सासरी गेलेल्या मुलीला चार दिवस माहेरपणासाठी बोलवायचे असेल तरी माहेरच्या गावाहून कोणीतरी माघारी धाडायचा- सासरच्यांना विनंती करण्यासाठी आणि मुलीच्या प्रवासात सोबत अशा दोन्ही कारणांसाठी ही कित्येक पिढ्यांची पद्धत. आता मात्र प्रवासाचा निर्णय आणि अंमलबजावणी ह्या दोन्ही पातळ्यांवर महिला स्वतंत्र झाल्या आहेत, होताहेत. एकटीने किंवा मिळून काही जणींनी प्रवास करण्याचे प्रमाण वाढलेय, वाढतेय. तिच्या ह्या हॅपी जर्नीबाबत
‘तुम्ही तिघी एकट्याच जाणार?’ पंधरा दिवसांच्या निसर्गभ्रमंतीसाठी निघालेल्या तिघी तरुणींना विचारलेला हा प्रश्न महिलांच्या पर्यटनामागे असलेल्या मानसिकतेची कल्पना द्यायला पुरेसा ठरावा. तिघी जातोय आणि बरोबर 25 जणांचा ग्रुप आहे, हे स्पष्टीकरण अशा वेळी पुरेसे ठरत नाही. आता मात्र मानसिकता काहीही असली तरी महिलांनी प्रवास करण्याचे प्रमाण वाढतेय, हे वास्तव आहे आणि हे वास्तवच कित्येच वर्षांच्या- दशकांच्या- शतकांच्या ह्या मानसिकतेला बदलण्यास कारणीभूत ठरतेय, हेही वास्तवच आहे.
देवधर्मासाठी, तीर्थयात्रांसाठी किंवा नातेवाईकांघरच्या लग्नाकार्यासाठी प्रवास इथपासून ते नवनवीन ठिकाणांना भेटी देण्याची हौस किंवा रोजच्या धकाधकीच्या जीवनातून चार क्षण विरंगुळा इथपर्यंत पर्यटनाची व्याख्या आणि व्याप्ती विस्तारलीय. एखाद-दोन दिवसांची वीकेंड ट्रिप, दहा-पंधरा दिवसांची मोठी टूर किंवा व्यवस्थित नियोजन केलेली परदेश सहल, फिरण्यासाठी बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. महाबळेश्वर, माथेरान, आग्रा, माऊंट अबू, बेंगलोर-म्हैसूर, कन्याकुमारीच्या पलीकडे जाऊन नवनवीन ठिकाणे पर्यटनाच्या नकाशावर येऊ लागली आहेत. आपापल्या बजेटनुसार फिरवून आणणार्या टूर कंपन्याही उदयाला येत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर, भटकंती करणार्या महिलांचे प्रमाणही वाढतेय. ऑफिसच्या कामासाठी असो किंवा निव्वळ फिरण्याच्या हेतूने, प्रवास करणार्या महिलांची संख्या लक्षणीयरित्या वाढते आहे. त्यातही कधी कोणी सोबत नाही म्हणून किंवा कधी घरच्यांना सोबत यायला वेळ नाही म्हणून अनेकजणी एकट्या फिरण्याचा पर्याय स्वीकारताहेत. अनेकदा कुटुंबातल्या फक्त बायकांनी एकत्र ठरवून फिरण्याचे कार्यक्रमही होताना दिसताहेत.
आयुष्यभर कुटुंबाला वाहून घेतलेल्या अनेकजणी नेहमीच्या कामातून सुट्टी म्हणून एकट्या सहलीला जाण्याचा मार्ग पत्करतात. सहकुटुंब सहलीला गेल्यावर, नवरा-मुले समुद्राच्या पाण्यात खेळायला उतरली असताना कपडे-पिशव्या-चपला सांभाळायचे काम अनेकदा आईकडे येते. कधी एखाद्या बागेत फोटोसेशनमध्ये रमलेल्या मुलाला हाका घालघालून जेवणासाठी हॉटेलच्या टेबलावर बसवण्याची जबाबदारी सहलीतही तिच्या डोक्यावरून सुटत नाही आणि घरी आपापले रुमाल-मोजे ठरावीक खणातून काढून घेण्याची शिस्त अंगी बाणवलेल्यांनाही फिरायला गेल्यावर ते रुमाल-मोजे बॅगच्या कोणत्या खणात ठेवलेत, हे सापडेना झाले तर बायकोच्या माथ्यावरची जबाबदारी सुटत नाही, हेही दिसते.
कधी तरी चार दिवसांसाठी मला एकटीला जायचंय, तुमचे तुम्ही बघा, असे ठणकावून सहलीला जाणार्या महिलांची संख्या वाढतेय. अनेक आघाडीच्या ट्रॅव्हल कंपन्यांनीही ही गरज ओळखून केवळ महिलांसाठीची स्पेशल टूर पॅकेजेस दाखल केली आहेत. त्याला मिळणारा प्रतिसाद ही आजच्या महिलांची ह्या निवांतपणाची गरज अधोरेखित करणारा आहे. त्यातही मग अगदीच एकटीने जाण्यापेक्षा, इतर नव्या मैत्रिणींच्या सोबतीने जाण्यातली सुरक्षितता तिला अनेकदा कम्फर्टेबल वाटते, हेही यामागचे कारण. डबा, शाळेची तयारी, 9.31 ची लोकल, ऑफिसातले प्रेझेंटेशन, नातेवाईकांच्या लग्नकार्यातील हजेरी हे सगळे बाजूला ठेवून चिल-आऊट करण्याची संधी तिच्यासाठी मौल्यवान असते ती याच कारणामुळे.
घरच्यांना न घेता आपण एकटी एन्जॉय करतोय हा बाय-डिफॉल्ट गिल्ट ह्या मैत्रिणींच्या मनातून कमी होतोय. ‘इतरांना वेळ नाही, तर माझे मन मी कशाला मारू?’ हा विचारही बळावतोय, याचे स्वागत करायला हवे. अनेकदा मैत्रिणींनी किंवा बहिणींना भेटण्यासाठी एरव्ही वेळ मिळत नाही म्हणून ठरवून अशा विमेन स्पेशल ट्रिपला जाणार्यांची संख्याही मोठी आहे. येणार्या महिला पर्यटकांना तुम्ही स्पेशल असल्याचा अनुभव देणार्या ह्या टूर्सना पसंती आहे ती म्हणूनच. त्याशिवाय, अशा टूर्सचे आणखी एक कारण म्हणजे महिलांच्या विशेष आवडीनिवडी. सहकुटुंब सहलीला जाताना त्या शेड्यूलमधून आपल्याला हवे तिथे शॉपिंग करण्यासाठी किंवा स्पा, ब्युटी ट्रीटमेंट आदींसाठी वेळ देता येत नाही हे लक्षात घेऊन फक्त स्पा स्पेशल किंवा शॉपिंग स्पेशल टूर्स आयोजित करण्याचे प्रमाण परदेशात मोठे आहे. ही पॅकेजेस हिटही ठरताहेत. एकूणच पर्यटन उद्योगानेही महिलांना अगदी केंद्रस्थानी जरी नाही तरी महत्त्वाच्या स्थानी ठेवून आपली धोरणे आखायला सुरुवात केली आहे.
दुसरीकडे ऑफिसच्या मीटिंग्ज, कॉन्फरन्स, ट्रेनिंग यासाठी टूरवर जावे लागणार्या महिलांचे प्रमाणही मोठे आहे. अशा महिला प्रवाशांना बरेचदा एकट्यानेच फिरावे, राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी हॉटेलांचे काही मजले केवळ महिलांसाठी राखीव ठेवण्याचे धोरण परदेशातील काही हॉटेलांमध्ये अवलंबले जाते. महिलांच्या गरजांबाबत हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री लवचिक असल्याचे यातून दिसून येते.
एकीकडे महिला पर्यटक/ प्रवाशांची संख्या वाढत असली तरी पुरुषांच्या तुलनेत महिलांना फिरताना काही बाबतीत अधिक अडचणी येत असतात. त्यामुळेच त्यांनी अधिक सजग, सावध राहणे गरजेचे असते. आरोग्य आणि सुरक्षितता ह्या दोन्ही आघाड्यांवर महिलांना अधिक भान बाळगावे लागते. परदेश प्रवासाबाबत विविध देशांकडून वेळोवेळी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी म्हणजेच पर्यटकांसाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातात; परंतु देशांतर्गत प्रवासासाठी मात्र ही ट्रॅव्हल अॅडव्हायजरी आपली आपल्यालाच तयार करावी लागते. पूर्वतयारी हा कोणत्याही प्रवासातील कळीचा मुद्दा. जेवढी पूर्वतयारी योग्य तेवढा तुमचा प्रवास अधिक सुखाचा होतो. जिथे जाणार त्या ठिकाणाची माहिती, प्रवासाची साधने, फी, याबाबतची माहिती इंटरनेट, ट्रॅव्हेल गाइड्स, एजंट्स आणि आधी त्या ठिकाणी जाऊन आलेल्या व्यक्ती यांच्या माध्यमातून जमा करणे अधिक योग्य.
परदेशात असो वा आपल्याच देशात, सामाजिक, सांस्कृतिक तफावतीचा सर्वाधिक परिणाम हा महिलांवरच होत असतो. कारण पेहराव, धार्मिक कार्ये, प्रवेश याबाबतच्या अटी महिलांबाबत अधिक जाचक असतात. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यानुसारच प्रवासाचा मार्ग, ठिकाणे आखण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. ज्या ठिकाणी जायचे आहे. तिथली संपूर्ण महिती घेऊन ते ठिकाण सुरक्षित आहे का, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी पेहरावाबाबत काही प्रथा अलिखित नियम असतात, काही मंदिरे वा धार्मिक स्थळी महिलांना प्रवेश निषिद्ध असतो. अशा वेळी ह्या स्थानिक भावनांचा आदर राखावा. प्रथांची योग्यायोग्यता ठरवणे किंवा त्या प्रथा पाळणार्यांचे प्रबोधन करणे यासाठी अन्य मार्ग आहेत. पण पर्यटक म्हणून जाताना हे स्थानिक कायदेकानून पाळणे इष्ट. काही संवेदनशील ठिकाणी सामाजिक, राजकीय, धार्मिक मुद्यांवर भाष्य न करण्याचा किंवा स्थानिकांबरोबर चर्चा न करण्याचा सल्ला दिला जातो, त्याचा जरूर आदर करावा.
दुसरीकडे प्रवासाची तिकिटे, हॉटेल्सची आरक्षणे आदींच्या योग्य प्रती जवळ बाळगाव्यात. हे सर्व तपशील, दररोजच्या मुक्कामाची ठिकाणे-हॉटेल्स यांचे नाव, पत्ते, नंबर आदी माहिती तिकिटांच्या प्रतीसह घरी वा नातेवाईकांकडे देऊन ठेवणे अधिक योग्य. अलीकडे रेल्वेसह अनेक ठिकाणी एसएमएस हाच तिकीट म्हणून वैध धरला जातो. काही महिने आधी आगाऊ आरक्षण केलेले असल्यास त्यावेळी आलेला एसएमएस गाडीत बसल्यावर शोधणे कठीण जाते. त्यामुळे असे पुरावा एसएमएस वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवावेत. ह्या बारीकसारीक बाबी वाटल्या तरी एखादी गोष्ट सुटली तर वेळ-पैशाचे गणित बिघडून संपूर्ण पिकनिकचा विचका होऊ शकतो.
ट्रॅव्हल लाइट हा कोणत्याही आनंददायी पर्यटनाचा आणखी एक मूलमंत्र. जेवढे सामान कमी तेवढा फिरण्याचा आनंद अधिक लुटता येतो. वजन कमी असल्याने फिरणे सोपे जाते, चोरीची भीतीही नसल्याने डोक्याचे टेन्शनही अनेकपटींनी कमी होते. प्रवासादरम्यान, मौल्यवान वस्तू, म्हणजे महिलांच्या बाबतीत दागिने जवळ बाळगणे ही मोठी जोखीम ठरू शकते. त्यामुळे शक्यतो दागिने वापरणे टाळावे, असा सल्ला अनुभवी भटके आवर्जून देतात. तिकिटे, व्हिसा-पासपोर्ट आदी कागदपत्रे, औषधे, पाणी, हलके स्नॅक्स, टॉयलेटरीज, हवामानानुसार टोपी, गॉगल्स, रेनकोट, स्वेटर्स आदी चटकन हाताशी येईल, अशा पद्धतीने बॅगमध्ये जवळ ठेवलेले असावे.
एकट्या प्रवास करणार्या महिलांना लक्ष्य करण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे रहदारी नसलेल्या रस्त्यावर वा कमी वर्दळीच्या ठिकाणी सावधानता बाळगावी. बस-रेल्वेमध्ये शक्यतो जिथे अधिक लोक असतील, अशी आसने निवडावीत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नवख्या व्यक्तींशी बोलताना खबरदारी घ्यावी. आपली संपूर्ण माहिती देणे टाळावे. त्यांनी दिलेले खाद्यपदार्थ विनम्रपणे नाकारावेत. आपल्या सुरक्षिततेसाठी ह्या सर्व बाबी आवश्यक आहेत.
आणखी एका महत्त्वाच्या मुद्यावर जाणकार लक्ष वेधतात, परक्या ठिकाणी काही अडचण आल्यास आपण ज्यांना मदतीसाठी बोलावू शकतो, असे सर्व नंबर्स जवळ असावेत. म्हणजेच, स्थानिक पोलीस स्टेशन, हेल्पलाइन क्रमांक, आपत्कालीन नंबर्स, यांची माहिती जरूर ठेवावी. त्याशिवाय, हॉटेल्स, वाहतुकीची साधने आदींची संपूर्ण माहिती आधीच इंटरनेटवरून किंवा अधिकृत ट्रॅव्हल डेस्कवरून घेऊन ठेवल्यास अनोळखी व्यक्तींवर विसंबून राहावे लागणार नाही.
चारचौघींची भटकंती
0
Share.