मी प्रदीप दत्ताराम बांदेकर, मूळचा गोवेकर असलो तरी पक्का मुंबईकर. लहानाचा मोठाही ह्याच शहरात झालो. खालसा कॉलेजमध्ये शिकल्यानंतर जेजे कॉलेज ऑफ ऑर्टसमध्ये फोटोग्राफीचा कोर्स केला. त्यानंतर थेट सिनेफोटोग्राफर म्हणून काम करायला लागलो. फ्रीलान्सर फोटोग्राफर म्हणून काम करण्याचे कारण होते ते म्हणजे चित्रपट, गाणी ह्यांची आवडसिनेफोटोग्राफर म्हणून काम करताना एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे अनेक सिनेमाला वाहिलेली मासिक, नियतकालिके तेव्हा आली. त्यांच्यातल्या स्पर्धेमुळे चांगल्या फोटोसाठी फोटोग्राफर्सची गरज भासू लागली. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन ह्यासारख्या बड्या कलाकारांची मीडियावर आणि फोटोग्राफरवर नाराजी असण्याची कारणे वैयक्तिक होती. तो काळ कलाकारांसाठी गॉसिप्सने गाजण्याचा होता, तर फोटोग्राफरसाठी स्ट्रगलचा.
घरातून फोटोग्राफी करण्याच्या माझ्या निर्णयाला फार अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. वडिल तर माझी आवड ऐकूनच रागावले. त्यावेळी शॉर्टहँड-टायपिंगचा कोर्स करून नोकरी करावी, असे पक्क ठरलेले असायचे. अन्य मराठी घरांमध्ये दिला जाणारा हा वडिलधारी सल्ला मलाही देण्यात आला होता. मी मात्र नऊ ते पाच अशा नोकरीत अजिबातच पडणार नव्हतो. मस्टरवर हजेरी लावून रोज एकच काम करण्याची कल्पनाही करू शकत नव्हतो. त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये फार उत्साहाने उत्तरे देण्याच्या फंदातही कधी पडलो नाही. त्यामुळे नोकरीसाठी सिलेक्ट होण्याची शक्यता नव्हतीच. माझी ही आवड पाहून वडिलही म्हणाले, दोन वेळचे जेवण आणि वर्षभरात कपडे एवढेच मी तुला देईन. बाकीचे तू बघ.
खालसा कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर फोटोग्राफी कोर्स करायचे ठरवले. तेव्हा कॅमेरा घेण्यासाठी आधी पैसे जमवले. इतरांसारखे नाक्यावर उभे राहणे मला पटणारे नव्हते. जेजेमध्ये प्रवेश मिळवणे, त्यावेळी खूप कठीण होते. पण कोर्स करायचे असे ठरवले होते. मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते. पहिल्यांदा तर प्रवेशही नाकारला गेला. पण सर्टिफिकेटला खूप महत्त्व आहे, हे समजल्याने कोर्स करायचाच असे ठरवले. त्यातही फार काही विशेष करण्यापेक्षा इतर परीक्षांप्रमाणे ऐनवेळी जर्नल पूर्ण केली. जेजेमधून कोर्स केल्यानंतरही पुढे काय करायचे, हा प्रश्न जास्त महत्त्वाचा होता. कारण त्यावेळी फोटोग्राफर म्हणजे लग्नाचे फोटो काढणारे… असे एक ठाम चित्र आजुबाजूला होते. तो काळच तसा होता. शिवाय केवळ आवड म्हणून फोटोग्राफीत शिरणारे फोटोग्राफर जास्त होते. मला मात्र फोटोग्राफी त्यातही सिनेफोटोग्राफर म्हणून काम करण्यात रस निर्माण झाला.
ह्या आवडीचे एक कारण होते, सिनेमाची आवड असणे. ह्या आवडीला पोषक ठरले होते, ते माझे वडाळा भागात राहणे. तेव्हा सिनेमाचे क्षेत्र हे आजच्यासारखे चांदिवली, गोरेगावइतक्या लांबवर नव्हते. तर ते दादर परिसरापुरते सिमीत होते, फारतर बांद्र्यापर्यंत. रणजी, रूपतारा ह्या स्टुडिओजमध्ये शुटिंग व्हायच्या. राजकपूर आरके स्टुडिओत तर दिलीपकुमार रणजीत स्टुडिओत शुटिंग करायचे. अशातच खालसा कॉलेजमधून थेट सिनेक्षेत्रात उतरणारी मंडळी होती. आमच्यावेळी असलेल्या रमेश तलवार ह्यांना थेट दिग्दर्शक यश चोप्रांना असिस्ट करण्याची संधी मिळाली होती. अवतार गीलसारखा कलाकारही होता. ह्या सगळ्यांमुळे सिनेक्षेत्राविषयी वाटणारे आकर्षण वाढलेच. कलाकारांना आपल्या कॅमेर्यात कैद करणे हे मनाशी ठरवून टाकले.
कोणीही गॉडफादर नसताना ह्या क्षेत्रात येणे हे धाडसाचेच होते. पण काही मित्रांनी पाठिंबा, प्रोत्साहन दिले. सकाळी लवकर उठून घराबाहेर पडायचो. घरातल्यांना वाटायचे घरची जबाबदारी नको म्हणून हा जातो. त्यावेळी फोटोचे रेट पाच, सात आणि वीस रूपये असे असायचे. पण त्याकाळी फोटोग्राफर खूप चांगले होते. स्टील फोटोग्राफीमध्ये ते अप्रतिम काम करायचे. संपादक, पत्रकारांना मात्र त्याचे फार कौतुक नसायचे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये एकाददुसरा फोटो छापून येणेही फार मोठी गोष्ट होती. छापून आलेल्या फोटोसाठी इंचाच्या हिशोबाने पैसे मिळायचे. इंग्रजीमध्ये थोडीफार बरी स्थिती होती. पण मराठी फोटो छापला तरी पैसे मिळण्याची शक्यताच नव्हती. फुकट फोटो छापून देण्याची तयारी ठेवावी लागायची. अगदी नावही छापून येण्याची सुतराम शक्यता नव्हती. मात्र मित्र एन. शर्मा ह्यांच्या प्रोत्साहनाने ‘लोकप्रभा’च्या कव्हरवर अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी ह्यांचे फोटोशूट करण्याची संधी मिळाली. त्यानंतर विश्वास वाढत गेला. अभिनेता ओम पुरी ह्यांचे पहिले फोटोशूटही मी केले. माधुरी नावाचे सिनेमॅगझिन होते. त्यात फोटो छापून येण्याची संधी मिळाली.
तरीही फोटोग्राफर म्हणून फार सन्मानदायक स्थिती नव्हती. दिवसभर काम करूनही पूर्ण वेळ नोकरी नव्हती. गाडीही नव्हती. वजनदार कॅमेरे घेऊन अक्षरशः पाठीवर वळ उमटायचे. अनेकदा पीआर बोलायचे नाहीत. सेटवर फोटोग्राफर आला तर त्याला एखाद्या अस्पृश्यासारखी वागणूक मिळायची. कधी कलाकार, निर्मात्यांच्या ओळखीमुळे त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळायची. अनेकदा चार-पाच जण एकत्र सेटवर जायचो. एखादा ओळखीचा फोटोग्राफर पुढे व्हायचा. बाकीचे त्याच्या ओळखीवर आपले काम करायचे. अशातूनच जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हांसारखे कलाकार परिचयाचे होते गेले. पुढे त्यांच्याशी मैत्रीही झाले.
सिनेफोटोग्राफर म्हणून काम करताना एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे अनेक सिनेमाला वाहिलेली मासिक, नियतकालिके तेव्हा आली. त्यांच्यातल्या स्पर्धेमुळे चांगल्या फोटोसाठी फोटोग्राफर्सची गरज भासू लागली. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन ह्यासारख्या बड्या कलाकारांची मीडियावर आणि फोटोग्राफरवर नाराजी असण्याची कारणे वैयक्तिक होती. तो काळ कलाकारांसाठी गॉसिप्सने गाजण्याचा होता, तर फोटोग्राफरसाठी स्ट्रगलचा.
नावाजलेले फोटोग्राफर फक्त कव्हर शूट करायचे, तर आमच्यासारखे नवोदित फोटोग्राफर आतले फोटो काढून द्यायचे. मराठी मासिकांमध्ये तर फार संधी नव्हतीच. अशावेळी अरुण ताम्हणकर ह्या माझ्या मित्राने माझ्यातल्या फोटोग्राफरला खूप प्रोत्साहन दिले. आज कलाकार फोटोग्राफरला यूझ आणि थ्रो अशी वागणूक देत आहेत. सुरुवातीला कलाकारांच्या पार्ट्यांमध्ये आम्हाला फार सन्मानाने बोलायचेही नाही. पण त्रासही द्यायचे नाही. नंतर मात्र फोटोग्राफरप्रती सन्मान वाढला, तो सन्मान मी माझ्या कामाने म्हणजेच कॅमेर्याने मिळवला.
हा सन्मान मिळवण्यासाठी झगडावे लागले, कारण फोटोग्राफर म्हणून मला आपल्या अधिकारांचे भान होते. अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चन हिच्या विवाहाचा किस्सा मला आवर्जुन सांगावासा वाटतो. त्यावेळी अभिषेक बच्चन सोळा-सतरा वर्षांचा तरुण होता. मी लग्नाचे चित्रण करण्यासाठी गेलो, तेव्हा अभिषेकने मला अडवले. मी त्याला सांगितले की, मी माझा कॅमेरा इथून वीस फूट लांब अंतरावर लावलाय, तुम्ही मला अडवू शकत नाही. त्यानंतर मी लग्नाला आलेल्या कपूर (बबीता, करिश्मा) कुटुंबाचे फोटो काढले. हे केवळ मला माझ्या फोटोग्राफर असलेल्या कायद्याने दिलेल्या अधिकाराची जाण असल्यानेच करता आले.
चित्रपटसृष्टीत काम करताना अनेक कलाकारांशी दोस्ती झाली. ती टिकली ती केवळ त्यांचे सेलेब्रिटीपण जपले म्हणूनच. संजय दत्तशी झालेली मैत्री असो, नाही तर शाहरूख, सलमान किंवा आमीर खानशी जमलेले सख्य असो, ह्या नात्याला माझा कॅमेराच जबाबदार आहे. पूर्वीचे कलाकार इमेजला खूप जपायचे. आपले वाईट दिसणारे फोटो किंवा वैयक्तिक फोटो छापून आल्यास नाराजी व्यक्त करायचे. कधी प्रेमाने समजावायचेही. एकदा मी मिथुन चक्रवर्तीच्या चित्रपटाच्या सेटवर रात्री उशीरा गेलो, त्याला ते आवडले नाही. मग त्याने समजावून सांगितले, दिवसभर शूटिंग केलेय. केस खराब झालेले आहेत, डोळेही तांबरलेत, अशावेळी फोटो कसे चांगले येणार… असे किस्से घडता-घडता अनेक कलाकार माझ्या कॅमेर्याचे मित्र झाले.
काम करता करता समाधान देणारे क्षण खूप आले. प्रत्येक चांगला फोटो छापून आला, की त्यातून मिळणारा आनंद निश्चितच कामाचे चीज झाल्याचे सांगणारा असतो. एकदा पण फोटोबाबत इतरांनी केलेले कौतुकही त्या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार ठरले. असाच एक कौतुकाचा किस्सा घडला. कमल नावाचे कोरिओग्राफर तेव्हा व्हिडिओ शूट करत होते. त्यांनी मला बोलवले. अमिताभ बच्चन भगवानदादांच्या गाण्यावर नृत्य करत असतानाचे शुटिंग करण्यात येत होते. तिथे हास्यअभिनेते जॉनी लिव्हरही आले होते. जॉनी लिव्हरच्या विनोदांवर अमिताभ मोठमोठ्याने हसत होते. ते पाहून मी हळूच त्यांचे फोटो काढले. अमिताभनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. पण मला रोखले नाही. मी पूर्ण रोल शूट केला. ते सगळे फोटो कोणत्याही पोझविना काढलेले होते. त्यात अमिताभ दिलखुलास हसत असले तरी चेहरा वेडवाकडा, चित्रविचित्र हावभाव मी टिपले होते. त्यावेळी असे फोटो छापण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे असे फोटो छापणार कोण… असा प्रश्न होता. पण ती संधी मिळाली. झी मासिकाच्या संपादिका भावना सौमय्या ह्यांची अमिताभशी मैत्री होती. त्यांना भेटून हे फोटो दाखवले. त्यांनी तब्बल 22 फोटो आपल्या मासिकात छापले. खुद्द अमिताभनाही ते फोटो आवडले. त्या फोटोंची इतकी चर्चा झाली की, अभिनेत्री रेखानेही, ‘उस कलाकार की अच्छी तस्वीर निकाली हैं’, अशा शब्दांत कौतुकाची पावती दिली होती. कलाकार आणि माझा कॅमेरा हे नातेही असेच राहिले. त्याने टिपलेल्या फोटोंची दखल इतरांनी घेतली आणि मी समाधान पावत राहिलो. हेच नाते माझ्या मुलाच्या, प्रथमेशच्या रूपात फुलत राहिल.