मानवी मन व त्याची वर्तणूक, अत्यंत गूढ अन् गुंतागुंतीची गोष्ट. ते नक्की काय आहे यावर आजवर बराच काथ्याकूट झालाय. पण अजूनही पूर्णत: आकलन झालेले नाही. म्हणूनच तर म्हणतात, ’मन मनास उमगत नाही’. त्यातून स्त्री मन तर फारच गूढ, अनाकलनिय. त्याचा आदमास घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जणू गूढ सागराच्या खोल तळाचाच वेध घेण्याचा प्रयत्न करण्यासारखे. अशा अकल्पनीय स्त्री-मनाचा मागोवा घेण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.
मनाची जडण-घडण होण्यात त्यावर बालपणापासून होणारे संस्कार, रितीरिवाज, परंपरा, शिक्षण, समाज इत्यादींचा प्रभाव असतोच, पण बरोबरीनेच हजारो वर्षांपासून नैसर्गिकरित्या चालत आलेली (उत्क्रांत होत आलेली) पारंपरिक वर्तणूक व मानसिकतेचाही फार मोठा वाटा असतो. निसर्ग रहाटीत मानव उत्क्रांत होत गेला, कारण त्याला मिळालेले बुध्दीचे वरदान. बुध्दीचा जसजसा विकास होत गेला तसतशी मानवी मनाची प्रगल्भता व आवाका वाढत गेला. काही शतक अथवा सहस्त्र वर्षांपूर्वीचे मानवी मन व आजच्या ह्या मोबाईल, इंटरनेट युगातील मानवी मन यात नक्कीच काहीना काही फरक असणार आहे.
एखाद्या विशिष्ट वर्गाच्या मानसिकतेचा विचार करताना अशा सर्व बाबी समजून घेणे गरजेचे असते. मग ती स्त्री असो, पुरुष असो वा पशू. मानवी मन कधी कधी असे अनाकलनीय का वागते याचा मागोवा घेताना केवळ आजच्यापुरता विचार न करता मानवी जीवन जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासूनच्या मानसिकतेचा (तिथपर्यंत ही पाळेमुळे गेल्यामुळे) मागोवा घ्यायला हवा. पण मानसिकतेवर सर्वांत जास्त परिणाम वर्तमान जगाचाच पडत असतो.
मानसिकता कशी तयार होत जाते त्याचे एक छोटेसे उदाहरण. एकदा एका मानसशास्त्रज्ञाने मांजराची दोन पिल्ले पाळली. काही दिवसांनी एका पिल्लाला त्याने हाडतूड सुरू केली. दिसले की फटकवायचा. घराबाहेर हुसकावून लावायचा. दुसर्याचे मात्र खूप लाड सुरू केले. त्याला अंजरागोंजारायचा. बसल्या जागेवरच खाणे मिळायचे. काही दिवसांनी आवडते मांजर एक मस्तवाल गलेलठ्ठ बोका झाला होता. अतिशय आश्वस्त व सुरक्षित जीवन मिळाल्यामुळे त्याच्या वागण्यात बेफिकीरी शान होती. ऐट होती. चाल डौलदार होती. उलट नावडते मांजर मात्र हडकुळे, भित्रे, घाबरट झाले होते. कुणी प्रेमाने खायला दिले तरी संशयाने बघायचे, थरथरत येऊन घेऊन पळून जायचे. न जाणो; कुणी रट्टा हाणला तर? त्याच्यावर आलेल्या परिस्थितीने त्याची मानसिकताच तशी बनली होती.
हे इथे सांगण्याचे कारण म्हणजे, मानवाचा पूर्वीपासूनचा अभ्यास केला तर मानवाचा इतिहासच लढायांचा, अत्याचारांचा, लुटालुटीचा. कुणी आक्रमक येऊन हल्ले करीत व यात सर्वांत जास्त होरपळ होई ती स्त्रियांचीच. सर्वांत जास्त अत्याचार, फरफट त्यांचीच. म्हणून त्या काळची त्यांची मानसिकताही तशीच साशंकित, भयभीत, कशावरच विश्वास नसलेली.
शिवाय निसर्गात प्राणीमात्रांचा जरी अभ्यास केलात तरी हे लक्षात येईल की, मादी ही नरापेक्षा केव्हाही शारीरिक व मानसिक स्तरावर दुर्बलच असते. नेहमीच नराच्या आक्रमकतेला तिला बळी पडावे लागले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मानवासहित सगळ्याच प्राणीमात्रांचा जन्म होतो तो त्यांनी पुढची पिढी जन्माला घालून हा निसर्ग सतत प्रवाही ठेवण्यासाठी. एवढाच मूळ उद्देश निसर्गाचा असतो. मानवाने प्रगती केली, जगण्याचे नीतीनियम बनवले, आहार-निद्रा-भय-मैथुन ह्या पलीकडे जाऊन जगण्याचा अर्थ शोधला… हे सारे नंतरचे. बुध्दीचे वरदान मिळाल्यानंतरचे. पण त्याचा ह्या पृथ्वीवरील अस्तित्वाचा उद्देश त्याने पुढची पिढी निर्माण करावी हाच असतो आणि त्यात प्रमुख योगदान असते ते स्त्रीचे. इथे पुरुष व स्त्रीच्या मानसिकतेत फरक पडत जातो.
निसर्गात मादीच पिल्लांना जन्म देते. नराचा सहवास फक्त गर्भधारणा होईपर्यंतच असतो. नर नंतर त्याच्या वाटेने निघून जातो. मादी मात्र पिल्लांना जन्म देईपर्यंत गर्भात सांभाळते. प्रसव वेदना सहन करीत जन्म देते, नंतरही पिल्ले स्वत: शिकार शिकेपर्यंत त्यांचा सांभाळ करते, संरक्षणही करते. केवढी मोठी जबाबदारी निसर्गाने स्त्रीवर दिली आहे. आपले मानवाचेही थोड्याफार फरकाने तसेच आहे, नाही का? निसर्गाताच ही रचना तयार झाली. त्याला अनुकूल असे देह बनत गेले व तशा प्रकारे मानसिकता विकसित होत गेली. आजचे मानवी मन बनण्यात हजारो वर्षांपासून नैसर्गिकरित्या चालत आलेली (किंवा उत्क्रांत होत आलेली) पारंपरिक वर्तणूक व मानसिकतेचाही फार मोठा वाटा असतो. तसेच आहार-निद्रा-भय-मैथुन ह्या चार मूळ गरजांपैकी मैथुनाची गरज ही मानसिकतेवर फार मोठा परिणाम घडवून आणते. ह्या सार्या पार्श्वभूमीवर स्त्री मनाचा विचार करता ते हळवे, अतिशय संवेदनशील, साशंक, भाऊक, प्रेमळ, चटकन विश्वास न ठेवणारे, अनाकलनीय, गूढ असे बनल्यास नवल ते काय?
मग कसे असते तिचे मन, तिला काय हवे असते आणि काय नको असते, तिने न सांगताच तुम्ही काय काय करावे अशी तिची अपेक्षा असते आणि सांगितल्यावरसुद्धा तुम्ही काय करू नये असे तिला वाटते. तिची सर्वांत प्राथमिक गरज असते ती म्हणजे तिची सुरक्षितता. भक्कम सुरक्षितता. खंबीर आधार व सन्मान मिळत असेल तर ती भरभरून फुलून येते. तिचे स्मितहास्य सभोवतालचा आसमंत दरवळून टाकते. त्याला सारे काही विसरायला लावते, त्याचे दुख: हलके करते. जर त्याच्याकडे तिला समजण्याचे व तिची प्रत्येक गोष्ट सकारात्मकपणे घेण्याचे कौशल्य असेल तर जीवन म्हणजे कुठल्याही वेळी एक न संपणारा प्रणयकाळ बनून जातो.
तो तिच्या दिसण्यावर जातो पण ती फार काळजीपूर्वक त्याला निवडते. कारण भविष्याची, मुलांची चिंता असते. तो प्रतारणा तर करणार नाही, सोडून तर जाणार नाही, या गोष्टी तिला सतावत राहतात. माहीत आहे की त्याचे जीवापाड प्रेम आहे आपल्यावर पण तरीही असे विचार ती मनातून आवरू शकत नाही.
तुमचे तिच्यासोबत असणे तिच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे, ते तिला सर्वांत मोठे गिफ्ट आहे. तुमच्याकडून नेहमीच पैसे, चॉकलेट, गिफ्ट मिळावे अशी अपेक्षा नसते, पण लांब असताना फोनवरून नियमित विचारपूस करावी व जवळ असताना प्रशंसा करावी (कॉम्प्लिमेंटस द्यावी, काही कारण नसतानासुद्धा, किमान तिच्या डोळ्यात डोळे घालत छानसे हसावे आणि अनपेक्षितपणे हळुवार मिठीत घ्यावे, अशी अपेक्षा असते. कॅण्डल लाईट डिनरनंतर तिच्या आवडीचे संगीत लावून त्यावर जोडीने हळुवार डान्स हा तिचा वीक पाँइट असतो. अशावेळी ‘तू ना माझ्यासाठी खूपच लकी आहेस’ आणि फक्त माझीच आहेस. असे तिला सांगा. ती अगदी हरखून जाईल. तुम्ही तिच्याशी कधीही प्रतारणा करू नये, तिला विश्वासात घेऊन तुमची सारी गुपिते तिच्याकडे उघडी करावी असे तिला वाटत असते. तुम्ही कामावरून घरी आल्यावर तुमच्या ऑफिसमधील स्टोरी ऐकण्यात तिला फारसा इंटरेस्ट नसतो. तिची विचारपूस करावी, तुमचे घर, मुले सांभाळल्याबद्दल तिचे कौतुक करावे, तिच्याशी गप्पा माराव्या, कधी तरी फिरायला घेऊन जावे असे तिला वाटते. महत्त्वाच्या घडामोडींवर तिच्याशी जरूर चर्चा करा पण तिचा मूड पाहून. प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत काय करू म्हणून विचारण्याची गरज नाही. विचारात राहिलात तर ‘मला काय कळते त्यातले! नंतर मी सांगितले म्हणून केले आणि असे झाले म्हणायला मोकळे…’ असेही ऐकून घ्यावे लागते आणि जर का नाही विचारलेत, ‘तर विचारतसुद्धा नाही’, असेही ऐकून घ्यावे लागेल. म्हणून निर्णय स्वतःच स्वतःच्या जबाबदारीवर घ्यायचे पण तिच्याशी सल्लामसलत जरूर करायची. (हा सुवर्णमध्य). निर्णय बरोबर ठरला तर ‘तूच सुचवलंस’ म्हणून कौतुक करायचे.
कधी कधी असे होते की त्यांना काय होतेय किंवा काय पाहिजेय हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. अशावेळी त्यांना एकटे राहू द्या पण एकटे सोडू नका. म्हणजे त्यांच्या जवळपास राहा पण त्यांची प्रायव्हसी मोडू नका. थोड्या वेळाने ती नक्की येईल तुमच्या मिठीत विसावण्यासाठी. तिला हळुवार मिठीत घ्या. जेव्हा-जेव्हा तुला गरज भासेल, तेव्हा-तेव्हा मी तुझ्यासाठी आहेच, हे तुम्ही न सांगताही तिला कळू द्या. त्यांची स्पेस त्यांना द्या. ती तुमची असली तरी एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे याचा विसर पडू देऊ नका व तिचा मान राखा. तिला हेच हवे असते पण ती तसे कधीही तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला तिला काही बोलायचे असल्यास, वाद घालायचा असल्यास, बंद दाराआड जे काय करायचे ते करा. इतरांसमोर नको. (इतरांसमोर केलेला अपमान ती कधीही विसरणार नाही). ती रडेल आणि थोड्यावेळाने विसरून पण जाईल. मग तिला जवळ घ्या व रडवल्याबद्दल सॉरी म्हणा.
वाद झाल्यावर तुम्ही तिची संपूर्ण बाजू शांतपणे ऐकून घ्या. तिची बाजूही बरोबरच असते कारण ती तिच्या दृष्टीने सत्याची असते, असा तिचा ठाम विश्वास असतो. तुमची चूक असल्याने तिचा संपूर्ण ओरडा चूपचाप खावा, तिचे ओरडून झाल्यावर मग तुम्ही सॉरी म्हणायला हवे, बरे. कधी-कधी तिची चूक असते असे तुम्हाला ठाम वाटते, तुम्ही ओरडता, ती रडायला लागते, आताही सॉरी तुम्हालाच म्हणायला हवे. ती स्वतःहून काही सांगणार नाही, तुम्ही ते ओळखावे, समजून घ्यावे अशी तिची इच्छा असते. जर तुम्ही ते ओळखलेत व त्याप्रमाणे वागलात तर तुम्ही तिचे डार्लिंग असता. त्यांना संशय जरी आला की तुम्ही त्यांची थट्टा करताय, त्यांना हसण्यावारी नेताय किंवा त्यांच्याशी विश्वासघात होतोय त्यांना पटकन राग येतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष होेतेय अथवा इतरांसमोर कमीपणा काढला जातोय असा संशयही त्यांना येता कामा नये. त्यांचा मूड फटकन बदलतो. रुसवा काढायला खूप मेहनत करावी लागते. ती मेहनत करा, त्यातही खूप मजा असते. त्यांना सत्य काय याच्याशी फार देणे-घेणे नसते. त्यांना त्यांचाशी सहमत होणारा आवडतो. इतरांसमोर वावरताना तिचा हात हातात घेतलेला आवडतो. तिच्यावर प्रेमळ अधिकार गाजवलेला तिला आवडतो. तिच्या मित्र-मैत्रिणींसमोर अदबशीर प्रेमाचे प्रदर्शन केलेले तिला आवडते.
तिच्यासोबत तुम्ही शॉपिंगला जावे, अशी तिची खूप इच्छा असते. दागिने आणि महागडे वस्त्रालंकार हा त्यांचा आणखी एक वीक पॉइंट असतो. कपडे खूप महाग असल्यामुळे ते नको घेऊया असे ती सुचवेल. पण ते वरवर मनापासून नाही. आग्रह करून करून तुम्ही ते घ्यावेत असेच तिला मनापासून वाटत असते. ती नको-नको म्हणत असतानासुद्धा तिच्यासाठीच हा करणे, तिच्या कपड्यांना इस्त्री करून देणे, घरकामात मदत करणे, भाजी आणणे, तिच्या माहेरच्यांसाठी धावाधाव करणे तिला आवडते.
सगळे पुरुष इथून-तिथून सारखेच यावर तिचा मनापासून विश्वास असतो. म्हणूनच ती म्हणते ‘साप म्हणू नये धाकला व नवरा म्हणू नये आपला’. त्या जरी कितीही म्हणाल्या की जोडीदारावर तिचा स्वत:पेक्षाही खूप विश्वास आहे, तरीही दुसरी एखादी स्त्री त्याच्या जवळपास फिरकत असेल तर तिला सहन होत नाही. मनात धाकधूक व जेलसी होतेच. तिचा त्याच्यावरचा विश्वास डळमळतोच.
पुरुष उधळे असतात व बायका काटकसरी असतात हा त्यांचा एक आवडता सिद्धांत. पण त्या खरोखरच काटकसरी असतात आणि कितीही काटकसरी असल्या तरी दागिने व महागडे वस्त्रालंकार दिसल्यावर त्यांना राहवत नाही. त्या खरेदी करणारच. अशा त्यांच्याच पसंतीच्या उंची वस्त्राभूषणांनी त्यांचे कपाट भरून गेले असले तरी ऐनवेळी मात्र त्यांच्याकडे त्यांना हवे तसे घालण्यासारखे काहीही नसते. पण तरीही आहे त्याच वस्त्रांचा वापर करून त्या अगदी छान सजतात आणि कितीही सजल्या तरी स्वतः मात्र त्याबद्दल समाधानी नसतात. काही तरी कमी असल्यासारखं त्यांना सतत वाटत राहते. बरे, एवढे असूनही बघणार्यांनी कमेंट्स द्याव्या असे त्यांना वाटत असते आणि कमेंट्स मिळाल्यावर त्या छान लाजत हसत त्याचा स्वीकार करतात. पण कमेंट्स देणार्यावर त्यांचा मुळीच विश्वास नसतो. तिला इंप्रेस करण्यासाठी तो जरा जास्तच पुढे पुढे करतोय असे त्यांना वाटत असते.
तिला सजणेधजणे, नटणे आवडते. तो तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. आपण इतरांच्या नजरेत यावे, केंद्रस्थानी असावे, चर्चा, कौतुक व्हावे अशी सुप्त इच्छा असते. ती छान शृंगार करते. पुरुष बघणार असतात, शेरेबाजी होणार असते आणि तिलाही त्याची पूर्ण कल्पना असते. तिलाही त्याची ना नसते पण त्यात सुसंस्कृतपणा असावा, उच्च अभिरुची असावी, अशी तिची अपेक्षा असते. कुणीतरी एखादा तिला पाहून स्वतःला हरवून बसतो. तिच्याकडे एकटक पाहत राहतो. तिला असे परक्याने एकटक पाहत राहिलेले अजिबात आवडत नाही. त्याला ती अशिष्ट, असभ्य ठरवून टाकते. पण जर का मुळीच पाहिले नाही तरीही तिला ते खटकते. मग तो अरसिक, अहंकारी असतो. बायकांना पुरुषांची रसिक नजर व अरसिक नजर चटकन कळते. ती पुरुषांना त्यांच्या नजरांवरून ओळखते. त्याने तिची छेडछाड केलेली तिला आवडते, जर तो तिचा आवडता असेल तर तिचा हिरो असतो, पण जर आवडता नसेल तर तोच मवाली, गुंड असतो. पुरुषांची नजर ओळखणे, संशय येणे, मत्सरग्रस्त, जेलस होणे, पाहिजे तेव्हा हमखास रडू येणे, इत्यादी गुण त्यांच्या असुरक्षित वाटण्यातून विकसित झालेले हे स्वभावविशेष आहेत. बघा ना, नजरेवरून धोकादायक पुरुष त्यांना कळतो. संशय, मत्सर, जळफळाटातून त्या सतर्क, सावध होतात. त्यांच्या हिताआड येणार्या गोष्टींना त्या दूर ठेवतात. त्यांच्या रडण्यात पुरुष विरघळून जातो. त्याचा विरोध मावळून जातो. ती पुरुषापेक्षा नक्कीच हुशार असते. (10 वी 12 वीचे निकाल पाहा, मुलीच पुढे असतात.) पुरुषापेक्षा स्त्रियांचाच मनावर जास्त ताबा असतो. बरोबरीनेच भावनेच्या भरात वाहवत जाण्यातही त्या पुरुषांच्या पुढेच असतात.स्त्रियांबाबत केलेले अभ्यास असे सांगतात की, त्या शैक्षणिक कालावधीत मुलांपेक्षा हुशार व त्यांच्यापुढे असतात. मात्र नंतर करिअरमध्ये मागे पडतात. चाळीशीनंतर उच्च दर्जाचे यश मिळविणार्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण खूपच कमी असते. कारण तिशीनंतर त्या करिअरपेक्षा घर व मुले ह्यांना जास्त प्राधान्य देतात. तशा प्रकारची उच्च दर्जाची क्षमता असणार्या काही स्त्रिया कुणाच्या तरी प्रेमात वाहवत जाऊन करिअरवर पाणी सोडताना आढळून आलेल्या आहेत. पण ज्या इथेही भावनांना, प्रेमाला आपल्यावर स्वार होऊ न देता कठोरपणे स्वत:ला आवरतात त्यांच्यापैकी काहीजणी माया, ममता, जयललिता वगैरे बनतात व अख्या दुनियेला स्वतःच्या तालावर नाचायला लावतात. पण अशांचे प्रमाण फारच कमी आहे. इतर स्त्रियांचे असे होते, कारण त्या भावना, प्रेम, घर, मुले यांना जास्त महत्त्व देतात. त्या पातळीवर वावरण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो त्यात कमी पडतात. कठीण वेळ आली की कुणीतरी त्यांना बरोबर लागते. त्यातून त्या माघार घेतात. मोठ्या पदावरचे ताणतणाव सहन करण्याची त्यांची मानसिकता नसते. आत्मविश्वासाअभावी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी कुणा पुरुषाचा आधार घेणे त्या पसंत करतात. लग्नाच्यावेळी तो तिला स्मार्ट, केअरींग, समजूतदार, आकर्षक वगैरे वगैरे वाटत असतो. लग्नानंतरही काहीकाळ (मुले होईपर्यंत) तो हुशार, लाखात एक वगैरे असतो. त्यानंतर मात्र त्याच्यातील कमी तिला जाणवायला लागतात, नंतर खुपायला लागतात. तो तिला बावळट, व्यवहारातले काही कळत नसणारा वगैरे वगैरे वाटायला लागतो. कारण आता सगळी नवलाई संपलेली असते, संसाराचे वास्तव चटके बसायला लागलेले असतात. आणखी काही वर्षांनी तिनेच म्हणून त्याच्याशी संसार केला, जमवून घेतले, तिच्या जागी दुसरी कुणी असती तर केव्हाच पळून गेली असती, असा तिचा ठाम दावा असतो.
आपण कसे काय फसलो ह्या माणसाला? आणखीही चांगली प्रपोजल समोर असताना आपण नेमकी ह्या माणसाचीच निवड कशी काय केली याबद्दल राहून राहून ती स्वत:कडेच आश्चर्य व्यक्त करीत असते. आणखी काही काळानंतर, म्हणजे मुलांची लग्ने वगैरे झाल्यानंतर, तिची मते पुन्हा बदलतात. तो आतापर्यंत ह्या घरासाठी, मुलांसाठी किती झिजला हे तिला कळायला लागते, तो तिला पुन्हा आवडायला लागतो. पण केव्हा? जर ऐन तारुण्यात त्याने तिचे वरचे एवढे सगळे चुपचाप ऐकून घेऊन, सांभाळून तिच्यावर प्रेम केले असेल, तिला जपले असेल तरच. मात्र तसे नसेल तर त्याचे आता काही खरे नाही. ह्या वयात तिच्याकडून सहकार्याची अपेक्षा त्याने करू नये. कारण बायका कधीच काही विसरत नाहीत, स्वतःचा अपमान, अन्याय, मानहानी तर नाहीच नाही. वेळ येताच हिशोब चुकता केला जाणार असतो, मग वय काहीही असो. मुलगा कुणाच्या प्रेमात पडला तर गावभर सांगत सुटतो पण ती कुणाच्या प्रेमात पडली अथवा तिला कुणी आवडू लागले तर ते तिच्याशिवाय कुणालाच माहीत नसते. काहीवेळा ती स्वत:शीसुद्धा हे नाकारते. पण तिच्या मनात सतत त्याचे विचार रुंजी घालत असतात.
समुपदेशनाच्या निमित्ताने विविध स्त्री-मनांचा अभ्यास करण्याची संधी मिळत असते. नेहा नावाची एक तरुणी. (अर्थातच नाव बदलले आहे) वरद नावाच्या एका तरुणाशी ओळख झाली. तो मीडियामध्ये काम करणारा. बोलणे-चालणे आकर्षक. त्यातून अविवाहित. नेहा त्याच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून गेली. तिला सतत त्याच्यासोबत बोलत राहावसे वाटायचे, फिरायला जावसे वाटायचे. एक दोनवेळा फिरूनही आले. पण तिला देण्यासाठी सततचा वेळ त्याच्याकडे नव्हता. त्यावरून, ‘तुला फोन पण करावासा वाटत नाही, माझी आठवण पण येत नाही’, अशी तिची सतत भूणभूण त्याच्यामागे तिने सुरू केली. त्याने तिला आपण सतत कामात असल्याचे सांगितले. वरद मीडियात काम करीत असल्याने व अनेक मुली त्याच्या मैत्रिणी असल्याने त्याच्यासाठी हे नेहमीचेच होते. त्यामुळे वरदला नेहाबद्दल मैत्रीपलीकडे काही विशेष वाटत नव्हते. पण नेहाच्या बोलण्यावरून ती प्रेमात पडल्याचे त्याच्या लक्षात आले. म्हणून तिला सावध करण्यासाठी एकदा त्याने तिला संगितले, ‘अगं, तुला सतत फोन करायला किंवा मनात आठवायला तू माझी गर्लफ्रेंड नव्हेस’. झाले, नेहाचा भडकाच उडाला. ‘तुम्ही पुरुष समजता कोण स्वतःला. एखादी मुलगी तुमच्याशी नीट बोलायला लागली, एकदा डेटवर आली म्हणजे काय ती तुमच्या गळ्यात पडायला लागली असे वाटते तुम्हाला. तू असे बोललासच कसे. मुलींशी कसे बोलावे हे कळते का तुला…’ वगैरे वगैरे बोलली आणि रडायला लागली. ‘मला असे बिलकुल म्हणायचे नव्हते’, अशी तिची समजूत काढता काढता वरदच्या नाकीनऊ आले. कसाबसा तिचा राग काढला पण काही दिवसांनी पुन्हा तेच. मग पुन्हा भांडणे. वरदशी बोलणे, त्याचा सहवास आवडणारी नेहा आपण त्याच्या प्रेमात पडल्याचे बिलकुल मानायला तयार नव्हती, अगदी स्वत:शीही. शेवटी नेहाच्या अगदी जवळच्या मैत्रिणीने ती वरदच्या प्रेमात असल्याचे पटवून दिल्यावर तिने प्रेमाची कबुली वरदकडे दिली. पण वरद अगोदरच एका मुलीशी रिलेशनशिपमध्ये असल्याने तशी स्पष्ट कल्पना त्याने नेहाला दिली. तरीही ती ऐकायला तयार नव्हती. वरदने ते संबंध तोडून नेहाशी संबंध जोडावे अशी तिची इच्छा होती. वरदला तिच्याशी रिलेशनशिप नको होती. पण मैत्री हवी होती. शेवटी तूच मला प्रेमात पाडलंस आणि फसवलंस असा आरोप नेहाने केला व त्यांची मैत्री तुटली आणि नेहा डिप्रेशनमध्ये गेली. खरे तर वरदने कधी चुकूनसुद्धा तो तिच्या प्रेमात असल्याचे जाणवू दिले नव्हते. तिने स्वत: फोन केल्यावर तिच्याशी बोलण्याव्यतिरिक्त आणि दोन वेळा डेटवर जाण्याव्यतिरिक्त ना कधी त्याने तिला गिफ्ट दिले, ना कधी i love you बोलला. ती नेहाच होती जी स्वत:हून त्याच्या प्रेमात पडली आणि त्यालाच दोष देत होती. तिच्या मते तिची यात काहीही चूक नव्हती. त्यांना अनाकलनीय का म्हणायचे याची एक झलक.
पुरुष डोक्याने विचार करतात तर ती हृदयाने. म्हणूनच खूप भावनाप्रधान असते. त्यामुळे स्वत:चेसुद्धा निरपेक्ष आकलन किंवा परीक्षण करू शकत नाहीत. माझे तुझ्यावर प्रेम आहे हे शब्द त्यांच्यावर विलक्षण परिणाम करून जातात. कुणी छचोर तरुण सतत i love you म्हणत एखाद्या नवथर तरुणीच्या मागे लागला तर आज न उद्या ती त्याच्या गळाला लागण्याचीच शक्यता अधिक असते. कारण ह्या वयात त्या खूप भावनाप्रधान, स्वप्नाळू असतात. अशा मतलबी पुरुषांच्या आर्जवाला काहीजणी सहज फसतात. मतलब साधल्यावर ते पुरुष निघृणपणे पाठ फिरवतात. पश्चातापाने रडण्याखेरीज तिच्या हातात काही उरत नाही. बरे, हे दु:ख आणखी कुणालाच सांगण्यासारखे नसते. तसे समजून घेणारी मैत्रीण असेल तर ठीक. पण तिचे सांत्वनही फारशी ऊब देत नाही. अशावेळी सर्वांत जास्त ऊब देतो तो एखादा समंजस मित्रच. पण इथे पुन्हा धोका हा निर्माण होतो, की तिला समजून घेताना किंवा तिचे दु:ख वाटून घेतानाही त्याच्या प्रेमात पडण्याची शक्यता असते.
कुणाच्या प्रेमात पडतील किंवा कुणाविषयी भावना तीव्र असतील तर त्याबद्दल अलिप्तपणे विचार करू शकत नाहीत. निदान त्याक्षणी तरी खूप भावनात्मक होऊन निर्णय घेतात व नंतर पस्तावतात. कुणाच्या प्रेमात झोकून देतात. त्यावेळी आई-वडील, जात-धर्म-पंथ, रूढी, परंपरा कशाचाच विचार करीत नाहीत, नंतर होते असे की, आपल्यात वळषषशीशपलशी आहेत हे जाणवायला लागते. पण तेव्हा उशीर झालेला असतो. त्यांच्या स्वप्नांची पूर्ण राखरांगोळी झाल्यानंतर याना आई-वडिलांना दोष देताना मी पाहिलेले आहे. मी अल्लड होते त्यावेळी, मला जीवन म्हणजे काय आहे हे माहीत नव्हते, अनुभव नव्हता. पण वडिलांनी तरी तेव्हा मला कठोरपणे आवरायला हवे होते. असा उलट दोष वडिलांनाच देतात. पण जर का वडिलांनी कठोरपणे आवरले असते अशावेळी तर त्या पळून जाण्याचा किंवा आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात.
ती सोबत असताना दुसरी कोणी कितीही अप्सरा आली तरीही त्या अप्सरेची तारीफ करू नका. तुमच्या सखीने केली तरीही. ती मुद्दामच तुमचे मन जाणून घेण्यासाठी वरवर तिची तारीफ करील. पण फसू नका. तिचा मत्सर जागाच असतो. तिने वरवर दाखवले नाही तरी तुम्ही दुसर्या स्त्रीची तारीफ केलेली तिला कधीही आवडणार नाही, उलट काही तरी खुसपट काढलात तर तिला बरे वाटेल.
एका स्त्रीला दुसर्या स्त्रीबद्दल असा सुप्त मत्सर का असतो? कुणी जाणीवपूर्वक तसे करायला जात नाही. आपसूकच होते ते, अगदी सहजतेने. जसे की निसर्गात एक नर (पुरुष) दुसर्या मादी (स्त्री) कडे जितक्या सहजतेने आकर्षिला जातो, तितक्या सहजतेने. तेव्हा तो पुरुष आपण एक नर आहोत व आता आपल्याला एक सुंदर स्त्री दिसतेय तर तिच्याकडे आपण आकर्षित व्हायलाच हवे, किमानपक्षी तसे दाखवायला तरी हवे असा विचार करून तिच्याकडे खेचला जात नाही. ते आपसूकच होते. नकळतपणेसुद्धा होते. कारण निसर्गाचीच ती योजना असते. गरजही असते. नर-मादीने एकत्र येऊन निसर्ग अखंडित ठेवावा हे निसर्गाचेच विधान आहे. त्याच धोरणाचा हा एक भाग असतो. नर-मादी दोघांची रचना त्यादृष्टीनेच झाली आहे. अशावेळी आपल्याकडे आकर्षित झालेला पुरुष हा फक्त आपलाच बनून राहावा, कुणा दुसरीने त्याला भुलवू नये, तो सतत आपल्याकडेच आकर्षित राहावा, त्याने सतत आपली व अपत्यांची काळजी घ्यावी, त्याच्याकडून सुरक्षितता व सन्मान जीवनभर लाभावा ही तिची अपेक्षा असते. ह्यात दुसरी कुणी येऊन आडकाठी करू नये, आपल्या भवितव्याच्या आड येऊ नये, हा प्रमुख उद्देश असायला हवा. त्यासाठीच मत्सर हा गुण उत्पन्न झाला असावा. त्याने स्त्री सजग व सावध होते. हळूहळू हा गूण स्वभावाचा भाग बनत गेला असावा. ह्या गुणामुळेच ती स्त्री आपल्या जोडीदाराकडे दुसर्या कुठल्याही स्त्रीची भलामण करणार नाही. त्याने तिच्याकडे आकर्षित होऊ नये हाच उद्देश असतो. त्यांना सर्वांत जास्त महत्त्वाची वाटते त्यांची सुरक्षितता आणि म्हणून त्या अतिशय सतर्क असतात. पुरुषातही हा गुण असतो पण तुलनेने कमी प्रमाणात. त्यात सुरक्षितता हा उद्देश नसतो तर आपली स्त्री दुसर्या कुणाकडे आकर्षित होऊ नये हा उद्देश असतो.
ती अशी अतिशय संवेदनशील, हळवी, संशयी का असते किंवा तिची अश्या प्रकारची मानसिकता बनण्यामागचे कारण काय असावे? आज मानव बौद्धिकदृष्ट्या विकसित प्राणी आहे. बुद्धीच्या विकासामुळेच तो विचार करू लागला. त्याने घर कुटुंब बनवले, शेती केली, शाळा सुरू केल्या, नीतीनियम घटना बनवल्या. आज स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी आपण करतो. हे सुसंस्कृतपणाचे व बुध्दिजीवी असल्याचे लक्षण आहे. पण त्याच्या बुद्धीची वाढ होण्यापलीकडे जाऊन विचार केला, तर त्याकाळी पुरुष हा आजच्या पशुतील नरासारखाच आक्रमक असणार आहे. त्याचा उपयोग व साथ फक्त सहवासापुरतीच. तिची अगतिकता, सहवासासाठी नराची आक्रमकता, त्याच्यासमोरची तिची हतबलता, पुढेही अपत्याला जन्म देऊन तो सबळ होईपर्यंत त्याचे संगोपन व संरक्षण करणे. ह्या अशा सगळ्या पार्श्वभूमीवर टक्के टोणपे, धोके खात, हजारो वर्षांच्या कालावधीतून घडत आलेले स्त्रीमन. त्यातूनच तिची अशी मनोवस्था बनली असण्याची शक्यता आहे. म्हणूनच तिला संपूर्ण सुरक्षा हवी असते. संपूर्ण सुरक्षा देणार्या आणि ज्याच्याबद्दल तिला विश्वास वाटेल अशा पुरुषाला ती खुशीने समर्पित होते आणि अशा रीतीने कोणी घरात आली तर त्या घराचा स्वर्ग बनवते. जर त्या घरात ती सुखी, समाधानी, आनंदी असेल तर. पण जर तसे नसेल तर तेच घर नरक बनते. घराचा स्वर्ग बनवायचा की नरक हे एका स्त्रीच्या हातात असते. एक स्त्रीच दुसर्या स्त्रीचा छळ प्रभावीपणे रोखू शकते. सासू सुनेचा छळ करते किंवा सून सासूचा. दोन्ही एकसाथ आल्या तर जग नक्कीच बदलून जाईल. कारण मग स्त्रीचा छळ करण्याची कुठल्याही पुरुषाची हिम्मत होणार नाही. पण तसे कधीही होणार नाही. कारण पुरुषावर प्रेम करणे व दुसर्या स्त्रीचा सुप्त मत्सर करणे हे तिचे स्वभावविशेष तिला तसे वागू देणार नाहीत. आताच्या ह्या काळात स्त्रिया स्वावलंबी बनून आर्थिकदृष्ट्या सबळ व मनाने अधिक खंबीर झाल्यामुळे त्यांच्या मानसिकतेत फरक पडत चाललेला आहे. आता ती पूर्वीइतकी दुर्बल व सर्वस्वी पुरुषावर अवलंबून असलेली राहिलेली नाही. पण तरीही ती एक स्त्री आहे आणि मातासुद्धा. त्यामुळे सहजीवनाची ओढ तिलाही आहे. स्वत:च्या जबाबदारीची जाणीवसुद्धा. फक्त पुरुषांची अरेरावी ती आता पूर्वीइतकी सहन करणार नाही हे निश्चित.
हे एका सरासरी स्त्री मनाचे अंतरंग. पण स्त्रीचे मन त्या पलीकडेही कितीतरी अफाट आहे. समजून घेणे मुश्कील. खरे तर तिला फारसे समजून घेण्याच्या फंदात पडूच नका, गरजच काय त्याची. आणखी गुंतागुंत होत राहील. तिला समजून घेतोय असे भासवत तिच्यावर फक्त प्रेम करत राहा, बस्स इतकंच!