आजच्या स्त्रीला मानसिक स्वास्थ प्रयत्नपूर्वक मिळवायला लागते. तिचा स्ट्रेस वाढलाय. ती घरी आणि कार्यालय अशा दोन्ही ठिकाणी काम करते. आर्थिक स्वातंत्र्यातून तिला हौसमौज करण्याचे स्वावलंबन मिळाले आहे, पण त्यातूनच अधिक काम, अधिक पैसा, प्रमोशन, स्पर्धा वाढायला लागल्याने ती अस्थिर आहे.
स्त्रीचे आरोग्य म्हटले की आजही काहीसा हेटाळणीचा’ दुर्लक्षित असा कटाक्ष असतो. वास्तवात स्त्री विविध भूमिका निभावत असते. मग ती कन्या, आई, आजी, सासू, पत्नी, नणंद, भावजय, सून, मैत्रीण एक का अनेक. अन् ती ‘सारी’ संसाररूपी रहाटगाडग्याला जोडलेली नव्हे जुंपलेली आहेत अन् तिच्या क्षमतेवरच घरादाराचा डोलारा अवलंबून आहे. स्त्रीच्या कार्यशक्तीवर घराची प्रगती होत असते. घरकुलातील व्यक्तींचे सौख्य स्त्रीच्या अथक कष्टांवर चालते. मग ती स्त्री पूर्णवेळ गृहिणी असो वा आजच्या कार्पोरेट वर्ल्डमधील करिअरिस्ट वुमेन. म्हणतात ना, ‘घार हिंडते आकाशी; चित्त तिचे पिल्लांपाशी’ तसेच स्त्री’चे आहे. ती कुठेही असली तरी कौटुंबिक जबाबदारीचा स्त्रीला ध्यास असतो आणि कुटुंबासाठी, त्यातील व्यक्तींच्या स्वास्थासाठी, त्यांच्या खाण्यापिण्याच्या अन्य आवडींशी ती इतकी एकरूप असते की त्यांच्यासाठी वेळ राखून ठेवताना ती स्वत:कडे, शारीरिक, मानसिक कुरबुरींकडे ‘वेळ नाही’ म्हणत पूर्णत: डॉक्टरकडे जाणे तर टाळतेच पण स्वत:ला थोडी विश्रांती घ्यायला हवी, सवड काढायला हवी,. रोजच्या धावपळीत स्वत:कडे पूर्ण लक्ष द्यायला हवे हे जणू विसरली आहे.
ह्या तिच्या स्वत:च स्वत:ला टाळण्याच्या प्रवृत्तीमुळे ह्या समाजात आजच्या घडीला अनेक स्त्रिया ह्या अनारोग्याच्या जाळ्यात झपाट्याने ओढल्या जात आहेत. त्यामुळेच आजची स्त्री बाह्यरंगी मेकअपने’ मग ते फेशीयल, फाऊंडेशन, क्रिम-पावडर, आयशॅडो, लिपस्टिक यासारख्या गोष्टींनी कितीही सुंदर भासली तरी वास्तवात अॅनेमिया, थॉयरॉईड, गर्भाशयाचे विकार मासिक पाळीचे त्रास, त्वचारोग अशाने अंतरंगी ती अनुत्साही आहे. ह्या अन् याच्या अनुषंगाने येणारे नैराश्य, निद्रानाश, व्यसनाधिनता मग गंमत म्हणून घेतलेला पेग असो की सिगारेटचा झुरका यामधूनही तिच्या अनारोग्याची झलक जाणवते. पण गतिमान जगाच्या परिघात गुंतलेली स्त्री कुटुंबातील अपवाद वगळता अन्य सदस्य आपल्यातच रममाण झालेले अन् व्हॉटस अप, सोशल साईटवर अपडेटस देण्या-घेण्यात मग्न असलेली तरुणाई यात स्त्रीनेच स्वत:च्या आरोग्यासाठी जागरूक असायलाच हवे.
आजच्या स्त्रीला मानसिक स्वास्थ प्रयत्नपूर्वक मिळवायला लागते. तिचा स्ट्रेस वाढलाय. ती घरी आणि कार्यालय अशा दोन्ही ठिकाणी काम करते. आर्थिक स्वातंत्र्यातून तिला हौसमौज करण्याचे स्वावलंबन मिळाले आहे, पण त्यातूनच अधिक काम, अधिक पैसा, प्रमोशन, स्पर्धा वाढायला लागल्याने ती अस्थिर आहे.
मानवी विकास झाला तर हे ताणतणाव कमी होतील म्हटले जाते. समाजशास्त्रज्ञ संदीप वासलेकर म्हणतात, ‘मानवी विकास हा फक्त ऐहिक अभिप्रेत नाही’ अधिक बँक बॅलेन्स म्हणजेच अधिक सुख नव्हे. आनंदी असणे, सुखी समाधानी राहणे हे पूर्णत: वेगळे असे तत्त्वज्ञान आहे. थोडक्यात म्हणू शकता, ‘मना तू असता समाधानी, घेशील उंच भरारी’ चांगल्या मन: स्वास्थ्यासाठी छंद जोपासावेत, स्वत:साठी सत्कारणी वेळ काढावा, सकारात्मकता ठेवावी. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार उक्तीनुसार स्वत:वरचा आत्मविश्वास, प्रेम, स्वत:शी केलेला सुसंवाद, मनन, चिंतन ह्यामधून प्रचंड ऊर्जा मिळू शकते, जी तुमच्यातील त्रुटींना दूर सारून तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाची, चांगल्या विचारांची, सद्भावनांची ओळख होते. जी व्यक्तीच्या नकारात्मक भावनांना पूर्णविराम देत स्त्रीला अधिक सक्षम करीत जगाकडे ममत्वाने बघण्याची दृष्टी प्रदान करते. जी मानसिक स्वास्थाला पूरक आहे.
स्त्रीने तिच्या आरोग्यासाठी सजग राहत कुटुंबात राहूनच स्वत:चा विकास करताना एखादा दिवस स्वत: क्षणभर विश्रांती घ्यावी. कुटुंबाशी फारकत म्हणजे काही भांडणतंटा, अबोला नव्हे तर थोडासा अलिप्तपणा जणू अळवावरचं पाणी व्हावे. मुलांना, पतीला म्हणावे आज तुमची रेसिपी, तुम्ही केलेले काम यांचा ‘स्वीकार किया मैंने’, त्यांना धडपडू द्या, कष्ट घेऊ द्या. भले पसारा होईल पण सर्वांनी एन्जॉय करा अन् तयार जेवणाची मज्जा औरच.
स्त्रीचं आरोग्य हे प्रामुख्याने शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही टप्प्यांवर विभागलेले आहे. त्यासाठी आहार, विहार, व्यायाम यांचा सखोलतेने विचार महत्त्वाचा ठरतो. कालच्या तुलनेत स्त्रियांचे आजचे आजार अधिक गुंतागुंतीचे दिसतात अन् गर्भाशयासारखे विकार तर बहुतांश स्त्रियांना होतांना दिसतात. अगदी कॉमनली गर्भाशय काढून टाकणार, पुढची झंझट आज संपवलेली बरी असे स्त्रिया एकमेकींना सहजतेने सांगतात किंवा गुडघे प्रत्यारोपण ह्या अन् अशा अनेक व्याधी पूर्वी नव्हत्या म्हटले तर… पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत कामाचे विभाजन, परस्परांशी असणारा संवाद, नेमकेच खाणे तेही काटेकोर घरीच बनवलेले. (हॉटेलचे खाणे लज्जास्पद मानले जाई) जेवणाच्या ठरलेल्या वेळा आणि सर्वांत महत्त्वाचे सर्वांगीण व्यायाम होईल अशा स्वयंपाक हालचाली. मग ते निवडणे, पाखडणे, दळणे, विहिरीतून पाणी काढणे, शेंदणे, सडा-रांगोळी ह्या सर्वांत हातापायांना पाठीला-पोटाला आपसूक व्यायाम व्हायचा अन् तोही आरोग्याला वरदान ठरायचा. पुन्हा हे सर्व काम घरातील अन्य स्त्रियांसह हसतखेळत, भेंड्या, गाणी, ओव्या, भजन म्हणत होत असल्याने स्त्रीच्या मनाचा कोंडमारा कमी व्हायचा.
ह्यानंतर आलेली मधली पिढी ही जास्त भरडली जाते आहे. एकीकडे वृद्ध वडीलधार्या मंडळींचे तानमान सांभाळणे, काळजी घेणे अन् नव्याने आलेले सासूपण स्वीकारतांना कामावर जाणार्या सुनेची काळजी वाहताना स्वत:च्या कुरकुरींकडे कानाडोळा यातून अनारोग्य वाहक अशी ही पिढी. सून म्हणून घरकुलात आलेली स्त्री काही प्रमाणात आरोग्याविषयी जागरूक होताना काही वेळेला नको इतकी हेल्थ कॉन्शस होताना दिसते. नुकतेच एका बालरोगतज्ज्ञ मैत्रिणीकडे डोकावले तर दोन बालवाडीतल्या (के.जी.) मुली मास्क लावून बसलेल्या ‘यांना काय झालंंय?’ ‘अगं काही नाही जरा नाक चोंदलंय. हा मास्क लावला की वाफार्याचे काम होते. ‘पण अगं हे घरी होऊ शकते की’ धावपळीत तेवढाच रिलीफ ह्या ममांना’ मैत्रीण म्हणाली. अर्थात ती डॉक्टर गप्प राहिली.
ह्याच नव्या जनरेशन संदर्भात म्हणावेसे वाटते यांना खायला लेज, कुरकुरे तत्सम तळलेल्या गोष्टीत रूची अन् आपल्या देशी चिकवड्या, साबुुदाणा, बटाटा, उडीद, नाचणी पापडांवर काट कुरडई खाणे, खायला देणे किती चांगलंय. त्यातून गव्हाचे सत्व पोटात जाते अन् वरील बाजारू पदार्थांपेक्षा देशी, घरगुती जय हो!
घरीदारी सारखे एसीत बसून अनेक त्वचा विकार, कफ, सर्दी ह्या आजारांत वाढ झाली आहे. ‘डी’ जीवनसत्व उन्हातून मुबलक उपलब्ध होते पण त्याकडे आपण स्त्रिया पाठ फिरवतो अन् डीच्या कमतरतेत चूर होतो पण ह्यासाठी सहजशक्य आहे ते कोवळं ऊन अंगावर घेणे. आताशा अंगण, मैदान संपल्यात जमा. मग काय गच्चीवर चला गप्पा मारत उन्हं खा, त्वचाविकार दूर करा आणि हाडं बळकट करा. ऑस्टीओपोरोसिसला दूर करा. फ्रॅक्चरची धास्ती ठेवू नका अन् हे असे उन्ह घेतांना सैलसर तलम, सुती कपडे घाला. सनस्क्रीन अशावेळी अंगाला चेहर्याला चोळू नका. ‘कोवळे ऊन’ म्हणजे अकरापर्यंतच असणारी सूर्याची किरणे!
बालपणी आई, आज्जी केसांवर तेल चोळीत छान डोके म्हणजे घालून आजच्या भाषेत ‘हेड मसाज’ करून देत म्हणीत, ‘पोरींना खा हे कोवळ ऊन अन् घ्या ऊब भरोनी उद्याची’ त्या उन्हातली आरोग्य धनसंपदा आजवर पुरली आहे.
जंक फूड टाळायलाच हवं. मैदा, सोडा, अॅजिनोमोटो, चायनीज, सॉस, मसालेदार, तेलकट, तिखट पदार्थ आपल्या जेवणात नको. वास्तवात आपला मराठी मेनू हा आयडीयल शाकाहारी आहारात येतो. अगदी माधुरी दीक्षित, करीनापासून अनेकांनी त्यातूनच आपले उत्तम निरोगी व्यक्तिमत्त्व घडवलंय.
मग काय मैत्रिणींनो पास्ता, पिझ्झा, चायनीज चाखूया कधीतरी. अन् रोजच्या नाश्त्यात उप्पीट, अकडपेंन्ड, उपमा, पोहे, धिरड, दहीभात, दलीया, खिचडी अशा अनेकविध पदार्थांना शोधूया, मन:पूर्वक अन् आरोग्याचे धनी करूया स्वत:संगे सर्वांना, जेवणात ‘रेडी टू कुक’ वर भर न देता आपल्या मंडईत असणार्या मोसमी भाज्या-फळांचा मस्त आस्वाद घ्या. ताजी फळम, भाज्या केव्हाही बेस्ट.
मंडई म्हटले की एक सुरसुरी येते. प्रत्येकाने आपल्या बालपणी ह्याची सैर केलेली आहे. ह्या मंडया थोड्या लांबच असतात. त्यामुळे आपोआप आपले चालणे होत. मोकळ्या मंडयांतील अनेकविध रंगरूपांच्या रचलेल्या भाज्यांच्या टोपल्या पाहिल्या ते की गिरकी माराविशी वाटते अन् प्रेमाने खरेदी केलेल्या ह्या भाज्यांच्या, फळांच्या कापाकापीतून स्वादिष्ट स्वयंपाक बनतो अन् रेडी टू कुकला हद्दपार करतो. आता हे थोडे कष्ट घ्यावे लागतात पण त्यातून मिळणारी एनर्जी लाजवाब!
कुटुंबाची काळजी वाहतांना स्वत:साठी आनंदाची छोटी छोटी बेटे शोधा. पूर्वी सर्व सण-व्रतवैकल्ये, हळदी-कुंकू जोरात असत, तेव्हा स्त्रिया एकत्र येत अन् सुख-दु:खाची देवाण-घेवाण करीत. आजही तीच गरज जरा वेगळ्या पद्धतीने पूर्ण होऊ शकते. महिला मंडळ, किटी पार्टी, सहली, लेडीज ओन्ली पर्यटन, परदेश प्रवास, सांस्कृतिक मंडळाचे सदस्य होणे, हास्य क्लब जॉईन करणे, मेंदी काढा, रंगावली, हस्तकला, पाककला ह्यामध्ये चढाओढीने भाग घेणे अशा विविध आविष्कारातून स्त्रीला तिच्या रटाळ, सांसारिक दैनंदिनीतून चार घटका विरंगुळा मिळतो, जो तिच्यातील बालिकेला अवखळ स्पर्श करतो अन् स्त्री नव्याने संसारात झोकून जाते. यासाठीच ही छोटी छोटी आनंद बीजे हुडकून स्वत:च्या आनंदासाठी त्यांचा फेरफटका मारीत तिने स्वत:ला कार्यक्षम बनवावे. कारण आरोग्य हे नेहमी चांगल्या मनात वसते अन् आनंदी मन आनंदाने कालक्रमणा जोमाने करते.
आहार-विहार ह्या जोडीनेच व्यायाम हा कायमच आरोग्याला पूरक ठरलेला आहे. मग ते प्राणायम, योगासने, पोहणे, चालणे, एरोबिक्स, जिम असे काहीही असो. ह्या सर्वांतून तुम्ही तुमच्यातील मीचे लाड पुरविता, त्याला बळकट करता. ब्रह्मविद्येच्या एका पाठात म्हटलंय, ‘आरशातील तुमच्या प्रतिबिंबाशी मैत्र करा अन् म्हणा मी सुदृढ होणार आहे, सुंदर आहे, अधिक काटक होईन वगैरे’ अशा अनेकांतून हे सांगायचा प्रयत्न आहे की, तुमच्या अनारोग्याला हा ‘मी’ जबाबदार असतो. दुसरे कुणी नाही अन् आरोग्यही ह्या ‘मी’तून मिळते म्हणजे आधी तुम्ही स्वत:वर प्रेम करा अन् आपल्या आहार-विहार व्यायामातून फायदे मिळाले तर नुकसान कमी होईल. त्यासाठी स्वत:ची जबाबदारी ओळखा. हे शरीर ही तुमची स्वत:ची व्यक्तिगत संपत्ती आहे, त्याचे संवर्धन करणे हे तुमचे काम असतांना, योग्य ती काळजी न घेताच त्याचा होत असलेला र्हास तुम्ही पाहत राहिलात तर तो त्रास, आजार, व्याधी, दु:ख, वेदना अशा सार्या त्रुटींचा शरीरावर वाढलेला बोजा घेऊनच करावी लागणारी कष्टदायी वाटचाल अटळ आहे. अशी फरफट होऊ नये, कधीतरी अशातून जीवनाचा अंत होऊही शकतो यासाठी स्त्रियांनी आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी नियमित तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करुन घेण्याची स्वत:ला सवय लावावी. अनारोग्य
मर्यादेबाहेर जाण्याआधीच औषध, तज्ज्ञांचा सल्ला, उपचार करुन घेत स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे.
वेळ नाही, कुटुंबात अमूक आहे, ते झाल्यावर मग बघू, स्त्रीला काय होतेय? तिच्या अनारोग्यावर खर्च कशाला अशा सबबीच्या दडपणाखाली बंदीस्त न होता उद्या नव्हे, आज आता ताबडतोब डॉक्टरी सल्ला घ्यावा. इंटरनेटवरच्या माहितीतून स्वत:च स्वत:चे डॉक्टर न होता अन् ऐकीव पॅथीवर तिला सोईचे झाले, खर्च कमी आला. हे, ते अशा ‘मेडीसीन’ नसलेल्या उपचार पद्धतींकडे न वळता हे उपचार माझ्यातील स्त्रीत्वासाठी आहेत अन् ते लगेच अंमलात आणायचे आहेत हा दृढ आग्रह स्वत:वर गाजवीत स्त्रीचे आरोग्य अभिमानाने मिरवावे.
नस आणि निसर्गोपचार पद्धती
ऑफिसात बसून काम करण्याच्या पद्धतीमुळे कंबरदुखी, पाठदुखी, मानेचे दुखणे सुरू होते. त्यावर एखादी जाहिरात पाहून आपण ते बरे होण्यासाठी बाम, जेल वापरतो. पण त्याचा काही उपयोग होत नाही. पुढे जाऊन सर्व्हायकल स्पॉण्डिलिसिस, सर्क्युलर पेन, स्पोर्टस् इन्जुरी, फ्रोजन शोल्डर, मायग्रेन, पोट-पायदुखीसारखी उग्र रूपे धारण करतात. अशा आजारांवर औषधांशिवाय मात करता येते ती नस आणि निसर्गोपचार पद्धतीने. त्यासाठीच्या काही महत्त्वपूर्ण टीप्स
- रोज सकाळी झोपेतून उठल्यावर अनाशेपोटी एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे हळद टाकून ते पिणे.
- रोज किमान एक पेलाभर दूध प्यावे. तसेच वेळेवर नाश्ता आणि जेवण घ्यावे.
- दिवसातून किमान 10 ग्लास तरी पाणी प्यावे. तसेच रात्री झोपण्यापूर्वी 2 ग्लास कोमट पाणी प्यावे.
- शरारीचा भार पेलणारे आपले पाय जास्त थकतात. यासाठी दिवसातून किमान एकदा तरी दोन्ही पाय गरम पाण्यात गुडघाभर बुडतील असे 20 मिनिटे ठेवावेत.
- काम करण्याच्या ठिकाणी आपण ज्या खुर्चीवर बसून काम करू त्यावर आपल्या पायांची मांडणी 90 अंशाप्रमाणे, म्हणजे काटकोनात, असावी.
सर्दी खोकल्यावर उपाय
4 ते 5 लवंगा एक ग्लास पाण्यात उकळून पिण्याने सर्दी खोकल्यावर रामबाण इलाज होतो.
कोलेस्ट्रॉल व हृदयविकार ह्यावर उपाय
50 ग्रॅम चणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी चांगले चावून खाल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची व हृदयविकार उद्भवण्याची शक्यता कमी होते. तसेच हृदय सुदृढ होते.
गरगरल्यासारखे वाटल्यास
10 ग्रॅम अजवानचे फुल, 10 ग्रॅम कापूर व 10 ग्रॅम पुदिन्याची फुले मिसळून उन्हात ठेवून द्यावी. जेणेकरून हे मिश्रण वितळून पाण्याप्रमाणे होईल. ते एका बाटलीत भरून ठेवावे. गरगरल्यासारखे किंवा छातीत धड-धड वाढल्यावर किंवा जीव घाबरा झाल्यावर 4 चमचे पाणी घेऊन ह्या मिश्रणाचे 3 ते 4 थेंब मिसळून प्यायल्याने ताबडतोब आराम मिळतो.
मिठातील आयोडीनची काळजी
मिठाच्या डब्याचे झाकण उघडे ठेवू नये. कारण मिठात आयोडीन नावाचे सत्त्व असते व झाकण नसल्याने हवेशी संपर्कात येऊन ते आयोडीन हवेत विरून जाते. शरीरात आयोडीनची कमतरता झाल्यास थायरॉईड नावाचा आजार होऊ शकतो.
कफासाठी उपाय
कांद्याचा रस व मध मिसळून चाटण्याने कफ दूर होतो. तसेच आतड्यातील हानीकारक द्राव निघून जंतू मरतात.
दूध आणि मधाचे फायदे
एक ग्लास दुधात मध मिसळून रोज रात्री प्यायल्याने दुबळेपणा निघून जातो व शरीर सुडौल, धष्टपुष्ट आणि सुदृढ बनते.