाळवी मुळासकट उखडून फेकायला मदत करील अशी आशा बाळगायला हरकत नाही. मात्र याकरीता एकजात समस्त पुरूषवर्गाला संशयाच्या भोवऱ्यात गुंतणे बरोबर नव्हे. शेवटी प्रत्येक ‘अत्याचारी’ हा ‘पुरुष’ नसतो तसेच प्रत्येक ‘पुरुष’ हा ‘अत्याचारी’ नसतो हेसुद्धा ध्यानात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
‘मी टू’ : परी अंतरीच्या ‘नाना’ कळा
0
Share.