गेल्या काही वर्षांत घडणाऱ्या घटनांमुळे माझा ‘नजर लागणे’ ह्या विषयावर अधिकाधिक विश्वास बसत चालला आहे. अर्थात, तो माझ्या आयुष्यापुरता मर्यादित आहे. कोणी त्यावर विश्वास ठेवावा; नाही ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. राशीचक्रकार शरद उपाध्ये याबाबद नेहमी एक उदाहरण देतात. नजर लागतेच, तुमच्या तोंडाकडे सतत एकटक कोणी बघत बसलं तर तुम्हाला आवडेल का? कोणीतरी आपल्याकडे बघतंय ही कल्पना सुखावह असली तरी “कोणीतरी” आणि कोणीही बघत बसणे यात मात्र फरक आहे. यात बघणाऱ्याची नजर कशी हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. अगदी १ टक्का किंवा त्याहून कमी लोक अगदी मनापासून आनंदात असतात तुमच्यासाठी; हे सत्य आहे. काही तटस्थ असतात तर काही जळतात आणि काही आपला सत्यानाश होवो यासाठी तांत्रिक विद्येचा वापरदेखील करतात. हे विज्ञानाला धरून नाही यात वाद नाही. पण “अनुभव” लोकांना विज्ञान विसरायला भाग पाडतो.
मी मध्यंतरी माझ्या बाळाचा फोटो फेबुवर टाकला. अनेक लोकांनी ‘नजर लागेल, फोटो रीमूव्ह कर’ असे मेसेज केले. याचा अर्थ त्यांनाही नजर लागण्याचा अनुभव आलेला असणार यात शंका नाही. मला तर असे अनेक अनुभव आहेत. आपल्यालाही असतीलच. ते अनुभव मांडत बसत नाही. उपाय काय केला ते सांगतो. पूर्वी कोणतीही गोष्ट करताना मी सगळ्यांशी डिस्कशन करत बसे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला मी काय करू हा प्रश्न विचारत असे. भेटणारा प्रत्येक जण मला त्यांच्या विचार करण्याची क्षमतेप्रमाणे मार्ग दाखवत. परिणामी मार्ग मिळणे सोडाच पण प्रश्न अधिक जटिल बनत असे. चर्चा सुरूच राहिल्या. एकही काम होईनासे झाले. प्रश्न, उत्तर आणि उत्तरातून निर्माण झालेले प्रश्न. चक्र फिरत राहिले. मग माझ्या आयुष्यात आलं “द सिक्रेट”. ते “लॉ ऑफ अट्रॅक्शन” वालं नाही बरं का!
एक प्रयोग माझा मीच करून बघितला. ठरवून टाकलं काय वाट्टेल ते झालं तरी लोकांना आपण काय करतोय याची कानोकान खबर लागली नाही पाहिजे. पूर्णपणे सिक्रेट ठेऊन कामं करायची आणि त्याचा परिणाम लगेच जाणवला. काम अडथळे न येता पूर्ण झालं. डोक्यात पेटलेली “द सिक्रेटची” ट्यूब काम करत होती. पुढे हा छंदच लागला. करत असलेलं एकही काम कोणाला न सांगता करायला लागलो अगदी गुपचूप. त्या प्रमाणे त्याचे रिझल्ट मिळायला लागले. अजूनही तोच कित्ता गिरवत आहे. कोणालाच सांगत नाही का मी ?? अजिबात नाही; सांगतो जरूर, पण कोणाला? ज्याची खरोखर आपल्याला “त्या” विशिष्ठ कामात गरज लागणार आहे फक्त त्याला आणि त्यालाच. त्याची मदत सुद्धा तो कोणाला सांगणार नाही ह्या अटीवरंच! इतकी कमालीची गुप्तता मी बाळगतो.
जसा फायदा आहे तसं थोडं नुकसानही झेलावं लागतं. जे मी झेललं. आम्हाला काही न सांगता करतो ही घरीच्यांची ओरड खावी लागली. मध्यंतरी पाच दिवस गायब होतो. कुठे होतो, काय करत होतो कोणाला माहिती नाही. अगदी खास लोकांनाही माहिती नाही. प्रत्येकाला वेगवेगळी कारणं आणि ठिकाणं सांगितली. काम निर्विघ्नपणे पार पडलं. पण खोटं बोलण्याचा शिक्का बसला. अजून एक महत्त्वाचे नुकसान म्हणजे हे द सिक्रेट सांगण्यासाठी “चुकीच्या” व्यक्तीची निवड. यात मी अनेक वेळा फसलो आहे. आपण करत असलेलं हे “गुप्त” काम त्या व्यक्तीला तो योग्य मदत करेल म्हणून सांगावं आणि त्याने प्रत्येकाला जाऊन ते सांगावं. पुढे आपल्या कामात माशी शिंकावी. माझ्या बाबतीत हे कैकवेळा घडलेले आहे. करत असलेल्या कामाचा गाजावाजा झाला की काम लटकलंच म्हणून समजा.
एकंदरीत माझ्या कामापासून ते खाजगी आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टीचा गाजावाजा झाला की ते काम होत नाही असा एकंदरीत अनुभव आहे. ‘आम्हाला का सांगत नाही’ याचं हे एकमेव कारण आहे. हा अनुभव मला नातेसंबंधातपण आला. माझ्या ओळखीतलं जे जे कपल त्यांच्या रिलेशनशिपचा गाजावाजा करत होते त्यांचं लग्न शेवटी भलत्याच व्यक्तीशी झालेलं मी बघितलं आहे. याला मी स्वतःही अपवाद नाही. हे रिलेशनशिपपुरतं मर्यादित नाही यात मैत्रीसुद्धा आहे. बेस्ट फ्रेंड फॉरेवर वगैरे सतत मिरवणारे एकमेकांचं तोंडसुद्धा आता बघत नाहीयेत. ह्या उलट, ज्यांना हे लिहायची बोलायची आवश्यकता भासत नाही त्यांची दोस्ती मजबूत आहे आणि टिकूनही आहे. ह्या द सिक्रेटच्या फंडामध्ये एक पथ्य मात्र पाळावं लागतं, ते म्हणजे करत असलेलं काम हे आपल्या, आपल्या कुटुंबाच्या किंवा अजून कोणाच्याही भल्याचंच असलं पाहिजे. कमालीची गुप्तता बाळगून जर कोणाचं नुकसान करत असाल किंवा वाईट हेतू असेल तर सिक्रेटच्या नियमानुसार ते होईलच पण भविष्यात तुमचं डबल नुकसान होईल हे लक्षात ठेवावं.
असो, अर्धं आयुष्य संपल्यावर मला हा साक्षात्कार झालाय खरा. त्यामुळे “तुझं सध्या काय चाललंय” ह्या प्रश्नाचं मी दिलेलं उत्तर प्रत्यक्ष वस्तुस्थितीला धरून असेलच असं नाही. सांगायचा मुद्दा एवढाच ‘तू फक्त लढ म्हण, विश्वास ठेव माझ्यावर आणि माझ्या द सिक्रेटवर”