आपल्या अगदी जवळच्या माणसाशी आपले काय नाते, असा प्रश्न कुणी विचारला, तर त्याचे उत्तर देणे तसे सोपेच असते. कारण अशी व्यक्ती तुमची आई, बहीण, वडील, भाऊ, मित्र, पत्नी, मैत्रीण, शिक्षक अशापैकी कुणी ना कुणी असू शकते. पण हा प्रश्न इथे थोडा अधिक अडचणीचा आणि कदाचित नसलेल्या उत्तराचा आहे, कारण माझे माध्यमांशी असलेले नाते, ह्या विषयावर मी लिहावे, असे संपादकांनी सुचवले. त्यानंतर मी जसजसा विचार करू लागलो, तसतसा उत्तराकडे जाण्याऐवजी प्रश्नांच्या जाळ्यातच अधिकाधिक गुंतू लागलो.
माध्यम व माझे नक्की नाते तरी काय? ह्याचे सोपे पण सर्वांत फसवे उत्तर हे की, माध्यम आणि माझे व्यावसायिक नाते आहे. वयाच्या विशीलाही पोहोचायच्या आत मी माध्यमांमध्ये काम करू लगलो आणि आता साठी उलटली, तरी माध्यमांशीच माझे नातेसंबंध तितकेच दृढ आहेत. पण म्हणून माध्यमांचे आणि माझे केवळ व्यावसायिक नाते आहे का? तसे म्हणणे ही स्वत:ची व असंख्य वाचकांची फसवणूक केल्यासारखे होईल. मी व्यावसायिक पत्रकार असल्याने माध्यमे हे माझे व्यावसायिक साधन आहे, हे खरे. पण ते माझे खरे नाते आहे का? तसे असते, तर त्याची मर्यादा केवळ व्यवसायाचे व पर्यायाने उपजीविकेचे साधन इतकीच उरली असती. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही.
खरे तर पदव्युत्तर पदवी व नंतर डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय म्हणून पत्रकारितेच्या पलीकडील अनेक दालने मोकळी झाली होती. त्यामध्ये महिनाकाठी मिळणारी मिळकत कित्येक पटीने अधिक होती. पत्रकारितेत मान-सन्मान व थोरामोठ्यांबरोबर ऊठबस होत होती; वर्तमानपत्रांत नाव व नंतर टीव्हीवर चेहरा झळकत राहिल्याने लोक ओळखत होते; बाजारापासून लग्नसमारंभांपर्यंत सर्वत्र अनोळखी लोक ओळखीचे स्मित करत होते. अलीकडे सेल्फीवर फोटोही काढून घेत होते, हे खरे. पण माध्यमांत काम करताना जी दमछाक होत होती, त्याच्या बदलात पदरात फारसे काही पडत नव्हते, हेही खरेच. लग्न झाल्यानंतर मध्यमवर्गीय माणसांकडून संसाराच्या ज्या किमान अपेक्षा असतात, त्याही पुर्या करणे कठीण नव्हे, बहुधा अशक्यच होत होते. व्यवसायाच्या वेळांच्या गणिताची संसाराच्या कोष्टकाबरोबर जुळवणी करण्यात दमछाक होत होती. ही केवळ माझीच नव्हे, तर माध्यमांत काम करणार्या बहुतेकांची स्थिती तेव्हा होती व आजही आहे. तरीही मी स्वत: व माझ्या बरोबरीचे, आधीचे व नंतरचेही अनेक जण याच व्यवसायात टिकून राहिले व यापुढेही राहतील.
ह्याचे कारण हेच की, माध्यमांशी आमचे नाते प्रेमाचे आहेच, शिवाय आम्ही आमचे अस्तित्वच माध्यमांशी जोडून टाकले आहे. ‘तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे’, तशी आमची अवस्था आहे. कोळीष्टकात सापडलेल्या किड्यांचे बारकाईने निरीक्षण करा, तलम पण चिवट तंतूंनी कोळ्याने विणलेल्या जाळ्यात अडकलेला किडा स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी परोपारीने प्रयत्न करतो. पण तो जितके प्रयत्न करतो, तितका तो त्याच जाळ्यात अधिकाधिक गुरफटतच जातो. माध्यमांच्या तलम पण चिवट व मजबूत जाळ्यात स्वत:हून अडकून घेतलेल्या आम्हा पत्रकारांचे तसेच आहे. फरक इतकाच की, कोळ्याच्या जाळ्यात अडकलेला किडा किमान स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करतो. आमचा प्रयत्न मात्र गुरफटून राहण्याचाच असतो. कारण त्या गुरफटण्याची ऊबच आम्हाला हवीहवीशी वाटत राहते.
मग प्रश्न हा निर्माण होतो की, माध्यमांनी मला व माझ्यासारख्या अन्य पत्रकारांना दिले तरी काय? तर माध्यमांतील अस्तित्वामुळेच माझ्रासारख्याच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त झाला. माझ्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत मी लिहिले की, मी पत्रकार नसतो, तर काय असतो, तर एक भणंग असतो. कारण जीवनात अनेक पेशांमध्ये अनेक माणसे काम करत असतात. त्यांचे जगणे व काम करणे ह्याकडे जेव्हा मी निरखून पाहतो, तेव्हा हे ध्यानात येते की, ह्यापैकी एकही गोष्ट मी करू शकलो नसतो व केली असती, तर मी स्वत:ला व माझ्या पेशाला किमान न्यायही देऊ शकलो नसतो. त्यामुळे मी पत्रकार झालो व माध्यमांशीच माझा नातेसंबंध निर्माण झाला, हेच चांगले झाले.
माध्यमांनी माझ्या जीवनाला रंगरूप व अर्थ तर दिलाच, शिवाय मला जगण्याची उर्मी व हुरूपही दिला. आमचे अनेक शिक्षक व प्राध्यापक मी जवळून पाहिले. एकच थिअरी वर्षानुवर्षे तश्शीच शिकवून ह्या मंडळींना कंटाळा कसा येत नाही, ह्याचे मला आजही आश्चर्यच वाटत आले. बँकेतल्या अधिकार्यांना तीच ती लेजर बुक वर्षानुवर्षे तशीच हाताळताना पाहून मलाच त्यांची कीव करावीशी वाटते. येणार्या प्रत्येक नव्या राज्यकर्त्यासमोर लवून उभे राहताना मोठ्या हुद्दयांवरील सरकारी अधिकार्यांना स्वत:चीच लाज कशी वाटत नाही, ह्याचा विचार मी आजही करत राहतो. कामगार, कर्मचारी, शेतकरी, उद्योगपती ह्या सर्वांनाच कधी ना कधी आपल्या कामाचा कंटाळा येतच असणार. पत्रकार म्हणून माध्यमात काम करताना अनेकदा त्रास झाला, संकटे आली, कधी जीवावरही बेतले. कधीही माध्यमांशी नाते तोडावे असे मात्र वाटलेच नाही. ही महत्ता माध्यमांचीच.
भाग्याची बाब अशी की, सर्व प्रकारच्या माध्यमांत काम करण्याची पुरेपूर संधी माझ्याकडे आली. अशा संधींचा मी पुरेपूर वापरही करून घेतला. त्यामुळे आनंद तर मिळालाच, शिवाय जीवन समृद्ध झाले. मराठी व इंग्रजी पत्रकारिता, देश व विदेशात काम करण्याचा अनुभव आणि वृत्तपत्र, रेडिओ व टेलिव्हिजनमध्येही प्रवेश असे सारे काही करता आले. शिवाय वार्ताहर पदापासून इंग्रजी व मराठी वृत्तपत्रांचे संपादक होण्याचेही भाग्य लाभले. ह्या सार्यामुळे माझा माध्यमांवर व माध्यमांचा माझ्यावर लोभ जडला. तो आजही कायम आहे.
हे करताना माध्यमांमध्ये झालेले व सतत होत राहिलेले बदल मी व माझी पिढी पाहतच होती. वृत्तपत्रांच्या तांत्रिक अंगांत कमालीचे बदल झाले. लाईनो टाइपसेटिंगपासून कम्प्युटरच्या युगात वर्तमानपत्रे प्रवेश करताना पाहता आले. पत्रकारसुद्धा कार्यालयांत थेट कम्प्युटरवर बातम्या, लेख, अग्रलेख लिहिताना बघितले. पाने थेट संपादकीय विभागातच तयार होऊ लागली. वर्तमानपत्रांच्या डझनभर आवृत्त्या निघू लागल्या. वर्तमानपत्रांची पाने रंगीत झाली. टेलिव्हिजनसुद्धा बदलत गेला. आधी केवळ सरकारी ‘दूरदर्शन’ होते. नंतर खासगी चॅनेल्स आली. प्रसारण डिजिटल झाले. घराघरावर डौलाने फडकणार्या टीव्ही अँटेनांच्या जागा डीशने घेतल्या. टीव्हीही रंगीत झाला. परदेशी चॅनेल्स घराघरात दिसायला लागली. थोडक्यात बातम्यांचे ‘स्फोट’ होऊ लागले. त्याचा परिणाम म्हणून माणसे ‘शहाणी’ झाली. पूर्वी आम्ही पत्रकार म्हणून वाचकांना/प्रेक्षकांना जे सांगू त्यावर ते निमूटपणे विश्वास ठेवत होते. ते आता प्रश्न विचारू लागले, संशय घेऊ लागले व निषेधही करू लागले. त्यामुळे माध्यमेही जागृत झाली. इंटरनेटचा जन्म झाला आणि छापील वृत्तपत्रांना नवा शत्रूच आला. आता माध्यमांमध्ये तीन भावंडे आहेत. वृत्तपत्र, टीव्ही व इंटरनेट. लवकरच केवळ बातम्यांना वाहिलेली एफएम रेडिओ स्टेशन्स निघतील, असे म्हटले जाते. ते खरे ठरले, तर माहितीचा पूर घराघरात पसरेल.
ह्या बदलत्या स्थितीत नव्या पिढीचे नवे दमदार पत्रकार काम करू लागतील. आजही इंजीनियर, डॉक्टर्स, एमबीए झालेले अनेक पत्रकार कार्यरत आहेत. पुढे हे प्रमाण वाढेल. त्यामुळे माध्यमांची बौद्धिक सुबत्ताही वाढेल. कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपन्यातील मॅनेजर्सना मिळतात, तितके पगार आजच अनेक पत्रकारांना मिळू लागले आहेत. त्यातही वाढ होईल.
प्रश्न हा आहे की, हे सारे होताना माध्यमांची जनतेशी असलेली नाळ तर तुटणार नाही? माध्यमांचे व्यापारीकरण झालेच आहे. ते अपरिहार्यच आहे, कारण वृत्तपत्र, टीव्ही चॅनेल्स चालवायची तर खूप मोठे भांडवल लागते. ते आणण्यासाठी भांडवलदार लागतात. त्यांची वृत्ती व्यापारीच असणार. पण व्यापारी वृत्तीने वागताना माध्यमे आपल्या मूळ धर्मालाच विसरली तर? तशी लक्षणे आताच दिसू लागली आहेत. तसे झालेच, तर मात्र अनर्थ होईल. कारण माध्यमे म्हणजे जनता आणि सरकार, जनता आणि भांडवलदार ह्यांच्यातील दुवा. हा दुवा जर तुटला, तर समाजातील संवादच नष्ट होईल. असा संवाद तुटतो, तेव्हा एक तर अनाचार माजतो किंवा संताप, निषेध व त्यामागोमाग हिंसाचार पेटतो. त्याची अपरिहार्य परिणती सर्वनाशात होते.
दुर्दैवाने तसे झाले, तर त्यात माध्यमांचा र्हास तर होणारच, पण त्याबरोबर माध्यमांवरच ज्यांचे अस्तित्व अवलंबून आहे, त्या पत्रकारांच्याही अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण होईल.
शेवटी पुन्हा मूळ प्रश्नाकडे! माझे माध्यमांशी काय नाते? ह्याचे उत्तर एकच, आम्ही एकरूप आहोत. आता नाते शोधण्यासाठी आम्हाला वेगळे करता येणार नाही. आत्मा व परमात्मा यांचा एकमेकांशी काय संबंध? प्राण आणि शरीर यांचे काय नाते? झाड आणि त्याची पाने यांचे काय नाते? तेच नाते आम्हा पत्रकारांचे माध्यमांशी!
भारतकुमार राऊत
(पूर्व प्रसिद्ध एप्रिल 2016, ऋतुगंध मासिक)