आता आमच्यात वेगळे असे काय आहे? शब्द वेगळे कुठले? मी वेगळा कुठला? असे राहिलेले नाही. हे नाते वर्षानुवर्षे खुलत आले आहे. वेगवेगळ्या माध्यमातून काम करताना सातत्याने ह्या नात्यामुळे मी तगलोय, टिकलोय. एखाद्या मंचावर अचानक तुम्हाला सांगण्यात येते की अमुक एका विषयावर तुम्ही बोला तेव्हा काय बोलू, असा प्रश्न मला पडतो. त्या वेळेस शब्द मला सांगतात भिऊ नकोस, तू तोंड उघड, आम्ही आहोत. हा दिलासा जोवर आहे तोवर मी व्यक्त होत राहणार.
‘कधी शब्द आले, सुरांनीच नाहले
मलाही न कळले, कसे गीत झाले’
माझ्या शब्दांशी असलेल्या ह्या नात्याबद्दल मी नेहमी असेच म्हणतो की शब्द कधी आले मला माहीत नाही, त्याचे गाणे कधी झाले मला ठाऊक नाही. हा प्रवास फार मागे जाऊन पाहावा लागेल आणि तो थोडासा मलाही गोंधळात टाकणारा आहे. माझ्या एका कवितेत मी लिहिले होते,
‘अर्थ लेवुनी पहिले अक्षर, कधी उमटले कळले नाही
परी घेतला वसा न सुटला, पाऊल मागे वळले नाही’
पहिले अक्षर कधी लिहिले, पहिले अक्षर प्रत्येक जण तेव्हा लिहितो जेव्हा आई आपल्याला पाटीवर अ आ ई लिहायला शिकविते. मग त्यातले अ लक्षात राहत नाही पण आ ई मात्र लक्षात राहते, कारण आईशी आपण जोडले गेलेले असतो. ती नुसती पाटीवर नसते तर मनात असते. तसाच कुठलाही शब्द मनात रुजण्यासाठी तो मुळात तिथे असावा लागतो, त्याचे अस्तित्व असावे लागते. त्यामुळे शब्दांशी नाते हे त्या वयातच जुळते जेव्हा तुम्हाला शब्दांची जाण येते. माझ्या बाबतीत मी स्वतःला भाग्यवान समजतो. लहानपणी गावी कोकणातल्या घरी गेल्यावर तिथे आजोबा गाथा, ज्ञानेश्वरी आणि पोथ्या मोठ्याने वाचायचे, त्यामुळे शब्दांचा परिचय हा मला लहानपणापासून होता. दासबोध असेल, गाथा असेल, छान छान शब्द कानावरून जायचे अगदी उमलत्या वयात. म्हणजे आता ज्या वयात मुले टीव्ही पाहतात संगणकावर खेळ खेळतात आणि त्यात रमलेलेदेखील असतात, अशा वयात माझ्या कानावर ते छान छान शब्द पडले. आत्ताच्या मुलांना मराठी भाषेतले फारसे शब्द माहीत नसतात. भावना व्यक्त करण्यासाठी तेव्हा ते इंग्रजी भाषेचा वापर करतात, परंतु इंग्रजी भाषेत भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचे तितके पर्याय नाहीत. मराठी भाषेचे तसे नाही, मराठी भाषेत संस्कृत तसेच इतर भाषांचा जो ओघ येऊन मिळालेला आहे त्यामुळे ती समृद्ध आहे. आज जेव्हा गाणे लिहिताना मला पर्याय हवे असतात, तेव्हा कुठलीही भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दांचा तुटवडा नसतो. ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात आणि मला त्यांना आळवावे लागत नाही. मी लेखणी घेऊन बसलो की ते अगदी समोर हजर होतात. त्यासाठी मी शब्दांचा कायमच ॠणी राहीन. ह्याचे श्रेय मी माझ्या लहान वयात आजोबांच्या त्या पोथी वाचनाला देतो. नंतरच्या काळात मी त्याचे श्रेय रेडीओला देतो.
काळात बदल झाला आहे. संगणक, टीव्ही ह्यांसारख्या प्रसारमाध्यमांचा झपाट्याने जो मारा होत आहे, त्याने माहिती खूप मिळते पण नेमके काय घ्यायचे हे आत्ताच्या पिढीला कोणीतरी दाखवणे गरजेचे आहे. तसे माझ्या त्या वयात मला गीत लेखनाकडे खेचणारे आणि शब्दांची भुरळ घालणारे माध्यम म्हणजे रेडीओ होते. टीव्ही नसल्या कारणाने दिसायचे काहीच नाही. सातत्याने रेडीओवर गाणी वाजायची आणि ती श्रवणीय असायची कारण श्रवण यंत्राचाच वापर तेव्हा जास्त केला जायचा. त्यामुळे तुम्ही तुमचे काम करताकरता छानछान शब्द कानावरून जायचे, ते काव्य ऐकायला मिळायचे. मग बराच वेळ ते उलगडत जायचे. त्याची भुरळ पडायची की ही भावना किती छान, किती गोड पद्धतीने व्यक्त केली आहे. मग आपल्याला तसे का नाही येणार? आपण असे काही करावे का? हे जे आहे ते हळूहळू उलगडत गेले आणि त्यातून मंडळी सापडत गेली, मिळत गेली. मोठमोठे साहित्यिक घरात आणून बसवायची क्षमता रेडीओवर होती. एकाच वेळी भा.रा. तांबे, पाडगावकर, बोरकर, माडगुळकर, खेबुडकर, अशी अगणित मंडळी, ज्यांनी उत्तम साहित्य निर्माण केले, ज्यांनी उत्तम काव्य जन्माला घातले ते आपल्या घरात आले ते रेडीओमुळेच. मी नेहमी असे म्हणतो की रेडीओने माझ्या कानाला पापण्या दिल्या. कसे असते की, एखादे काही नाही आवडले तर डोळे मिटून घेता येतात पण कान नाही मिटून घेता येत. हे चांगले, हे वाईट, हे ठरवण्याचा अधिकार कानाला नसतो. ते धर्मशाळेसारखे असतात, ज्यात कुणीही आत ये-जा करू शकते. पण रेडीओने मला शिकवले की काय चांगले आहे, काय उत्तम आहे, काय ऐकावे, काय ऐकू नये, हा संस्कार घडवला. त्याने माझ्यात एक अशी भावना निर्माण झाली आहे की मी माझे कान चांगल्या नसलेल्या गोष्टी टाळण्यासाठी मिटून घेऊ शकतो. त्या काळामध्ये सातत्याने वेगवेगळे कवी, वेगवेगळे लेखक हे माझ्यापर्यंत पोहोचत गेले आणि मला त्या सार्यांशी जोडणारा दुवा होता ते म्हणजे शब्द. मग मला वाटले की आपणही असे व्यक्त का होऊ नये, व्यक्त व्हायचे माध्यम, शब्दांची ताकद ही हळूहळू उकलत गेली, उलगडत गेली आणि वाटायला लागले आपण काहीतरी लिहायला हवे. एखादा मुलगा लहानपणी ठरवतो की मोठेपणी मला लेखकच व्हायचे आहे, मोठा साहित्यिक किंवा गीतकार व्हायचे आहे, तसे काही माझे ठरलेले नव्हते. बर्याच गोष्टी जुळत आल्या.
लहानपणी कोकणात जायचो. छान झाडे बघायचो. मग इथल्या मित्रांना येऊन त्याचे वर्णन करायचो. ते वर्णन तोकडे पडायला लागले तेव्हा मी चित्र काढू लागलो की जेणेकरून चित्रांतून त्यांना तो निसर्ग कळावा. चित्रातून निसर्ग कळतोय ते दृश्य तर दिसते आहे पण गंध, स्पर्श ह्या गोष्टी चित्रांतून कश्या कळणार? आंब्याचे मोहरणे, चाफ्याचे दरवळणे ह्या गोष्टी चित्रातून नाही दाखवता येत. मग मला वाटले हे छान शब्दांत मांडावे. तिथे कुठेतरी मला कविता सापडली आणि तो निसर्ग शब्दातून कसा मांडता येईल ह्याचा मी विचार करू लागलो. मी आळवू लागलो त्या शब्दांना. कमोदिनी काय जाणे तो परिमळ हे आजोबांकडून कानावर पडलेले. त्यात कमोदिनी म्हणजे काय? परिमळ म्हणजे काय? दरवळ म्हणजे काय? मोहरणे म्हणजे काय? बहरणे म्हणजे काय? ह्या भावना आहेत आणि त्यांना हवे असणारे शब्दांचे भांडार तो खजिना हा आपल्याकडे आहे हे तेव्हा जाणवले. मी डोळे बंद करून जेव्हा काही लिहायला बसायचो तेव्हा भराभरा शब्द सुचायचे आणि मला कळायचे नाही हे आले कुठून? कारण शाळेत कधीही मराठीच्या विषयात मला काही फार गुण नव्हते. मग मला कळायचे हा तो टप्पा नाही आहे, हा फार पूर्वीचा टप्पा आहे ज्यात ते शब्द साठवले आहेत. मातीतले, लोकसंगीतातले आणि संत साहित्यातले जे शब्द मिळत गेले तो दुवा, ते नाते तिथे जडले आणि ते नाते अथक आहे, सातत्याने सोबत असणारे आहे. एक सावली असते एखाद्या सोबत तसे ते आहे. प्रयत्नपूर्वक सहजपणातून ते नाते अधिकाधिक दृढ होत राहिले. कवी झालो, गीतकार झालो, त्या शब्दांचे नाते आणखी घट्ट झाले. तुम्ही सिनेमाकरिता लिहिता तेव्हा शब्द तुम्हाला वश असावे लागतात. ते तुमचे मित्र असावे लागतात. आप्तसखा, जिवलग अशा भूमिकेतून शब्द तेव्हा तुमच्या पाठीशी असावे लागतात. तू काहीही कर आम्ही आहोत, अजिबात घाबरू नकोस असे तुम्हाला म्हणणारा तुमचा सखा, जिवलग मित्र असतो, तसे तुमच्यासोबत शब्द असावे लागतात. त्याशिवाय तुम्हाला चालीवर गाणे लिहिता येत नाही. एक संगीतकार कुठल्यातरी चार भिंतीच्या आड एका स्टुडीओमध्ये तुम्हाला एक चाल ऐकवतो आणि सांगतो, आता ह्या चालीवर प्रेमगीत लिहायचे आहे किंवा ह्यावर निसर्गाचे एक गाणे लिहायचे आहे अशा वेळेस ते प्रेम आणि तो निसर्ग त्या चार भिंतींच्या आत उभा करण्यासाठी तुम्हाला शब्द वश असावे लागतात. ती भावना, त्या जाणिवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यक्त करायला शब्द मदत करतात. तुमच्या डोळ्यासमोर जो निसर्ग आहे, ज्या प्रेमभावना आहेत त्या कागदावर जोवर येत नाहीत तोवर त्याला अर्थ नसतो. त्यात त्याचे आकार उकार त्यांचे आकारान्त, ईकारान्त ह्या सगळ्या अटी असतात. ड ड डी असे म्हटल्यानंतर तिथे सजली असेच लिहावे लागते. उडाला असे लिहून चालत नाही. त्या सगळ्या आकार उकरांना सांभाळून पुन्हा त्या ओळीला एक सुरेख अर्थ असावा लागतो. त्यातून ती भावना व्यक्त व्हावी लागते. अशावेळी हे माझे आप्त-सखा-जिवलग माझे शब्द माझ्या पाठीशी असतात. ते माझ्या लेखणीत शिरून अलवारपणे त्या कागदावर उतरतात आणि एक छान गीत जन्माला येते. त्यामुळे मला सतत वाटते, ही सगळी त्यांची कृपा आहे. गेली दहा एक वर्षे मी चित्रपटांसाठी लेखन करतो आहे. आजवर जवळजवळ शंभरच्या घरात सिनेमे झाले. तीन-चारशे गाणी झाली. गैरफिल्मी किंवा आल्बमसाठी बरीच गाणी झाली आहेत. कविता झाल्या आहेत पण अजूनही लोक म्हणतात तुमच्या कवितेत वेगळेपण आहे, तुमच्या उपमा वेगळ्या असतात. एवढे शब्द आणता कुठून? खरेच मी त्यांचा ॠणी आहे. शब्द आणि मी असे वेगळे राहिलेलो नाहीत. आमचे एक वेगळे नाते झालेले आहे.
‘उलटून गेली युगे आता त्या अनुबंधासही अंकुर फुटले’
इतकी वर्षे उलटून गेली की जे आमच्यातले नाते होते त्यालाही आता वेगळे अंकुर फुटले आहेत.
‘प्रश्न अताशा पडे जगाला, मी कुठला अन् अक्षर कुठले
मिसळून गेलो परस्परांतच, न उरले आता वेगळे काही
परी घेतला वसा न चुकला, पाऊल मागे पडले नाही’
असे हे आमच्यात दृढ नाते आहे. आता आमच्यात वेगळे असे काय आहे? शब्द वेगळे कुठले? मी वेगळा कुठला? असे राहिलेले नाही. हे नाते वर्षानुवर्षे खुलत आले आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून काम करताना सातत्याने ह्या नात्यामुळे मी तगलोय, टिकलोय. एखाद्या मंचावर अचानक तुम्हाला सांगण्यात येते की अमुक एका विषयावर तुम्ही बोला तेव्हा काय बोलू, असा प्रश्न मला पडतो. त्या वेळेस शब्द मला सांगतात भिऊ नकोस, तू तोंड उघड, आम्ही आहोत. हा दिलासा जोवर आहे तोवर मी व्यक्त होत राहणार. मला असे वाटते की, माझ्या संपूर्ण यशाचे, आजवरच्या प्रवासाचे जे श्रेय असेल तर ते सगळे शंभर टक्के त्या शब्दांना जाते. शब्दशः शब्दांना जाते.