‘जय महाराष्ट्र’ असा दणदणीत घोष ऐकला की समजायचं शिवसैनिकाची कुणाशी तरी भेट झाली. ‘राम राम’, ‘नमस्कार’, असे भेटीच्या वेळचे परवलीचे शब्द किमान शिवसैनिकांच्या बाबतीत तरी मागे पडले आणि त्याची जागा ‘जय महाराष्ट्र’ने घेतली, त्याला पाच दशकांहून अधिक काळ उलटला आहे. राज्याच्या ठायी असलेला अभिमान ह्या घोषणेने शिवसैनिकांमध्ये क्षणाक्षणाला जागता ठेवला. जणू प्रांतिक अस्मितेची ती खूणच ठरली. मराठी ठसका ह्या शब्दांमधून जाणवू लागला. ‘जय महाराष्ट्र’सारखाच आणखी एक घोष शिवसेनेच्या स्थापनेनंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे नव्वदच्या दशकात रूजू पाहात होता, तो म्हणजे ‘शंभो नारायण’. अखिल भारतीय सेनेची स्थापना करून शिवसेनेला आव्हान देेेेणाऱ्या कुख्यात अरूण गवळी याचं हे घोषवाक्य. शिवसैनिकांच्या ‘जय महाराष्ट्र’प्रमाणेच ‘शंभो नारायण’चा वापर गवळीपासून ते त्याच्या गँगमधील गुंड आणि अखिल भारतीय सेनेचे कार्यकर्तेही सर्रास करू लागले. शिवसेनेने अभासेच्या आव्हानाची दखल घेत पोलिसांमार्फत गवळी सेनेचा पुरता बीमोड केला आणि हळूहळू हवेत विरून गेलेला ‘शंभो नारायण’चा घोष केवळ शिवभक्त अरूण गवळीपर्यंतच सीमित राहिला.
समुहाचं असं वेगळं मानसशास्त्र असतं. राजकारणी कळत नकळत ह्या मानसशास्त्राचा बऱ्यापैकी अभ्यास करीत असावेत. समुहाला आकर्षित करणं आणि दीर्घकाळ आपल्याकडे खिळवून ठेवणं, हे अतिशय कठीण काम. तशी खुबी असणं ही तर नेतेमंडळींसाठी अत्यावश्यक बाब. म्हणूनच राजकारणात भरभक्कम मुद्दा हाती असल्याशिवाय नेत्यांची डाळ जनतेसमोर शिजत नाही ते त्यामुळेच. ज्याचं नाणं खणखणीत तो बाजीगर. शिवसेनेचा जन्म झाला तोच मुळी प्रांतिक अस्मितेच्या मुद्यावरून. मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायावर बोट ठेवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा हाती घेतला आणि राजकारणात शिवसेनेचं स्थान बळकट केलं ते कायमचंच. प्रांतिक अस्मितेचा मुद्दा इतका भावनिक होता की राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात अमराठी – अमराठी असे तट, कुठे दृश्य तर कुठे अदृश्यरित्या पडले. कधी जाणवण्याइतपत तर कधी अजाणतेपणी मराठीपणाचा मुद्दा घुमत राहिला. अनेक संदर्भात मराठीचा मुद्दा राजकारणाला स्पर्श करीत राहिला.
कामगार संघटना, बँका – सरकारी कार्यालयांमधील व्हाईटकॉलर वर्ग, कलाकार असा सगळीकडे मराठीचा मुद्दा नेत शिवसेनेने मराठी माणसात लोकप्रियता मिळवली. मराठीच्या मुद्दयाचा वापर करीत समुहाला ताब्यात घेण्याची किमया शिवसेनाप्रमुखांनी साधली होती. मराठीचं वारं त्यांनी लीलया अनेक क्षेत्रात नेलं आणि १९९० च्या दशकात तर ते मुंबईच्या अंडरवर्ल्डलाही भिडलं. १९९३ च्या मार्च महिन्यात मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेमागे दाऊद इब्राहिम असल्याचं उघडकीस आलं आणि शिवसेनेच्या देशद्रोही मुस्लिमविरोधाला आणखीनच धार आली. त्या आधीच्या काही वर्षांत अनेक सत्ताधारी नेत्यांचे माफिया टोळ्यांशी असलेले संबंध उघड झाले होते. उल्हासनगरचा आमदार पप्पू कलानी टाडाअंतर्गत तुरूंगात गेला होता. जे.जे. हत्याकांड प्रकरणात भिवंडीचा महापौर दाऊद टोळीला मदत केल्याच्या गुन्ह्यात टाडाअंतर्गत बंदिस्त होता. वसई – विरारमधील हितेंद्र ठाकूरही गजाआड होता. त्याचदरम्यान तत्कालीन महापालिका उपायुक्त गो.रा. खैरनार यांनीही शरद पवार यांच्यावर बेछुट आरोप केले होते. दाऊद टोळीच्या शर्मा बंधूंनी शरद पवार संरक्षणमंत्री असताना त्यांच्या विमानातून केलेल्या प्रवासाची पार्श्वभूमी त्याला होती. याच सुमारास एका सभेत शिवसेनाप्रमुख भाषणाच्या ओघात दाऊदला मिळणाऱ्या राजकीय आशिर्वादाबाबत संताप व्यक्त करताना म्हणाले,‘‘तुमचा दाऊद, तर आमचा गवळी.’’ अर्थातच तेव्हाही नेहमीप्रमाणे शिवसेनाप्रमुखांच्या याही वाक्यावर कवित्व सुरू झालं. अनेकांनी आपापल्या सोयीनुसार त्यांच्या ह्या वाक्याचा अर्थ लावला. त्यात राजकारणी, अंडरवर्ल्ड टोळ्यांपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वांचाच समावेश होता. याच सुमारास दाऊद आणि गवळी टोळीतून विस्तव जात नव्हता. मुंबईत गँगवॉरने कळस गाठला होता. दोन्ही टोळ्या एकमेकांच्या गुंडांना मिळेल तेथे टिपत होते. मुंबईत रक्ताचे सडे पडत होते. दाऊद गँग आर्थिकदृष्ट्या मजबूत होती. बॉलिवुड, नेतेमंडळी, बिल्डरांपर्यत अनेक बड्या हस्ती दाऊद गँगच्या हितचिंतक होत्या. तर प्रामुख्याने खंडणी उकळणारी गवळी गँग त्याच्याशी कडवी झुंज देत होती. नाही म्हटलं तरी मराठी माणसाच्या अंतर्मनात कुठेतरी गवळी गँगबद्दल सहानुभुती होतीच.
शिवसेनाप्रमुखांनी हा एक दगड मारून अनेक घटकांना विचार करायला भाग पाडण्याची किमया साधली होती. अरूण गवळी मध्य मुंबईतला अस्सल मराठी गुंड. त्याच्या गँगमध्ये बऱ्यापैकी मराठी गुंडांचा भरणा. भायखळ्याच्या दगडी चाळीसारख्या टिपिकल मराठी चाळीत त्याचा अड्डा. तेथे महाशिवरात्रीपासून नवरात्रीपर्यंत धार्मिक सण विधिवत साजरे करण्याची त्याची परंपरा. त्यामुळे अनेकांनी वेगवेगळे अर्थ लावणं स्वाभाविकच होतं. कुणी गवळी मराठी असल्याने शिवसेनाप्रमुखांचा ‘आमचा गवळी’ असा उल्लेख म्हणजे त्यांनी मराठी गुंडांना दिलेली अप्रत्यक्ष साथच असल्याचा अन्वयार्थ काढला. कुणी दाऊद देशद्रोही मुस्लिम असल्याने बाळासाहेबांनी हिंदू गवळीला आपली साथ असल्याचं ध्वनित केल्याचा निष्कर्ष काढला. बाळासाहेबांच्या ह्या एका वाक्याने अंडरवर्ल्डमध्ये मराठी – बिगरमराठी किंवा हिंदू – मुस्लिम अशी दुफळी निर्माण होणार काय, असेही आडाखे बांधले गेले. पुढील काळात शहरातील गँगवॉरला वेगळं वळण लागण्याची शक्यताही वर्तवली जात होती. अरूण गवळी आणि त्याचे साथीदारही शिवसेनाप्रमुखांच्या ह्या बहुउद्देशीय वाक्याने भलतेच सुखावले होते. कारण तोपर्यंत गवळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नावाने शंख करीत होता. आपल्या आणि आपल्या टोळीतील गुंडांविरूद्ध कडक कारवाई करणारे पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून दाऊद गँगला मोकाट सोडतात, अशी त्याची ओरड होती. सेनाप्रमुखांचं वाक्य म्हणजे गवळी आणि पर्यायाने मराठी गुंडांसाठी स्फुरण चढवणारं भरतवाक्य होतं. गवळीच्या गुंडांमध्येही ह्या वाक्यावरून चर्चा भलतीच रंगत असे. आता आपल्याला विरोधी पक्षाचा का होईना पण राजकीय वरदहस्त मिळेल, अशा उकळ्या त्यांना फुटत होत्या. शिवसेनेलाही ह्या वाक्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभच झाला असावा, अशी अटकळ बांधायला हरकत नाही. काहीच नाही तर निदान अंडरवर्ल्डमधील शिवसेनेच्या हितचिंतकांमध्ये काही प्रमाणात तरी वाढ झालीच असावी.
त्यानंतरच्या म्हणजे १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती सत्तेवर आली. अंडरवर्ल्डला दाखवलेलं मराठी कार्ड पुढे काय उलथापालथ घडवेल, याची उत्सुकता सर्वांनाच होती. पण ‘आमचा गवळी’ असं म्हणणाऱ्या शिवसेनाप्रमुखांकडून पुढे प्रत्यक्षात काहीच संकेत मिळाले नाहीत. भविष्यात झालं ते सगळं वेगळंच होतं. काँग्रेसच्या काळात तुरूंगात गेलेला अरूण गवळी बऱ्याच वर्षांनी बाहेर पडला तो शिवसेना – भाजपाची सत्ता असताना. मात्र फार काळ तो बाहेर राहू शकला नाही. बाहेर पडताच लगोलग ‘एमपीडीए’अंतर्गत तो पुन्हा वर्षभरासाठी तुरूंगात गेला. त्याला अटक होऊ नये म्हणून शिवसेनेचे मोहन रावले यांनी दगडी चाळीत जाऊन बरेच प्रयत्न केले. पण अखेर पोलिसांनी त्याची उचलबांगडी केलीच. त्यामुळे दगडी चाळ संतापली. नाईलाजाने शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेचेच खासदार मोहन रावले यांना गवळीची सुटका व्हावी, ह्या मागणीसाठी आग्रीपाडा पोलीस ठाण्याबाहेर उपोषणाला बसावं लागलं. त्या उपोषणाचाही काही उपयोग झाला नाही. कारण ‘आमचा गवळी’ एव्हाना शिवसेनेसाठी ‘आमचा’ राहिला नव्हता.
सत्तेत येणारा कोणताच पक्ष आपल्या उपयोगाचा नाही, हे एव्हाना अरूण गवळीच्या ध्यानात आलं होतं. त्याची गाठ पडली ती जितेंद्र दाभोलकर ह्या उत्साही आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या तरूणाशी. आधी शिवसेनेच्या युनियनमध्ये राहून तेथील राजकारणाला कंटाळून बाहेर पडलेल्या दाभोलकरने गवळीला तोही राजकारणात बस्तान बांधू शकतो याची जाणीव करून दिली. गवळीच्या आकांक्षांनाही धुमारे फुटले. लागलीच त्याने दाभोलकरला होकार दिला आणि अखिल भारतीय सेनेची नोंदणी करण्यात आली. पुढचा काळ धामधुमीचा होता. अभासेला मिळणारा बेरोजगार तरूणांचा प्रचंड पाठींबा, आझाद मैदानावरून मंत्रालयावर काढण्यात आलेला विराट मोर्चा ह्या सगळ्या घटना पाहता अभासे आपल्याला भारी पडणार याची खूणगाठ शिवसेनेने बांधली आणि पोलिसांना आदेश गेले. धडाधड गवळीचे गुंड पोलीस चकमकीत मारले जाऊ लागले. हां हां म्हणता गवळी टोळीला वेसण घातली गेली आणि राजकारणात मुसंडी मारण्याची इच्छा अरूण गवळीला मर्यादित ठेवावी लागली. अशा तर्हेने शिवसेनाप्रमुखांचे ‘आमचा गवळी’ हे शब्द कालांतराने खोटे ठरले.
बाळासाहेबांच्या ‘त्या’ वाक्याने सुखावलेला एक मराठी वर्ग अंडरवर्ल्डमध्ये होता. पण पुढे अनेक शिवसेना पदाधिकारी याच गुंडांकडून मारले गेले, हा भाग अलाहिदा. अंडरवर्ल्डला जी मराठीपणाची किनार होती त्यालाही बरीच मोठी पार्श्वभूमी आहे. १९८२ साली कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांनी गिरण्यांचा संपाचा ऐतिहासिक लढा पुकारला. पुढच्या काही वर्षात गिरणी कामगार टाचा घासून मरणासन्न अवस्थेत गेले. त्यांच्या मुलांनी जे हाल पाहिले ते अत्यंत दुदैवी होते. उपासमार, अपमान, लाचारी ह्या सगळ्या परि स्थितीत ती मुलं वाढली. बेरोजगारी तर आधीपासूनच होती. वयात आलेल्या ह्या मुलांसमोर बेरोजगार पित्याशिवाय काहीच नव्हतं. सगळ्या व्यवस्थेवरचा विश्वास उडालेला होता. पैसे मिळण्याचं आकर्षण होतं. गुंडांकडून धुमधडाक्यात साजरे होणारे सण दिसत होते. त्यांना मिळणारा मान दिसत होता. अशा स्थितीत गिरणी कामगारांची काही मुलं अंडरवर्ल्डकडे आकृष्ट झाली. काही जणांनी फेरीच्या धंद्याप्रमाणे धंदे करण्याचा प्रयत्न केला. त्यातही टोळ्यांचा राज्य होतं. मग वेगवेगळ्या मार्गांनी ही मुलं अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश करती झाली. चाळीचाळीत भाई तयार होऊ लागले. कोणत्या तरी गँगशी संबंधित आहे, यात काही गैर वाटेनासं झालं. पोलिसांच्या फायलींमध्ये ज्या अनेक गुंडांच्या नोंदी होत्या त्यातील तपशील पाहिला तर पिता कोणत्या तरी गिरणीत कामाला होता, असा उल्लेख सापडतो. एकूणच अंडरवर्ल्डमध्ये मराठी गुंडांचं प्रमाण अधिक असण्याचं हेही एक कारण असावं. प्रभादेवीच्या गरम खाड्यात बाबा गुडे गँग, गिरगावच्या क्रांती नगरात दशरथ रहाणेची गँग, परळ व्हिलेजमधील सुरेश मंचेकर गँग अशा जागोजाग गँग तयार होऊ लागल्या. चिंचपोकळीची अमर नाईक गँग उदयाला आली तीच मुळी फेरीवाल्या गटांच्या वादावादीतून. बापट गँगच्या कहाण्या आजही दादरच्या फेरीवाल्यांमध्ये रंगतात. मराठी माणसाचा अंडरवर्ल्डशी अधिकचा संबंध आहे तो असा.
खुद्द गवळीचा जीवनक्रम पाहिला तर त्याच्या टोळीत काहीच भेदभाव मानला जात नव्हता. अस्सल मराठमोळा गवळी हिंदूंचे सगळे सण, उत्सव विधीपूर्वक साजरे करतो. मात्र त्याच्या टोळीत मराठी गुंडांचं प्राबल्य असलं तरी मुस्लिमही गुंड होतेच. खुद्द गवळीची पत्नी आशा गवळी ही पूर्वाश्रमीची मुस्लिम समाजातील झुबेदा मुजावर. लग्नानंतर तिने धर्मांतर केलं. दुसरीकडे दाऊद देशद्रोही ठरला तो १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर. पण तोपर्यंत त्यालाही हिंदू अथवा मराठी गुंडांचं काहीच वावडं नव्हतं. किंबहुना अनेक मराठी गुंडांमुळेच दाऊद मुंबईच्या अधोजगतावर राज्य करू शकला, हे वास्तव आहे. सतीश राजेची पत्नी ही दाऊदची मानलेली बहीण. चेंबूरला राजन निकाळजे ऊर्फ छोटा राजन तर दाऊदचा उजवा हात. सुनील सावत्या, श्रीकांतमामा देसाई, अनिल परब, सुभाष कोंचिकुर्वे, माया डोळस, संजय रग्गड, नरेश जुकर अशा अनेक मराठी गुंडांनीच दाऊद टोळीसाठी थरारक कारवाया केल्या. तसं पाहिलं तर अंडरवर्ल्डमध्ये धर्म, प्रांतवादाचे अडथळे कधीच दिसले नाहीत. राजकारणात बोलाचा भात आणि बोलाचीच कढी असते. काळाने हे खरं ठरवलं आहे. जसा अतिरेक्यांना धर्म नसतो तसंच गुंडांनाही धर्म, जात नसते, हे उघड आहे. केवळ राजकारणाप्रमाणेच कुठल्यातरी मुद्दयाचा आपल्याला फायदा झाला तर तो मात्र नेत्यांप्रमाणेच गुंडानाही हवा असतो, इतकंच आपण म्हणू शकतो.
‘आमचा गवळी’
1
Share.
1 Comment
अभ्यासपुर्ण लिख़ाण…