दि. ०५ ऑगस्टला संसदेत ३७० कलम “सुपूर्द ए खाक” झाले आणि अवघ्या भारतवर्षात आनंदाला उधाण आले . सत्तर वर्षे ‘३७०’ च्या जुलमी बेडीत अडकलेल्या काश्मीरने मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली होती आणि सर्वं भारतवासी राष्ट्रोत्सवात सामील झाले होते. झेलम, चिनाब, सिंधू, रावी सारख्या नद्यांनी स्तब्धता सोडून खळखळत वाहणे सुरू केले होते तर टोलेजंग चिनार वृक्षसंपदा आनंदाने मोहरून डौलू लागल्या होत्या, प्रसिद्ध दल सरोवरात तरंगे उठू लागली होती तर खिळलेल्या बोट हाऊस, शिकारा सरोवरात फेरफटका मारण्यास सज्ज होत्या. इनमिन दोनतीन घराण्यांनी आपल्या स्वार्थी आणि कुजक्या राजकारणासाठी देशद्रोही, फुटीरतावाद्यांना गाठीस धरून नंदनवनात नरकसदृश परिस्थिती निर्माण केलेली होती. अखेर ३७० च्या श्रृंखला गळताच गुदमरलेले नंदनवन मोकळा श्वास घेत सोनेरी पहाटेची वाट बघत होते तर धुमसलेले बर्फाचे पहाड आणि उंचसखोल दऱ्याखोऱ्या आपल्या रक्तरंजित इतिहासाला मागे टाकू पाहत होत्या. निश्चितच काश्मीरसाठी आपले सर्वस्व पणाला लावत मोदी सरकारने जे शिवधनुष्य पेलले त्याचे वास्तवात रुपांतर व्हायला नुकतेच आरंभ झाला होता आणि अशातच समाजमन स्तब्ध करणारी एक बातमी धडकली. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्या अकाली निधनाची. खरेतर देश एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होत असताना ही दु:खद बातमी पचवणे अत्यंत कठीण होते. मात्र काळवेळ किती निष्ठूर असते याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
वास्तविकत: सुषमाजी म्हटले की डोळ्यासमोर येते ती म्हणजे त्यांची सोज्ज्वळ परंतु कणखर छबी. उत्तम वक्तृत्व लाभलेल्या सुषमाजींनी मंत्री, कॅबीनेट मंत्री, मुख्यमंत्री असो की विरोधी पक्षनेतेपद;आपल्या दमदार भूमिकेने प्रत्येक पदाला न्याय दिला. आपल्या अमोघ वाणीने त्यांनी अनेक मैदाने गाजवली, मग ते संसद असो की संयुक्त राष्ट्रसंघाची आमसभा. १९९६ ला लोकसभेत सांप्रदायिकतेचा मुद्दा शिगेला पोहोचला होता आणि त्याकाळी एकजात सर्व भाजपाविरोधकांना हिंदुत्त्वाची अॅलर्जी होती. मात्र त्यावेळी सुषमाजींनी लोकसभेत हिंदुत्त्वाची, राष्ट्रवादाची पताका समर्थपणे फडकवत ढोंगी सेक्युलॅरिझमचा बुरखा टराटरा फाडला होता. ‘होय आम्ही सांप्रदायिक आहोत कारण आम्ही वंदेमातरमचा घोष करतो, होय आम्ही सांप्रदायिक आहोत कारण आम्ही राष्ट्रीय ध्वजासाठी पेटून उठतो, होय आम्ही सांप्रदायिक आहोत कारण आम्ही ३७० कलमाचा विरोध करतो आणि जर यालाच विरोधक सांप्रदायिकता म्हणत असतील तर आम्ही सांप्रदायिक आहोत’ असे त्यांनी सर्वांसमक्ष ठणकावून सांगितले होते.
२०१७ ला परराष्ट्रमंत्री असताना सुषमाजींनी युनोच्या आमसभेत पाकिस्तानची केलेली सुपरधुलाई कशीकाय विसरता येईल? ऐन नवरात्रात सुषमाजींनी नवदुर्गेचा अवतार घेत पाकिस्तानी नरराक्षसांवर तुफानी हल्ला चढवत पाकचे दात घशात घातले होते. तत्कालीन पाक पंतप्रधान शाहीद खान अब्बासी यांनी भारतावर चिखलफेक करताच सुषमाजींनी आपल्या ओघवत्या शैलीत समाचार घेतांना पाकला आतंकवाद्यांवर खर्च करण्याऐवजी आम जनतेच्या भल्यासाठी काम करण्याचे सुनावले. दोन्ही देशांची तुलना करताना भारतात डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक तर पाकिस्तानात आतंरराष्ट्रीय दहशतवादी तयार होत असल्याचे नमूद केले होते. भारताने आयआयटी, आयआयएम, एम्स आणि इस्रोसारख्या दर्जेदार संस्था उभ्या केल्या तर पाकने लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन आणि हक्कानी नेटवर्क सारखे दहशतवाद्यांचे अड्डे पोसल्याचे खडसावून सांगितले होते.
सुषमाजींचे यावेळी आवर्जून कौतुक केले गेले कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकची चिरफाड करतांना त्यांनी पक्षीय भेदाभेद बाजूला सारत पूर्वीच्या समस्त सरकारांनी विकासाची कास धरल्याचे सांगितले होते. सोबतच सध्याचे सरकार उज्ज्वला योजना, जनधन योजना, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया सारख्या योजनांद्वारे जनसामान्यांचे हित साधण्यासाठी कटीबद्ध असल्याचेही सांगितले होते. “पाक आमच्याविरूद्ध लढतो मात्र आम्ही गरिबीविरूद्ध लढत असल्याचे” सांगून गरीब, उपेक्षिताना सक्षम करण्याचा सरकारचा इरादा बोलून दाखवला होता.
बेरोजगारी, महिला सम्मान, शरणार्थी, जलवायू प्रदुषण आणि अनेक ज्वलंत विषयाला वाचा फोडत त्यांनी सभागृह मंतरून टाकले होते. सुषमाजींनी पाकला दहशतवादावर बेनकाब करत “लुक हु इज टॉकींग” म्हणत पाकची पुरती बेआबरू केली होती. सिमला करार आणि लाहोर जाहिरनाम्याचा आदर करत पाकला दोघांतील विवाद इतरत्र न उकरण्याची समज दिली होती. संपूर्ण जगताला “गुड टेररीझम, बॅड टेररीझमची” संकल्पना मोडीत काढून सर्वांनी दहशतवादाविरुद्ध एकत्र लढण्याचे कळकळीचे आवाहान त्यांनी केले होते. सुषमाजींचे भाषण जरी “अर्ध्या” तासाचे होते तरी पाकच्या पापाचा पाढा “पूर्ण” वाचण्यात त्या कमालीच्या यशस्वी ठरलेल्या होत्या.
खरोखरच सुषमाजी तुम्ही ह्या जगाचा निरोप घ्यायची जरा घाईच केली. तुमच्यासारख्या कित्येक ज्येष्ठश्रेष्ठांनी आयुष्यभर झटत पक्षासाठी जे अतुल्य योगदान दिले, कठोर परिश्रम घेतले त्याची फळे २०१४ पासून दिसायला लागली आहेत. २०१४ पासून हा देश अनेक अविश्वसनीय आणि ऐतिहासिक घटनांना सामोरे जात आहे, दुर्बल कचखाऊ मानसिकतेतून बाहेर पडत कणखर, साहसी आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. अर्थातच अशा सोनीयाच्या दिनांचे साक्षीदार व्हायला तुम्हाला नक्कीच आवडले असते. नुकतेच ३७० कलम खालसा होऊन धड दोन दिवसही उलटले नाहीत आणि तुम्ही कायमची एक्झिट घेतलीत. “गड आला पण सिंह गेला” अशा दु:खी मानसिकतेतून सावरायला तुमच्या चाहत्यांना वेळ लागेल. मात्र भारतीय समाजकारण आणि राजकारण यातले तुमचे योगदान सहजासहजी विसरता येणार नाही. आधी अटलजी, पर्रिकरजी आणि आता तुमच्या जाण्याने भारतीय राजकारणाची अपरिमित हानी झालेली आहे. प्रखर देशाभिमानी, जाज्वल्य राष्ट्रभक्ती, पक्षासाठी हवी ती जबाबदारी उचलणाऱ्या आणि आदर्श राजकारणी राहिलेल्या सुषमाजींना भावपूर्ण आदरांजली!