आजकाल मराठीचा ट्रेंड आहे, वाचताना वेगळं वाटेल कदाचित. पण सध्या मराठमोळं सजण्या-नटण्याकडे तरुणींचा कल वाढलाय. सणासमारंभाला साडी नेसून नथीपासून छल्ल्यापर्यंत सारे पारंपरिक दागिने परिधान करण्यास पसंती मिळू लागलीय. जिन्स, कुर्तीच्या रूटीनमध्ये एक दिवस वेगळा, हा विचार त्यात प्रामुख्याने असल्याचं लक्षात आलं. पण पेहरावातून मराठमोळंपण जपताना मराठी जपण्याचा, ती जगण्याचा प्रयत्नही व्हायला हवा.
मकरसंक्रांतीचा गोडवा, साजिरी दिवाळी, मंगलमय गणेशोत्सव, सोनेरी दसरा, उत्साही नवरात्री, प्रेममयी रक्षाबंधन, भाऊबीज… मराठी सणांची यादी तशी वाढतीच. वेेगवेगळ्या समाजानुसार, ठिकाणांनुसार ती साजरी करायची पद्धतही वेगळी. अर्थात यासाठी महिलांचा उत्साह मोठा. किंबहुना तो तिच्या आनंदाचाच भाग. पण काळानुसार आता महिला व्यग्र होत आहेत. ऑफिस, घर, संसार, ह्या सगळ्या खटाटोपात इतक्या सणांसाठी वेळ देणं जरा कठीणच. म्हणूनच मग हे सणसमारंभ आणि त्या ओघाने पोशाखापासून जेवणापर्यंत खास महाराष्ट्रीय साग्रसंगीत तिला जमेल का, याबाबत अनेक प्रश्न आधीच्या पिढीने उभे केले. लग्न ठरवण्याच्या बोलणीत तर ही अपेक्षा आवर्जून व्यक्त होऊ लागली. आम्हाला मुलगी घरचं आवडीने सगळं करणारी हवी, हे ठळकपणे मांडलं जाऊ लागलं. पण करिअरची विविध कवाडं उघडणाऱ्या आजच्या तरुणीलाही हे सणसमारंभ आणि त्या अनुषंगाने येणारं साजरेपण आवडतंय, मनापासून.
अगदी रोज नाही, पण काही खास निमित्ताने साडी नेसण्याचा तिचा अट्टहास असतो. त्यानिमित्ताने सजता येतं, ही त्यामागची एक मानसिकता. साडीवर खास महाराष्ट्रीय ढंगाचा श्रृंगार असतो. अगदी कोल्हापुरी साज, नथ, खोपा, बाजूबंद, छल्लाही वापरण्याचा ट्रेंड सध्या पाहायला मिळत आहे. नथीचे तर नानाविध प्रकार बाजारात आहेत. रोज लहानशी नोझरिंग वापरण्याचं प्रमाण वाढलंय. एव्हरग्रीन पैठणीलाही तरुणींची पसंती मिळते. म्हणजे डिझायनर साडीपेक्षा पैठणीचा रुबाब वेगळाच, असं तरुणी हमखास सांगतात. अशा अनेक फॅशन डिझायनर आहेत, ज्या पैठणीपासून ट्रेंडी ड्रेस तयार करतात आणि त्याला रॅम्पवर सादर करतात. आजकाल लग्नसमारंभात विधीच्या वेळी नऊवारी नेसण्याचा कल अनेक तरुणींचा असतो. पण आता ह्या नऊवारीतही पैठणीला पसंती मिळत आहे. अनेक लग्नात पैठणी अशी थीमच ठरवलेली असते. म्हणजे त्या कुटुंबातील सगळ्या महिला ठरवून पैठणी नेसतात. त्यावर छान मोत्याचा श्रृंगार केला जातो. केशरचनेतही खोपा अधिक पसंतीचा ठरत आहे. अगदी रोजच्या सणवारालाही महिला आवर्जून साड्या नेसतात. विविध सणही एका विशिष्ट थीमवर साजरे केले जातात. साडी कधीच ट्रेंडबाहेर जात नाही. पण आजच्या तरुणी साडीतूनही वेगवेगळे ड्रेस तयार करू पाहतात. अनारकली, घागरा चोली, किंवा अशाच पद्धतीचं काही नावीन्यपूर्ण वापरायला आवडतं. पैठणीच्या ड्रेसनाही विशेष मागणी असते, असं फॅशन डिझायनर केतकी शहा मुक्कीरवार सांगते. केतकी गुजराती असली तरी ती मराठी परंपरा अट्टहासाने पाळते. तिचं शिक्षणही मराठीतून झालं आहे. यंदाच्या मकरसंक्रांतीला तिने हळदीकुंकवासाठी महाराष्ट्रीय थीम ठेवली होती. त्यामुळे अमराठी महिलांनीही मराठमोळा पेहराव केला होता. कीर्तीने प्रॉप्स म्हणून नथ, चंद्रकोर ठेवली होती. सणवार हे एक प्रकारचं गेटटुगेदर असतं. त्या निमित्ताने मराठीपण रुजण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं ती सांगते. तिने घरही विशिष्ट पद्धतीने सजवलं होतं. साड्यांची सजावट करून त्यावर पतंग लावल्या होत्या. फेसबुकला हे फोटो हिट ठरले. काही महिला तर फेसबुक, इन्स्टाग्रामवर १०० साड्या, हे आव्हानही स्वीकारतात. म्हणजे १०० साड्या नेसून त्याचे फोटो ह्या सोशल मीडियावर अपलोड करायचे, ही त्यामागची संकल्पना.
ह्या सगळ्या मराठमोळ्या पेहरावाबाबत तरुणी सांगतात, रोज आपण कुर्ती, जीन्स अगदी वन पीसही वापरतो. पण वर्षातील काही दिवस पारंपरिक पेहरावाने खास होतात. सण साजरे केल्याचा आनंदही मिळतो आणि जरा वेगळं तयार झाल्यावर आपल्यालाही मानसिक समाधान मिळतं. अर्थात सोशल मीडियावर लाइक्सही. ह्या सगळ्याचा विचार केला तर त्यात सोशल मीडियाचा बराचसा प्रभाव असल्याचं कुणिका बनसोडे सांगते. सोशल मीडिया तुम्हाला हे मराठीपण जपण्यात उद्युक्त करतो आणि ते खूप छान आहे, असं तिचं मत आहे. म्हणजे मी देवळात जाते. सणानुसार पारंपरिक पोषाख परिधान करते. मला हे कुणी सांगितलेलं नाही. पण आईचं बघून स्वतःहून हे करते. त्यात मला आनंद मिळतो, असंही ती सांगते. सोशल मीडियामुळे आजकाल प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन जोरदार होऊ लागलंय. एकमेकांचे फोटो, व्हिडिओ बघून आपणही हे करावं असं वाटतं आणि हळूहळू तो ट्रेंड बनतो. मराठमोळ्या पेहरावाच्या वाढत्या क्रेझबाबतही ते झालं असेल. पण ती चांगलीच गोष्ट आहे, असं अमृता यद्रे सांगते. रोजच्या धकाधकीतून हा मराठमोळा आनंद मिळणार असेल तर तो का नाकारायचा, शिवाय कुटुंबव्यवस्था, परंपरा जपण्यासाठीही ते महत्त्वाचं आहे, असंही ती आवर्जून सांगते.
परदेशात गेलेल्या तरुणीही आपली सणसमारंभाची मराठमोळी परंपरा जपताना दिसतात. भारतात असताना सणांचं महत्त्व तितकं लक्षात आलं नाही, पण लंडनला आल्यावर ह्या सगळ्याची आठवण नक्की येते. आम्ही येथे प्रत्येक सण उत्साहाने साजरा करतो. गुढीपाडवा, दिवाळी, होळी, संक्रांतीपासून अगदी वटपौर्णिमाही. आपल्या मुलांना भारतीय संस्कृती कळावी, त्यामागील भावना रुजावी, हा त्यामागचा उद्देश खरंतर, त्याचबरोबर देशापासून दूर राहून त्या मातीतील सण येथे साजरे करण्याचं समाधानही मोठं असतं. म्हणून आम्ही मराठी कुटुंब एकत्र येऊन सण साजरे करतो. डान्स, गाणी, नाटक, मराठमोळी मेजवानी आणि पेहराव, असं त्याचं स्वरूप असतं, असं जयश्री सांगते. जयश्रीने आपल्या मुलाचं बोरन्हाणही अलीकडेच केलं. लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालून सजण्यासाठीही तरुणी उत्सुक असतात. काळ्या साडीचा मोहही त्यांना आवरता येत नाही.
कुटुंबव्यवस्थेतही मराठीपण जपण्याचा तरुणी प्रयत्न करत असतात. अगदी धकाधकीची नोकरी असेल तरीही त्यातून वेळ काढत सणसमारंभ साजरे करण्याचा त्यांचा कल असतो. म्हणजे दिवाळीचा सुग्रास संपूर्ण फराळ करणं जमलं नाही, तरी फक्त लाडू किंवा चिवडा करायचा आणि बाकीचा विकत आणायचा, असा मध्यम मार्गही त्या काढतात. गणेशोत्सव आपली नोकरी सांभाळून त्या साजरा करतात. एकूणच कुटुंबव्यवस्थेत मराठीपण जपण्याचा प्रयत्न होतो. तरुणी आपल्या वेळेनुसार सणसमारंभ साजरे करतात. अनेकदा त्यांना सवड नसल्याने त्याचे छोटे स्वरूप होते. पण दहा दिवसांचा गणपती कोणी पाच दिवसांवर आणत नाही. एकत्र कुटुंबपद्धतीही त्यांना हवीय. पण त्याची गणितं वेगळी असतात. नवं घर घेतलेलं असतं. ते भाड्याने देऊन हप्ते फेडायचे असतात किंवा आपल्या मुलाला एकत्र कुटुंबात सांभाळायला कुणीतरी असतं. तसंच घरखर्च तुलनेनं कमी असतो, हा विचार त्यामागे असतो, असं निरीक्षण अनुरुप विवाहसंस्थेच्या गौरी कानिटकर नोंदवतात.
आजचा मराठी दिन साजरा करताना हे तसं सकारात्मक चित्र दिसत असलं तरी त्यामागची विचारसरणी लक्षात घ्यायला हवी. म्हणजे आपल्या मुलाला मराठी शाळेत; किंबहुना मातृभाषेत शिक्षण द्यावं, असं शिक्षणतज्ज्ञ सांगत असले तरी त्याकडे सोयीस्कर लक्ष दिलं जात नाही. आपलं मूल इंग्रजी शाळेत शिकावं, हा सामाजिक पायंडा असेलही कदाचित, पण मग त्या मुलाला इंग्रजीबरोबर मराठीचं ज्ञान देणंही आवश्यक आहे. तुला आणखी राइस हवाय का, असं इंग्रजीमिश्रित बोलण्यापेक्षा ही नेहमीची वाक्य संपूर्ण मराठीत बोलणं सहज शक्य आहे. त्याला आपल्या भाषेची गोडी लागावी, यासाठी घराघरांत प्रयत्न होताना दिसत नाहीत. दक्षिण भारतात ज्ञानाची भाषा आणि मातृभाषा निराळी असते. म्हणून ह्या मुलांचे दोन्ही भाषांवर प्रभुत्व असते. आज प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये दक्षिण भारतीय वृत्तपत्रांचा खप त्यामुळेच अधिक असतो. आमच्या खिशात पाच रुपये असतील आणि दोन पर्याय असतील की ह्या पाच रुपयांत खायचं की मातृभाषेतील वर्तमानपत्र वाचायचं तर वर्तमानपत्राला प्राधान्य दिल जाईल, असं एका दक्षिण भारतीय पत्रकाराने सांगितलं होतं. दुसरा मुद्दा आजच्या तरुणींच्या पेहरावाचा. आजकाल मराठी पोशाखाचा ट्रेंड दिसत असला तरी हे मराठीपण अनेक तरुणींना रोजच्या जगण्यात नको आहे. मराठी भाषेचा वापरही त्यांच्या रोजच्या बोलण्यात नसतो. नुकत्याच एका घरगुती कार्यक्रमात जाण्याचा योग आला. त्यामध्ये एका मराठमोळ्या घरातील एक तरुणी आपल्या आईबाबत वाटणाऱ्या भावनांविषयी केवळ एक वाक्यही मराठीत बोलू शकली नसल्याचं दिसलं. तिला याबद्दल विचारल्यावर आम्ही तीन मैत्रिणी मराठी असलो तरी एकमेकींशी रोज हिंदीतून बोलतो, असंही तिने सांगितलं. म्हणूनच सण, उत्सव साजरे करताना मराठमोळेपण जपण्याचा प्रयत्न होतोय, ही चांगलीच गोष्ट आहे. पण त्याबरोबरच प्रत्येकाने मराठी जपण्याचाही किंबहुना ती जगण्याचा प्रयत्न नक्कीच करायला हवा. किमान मराठी घरातील रोजचा संवाद मराठीतून झाला, तरी औटघटकेच्या ट्रेंडपलीकडे मराठी मनामनात रुजेल.
ट्रेंड साजरेपणाचा…
0
Share.