भारतीय संस्कृतीमध्ये अन्न हे पूर्णब्रह्म समजले जाते. खूपदा याचा विचार केला तर हे वाक्य किती बरोबर आहे, याचाही प्रत्यय येतो. भारतामध्ये विविध राज्यांची भाषा वेगवेगळी आहे. पेहराव वेगवेगळे आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणचे खाद्यपदार्थही वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रात तर प्रत्येक जिल्ह्यात पदार्थ वेगवेगळे बनवले जातात. कोंकणात, विदर्भात, मराठवाड्यात पदार्थांची रेलचेल आहे. आजच्या बदलत्या काळात बर्गर पिझ्झाला जितकी मागणी आहे,त्याच्या तुलनेत घरगुती मर्हाठमोळे जेवण मिळाले तर सर्वांना नक्कीच आनंद होतो.
वर्षभर सणांचा विचार केला तरी असंख्य विविध पदार्थ बनवले जातात. अगदी रोजच्या जेवणाव्यतिरिक्त हे पदार्थ बऱ्याच वेळा वर्षातून एकदाच त्या-त्या सणांच्या निमित्ताने बनवले जातात. मराठी पदार्थांमध्ये खास करून श्रीखंडपुरी, पिवळी बटाटा भाजी, वरणभात हे जरी समोर आले तरी आजही सर्वजण आवडीने खातात. मला आठवते; आमच्या लहानपणी आजोबा म्हणायचे की, आपल्याकडील फुललेली पुरी पाहून ब्रिटीश चक्रावून जायचे. म्हणायचे,’ यात हवा कशी भरली’ त्यांना हा प्रश्र पडे. मराठी पदार्थांमध्ये प्रामुख्याने चुलीवरची भाकरी, चुलीवर भाजलेल्या वांग्याचे भरीत, पिठले असेही पदार्थ पूर्वांपार आवडीने खाल्ले जातात.
आताच्या तरूण पिढीला ह्याचे महत्त्व नसेल कदाचित; पण मराठी संस्कृतीमध्ये बदलत्या हवामानाला, बदलत्या सणांना आपले पदार्थही बदलते असायचे. पूर्वजांनी ह्यावर किती विचार करून हे सर्व बनवले असेल याचा विचार केला तर नक्की वाटते की बदलत्या हवामानात ठराविक पदार्थ आपल्यासाठी उपयोगी आहेत.आज मराठी पेहेरावासोबत खाद्यपदार्थांनी परदेशी लोकांना भुरळ पाडली आहे. आज अनेक देशांतून खास मराठी पदार्थांची रेस्टॉरंट सुरू झालेली पाहायला मिळतात. त्याचे कारण मराठी पदार्थ बनवायची पद्धतही तशीच आहे. घरातीलच असणारे साहित्य वापरून अतिशय चवदार पदार्थ बनवले जातात आणि ते पदार्थ बनवताना त्यातून आपल्याला जास्तीत जास्त पौष्टीकता कशी मिळेल याचाही विचार यात केलेला पाहायला मिळतो. सर्व साहित्य
बेताचे वापरून पण त्यातून चविष्ट पदार्थ तयार करणे हीच तर मराठी जेवणाची खासीयत आहे ना. मराठी पदार्थ कोणताही खा; तो कधीही जळजळीत नसतो; तेलकट नसतो. त्यामुळे त्याने फारसा कोणता त्रास होत नाही. मराठी पदार्थांमध्येही कोंकणातील जेवण
सर्वांना खूप आवडते. त्यात व्हेज जेवण असो अथवा नॉनव्हेज जेवण असो. इथे फिरायला येणारा परदेशी पाहुणाही ह्या जेवणाचे कौतुक करतो. कोंकणात पूर्वी भातपिक मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यापासूनचे पदार्थ बनवले जायचे. आजही तसेच आहे. आणि नारळाची झाडे भरपूर असल्याने प्रत्येक पदार्थात नारळाचे वाटण करून वापर केला जातो. त्याची चव अप्रतिम होते. बऱ्याच पदार्थांमधून कोकम/चिंच यांचाही वापर होतो. इथले मसालेही घरगुती असल्याने त्याची चव छान असते. इथे प्रामुख्याने व्हेज जेवणात मोदक हा गोड पदार्थ पारंपारिक आहे. तो बनविण्याचीही कलाच असावी लागते. अगदी न्याहरीसाठी आंबोळी, घावन, कांदा पोहे, हे आवडीने खाल्ले जातात. घरातील वेगवेगळी पिठं एकत्र करून त्याचे थालिपीठ केले जाते. वेगवगेळी धिरडी केली जातात. कोंकणाप्रमाणेच घाटावरही अनेक प्रकार पाहायला मिळतात. बाजरी -ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत विविध प्रकारच्या भज्या/तर नॉनव्हेजसाठी इथे खूप प्रकार आहेत. विदर्भाचे वांग्याचे भरीत आणि कोणकणातील वांग्याचे भरीत खाल्ले तर चवीत खूप फरक आहे. पण दोन्हीही चवीन परिपूर्ण आहेत. या सर्वांमध्ये एक गोष्ट लक्षात येते की पूर्वांपार चालत आलेल्या पद्धती आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत हे नक्की. कारण मराठी पदार्थ बनवताना त्यातील ताजेपणा आणि चव याची सांगड आहे.
पूर्वी लोक हे घरगुती पदार्थ खायचे त्यांचे शरीर निरोगी होते. आज बदलत्या काळानुसार आपणाकडे गेल्या काही वर्षात बर्गर पिझ्झाचे वेड आले आणि तरूणपिढी त्याकडे आकर्षित झाली. पण त्याचे दुष्परिणाम आज पाहायला मिळत आहेत. कारण बर्गरचे पॅटीस चार महिने अगोदरच करून ठेवलेले असतात. ते टिकवून ठेवण्यासाठी त्यात वेगवेगळे प्रिझरव्हेटीव्ह वापरले जातात आणि ऐनवेळी ते गरम करून तुम्हाला खायला दिले जातात. मराठी पदार्थ कोणतेच असे नाहीत, की जे असे बनवून ठेवले जातात. त्यात कोणतेही प्रिझरव्हेटीव्ह वापरले जात नाहीत. आत्ता बनवले आत्ता खाल्ले असे हे पदार्थ चवीने भरभरून आहेत. आजच्या स्त्रियाही आळशी झाल्यात म्हणून मुलांना, घरातल्यांना बाहेरचे जेवण जेवायला लागते. मान्य आहे; काळ बदलतो आहे. पूर्वी स्त्रिया घरात होत्या. त्यांना तेच काम होते. आजची स्त्री नोकरी व्यवसायात असल्याने घरात वेळ देता येत नाही, असाही सूर येईल. पण सांगू का, असे असले ना तरीही थोडासा वेळ काढला नातर घरात आजही चांगले पदार्थ बनवता येऊ शकतात.आपणच पुढील पिढी चांगली घडविण्यासाठी प्रयास केले पाहिजेत. आजची परिस्थिती पाहता खाद्यसंस्कृती टिकविण्यासाठी नाही तर आपले घर सुदृढ बनविण्यासाठी घरातूनच काही गोष्टी होणे गरजेचे आहे. मला आठवते, आमच्या लहानपणी घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने बाहेरचे काही विकत आणून खाणे जमणारे नव्हतेच. त्यामुळे आई काय बनवेल तेच आमच्यासाठी पूर्णब्रह्म असे. सुट्टीचा दिवस असेल तर पूर्ण दिवस वेगवेगळेव्पदार्थ बनवून खायला घालण्यात आमच्या मातोश्रींना धन्यता वाटे. अगदी कोंड्याच्या मुटक्यांपासून विविध प्रकारचे डाळींचे वडे, वेगवेगळया भाज्यांपासून केलेली थालपिठे, धिरडी, त्याच्या वड्या, असे अनेक प्रकार ती बनवत असे. मराठमोळ्या ह्या पदार्थंमध्ये सणालाही खूप पदार्थ असत.आज रोजच्या जेवणात लोकांना स्वीट डीश लागते. पण पूर्वी सण असेल तेव्हाच घरात गोड पदार्थ बनवले जायचे. पण प्रत्येक सणाचे पदार्थ वेगळे बरं का, गुळाची पोळी, पुरणपोळी, गव्हाची खिर, शेवयांची खिर, गव्हले घरी बनवून त्यांची खिर, विविध प्रकारचे हलवे घरी बनवले जात. त्यामुळे त्या चवी आजही जिभेवर आहेत. अर्थात, मी आता जास्तीत जास्त सर्वप्रकार घरीच बनवते आणि खाऊही घालते.
अगदी थंडीच्या दिवसात आई गव्हाचे सत्व काढून ते रोज सकाळी मीठ घालून किंवा गोड बनवून देत असे. आजच्या मुलांना कदाचित ह्या गोष्टी माहीतही नाहीत.आज माझे अनेक नातलग परदेशी आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार खास मराठी पदार्थांची रेस्टॉरंट आता जिथेतिथे उघडली जात आहेत आणि तिथे राहणाऱ्या भारतीयांसोबत परदेशी पाहुणेही त्याचा आस्वाद घेत आहेत. अगदी वडापाव,मिसळपाव, थालीपीठ यांच्यासारखे पदार्थ जगाच्या नकाशावर लोकप्रिय होताना दिसत आहेत. अहो माझ्या मराठी भाषेची गोडी जशी अविट आहे ना; तशीच पदार्थंची चवही अविटच आहे. साध्या भूक लाड़ू- तहान लाडू मधील १ लाडू खाल्ला तरी त्यावेळीपोटभरी होत असे. पौष्टीक वड्या आणि विविध प्रकारचे चिवडे -लाडू ह्या गोष्टी मराठी माणसाच्या घरात कायम मिळतील. आजही लग्नसमारंभ असूदेत अथवा कोणतीही पूजा असूदेत, पारंपरिक पदार्थांनाच याठिकाणी मान असतो. अलीकडच्या काळात घरांमधून हे पदार्थ होत नसले तरी काही रेस्टॉरंट/ कॅटरर्स यांच्याकडे ह्या सोशल पदार्थांच्या ऑर्डर्स घेतल्या जातात. थोडक्यात काळ बदलला असला तरी मराठी पदार्थांची चव काही जिभेवरून हालत नाही; हेच खरे.
1 Comment
सुरेख लेख.. मानसी चेऊलकर या स्वतः खुप सुरेख खाद्यपदार्थ बनवितात. हा शब्दपदार्थही त्यांनी सुंदर बनविला आहे.!