सणवार म्हटले की प्रश्न पडतो नैवेद्याला काय करावे? काही प्रमाणात आपल्याकडे पक्वान्ने ठरलेली आहेत. गणपती बाप्पाना उकडीचे मोदक, गौरीला घाव-घाटले, संक्रांतीच्या दिवशी गुळाच्या पोळ्या, होळीला पुरणपोळी इ. पण नवरात्रात मात्र नऊ दिवस रोज देवीला दसऱ्यापर्यंत भोजनात गोड काही तरी करतात. संध्याकाळी आरतीनंतर प्रसाद असतो. भोंडल्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खिरापती असतात. एकंदरीत नवरात्र म्हणजे देवीबरोबर लहानथोर सगळ्यांची प्रसादाची चंगळ असते.
नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी, तसेच अष्टमी, ललिता पंचमी ह्या दिवशी बऱ्याच जणांकडे सवाष्ण किंवा कुमारिका जेवायला असतात. म्हणून पहिल्या दिवशी व दसऱ्याला बासुंदी, श्रीखंड, जिलब्या, पुरणपोळी असे पक्वान्न असते. ललिता पंचमीला भाजणीचे वडे, भोपळ्याचे घारगे हवेतच. चटणी, कोशिंबीर, दोन भाज्या, थोडक्यात उजवी-डावी बाजू साग्रसंगीत सजवलेलं पान पुढे आले की सवाष्ण रूपातील देवी भरभरून आशीर्वाद देते अशी लोकांची श्रध्दा असते. हे तीन दिवस वगळता रोज कधी शिरा, गव्हल्याची खीर, ओल्या नारळाच्या करंज्या, रव्याचा लाडू, पुरणाचे कडबू, काही नाही तर सुधारस किंवा केळ्याची शिकरण किंवा बर्फीचा तुकडा तरी गोड म्हणून पानावर वाढायला हवा. तांदळाच्या रव्याची गूळ घालून केलेली खांडवी हा पदार्थ पण दोन वेळा होई. आता गुलाबजाम, रसगुल्ले,रसमलाई, खाजा असे तयार पदार्थ आहेतच. आमच्याकडे आई पाकातल्या पुऱ्या छान करत असे. त्यामुळे दसऱ्याला बहुतेक वेळा ‘त्याच कर’ अशी आम्हा मुलांची फर्माईश असे. एखाद्या दिवशी बदामाचे काप, केशर, वेलची पूड, घरचे तूप आणि तांदुळ तर घरचेच होते-असा साखरभात तयार झाला की कधी एकदा नैवेद्य दाखवतात असे होऊन जात असे. रव्याचे लाडू केले की एकदा पानावर आणि नंतर उरले तर भोंडल्याची खिरापत होई.
दिवाळीसारखी नवरात्रीची थोडी तयारी आधी करता येते. सगळे सारखे बारीक गव्हले करणे ही कला आहे. मध्ये जरा जाड, दोन्ही बाजूला निमुळते होत गेलेले गव्हले वाळले आणि काचेच्या बाटलीत गेले की, वेळखाऊ काम संपते. मग ललिता पंचमीला वड्याना लागणारी भाजणी दळून आणायची. बाकी लागणाऱ्या सामानाचीही जमवाजमव करावी लागते.
साधारण कोणत्या दिवशी काय मेनू हे बरेच आधी ठरवले जाते. कारण त्यावर भाजी अवलंबून असते. उदा. खीर पुरी , श्रीखंड पुरी केली तर उकडलेल्या बटाट्याची भाजी, त्यावर खोबरं कोथिंबीर. नैवेद्य म्हणजे फक्त पक्वान्न नाही तर केलेल्या पदार्थांनी सजवलेलं पान. केळीचे पान ताटात ठेवून त्यावर वाढायचे. भाताच्या, शिऱ्याच्या मुदी पाडायच्या. प्रत्येक पदार्थ ठरलेल्या जागी एकमेकांत न मिसळू देता वाढता आलाच पाहिजे ही अट. आज आपल्याला टीव्हीवरील कुकरी शोमधील सजावटीचे कौतुक वाटते, पण आपल्याकडे पितळेच्या फुल्यांचे सागवानी पाट, रांगोळीची महिरप, उदबत्तीचा सुगंध यापासून ते वाढलेल्या पानापर्यंत सगळे किती शोभिवंत दिसते ते ज्येष्ठ मंडळींना आठवेल.
नऊ दिवस आरतीचा प्रसाद त्यामानाने सोपा. साखर फुटाणे आणून ठेवलेले असत. खोबरे किसून भाजून ठेवलेले असते. आयत्यावेळी त्यात पिठीसाखर मिसळून खिरापत करता येते. सफरचंद, केळी, नारळ फोडून खुर्ड्या करून त्यांचा प्रसाद. सहज उपलब्ध असेल त्याचा नैवेद्य दाखवत. भोंडल्याची खिरापत लपवून ठेवलेली असते. भोंडला खेळणाऱ्या बायका, मुलींनी ती ओळखायची. खेळायला येणाऱ्या बायका पण अधूनमधून आपल्या घरून काही तरी प्रसाद डब्यातून आणतात. त्यात गोडाबरोबर तिखटामिठाचे पदार्थ पण कधी असतात. खेळून, गाणी म्हणून दमल्यावर एकत्र बसून गप्पा मारता मारता पळसाच्या पानांच्या द्रोणात किंवा केळीच्या पानात खाल्लेल्या खिरापतींंची चव अजून आठवते. आता वेळेअभावी काही घरी तयार पदार्थ विकत आणले जात असले तरी नैवेद्य दाखवण्यामागची भावना आणि श्रद्धा तशीच कायम राहिली आहे.
नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी, तसेच अष्टमी, ललिता पंचमी ह्या दिवशी बऱ्याच जणांकडे सवाष्ण किंवा कुमारिका जेवायला असतात. म्हणून पहिल्या दिवशी व दसऱ्याला बासुंदी, श्रीखंड, जिलब्या, पुरणपोळी असे पक्वान्न असते. ललिता पंचमीला भाजणीचे वडे, भोपळ्याचे घारगे हवेतच. चटणी, कोशिंबीर, दोन भाज्या, थोडक्यात उजवी-डावी बाजू साग्रसंगीत सजवलेलं पान पुढे आले की सवाष्ण रूपातील देवी भरभरून आशीर्वाद देते अशी लोकांची श्रध्दा असते. हे तीन दिवस वगळता रोज कधी शिरा, गव्हल्याची खीर, ओल्या नारळाच्या करंज्या, रव्याचा लाडू, पुरणाचे कडबू, काही नाही तर सुधारस किंवा केळ्याची शिकरण किंवा बर्फीचा तुकडा तरी गोड म्हणून पानावर वाढायला हवा. तांदळाच्या रव्याची गूळ घालून केलेली खांडवी हा पदार्थ पण दोन वेळा होई. आता गुलाबजाम, रसगुल्ले,रसमलाई, खाजा असे तयार पदार्थ आहेतच. आमच्याकडे आई पाकातल्या पुऱ्या छान करत असे. त्यामुळे दसऱ्याला बहुतेक वेळा ‘त्याच कर’ अशी आम्हा मुलांची फर्माईश असे. एखाद्या दिवशी बदामाचे काप, केशर, वेलची पूड, घरचे तूप आणि तांदुळ तर घरचेच होते-असा साखरभात तयार झाला की कधी एकदा नैवेद्य दाखवतात असे होऊन जात असे. रव्याचे लाडू केले की एकदा पानावर आणि नंतर उरले तर भोंडल्याची खिरापत होई.
दिवाळीसारखी नवरात्रीची थोडी तयारी आधी करता येते. सगळे सारखे बारीक गव्हले करणे ही कला आहे. मध्ये जरा जाड, दोन्ही बाजूला निमुळते होत गेलेले गव्हले वाळले आणि काचेच्या बाटलीत गेले की, वेळखाऊ काम संपते. मग ललिता पंचमीला वड्याना लागणारी भाजणी दळून आणायची. बाकी लागणाऱ्या सामानाचीही जमवाजमव करावी लागते.
साधारण कोणत्या दिवशी काय मेनू हे बरेच आधी ठरवले जाते. कारण त्यावर भाजी अवलंबून असते. उदा. खीर पुरी , श्रीखंड पुरी केली तर उकडलेल्या बटाट्याची भाजी, त्यावर खोबरं कोथिंबीर. नैवेद्य म्हणजे फक्त पक्वान्न नाही तर केलेल्या पदार्थांनी सजवलेलं पान. केळीचे पान ताटात ठेवून त्यावर वाढायचे. भाताच्या, शिऱ्याच्या मुदी पाडायच्या. प्रत्येक पदार्थ ठरलेल्या जागी एकमेकांत न मिसळू देता वाढता आलाच पाहिजे ही अट. आज आपल्याला टीव्हीवरील कुकरी शोमधील सजावटीचे कौतुक वाटते, पण आपल्याकडे पितळेच्या फुल्यांचे सागवानी पाट, रांगोळीची महिरप, उदबत्तीचा सुगंध यापासून ते वाढलेल्या पानापर्यंत सगळे किती शोभिवंत दिसते ते ज्येष्ठ मंडळींना आठवेल.
नऊ दिवस आरतीचा प्रसाद त्यामानाने सोपा. साखर फुटाणे आणून ठेवलेले असत. खोबरे किसून भाजून ठेवलेले असते. आयत्यावेळी त्यात पिठीसाखर मिसळून खिरापत करता येते. सफरचंद, केळी, नारळ फोडून खुर्ड्या करून त्यांचा प्रसाद. सहज उपलब्ध असेल त्याचा नैवेद्य दाखवत. भोंडल्याची खिरापत लपवून ठेवलेली असते. भोंडला खेळणाऱ्या बायका, मुलींनी ती ओळखायची. खेळायला येणाऱ्या बायका पण अधूनमधून आपल्या घरून काही तरी प्रसाद डब्यातून आणतात. त्यात गोडाबरोबर तिखटामिठाचे पदार्थ पण कधी असतात. खेळून, गाणी म्हणून दमल्यावर एकत्र बसून गप्पा मारता मारता पळसाच्या पानांच्या द्रोणात किंवा केळीच्या पानात खाल्लेल्या खिरापतींंची चव अजून आठवते. आता वेळेअभावी काही घरी तयार पदार्थ विकत आणले जात असले तरी नैवेद्य दाखवण्यामागची भावना आणि श्रद्धा तशीच कायम राहिली आहे.