संगीत नाटक किंवा नाट्यसंगीत म्हटले की आजही भल्याभल्यांचे कान टवकारले जातात आणि अंतरात्मा आसनमांडी घालून श्रवणाला बसतो. ललितकलांचे दालन समृद्ध करणाऱ्या ह्या नाट्य आणि संगीतप्रकाराची खासियत देखील तशीच आहे. मात्र आजकाल होतेय काय की, ह्या ललितकलेमध्ये पूर्णवेळ झोकून देत; तिची आकंठ साधना करायला फारजण उत्सुक नसतात. कारण देखील तसेच आहे, वर्षानुवर्षं करावी लागणारी निरपेक्ष साधना!त्यामुळे रियालिटी शोपुरती एखाद दोन नाट्यपदे घोटूनघोटून बसवायची आणि हमखास वाहव्वा मिळवून सुखी व्हायचे; असे प्रकार सर्रास दिसू लागले आहेत. अशा सर्वं पार्श्वभूमीवर अनुप बापट ह्या उमद्या गायकनटाची साधना खरोखरच डोळ्यांत भरते.
मूळ रत्नागिरीतील असलेल्या अनुपचे उच्चशिक्षण सुद्धा अमेरिकेत सुरू आहे. पण तिथे देखील संधी मिळताच तो आपली कला पेश करून रासिकांची वाहव्वा मिळवतो आहे.
अनुप सांगतो की, ‘माझ्या घरातच गाणं आहे. माझे पणजोबा यशवंतराव पटवर्धन ह्यांच्या नावाने रत्नागिरीत संगीत अकादमी सुरू आहे आणि तिथे संगीतोपासकांना शिस्तबद्ध शिक्षण दिलं जातं.आजोबा विजयराव पटवर्धन ह्यांना दैवी आवाज लाभलेला होता आणि सं.सौभद्र,सं.संशयकल्लोळ ह्यांसारख्या अनेक संगीत नाटकांमधून आपली गायकी आणि अभिनय सादर केलेला आहे. आई संगीता पटवर्धन-बापट आणि मावशी मंजिरी धोपेश्वरकर ह्यांचेही आवाज अतिशय धारदार आणि घरंदाज.धाकटा भाऊ पार्थ तबला वादनाचे प्रशिक्षण घेतोय तर बाबा भालचंद्र बापट, आजी पद्मजा बापट, आजोबा बाळकृष्ण बापट आणि आजी(आईची आई) भाग्यश्री पटवर्धन ह्यांचे अखंड पाठबळ. माझ्या लहानपणा पासूनच घरात आईचे संगीतवर्ग चालत. त्यामुळे सातत्याने कानांवर संगीत पडे. आज मी जो काही इथवर पोहोचलोय, ते तिच्याचमुळे! एकदा मी काहीतरी गुणगुणत असतांना आईने ऐकले आणि माझा संगीताभ्यास सुरू झाला. संगीत मंदारमाला ह्या नाटकांतील ‘तान बलवान’ हे मालकंस रागातील नाट्यपद आईने नीट सराव करवून बसवून घेतले होते. एका कार्यक्रमात ते सादर केले आणि रसिकांची भरभरून दाद मिळाली. कृष्णजन्माष्टमीच्या आमच्या घरगुती कार्यक्रमात ‘श्रीरंगा कमलाकांता’ हे पद माझ्याकडून हटकून गाऊन घेतले जाऊ लागले. ह्यानंतर सौ.मृणाल परांजपे, सौ.मुग्धा भट-सामंत ह्यांच्याकडे माझे शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू झाले. त्यांनी माझी संगीताची बैठक पक्की करून घेतली आणि शास्त्रीय संगीताच्या विविध अंगाउपांगांचा नीट सराव करवून घेतला.’
आजच्या रियालिटी शोमध्ये सादर केल्या जाणाऱ्या नाट्यसंगीताबद्दल अनुपला छेडले असता तो म्हणतो की, ‘हा महासागर आहे. दोन गाणी गिरवून तो कवेत येणारा नाही. अशा प्रकारांनी मिळणारी प्रसिद्धी अल्पजीवी आहे. आपण जे पेश करतो ते आपल्याला आणि श्रोत्यांना पूर्ण समाधान देतं का, ह्याचा गायकाने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. आमच्या मुग्धा मॅडम नेहमी सांगतात की, तीन साडेतीन मिनिटांच्या गाण्याने तुमचे समाधान होऊ देऊ नका. ह्या शिकवणुकीच्या संस्कारांमुळेच घडले असेल बहुतेक पण बंगलोर येथील एका कार्यक्रमात पं.विष्णुदास भावे ह्यांच्या नात श्रीमती श्यामल भावे ह्यांनी मला ‘अनुनादश्री’ह्या उपाधीने गौरविले. तर ऑल इंडिया रेडिओचा राष्ट्रीय स्तरावरील नाट्यसंगीत विशेष पुरस्कार देखील प्राप्त झाला. दादर माटुंगा कल्चरल सेंटरची स्कॉलरशिपसुद्धा मला मिळाली आहे. साडेतीन मिनिटांच्या गाण्याने समाधान न मानण्याच्या वृत्तीमुळेच हे यश पदरात पडलंय असं माझं प्रामाणिक मत आहे.’
संगीत रंगभूमीवर गायक नट म्हणून अनुपला प्रेक्षकांनी भरपूर दाद दिलीच पण त्याच्या अभिनयावर पुरस्काराची मोहोरसुद्धा उमटली आहे. आपल्या ह्या प्रवासाविषयी बोलताना तो म्हणाला की, ‘माझं इंजिनीअरिंगचं शेवटचं वर्षं सुरू होतं. त्याचवेळी रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंचच्या श्री.मिलींद टिकेकरांनी स्वयंवर मधील कृष्णच्या भूमिकेबद्दल विचारले आणि मी तात्काळ होकार दिला! रंगमंचावर गायकनट म्हणून प्रथमच उभा राहणार असल्याने दडपण होतेच. पण दिग्दर्शक संजय गणपुले, विनीत घाणेकर, किशोर साठे, दादा ऊर्फ सुनील वणजु, छाया दामले, उदय गोखले ह्यांच्यासारख्या मंडळींनी मोलाचे मार्गदर्शन केले. असंख्य नाटकांचे संगीतदिग्दर्शन आणि ऑर्गनसाथ करणारे विलास हर्षे ह्यांच्यासारख्या मातबर कलाप्रेमीचा सहवास लाभला. संगीत आणि अभिनय, ह्या दोन्हीची सुंदर जाण असलेला हा कलासेवक! ह्या सर्वांमुळे रंगमंचावरील माझा वावर सहज होत गेला. माझ्या मावशीचे यजमान सचिन धोपेश्वरकर ह्यांनी देखील वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन केले.
ह्या सर्वाचा परिणाम असा झाला की, माझा कृष्ण सर्वाना भावला. मोठी माणसं लहान मुलांना ‘कृष्ण बाप्पा’म्हणून मला दाखवू लागली. आमच्या स्वयंवर, स्वरसम्राज्ञीने प्रथम तर सुवर्णतुलाने राज्य नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. अखिल भारतीय नाट्यपरिषदेने पं.खाडिलकर पुरस्कार देऊन माझ्या अभिनयाला गौरविले. ह्या सर्वामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढायला मदत झाली.
अमेरिकेला प्रस्थान करण्यापूर्वी चारच दिवस आधी संपादित संगीत मानापमानमधील धैर्यधराची भूमिका करण्याची संधी मला मिळाली. पूर्वा पेठे, हेरंब जोगळेकर, श्वेता जोगळेकर, उदय गोखले, महेंद्र पाटणकर, विलास हर्षे ह्यांच्या सहयोगाने संक्षिप्त मानापमानचा हा अनोखा प्रयोग आम्ही सादर केला. चार पात्रांनी २७ गाण्यांसह सादर केलेल्या ह्या नाटकाला रत्नागिरीकर रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यामुळे गायकनट म्हणून मला देखील उत्साह मिळाला.’
अनुप अतिशय नाम्रपणे सांगतो की, ‘नाट्यसंगीताने गाणं जगावं कसं ते मला शिकवलं. नाट्यसंगीत हे कर्कश गायलं जातं आणि ते भावनाशून्य असतं, असं म्हटलं जातं. पण ह्या संगीतप्रकारासारखं भावगीत जगात कुठे शोधून सापडणार नाही, असं माझं मत आहे. नाट्यसंगीतामुळे कथानक प्रवाही राहतं आणि कलाकारालासुद्धा आपल्यातील भल्याबुऱ्याची सुयोग्य जाणीव होते.’
अमेरिकेसारख्या देशात इंजिनीअरिंगचे उच्चशिक्षण घेत असतांना संगीत आणि अभिनयाच्या सरावाबद्दल बोलतांना अनुप म्हणाला की, ‘मला नक्कीच सांगायला अभिमान वाटतो की, इथले महाराष्ट्र मंडळ आपली कलापरंपरा जीवापाड जपते आहे. डेट्रॉइटच्या महाराष्ट्र मंडळाचा मी अलीकडेच समितीसदस्य झालेलो आहे. इथे साहित्य संगीतकलाविषयक अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. अमित देशपांडे, मंडळाचे माजी अध्यक्ष सतीश डोंगरे, विद्यमान अध्यक्ष सौ. अनघा हुप्रिकर आणि अन्य सर्वच समिती सदस्य अनमोल मार्गदर्शन करतात. हेमंत बाबतीवाले हे इथे तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण देतात. त्यांच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात मला कला सादर करण्याची संधी मिळाली. संगीताचे कार्यक्रम इथेसुद्धा सुरू आहेत. माझ्या परीने आपल्या संगीताचा इथे जेवढा प्रसार करणे शक्य आहे, तेवढे मी करणारच. माझ्या अभ्यासाच्या शेड्यूलमधून माझ्या रियाजासाठी खास वेळ राखीव असतो. आमच्या घरासमोरील लीजिंग ऑफिसमध्ये मनमोकळा रियाज करता येतो.’
आजकाल संगीत नाटकांना हवा तसा प्रेक्षकवर्ग मिळत नाही, असे महटल्यावर अनुप आपली नाराजी प्रकट करत म्हणतो की, ‘असं अजिबात नाही. रत्नागिरीमध्ये होणाऱ्या संगीत नाटकांचे सर्वच प्रयोग हाउसफुल होतात. व्यक्तिरेखेबरहुकुम पात्रसंयोजन, नाटक श्रवणीय असण्यासोबत प्रेक्षणीय करण्याकडे लक्ष्य देणे, आवश्यक ते प्रभावी नेपथ्य, वेळ मर्यादा, समाजमाध्यमांवर योग्य प्रसिद्धी केली गेली; तर संगीत नाटकांना भरभरून प्रेक्षकवर्ग मिळायला काहीच अडचण नाही.’ इंटरनेटमुळे संगीत स्वस्त झालेले नसून, ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला मदत झालेली आहे, असं ठामपणे सांगणारा अनुप भावप्रधान गायकीमध्ये स्व:प्रेरणेने काही प्रयोगसुद्धा करत आहे.
रियालिटी शोमध्ये आपण कधी जावं असं वाटलं नाही का, असं छेडल्यावर तो म्हणाला की, ‘जेव्हा संधी होत्या तेव्हा मला वयोमर्यादेमुळे जाता आले नाही. नंतर चिरंजीव शास्त्रीय संगीताचा ओढा लागला आणि मीच अशा शोंपासून दूर राहिलो.’ आजकाल गरजेपुरते वेळ मारून नेण्यासाठी अनेक गायक नाट्यपदे घोकून तयार करतात. ह्याबद्दल अनुप नाराजी व्यक्त करताना म्हणतो की, ‘ही पदे अभ्यासाचा विषय आहेत. त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. स्वयंवर, मानापमानसारख्या नाटकातील पदे एकदा का कष्टाने गळ्यावर कोरली की, ती आयुष्यभर रत्नहार बनून राहतात. हे लक्ष्यात घ्यायला हवं.’
आपल्या भावी वाटचालीबद्दल बोलतांना अनुप उत्साहाने सांगतो की, ‘उच्चशिक्षण पूर्ण झाल्यावर शास्त्रीय संगीत आणि संगीत रंगभूमीची सेवा करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. संगीत आणि संगीत रंगभूमीची सेवा करायची आहे. स्वतःची नाटक कंपनी स्थापन करून नव्या दमाच्या कलाकारांमार्फत पुन्हा संगीत नाटके रंगभूमीवर आणायची आहेत आणि रसिकांना पुन्हा गंधर्वकाळाची अनुभूती करवून द्यायची आहे.’
नाट्यसंगीत आणि संगीत नाटकांचा ठेवा जीवापाड जपला जावा, ही संस्कृती नवनव्या पिढीकडे प्रवाही राहावी म्हणून; मनापासून प्रयत्नरत झालेल्या ह्या नव्या दमाच्या कलाकाराला अनंत शुभेच्छा!
मूळ रत्नागिरीतील असलेल्या अनुपचे उच्चशिक्षण सुद्धा अमेरिकेत सुरू आहे. पण तिथे देखील संधी मिळताच तो आपली कला पेश करून रासिकांची वाहव्वा मिळवतो आहे.
अनुप सांगतो की, ‘माझ्या घरातच गाणं आहे. माझे पणजोबा यशवंतराव पटवर्धन ह्यांच्या नावाने रत्नागिरीत संगीत अकादमी सुरू आहे आणि तिथे संगीतोपासकांना शिस्तबद्ध शिक्षण दिलं जातं.आजोबा विजयराव पटवर्धन ह्यांना दैवी आवाज लाभलेला होता आणि सं.सौभद्र,सं.संशयकल्लोळ ह्यांसारख्या अनेक संगीत नाटकांमधून आपली गायकी आणि अभिनय सादर केलेला आहे. आई संगीता पटवर्धन-बापट आणि मावशी मंजिरी धोपेश्वरकर ह्यांचेही आवाज अतिशय धारदार आणि घरंदाज.धाकटा भाऊ पार्थ तबला वादनाचे प्रशिक्षण घेतोय तर बाबा भालचंद्र बापट, आजी पद्मजा बापट, आजोबा बाळकृष्ण बापट आणि आजी(आईची आई) भाग्यश्री पटवर्धन ह्यांचे अखंड पाठबळ. माझ्या लहानपणा पासूनच घरात आईचे संगीतवर्ग चालत. त्यामुळे सातत्याने कानांवर संगीत पडे. आज मी जो काही इथवर पोहोचलोय, ते तिच्याचमुळे! एकदा मी काहीतरी गुणगुणत असतांना आईने ऐकले आणि माझा संगीताभ्यास सुरू झाला. संगीत मंदारमाला ह्या नाटकांतील ‘तान बलवान’ हे मालकंस रागातील नाट्यपद आईने नीट सराव करवून बसवून घेतले होते. एका कार्यक्रमात ते सादर केले आणि रसिकांची भरभरून दाद मिळाली. कृष्णजन्माष्टमीच्या आमच्या घरगुती कार्यक्रमात ‘श्रीरंगा कमलाकांता’ हे पद माझ्याकडून हटकून गाऊन घेतले जाऊ लागले. ह्यानंतर सौ.मृणाल परांजपे, सौ.मुग्धा भट-सामंत ह्यांच्याकडे माझे शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू झाले. त्यांनी माझी संगीताची बैठक पक्की करून घेतली आणि शास्त्रीय संगीताच्या विविध अंगाउपांगांचा नीट सराव करवून घेतला.’
आजच्या रियालिटी शोमध्ये सादर केल्या जाणाऱ्या नाट्यसंगीताबद्दल अनुपला छेडले असता तो म्हणतो की, ‘हा महासागर आहे. दोन गाणी गिरवून तो कवेत येणारा नाही. अशा प्रकारांनी मिळणारी प्रसिद्धी अल्पजीवी आहे. आपण जे पेश करतो ते आपल्याला आणि श्रोत्यांना पूर्ण समाधान देतं का, ह्याचा गायकाने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. आमच्या मुग्धा मॅडम नेहमी सांगतात की, तीन साडेतीन मिनिटांच्या गाण्याने तुमचे समाधान होऊ देऊ नका. ह्या शिकवणुकीच्या संस्कारांमुळेच घडले असेल बहुतेक पण बंगलोर येथील एका कार्यक्रमात पं.विष्णुदास भावे ह्यांच्या नात श्रीमती श्यामल भावे ह्यांनी मला ‘अनुनादश्री’ह्या उपाधीने गौरविले. तर ऑल इंडिया रेडिओचा राष्ट्रीय स्तरावरील नाट्यसंगीत विशेष पुरस्कार देखील प्राप्त झाला. दादर माटुंगा कल्चरल सेंटरची स्कॉलरशिपसुद्धा मला मिळाली आहे. साडेतीन मिनिटांच्या गाण्याने समाधान न मानण्याच्या वृत्तीमुळेच हे यश पदरात पडलंय असं माझं प्रामाणिक मत आहे.’
संगीत रंगभूमीवर गायक नट म्हणून अनुपला प्रेक्षकांनी भरपूर दाद दिलीच पण त्याच्या अभिनयावर पुरस्काराची मोहोरसुद्धा उमटली आहे. आपल्या ह्या प्रवासाविषयी बोलताना तो म्हणाला की, ‘माझं इंजिनीअरिंगचं शेवटचं वर्षं सुरू होतं. त्याचवेळी रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंचच्या श्री.मिलींद टिकेकरांनी स्वयंवर मधील कृष्णच्या भूमिकेबद्दल विचारले आणि मी तात्काळ होकार दिला! रंगमंचावर गायकनट म्हणून प्रथमच उभा राहणार असल्याने दडपण होतेच. पण दिग्दर्शक संजय गणपुले, विनीत घाणेकर, किशोर साठे, दादा ऊर्फ सुनील वणजु, छाया दामले, उदय गोखले ह्यांच्यासारख्या मंडळींनी मोलाचे मार्गदर्शन केले. असंख्य नाटकांचे संगीतदिग्दर्शन आणि ऑर्गनसाथ करणारे विलास हर्षे ह्यांच्यासारख्या मातबर कलाप्रेमीचा सहवास लाभला. संगीत आणि अभिनय, ह्या दोन्हीची सुंदर जाण असलेला हा कलासेवक! ह्या सर्वांमुळे रंगमंचावरील माझा वावर सहज होत गेला. माझ्या मावशीचे यजमान सचिन धोपेश्वरकर ह्यांनी देखील वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन केले.
ह्या सर्वाचा परिणाम असा झाला की, माझा कृष्ण सर्वाना भावला. मोठी माणसं लहान मुलांना ‘कृष्ण बाप्पा’म्हणून मला दाखवू लागली. आमच्या स्वयंवर, स्वरसम्राज्ञीने प्रथम तर सुवर्णतुलाने राज्य नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. अखिल भारतीय नाट्यपरिषदेने पं.खाडिलकर पुरस्कार देऊन माझ्या अभिनयाला गौरविले. ह्या सर्वामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढायला मदत झाली.
अमेरिकेला प्रस्थान करण्यापूर्वी चारच दिवस आधी संपादित संगीत मानापमानमधील धैर्यधराची भूमिका करण्याची संधी मला मिळाली. पूर्वा पेठे, हेरंब जोगळेकर, श्वेता जोगळेकर, उदय गोखले, महेंद्र पाटणकर, विलास हर्षे ह्यांच्या सहयोगाने संक्षिप्त मानापमानचा हा अनोखा प्रयोग आम्ही सादर केला. चार पात्रांनी २७ गाण्यांसह सादर केलेल्या ह्या नाटकाला रत्नागिरीकर रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यामुळे गायकनट म्हणून मला देखील उत्साह मिळाला.’
अनुप अतिशय नाम्रपणे सांगतो की, ‘नाट्यसंगीताने गाणं जगावं कसं ते मला शिकवलं. नाट्यसंगीत हे कर्कश गायलं जातं आणि ते भावनाशून्य असतं, असं म्हटलं जातं. पण ह्या संगीतप्रकारासारखं भावगीत जगात कुठे शोधून सापडणार नाही, असं माझं मत आहे. नाट्यसंगीतामुळे कथानक प्रवाही राहतं आणि कलाकारालासुद्धा आपल्यातील भल्याबुऱ्याची सुयोग्य जाणीव होते.’
अमेरिकेसारख्या देशात इंजिनीअरिंगचे उच्चशिक्षण घेत असतांना संगीत आणि अभिनयाच्या सरावाबद्दल बोलतांना अनुप म्हणाला की, ‘मला नक्कीच सांगायला अभिमान वाटतो की, इथले महाराष्ट्र मंडळ आपली कलापरंपरा जीवापाड जपते आहे. डेट्रॉइटच्या महाराष्ट्र मंडळाचा मी अलीकडेच समितीसदस्य झालेलो आहे. इथे साहित्य संगीतकलाविषयक अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. अमित देशपांडे, मंडळाचे माजी अध्यक्ष सतीश डोंगरे, विद्यमान अध्यक्ष सौ. अनघा हुप्रिकर आणि अन्य सर्वच समिती सदस्य अनमोल मार्गदर्शन करतात. हेमंत बाबतीवाले हे इथे तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण देतात. त्यांच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात मला कला सादर करण्याची संधी मिळाली. संगीताचे कार्यक्रम इथेसुद्धा सुरू आहेत. माझ्या परीने आपल्या संगीताचा इथे जेवढा प्रसार करणे शक्य आहे, तेवढे मी करणारच. माझ्या अभ्यासाच्या शेड्यूलमधून माझ्या रियाजासाठी खास वेळ राखीव असतो. आमच्या घरासमोरील लीजिंग ऑफिसमध्ये मनमोकळा रियाज करता येतो.’
आजकाल संगीत नाटकांना हवा तसा प्रेक्षकवर्ग मिळत नाही, असे महटल्यावर अनुप आपली नाराजी प्रकट करत म्हणतो की, ‘असं अजिबात नाही. रत्नागिरीमध्ये होणाऱ्या संगीत नाटकांचे सर्वच प्रयोग हाउसफुल होतात. व्यक्तिरेखेबरहुकुम पात्रसंयोजन, नाटक श्रवणीय असण्यासोबत प्रेक्षणीय करण्याकडे लक्ष्य देणे, आवश्यक ते प्रभावी नेपथ्य, वेळ मर्यादा, समाजमाध्यमांवर योग्य प्रसिद्धी केली गेली; तर संगीत नाटकांना भरभरून प्रेक्षकवर्ग मिळायला काहीच अडचण नाही.’ इंटरनेटमुळे संगीत स्वस्त झालेले नसून, ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला मदत झालेली आहे, असं ठामपणे सांगणारा अनुप भावप्रधान गायकीमध्ये स्व:प्रेरणेने काही प्रयोगसुद्धा करत आहे.
रियालिटी शोमध्ये आपण कधी जावं असं वाटलं नाही का, असं छेडल्यावर तो म्हणाला की, ‘जेव्हा संधी होत्या तेव्हा मला वयोमर्यादेमुळे जाता आले नाही. नंतर चिरंजीव शास्त्रीय संगीताचा ओढा लागला आणि मीच अशा शोंपासून दूर राहिलो.’ आजकाल गरजेपुरते वेळ मारून नेण्यासाठी अनेक गायक नाट्यपदे घोकून तयार करतात. ह्याबद्दल अनुप नाराजी व्यक्त करताना म्हणतो की, ‘ही पदे अभ्यासाचा विषय आहेत. त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. स्वयंवर, मानापमानसारख्या नाटकातील पदे एकदा का कष्टाने गळ्यावर कोरली की, ती आयुष्यभर रत्नहार बनून राहतात. हे लक्ष्यात घ्यायला हवं.’
आपल्या भावी वाटचालीबद्दल बोलतांना अनुप उत्साहाने सांगतो की, ‘उच्चशिक्षण पूर्ण झाल्यावर शास्त्रीय संगीत आणि संगीत रंगभूमीची सेवा करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. संगीत आणि संगीत रंगभूमीची सेवा करायची आहे. स्वतःची नाटक कंपनी स्थापन करून नव्या दमाच्या कलाकारांमार्फत पुन्हा संगीत नाटके रंगभूमीवर आणायची आहेत आणि रसिकांना पुन्हा गंधर्वकाळाची अनुभूती करवून द्यायची आहे.’
नाट्यसंगीत आणि संगीत नाटकांचा ठेवा जीवापाड जपला जावा, ही संस्कृती नवनव्या पिढीकडे प्रवाही राहावी म्हणून; मनापासून प्रयत्नरत झालेल्या ह्या नव्या दमाच्या कलाकाराला अनंत शुभेच्छा!
2 Comments
अनुप , मित्रा अनेकानेक शुभेच्छा ! भविष्यातील संकल्प सिध्दीसाठी !
Krushna khup chan watl manogat wachun